जगी पाहता देव कोट्यात कोटी

    13-Feb-2025
Total Views | 31

samarth ramdas swami
 
विश्वव्यापाराचा विचार केला, तर या जगातील जीव अव्यक्तातून व्यक्त दशेला येणे आणि काही काळानंतर, व्यक्तातून अव्यक्तस्थितीला जाणे या प्रक्रिया अनंतकाळापासून अखंडपणे चालू आहेत. हे सांभाळणारी कुणीतरी अज्ञात शक्ती असली पाहिजे, या कल्पनेतून देव-देवतांची निर्मिती झाली आहे. जो तो आपापल्या देव-देवतांचा अभिमान बाळगून राहिला आहे. अडाणी- अशिक्षित माणसांनी परंपरागत तसेच अज्ञानी समजुतींनी, भीतीपोटी अनेक देव मानले व ते त्यांची भक्ती करू लागले. वेद-विद्या जाणणार्‍या सुशिक्षितांनीही वेदोक्त देवदेवता मान्य करून, ते त्यांची उपासना करू लागले. परंतु, आत्म-अनात्म विवेकाने विचार केल्यावर, या बहुविध देवदेवतांच्या कल्पनेतील फोलपणा दिसून येतो. मूळ ‘देव’ कल्पनेचा शोध घेत असताना समर्थांनी, तर्कशास्त्रातील कार्यकारणभावाच्या आधारे सामान्य माणसांच्या मनातील उपरोक्त देवकल्पनांचे खंडन केले आहे. देवदेवतांसंबंधी सामान्य जनांच्या मनातील कल्पना तशाच पुढे चालू ठेवून, अनेक देवदेवतांच्या संभ्रमावस्थेत मुख्य देवाला कसे ओळखायचे? हेच कळेनासे झाले आहे असे प्रतिपादन, स्वामींनी केले आहे. तो श्लोक असा आहे,
 
जगीं द्वादशादीत्य हे रुद्र अक्रा।
असंख्यात संख्या करी कोण शक्रा।
जगीं देव धुंडाळिता आढळेना।
जगीं मुख्य कोण कैसा कळेना॥१७६॥
 
वेदांमध्ये आणि पुराणांत अनेक देवदेवतांची वर्णने आली आहेत. त्यांच्या काम्य उपासनेचीही वर्णने आहेत. वैदिक वाङ्मयातील मुख्य देवता आदित्य, रुद्र, अग्नी, इंद्र, सोम, वरुण इत्यादींपैकी आदित्य, रुद्र आणि इंद्र (शक्र) यांचा उल्लेख स्वामींनी वरील श्लोकात केला आहे. आदित्य म्हणजे अदितीचे पुत्र; अदिती ही कश्यपांची पत्नी असून ती देवांची जननी आहे. तथापि, प्रस्तुत श्लोकात आदित्याचा संदर्भ १२ सूर्यांशी आहे. रुद्र हा देवांचा समुदाय आहे. रुद्र ११ आहेत. रुद्राचा दर्जा महादेवांपेक्षा कमी मानला आहे. इंद्र देवांचा राजा. तथापि, सृष्टिनिर्मितीनंतर असंख्य इंद्र होऊन गेले. त्यांची गणना करता येत नाही. अशा परिस्थितीत, मुख्य देव कसा ओळखावा, हे लोकांना कळेनासे झाले आहे. याउलट संतांनी शोधलेल्या देवाचे स्वरूप शाश्वत असून, ते ‘सत-चित् आनंद’ असे आहे आणि तोच देवांचाही देव आहे.
 
त्याला समर्थांनी ‘थोरला देव’ असे संबोधले आहे. त्यालाच मुख्य देव म्हणावे. पण, तो देव अशाश्वताच्या पसार्‍यात सापडत नाही. त्याला शोधायचे, तर प्रथम आपल्या ठिकाणची देहबुद्धी व अहंभाव यांचे विसर्जन करून, आपल्या अंतःकरणात त्याच्या शोधार्थ स्थूलकडून सूक्ष्माकडे इंद्रियातीत होऊन, उलट प्रवास करावा लागतो. तेव्हा शाश्वत ब्रह्म सापडते. ते तत्त्व सापडल्यावर विश्वांतर्गत अविनाशी तत्त्वाचा प्रत्यय अनुभवाने घेता येतो. ते अतीन्द्रिय अविनाशी परमात्मत्व कसे आहे, हे आता स्वामी सामान्यांना समजेल अशा भाषेत पुढील श्लोकातून सांगत आहेत,
 
तुटेना फुटेना कदा देवराणा।
चळेना ढळेना कदा दैन्यवाणा।
कळेना कळेना कदा लोचनासी।
वसेना दिसेना जगीं मीपणासी॥१७७॥
 
ही चर्चा गहन विषयाकडे वळण घेत असल्याने, श्लोकपाठकाला थोडा वैचारिक विसावा मिळावा म्हणून स्वामींनी या श्लोकात ‘ना’ अक्षरावर अनुप्रास साधत थोडी मजा आणली आहे. सद्वस्तूच्या शाश्वततेचा अनुभव म्हणजेच ब्रह्मानुभूती हीच ‘थोरल्या देवा’चा साक्षात्कार असल्याने, त्याचे वर्णन करताना स्वामी म्हणतात की, “तो तुटत नाही, फुटत नाही किंवा त्याचे स्थलांतर होत नाही.” येथे भगवद्गीतेतील ‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि ... (२.२३)’ या श्लोकाची आठवण येते. सद्वस्तूचा अनुभव हा दिव्यत्वाचा अनुभव असल्याने, तेथे भौतिकतेचे गुणधर्म लावून चालत नाही. असा ‘तुटेना फुटेना’ याचा संदर्भ तत्कालीन सामाजिक स्थितीशी लावता येतो. समर्थांच्या काळी मूर्तिभंजक म्लेंच्छांनी हिंदूंची देवळे व त्यातील मूर्तींची तोडफोड केली होती. लोक हताश, निराश झाले होते. अशा वेळी त्यांचे धैर्य परत आणण्यासाठी, मूर्तीची तोडफोड झाली, तरी देव कधी तूटत नाही, फुटत नाही, हे सांगणे जरुरीचे होते. ते स्वामींनी केले आणि खर्‍या देवाचे अस्तित्व जाणण्यासाठी, अंतःकरणात उतरण्याची शिकवण दिली. देव अविनाशी असल्याने, भौतिक साधनांनी आपण त्याला पाहू शकत नाही. तो चर्मचक्षूंनी दिसणार नाही. मीपणा, देहबुद्धी, अहंकार काठोकाठ भरलेल्यांना आपल्या इंद्रियांद्वारा त्याला जाणता येणार नाही. त्यासाठी देहबुद्धी, अहंभाव दूर सारून ज्ञानचक्षूंनी त्याला पाहता येईल, असे असले तरी लोक आपल्या आवडीनुसार देवाची निवड करतात आणि त्याच्या मूर्तीची पूजाअर्चा, आराधना करण्यातच धन्यता मानतात. ही सामान्य माणसाची मानसिकता पुढील श्लोकात सांगून, स्वामींनी प्रत्येकाला माझीच भक्ती कशी श्रेष्ठ आहे असे वाटत असते, ते सांगितले आहे.
 
जया मानला देव तो पूजिताहे।
परी देव शोधूनि कोण्ही न पाहे।
जगीं पाहतां देव कोट्यानकोटी।
जया मानली भक्ति जे तेचि मोठी॥१७८॥
 
जगात आपल्या अवतीभवती काय चालले आहे, ते आपण रोज पाहात असतो, अनुभवत असतो. याचा विलक्षण प्रभाव मानवी मनावर होत असतो. तेव्हा देवासंबंधी लोकांची मानसिकता कशी तयार होत गेली, हे आता स्वामी विस्तारपूर्वक सांगत आहेत. सर्वसाधारणपणे लोक आपल्या मनपसंत देवाची उपासना मोठ्या आवडीने करतात. त्या बहुतेक काम्य उपासना असतात. बहुतेकांचा असा समज असतो की, जे डोळ्यांना दिसते, इंद्रियांच्या अनुभवास येते, तेच सत्य. थोडक्यात, लोकांचा इंद्रियजन्य ज्ञानावर पूर्ण भरवसा असतो. त्यातून देहबुद्धी वाढीस लागते. ‘माझी उपासना श्रेष्ठ, मी करतो तेच बरोबर,’ असे समज त्यातून निर्माण होतात. सामान्य माणसे आपल्या आवडी-निवडी देवावर लादून, तशा स्वरूपात त्याला पाहतात व त्याची उपासना करतात. त्या सात्विक, राजस अथवा तामस आहेत काय? हा विचारही कोणाच्या मनात येत नाही. त्यातूनच पुढे आमच्या देवाला मद्य-मांसाचा नैवेद्य लागतो; अशी भाषा ऐकायला मिळते. या कल्पनांच्या बाजारात खर्‍या देवाचा शोध कोणीही घेत नाही. ‘परी देव शोधूनि कोण्ही न पाहे,’ हीच स्वामींच्या मनातील खंत आहे. माणसांनी आपल्या सर्व प्रकारच्या आवडी-निवडी देवांच्या ठिकाणी कल्पिल्याने, कामना पुरवणारे देव कोट्यान्कोटी आहेत, असे म्हणावे लागेल. वेदकालीन देवदेवतांचे आकर्षण समाजाला होते, हे स्वामींनी यापूर्वी सांगितले आहे. आता देवांच्या उपासनेत काम्य इच्छा पुरवणारे, तंत्र-मंत्र जाणणारे, स्वधर्मीय आणि परधर्मीय साधू, बाबा, फकीर, त्याचबरोबर स्वतःला आध्यात्मिक पुढारी म्हणवणारे यांचीही भर पडल्याने, उपासनेबाबत समाजात गोंधळाची स्थिती पहायला मिळते. समर्थांसारख्या ज्ञानी भक्ताला याचे वाईट वाटते. समाजाला या गोंधळातून बाहेर काढावे, यासाठी समर्थ तळमळीने उपदेश करीत आहेत, प्रयत्न करीत आहेत. संतवाङ्मयांचा इतिहास पाहिला, तर हे कार्य सर्व मराठी संतांनी आवर्जून केले आहे. समर्थांचा त्यात मोठा वाटा आहे.
 
समर्थांनी सांगितलेला ‘थोरला देव’ कसा गुप्त आहे व गुरूकृपेने तो दिसतो, हे पुढील श्लोकात स्वामींनी सांगून खर्‍या गुरूची लक्षणे, त्यापुढील श्लोकांत सांगितली आहेत. तो पुढील लेखाचा विषय आहे. (क्रमशः)
 
 
सुरेश जाखडी

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121