लोकसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच संपले, २०२४ च्या निवडणुकानंतरचे हे तसे पहिलेच अधिवेशन असल्याने विरोधकांकडून समंजसपणाची अपेक्षा होती. मात्र, ती अपेक्षाच राहील, याची काळजी विरोधकांनी घेतली. यावेळी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही ठिकाणी पीठासीन व्यक्तींना सातत्याने गोंधळाला शांत करण्याचे काम करावे लागत असे. शेवटी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना, सभागृहात संवाद साधण्यासाठीचे आदर्श वातावरण निर्माण करण्याची गरज वाटू लागली. नवनिर्वाचित सदस्यांना मार्गदर्शन करताना ती गरज त्यांनी व्यक्तदेखील केली. भारताच्या संसदेला अनेक मान्यवर विद्वान सदस्यांचा व्यासंग लाभला आहे. या संसदेची परंपरा जपण्याचे कार्य गेल्या ७५ वर्षांत इथल्या प्रत्येक सदस्याने केले. मात्र, जेव्हा विरोधीपक्षनेतेपदी बसवलेले राहुल गांधीच, विरोधकांना गोंधळ घालण्याच्या सूचना करतात, तेव्हा या परंपरांचे भान या व्यक्तीला आहे काय? असा प्रश्न उपस्थित राहणे नैसर्गिकच म्हणावे लागेल. सध्या संसदेत सरकारविरोधात रणनीती आखताना, संवादाला महत्त्व न देता, विरोधक सभागृह अस्थिर करताना दिसतात. विरोधकांचा पवित्रा हा बेभानपणाच अधोरेखित करतो. सरकारला चर्चा करण्याचा आग्रह करायचा आणि उत्तराला सुरुवात झाली की, असा गोंधळ निर्माण करायचा की, सरकारचे म्हणणे जनतेपर्यंत जाता कामा नये. मात्र, याने सभागृहाचा वेळ आणि जनतेचेच पैसे वाया जात असतात, हे विरोधक विसरतात. हे असले धंदे विरोधक फक्त लोकसभेत करतात असे नाही, तर राज्यसभेतही काही सदस्य असे आहेत, ज्यांना उपराष्ट्रपतींशी रोज वाद घालण्यातच जास्त रस असतो. त्यापैकी एक म्हणजे सर्वज्ञानी जयराम रमेश होय. प्रत्येक प्रश्नात विनाकारण गोंधळ निर्माण करण्याच्या अभूतपूर्व क्षमतेचे धनी म्हणजे जयराम रमेश होय. शेवटी, जगदीप धनखडांना जयराम रमेश यांना प्रत्येक प्रश्नावर गोंधळ निर्माण न करण्याबाबत तंबी द्यावी लागली. अधिवेशने ही नक्कीच जनहिताचे प्रश्न मांडण्यासाठी असतात, मात्र विरोधक अधिवेशन हे त्यांचे अस्तित्व दाखवण्याची संधी वाटत असल्यासारखेच गेले १० दिवस वागत असल्याने ओम बिर्ला यांना ही शाळा घ्यावी लागली. आता किमान या शिकवणीनंतर तरी संवाद कसा असतो, हे विरोधकांना उमजेल हीच अपेक्षा!
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या जवळ येऊन ठेपल्या आहेत, तसतशा आरोपप्रत्यारोपांच्या फैरी तीव्र झालेल्या आपल्याला दिसून येतात. आपल्या मतदारांशी जोडण्यासाठी प्रत्येक पक्षाने राजकीय यात्रा करण्याचे हे दिवस आहेत. राजकारण म्हटले की, टीका या आल्याच. मात्र, टीका करताना अवश्यक भान बाळगणे आवश्यक असते, याचे भान रोहित पवार यांना राहिले नाही. राष्ट्रवादीतील अन्य तरुणांशी स्पर्धा करत, सगळ्यांच्या मागे राहत सतत चर्चेत राहण्याचा उद्योग रोहित पवार करत असतात. अशाच चर्चेत राहण्याच्या हव्यासापोटी रोहित पवारांनी असे म्हटले की, “देवेंद्र फडणवीस मध्यंतरी असे म्हणाले की, इतिहासात कर्तृत्वाला स्थान असते.” ‘मला देवेंद्र फडणवीसांचे कर्तृत्व काय, असा प्रश्न पडतो’, असे वक्तव्य शरद पवार यांनीसुद्धा करण्याचे धाडस केले नाही, ते रोहित पवार यांनी केले आहे. मुळातच देवेंद्र फडणवीस यांचे आडनाव ’पवार’ नाही, आणि तरीही त्यांनी गाठलेली राजकीय उंची यातच त्यांचे खरे कर्तृत्व दाखवून देणारी आहे. मात्र, रोहित पवार यांना हे कळायचे नाही. राहुल गांधींची नक्कल करत महाराष्ट्रभर एक यात्रा काढली म्हणजे, आपले कर्तृत्व फडणवीसांपेक्षा मोठे असे रोहित पवार यांना वाटत असल्यास तो त्यांचा भ्रमच म्हणावा लागेल. देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंब फोडले, पक्ष फोडले अशी टीका रोहित पवार करतात. मात्र, या सगळ्या फोडाफोडीचे महामेरू रोहित पवार यांच्या घरातच आहेत, हे ते सोयीस्कररित्या विसरतात. पवार साहेब कृषीमंत्री असताना, महाराष्ट्रातला शेतकरी सुखी असल्यासारखे आरोप जेव्हा रोहित पवार तुम्ही करता, तेव्हा शेततळे योजना मविआच्या काळात बंद झाली, ती पुन्हा सुरु करण्यासाठी का नाही आवाज उठवलात? याचे उत्तरही तुम्हाला द्यावे लागेल. फक्त आरोप करायचे आणि पुरावे काही द्यायचे नाहीत, अशी सध्या एकूणच शैली विरोधी कंपूत विकसित होत आहे आणि निर्माण झालेल्या गोंधळाची संधी साधत नॅरेटिव्ह विकसित करण्याचे उद्योग विरोधक करत आहे. ज्यांनी मविआ काळातील गुंडगिरीविरोधात तोंडातून ब्र नाही काढला, ते आज राज्याच्या कायदा सुव्यवस्थेसहित अनेक प्रश्न विचारत आहेत, हा सुद्धा संभ्रम निर्माण करण्याच्या राजकारणाचा भाग म्हणावा लागेल.
कौस्तुभ वीरकर