'आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता हा सध्या तंत्रज्ञानातील परवलीचा शब्द. त्याचा वापर सकारात्मक पद्धतीने केला, तर मानवाचे जीवन सुकर होऊ शकते. याच उद्देशाने जगभरातील विविध क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर झपाट्याने वाढताना दिसतो. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या गृह विभागाचा कारभार हाती घेतल्यापासून, महाराष्ट्र पोलीस दलाला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू केला. ‘क्राईम जीपीटी’ ही संकल्पना त्याचाच एक भाग. त्यासाठी नागपूरमध्ये तयार करण्यात आलेला देशातील सर्वात डायनॅमिक सायबर प्लॅटफॉर्म सर्वच राज्यांसाठी अनुकरणीय. त्यातील ’कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर’ आणि ’सिंबा’ अॅप कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधुनिक अवतार. ’सिंबा’ अॅपमधील ’फेशिअल रिकगनिशन’ फिचरमुळे हरवलेल्या व्यक्ती किंवा गुन्हेगारांचा शोध घेणे शक्य होईल. गुन्हेगाराने चेहरा बदलण्याचा प्रयत्न केला, तरी ‘एआय’ प्रणालीचा वापर करून ओळखता येणे शक्य आहे. विशेष म्हणजे, ’कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर’शी संलग्न असलेल्या कोणत्याही कॅमेर्यामध्ये गुन्हेगार दिसल्यास त्याचा अॅलर्ट आणि लोकेशन तत्काळ सेंटरला मिळेल. त्याचप्रमाणे मोबाईल फ्रॉड प्रकरणातील गुन्हेगाराच्या आवाजावरून शोध घेणे शक्य होईल. नुसती भाषणे वा घोषणा करून बदल घडत नसतात, त्यासाठी ठोस कृतीची गरज असते. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची धुरा हाती घेतल्यापासून वेळोवेळी ते सिद्ध करुन दाखविले आहे. कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले, ते त्यांच्याच प्रयत्नांमुळे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून गुप्तवार्ता क्षमता भक्कम करता येतेच, शिवाय अपराधांचा पूर्वानुमान लावण्याची क्षमताही वृद्धिंगत होते, हे त्यांनी जगाला दाखवून दिले. पोलीस दलाला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड मिळाल्याने मशीनला माहितीचे विश्लेषण करून गुन्ह्यांची उकल करण्यासाठी तसेच होणारे गुन्हे रोखण्यासाठी मोठा लाभ होऊ शकेल. त्याचबरोबर गुन्हेगारांची गुन्हे करण्याची पद्धत जाणून, कुठे गुन्हा घडू शकतो, कुठे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते आदी बाबींचे अनुमान आधीच लावता येईल. त्यामुळे राज्याच्या पोलीस दलाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार्या देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करावे तितके कमीच!
करवतीची धार पुढे सरली तरी कापते, मागे सरली तरी कापते. सत्तेच्या मोहापायी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीची गतही अगदी तशीच. लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित यश मिळाल्यानंतर तिन्ही पक्ष एकसंध राहण्याऐवजी कुरघोडीतच गुंतले. विधानसभेत दुसर्याला अधिक जागा मिळाल्या, तर मुख्यमंत्रिपद हुकेल, या भीतीपोटी शह-काटशहाच्या राजकारणाला सुरुवात झाली. त्याची पहिली झलक दिसली ती विधान परिषद निवडणुकीत. शरद पवारांनी काँग्रेसला हाताशी धरून उद्धव ठाकरेंचा ’गेम’ करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मिलिंद नार्वेकर यांच्या सर्वपक्षीय संपर्काने त्यांना तारले. काठावरचा विजय मिळाला खरा, पण या निवडणुकीतील दगाफटका ठाकरेंच्या मनावर वर्मी घाव करून गेला. पवार कुणाचेच नाहीत, हे उशिरा का होईना त्यांना कळले. त्यामुळे सावध झालेल्या ठाकरेंनी विधानसभेसाठी स्वबळाची चाचपणी सुरू केली. राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांना बोलावून त्यांनी २८८ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. काही ठिकाणच्या संभाव्य उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचनाही केल्या. ठाकरे एकटे लढल्यास सर्वाधिक नुकसान होईल ते काँग्रेसचे; कारण शरद पवारांचा स्वभाव पाहता ते कुणाशीही जुळवून घेण्याची शक्यता अधिक. त्यामुळे झोपेतून जागे झालेल्या काँग्रेसने ठाकरेंच्या गुप्त बैठकांचा तपशील हायकमांडला कळवला. त्यांनी तत्काळ आपले दूत महाराष्ट्रात पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल आणि प्रभारी रमेश चेन्नीथला शुक्रवारी मुंबईत दाखल होतील. लोकसभेतील निकालाच्या भरवशावर न राहता, विधानसभानिहाय सर्वेक्षण करून काँग्रेसने यादी तयार केली आहे. ठाकरे आणि शरद पवारांशी फारकत घेतल्यास ३०च्या पुढे गाडी हलणार नाही, असा सर्वेक्षणाचा अंदाज आहे. अनुकूल असलेल्या मतदारसंघांतही बहुरंगी लढतींमुळे पराभवाला सामोरे जाऊ शकते. या सगळ्या शक्यतांचा पाढा या बैठकीत वाचला जाईल. त्यानंतर, उद्धव ठाकरेंची समजूत काढण्यासाठी हायकमांडचे दूत ‘मातोश्री’वर जातील. उद्धवराव नेहमीप्रमाणे ’रुसूबाई रुसू’चा खेळ खेळतील आणि सरतेशेवटी अधिकच्या जागा पदरात पाडून स्वतःला ‘मोठा भाऊ’ म्हणवून घेतील. अशावेळी स्वतःला ‘चाणक्य’ म्हणविणारे शरद पवार काय भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
सुहास शेलार