मनुष्य शरीर अविरत कार्यरत असते. विविध संस्था (Systems) एकत्र येऊन शरीराचे विविध कार्य आपसूक घडवून आणत असतात. यामध्ये शरीराची झीज होते आणि टाकाऊ घटक निर्माण होतात. या सगळ्याचे शरीरातून निष्क्रमण होणे अत्यंत गरजेचे आहे. टाकाऊ घटक जर शरीरात बराच काळ राहिला, तर शरीरात अपाय उत्पन्न होऊ शकतो. या टाकाऊ घटकांचे निष्क्रमण विशिष्ट पद्घतीने, नियमित अंतराने होत असते. यालाचा ‘शारीरिक वेग’ (Physical Urges) म्हणतात. प्राकृतिक शारीरिक वेगांचे शरीरातून वेळोवेळी बहिर्गमन करणे जर व्यवस्थित सुरू असले, तर विविध शारीरिक तक्रारी, कुरबुरी, आजारांपासून बचाव करता येतो. त्याचबरोबर उत्साह, चैतन्य, हुशारी चांगली टिकते. तेव्हा, त्याविषयी सविस्तर आजच्या भागात जाणून घेऊया.
शारीरिक वेग शरीरात विशिष्ट ठिकाणी उत्पन्न होतात आणि उत्सर्जनासाठी इतर अवयवांकडे नेले जातात. या वेगांनादेखील गती असते, Movement असते. शरीरामधील ही हालचाल, प्रवास करण्याची क्षमता केवळ वातदोषामध्ये आहे; कारण तो गतिमान आहे. सूक्ष्म पेशींपासून मांसल पेशींपर्यंत कुठेही हालचाल (Movement) असल्यास, ते वाताच्या सक्रिय सहभागाशिवाय शक्य होत नाही. शारीरिक वेग उत्पन्न झाला; पण त्याचे उत्सर्जन वेळेत झाले नाही, तर वाताचा जोर वाढू शकतो. असे वारंवार होऊ लागले किंवा सतत करावे लागले, तर वाताची दुष्टी (Vitiation) होऊन विविध शारीरिक, मानसिक व भावनिक लक्षणे उत्पन्न होतात. या लक्षणांची तीव्रता वाताच्या दुष्टीवर अवलंबून आहे. वेगांचे धारण कधीतरी क्वचित होत असेल, तर शरीरातील टाकाऊ घटकांची शरीरात साठवून प्रदीर्घ काळ होते व त्यामुळे छोट्या-मोठ्या शारीरिक तक्रारी सुरू होऊ शकतात. असे वारंवार जर होऊ लागले, तर सर्वप्रथम वातदोषाची दुष्टी होते व नंतर पित्त व कफ दोषही बिघडतात. मग तिन्ही दोषांमधील समतोल (Equilibrium) बिघडतो आणि विविध रोगांची उत्पत्ती होऊ लागते. केवळ औषधोपचाराने त्यांना संपूर्ण आटोक्यात आणता येत नाही, जोपर्यंत त्या व्याधीचे मूळ कारण शोधून ते थांबविले जात नाही. शारीरिक प्राकृतिक वेगांचे धारण वारंवार व बराच कालावधीसाठी ती व्यक्ती जर करत असेल, तर त्याचा परिणाम केवळ शारीरिक यातनांमध्ये दिसत नाही, तर त्याचबरोबर मनोकायिक रोग (Psychomatic disorders) सुद्धा उत्पन्न होतात. मनोकायिक व्याधीमध्ये ताणतणाव, चिंता उत्पन्न होऊन त्याचा परिणाम शरीरावर घडतो व विविध शारीरिक लक्षणे व व्याधी निर्माण होतात. जसे, ग्रहणी एलूशार सारखे विविध त्वचाविकार, मायग्रेन, डोकेदेखी सारखे शिरःशूलाचे प्रकार, तीव्र स्वरूपाची व जीर्ण स्वरुपाची वेदना/शूल , सतत गळून जाणे, मरगळ वाटणे, मधुमेह, संधिवात, हृदयरोग, स्थौल्य इ. अशा वेळेस फक्त व्याधींच्या लक्षणांची चिकित्सा करून पुरेसे होत नाही. व्याधीमुक्त होण्यासाठी व्याधी निर्माण होण्याची कारणे जाणून घेऊन त्या कारणांचे शरीरातून समूळ उच्चाटन करणे, ही मुख्य चिकित्सा आहे.
अशा असाधारणीय शारीरिक वेगांच्या श्रृंखलेतील अजून एक वेग म्हणजे श्रमश्वास. श्वास म्हणजे केवळ श्वासोच्छ्वास येथे अपेक्षित नाही. येथे श्वास म्हणजे दम लागणे होय, श्वास कमी पडणे होय. ‘श्रमश्वास’ हा दोन शब्दांनी तयार झाला आहे. श्रम आणि श्वास. श्रम म्हणजे कष्ट, शारीरिक हालचाल. शरीराची हालचाल केल्यावर स्वाभाविकतः थोडी धाप लागते, श्वासाची गती वाढते. काही वेळेस नाकाने श्वासोच्छ्वास (श्वास) घेणे अपुरे वाटते व तोंडाने श्वास घेतला जातो. शरीराचे काम सुरू असताना श्वासोच्छ्वास एका विशिष्ट लयीत व गतीत सुरू असतो. जशी शारीरिक हालचालीची गती व जोर वाढतो, तशीच श्वासोच्छ्वासाची गतीही वाढते.
द्रूत चालणे धावणे नाचणे, चढणे (पायर्या, डोंगरचढ इ.) व्यायाम इ.मध्ये शरीराच्या हालचालींची लय व गती वाढते व त्यानुसार श्वासाची प्राणवायूची गरजही वाढते. ही वाढीव गरज भागविण्यासाठी आधी श्वसनाची गती वाढते व ती कमी पडू लागली की, तोंडावाटे श्वासोच्छ्वास केले जाते. यालाच ‘श्रमश्वास’ म्हणतात. जशी गरज वाढली, तशी प्राणवायूची उपलब्धता वाढवून देण्यासाठी शरीराने स्वाभाविकपणे केलेला ही उपाय आहे. जसजशी शारीरिक हालचालीची गती वाढते, प्राणवायूची गरज वाढते. ही गरज मुखावाटे श्वसनाने पूर्ण केली जाते.
पण, काही वेळेस हा श्रमश्वासाचा वेग अडविला जातो. लांब लांब श्वास नाकावाटेच घेतला जातो. असे क्वचित केल्यास (कधीतरी केल्यास) दम लागलेला कमी होण्यास थोडा अधिक वेळ लागणे, इतकेच होते. पण, हे जर वारंवार करण्याची सवय जडली, तर शरीरातील वाताची गती बिघडते व प्राण उदान व व्यान या वाताच्या प्रकारांमध्ये दुष्टी, बिघाड निर्माण होतो. म्हणजे वाताच्या नियमित कार्यामध्ये बाधा निर्माण होते. असे दीर्घकाळ होत राहिले, तर विविध व्याधी उत्पन्न होऊ शकतात. श्रमश्वासाचा वेग जर थांबविला, तर कधीकधी भूरळ, चक्कर येऊ शकते, मूर्छा येते. चक्कर आल्याने काही वेळेस भ्रमितावस्थाही निर्माण होऊ शकते. श्रमश्वासामुळे छातीत जडत्व जाणवू शकते, बेचैनी, घसा कोरडा पडणे, छातीचे ठोके जोरजोरात पडत आहेत, असे भासणे, कानात कलकलाट होणे, डोके सुन्न होणे इ. लक्षणे उत्पन्न होऊ शकतात. तसेच पोटात गुब्बारा आल्यासारखे होते. पोट फुगल्यासारखे होते (ऊळीींशपवशव) व पोटात गोळा आल्यासारखेही होऊ शकते. श्रमश्वासाच्या वेगाचे धारण केल्यामुळे प्राणवह संस्था व रसवह संस्था या दोन संस्थानांवर परिणाम होऊन त्यांच्या कार्यामध्ये अडथळा, बाधा, दुष्टी उत्पन्न होते. या संस्थांचे विविध रोग उत्पन्न होऊ शकतात.
श्रमश्वासाच्या वेगधारणाने जर काही शारीरिक, मनोकायिक लक्षणे निर्माण झाली, तर त्या लक्षणांवर त्वरित चिकित्सा तर घ्यावीच, पण त्याचबरोबर वेगधारणामुळे अपाय झाल्यास इतर उपायही करावेत. जसे, श्रमश्वासाच्या वेगधारणाने वाताची गती बिघडते. ती नियमित करण्यासाठी वातघ्न क्रियाकर्म-चिकित्सा उपक्रम करावेत. यामध्ये अन्नपानातील बदल (पथ्यपालन), अभ्यंग (सर्व शरीराला तेल लावून हलके चोळणे, जिरवणे), शिरोऽभ्यंग, शिरोधारा, कर्णपूरण, पादाभ्यंग, बस्ती व अन्य चिकित्सा जेणेकरून दुषित झालेला वात नियंत्रित करता येईल. पंचकर्माचे शुद्धी करताना, दीर्घश्वसन व स्नेहपान (तेल-तूपाचे सेवन करणे) व आभ्यंतर औषधी चिकित्सा यांचीही अवलंब करावा.
श्रमश्वासाच्या वेगाने धारण केल्यास सर्वप्रथम विश्रांती घ्यावी, विश्राम करावा. श्वसनाची वाढलेली गती नियंत्रित येईपर्यंत आरावा करावा, पडून राहावे. घशाला कोरड पडली असल्यास पाणी प्यावे. तोंडात पाणी धरावे (कवल - गंडूषधारण), चेहर्यावर पाणी मारावे. यामुळे दम लागल्यावर आलेला थकवा, मरगळ, चक्कर यांतून लवकर बरे वाटू लागते. दीर्घश्वसन करावे आणि पुनःपुन्हा वेगधारण केले जाणार नाही, याकडे लक्ष ठेवावे.(क्रमश:)
वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
९८२०२८६४२९