सध्या अमेरिका आणि वेस्ट इंडिज इथे सुरु असलेल्या टी-२० विश्चचषकाची स्पर्धा सुरु आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये एक वेगळाच उत्साह आहे. क्रिकेट म्हणजे भारतीयांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यात भारताचा संघ जर दृष्ट लागण्याजोगी कामगिरी करत असेल, तर मग भरातीय चाहत्यांच्या आनंदाला उधाण येते. हा होणारा विश्चचषक पहिल्यांदाच अमेरिकेत होत आहे. त्याच बरोबर अनेक गोष्टी या स्पर्धेत नव्याने होत आहेत त्याचा य लेखात घेतलेला आढावा....
बीसीसीआयने केली घोषणा : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने दि. 20 जून रोजी त्यांच्या वार्षिक नियोजनाची घोषणा केली आहे. क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असलेल्या 2024-25च्या वर्षात, भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल आहे. झिम्बाब्वे, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या निवडक देशांत भारतीय क्रिकेटपटू खेळणार आहेत, तर त्यांपैकी काही देशांचे दौरे भारतात आखले आहेत. त्यात भरपूर कसोटी, एकदिवसीय, 20 षटकांचे, कसोटी अजिंक्यपद, विश्वचषकाचे लघुरुप म्हणून ओळखली जाते अशी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा अशा पोटभर सामन्यांबरोबर, भारतात विविध ठिकाणी लोकप्रिय असलेल्या आयपीएलचाही समावेश आहे. देशोदेशीच्या निवडक क्रिकेटपटूंच्या लिलावातून उभे केलेले संघ, त्यांच्यातील खेळले जाणारे व अर्थकारण ढवळून काढणारे ’आयपीएल’चे सामने, मार्च 2025 ते मे 2025 या कालावधीत खेळली जाणार असल्याची अधिकृत घोषणाही झाली आहे.
रंगले सुपर आठ योद्धे : चालू वर्षासाठीचे आंतरराष्ट्रीय सामने भारतात मे महिन्याच्या अखेरिस संपले आहेत. तोच आता क्रिकेटचे दुसरे विश्वस्तरीय सामने विदेशात रंगले आहेत. टी-ट्वेंटी विश्वचषकाच्या नवव्या आवृत्तीचे सामने दि. 1 जूनपासून दि. 29 जूनपर्यंत, काही अमेरिकेच्या तर काही विंडीजच्या मैदानांवर खेळवले जात आहेत. भारत, पाक, ऑस्ट्रेलिया यांसारख्या प्रथितयश संघांसमवेतच अमेरिका, पापुआ न्यू गिनी, नामिबिया, ओमान, युगांडा अशा क्रिकेटमध्ये नाव कमवायला निघालेल्या 20 जणांच्यात होणार्या या स्पर्धेत प्रत्येकी पाच संघाचे चार गट असणार आहेत. भारत समाविष्ट असलेल्या ‘अ’ गटात पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका असे संघ होते. या चार गटांतील स्पर्धेनंतर प्रत्येक गटात शिर्षस्थानी असलेल्या पहिल्या दोन संघांसाठी पुढची फेरी सध्या चालू झाली असून, त्याला ‘सुपर आठ’ असे म्हटले जाते.
अशा निवडक ‘सुपर’ संघांमधील सामने हे आता, पहिल्या फेरीसारखेच खेळवले जात आहेत. ‘सुपर आठ’साठी पात्र ठरलेल्या आठ संघांची ’अ’ आणि ’ब’ अशा दोन गटांत विभागणी के ली गेली आहे. त्यातील ‘अ’ गटात भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया हे चार संघ प्रवेशकर्ते ठरले असून, दुसर्या ’ब’ गटात दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडीज, अमेरिका आणि इंग्लंड या देशांनी प्रवेश मिळवले आहेत. या दोन्ही गटातील प्रत्येक संघांचे तीन-तीन सामने खेळवण्यात येत असून, त्यातून दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरत आहेत. दि. 19 जूनपासून सुरू झालेल्या त्या फेरीत आठ संघांमध्ये एकूण बारा सामने सध्या सुरु आहेत. या ‘सुपर आठ’च्या दोन्ही गटांतील शीर्ष स्थानावरचे दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. उपांत्य फेरीत पोहोचायला त्यांना दोन विजय गरजेचे असतील. उपांत्य फेरीचे सामने ‘नॉक आऊट’ पद्धतीचे असून, त्यात हारणारा संघ स्पर्धेतून बाद होईल आणि विजयी दोन संघ अंतिम सामना खेळायला मैदानात उतरतील. दि. 29 जून रोजी ’बार्बाडोस’च्या मैदानावर अंतिम सामन्यात विजय मिळवण्यासाठी रोहित शर्माचा भारतीय संघ आता मैदानात उतरलाही आहे.
नरेशपुत्राची जन्मभूमी विरुद्ध कर्मभूमी : क्रिकेटमध्ये 360 डिग्रीचा खेळाडू असा असतो की, जो मैदानाच्या सर्व दिशेने फटके मारू शकतो. सुनील गावसकर त्याला ’मिस्टर 360 डिग्री’ नावाने ओळखतो. भारतात राष्ट्रीय स्तरावरील 19 वर्षांखालील क्रिकेटपटूंच्या चार दिवसीय कुचबिहार करंडकात नावाजलेल्या आणि ’मिस्टर 360 डिग्री’ म्हणून कीर्ती मिळवलेला सूर्यकुमार यादव आणि विद्यमान संघनेता असलेल्या रोहित शर्मा यांसोबत आपल्या क्रिकेटचा श्रीगणेशा करत, प्रारंभी भारतीय युवा संघाकडून आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला, मालाडचा सौरभ नरेश नेत्रावळकर. हा खेळाडू अमेरिकेतील ’ओरॅकल’ कंपनीत काम करत एक दिवस सॅनफ्रान्सिस्कोचा निवासी होतो आणि बघताबघता त्याचे नाव सगळ्यांच्या मुखी ऐकू येते. आपण जाणतो की, भारताच्या कानाकोपर्यांत क्रिकेट खेळले जाते. नेहमीच भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी चढाओढ असते. प्रत्येक स्थानासाठी तीव्र स्पर्धा असते. या कारणांस्तवच या सौरभसारखे युवक,बाहेरच्या देशांत नोकरीनिमित्त जाणे पसंत करतात. एका देशात तीन वर्षे वास्तव्य असेल, तर त्या खेळाडूला त्या देशाकडून खेळता येऊ शकते. अशा नियमांच्या आधारे सौरभ आणि मुंबईकर हरमित सिंग, तसेच अमेरिकेचा संघकप्तान असलेला गुजराथचा मोनाक पटेल, हे मूळचे भारतीय युवा क्रिकेटपटू, राष्ट्रीय संघाकडून खेळत आपले नाव कमावता यावे म्हणून प्रयत्नशील असतात. मग हेच युवक ‘जन्मभूमी विरुद्ध कर्मभूमी’ या विचारचक्रात अडकतात, आणि शेवटी भारतमातेच्या प्रेमाला तिलांजली देत क्रिकेटच्या वेड्या प्रेमापोटी अमेरिकी संघात भरवशाचे खेळाडू बनत समाधानी होतात. त्यातील भारतासमोरच्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्माला झटक्यात बाद करून, सौरभ हा मग अमेरिकेत ‘लोकल हीरो’देखील बनतो. सौरभ नेत्रावळकरची प्रारंभिक कल्पना अशी होती की, आपल्या अमेरिकन संघाची धाव जास्तीतजास्त साखळी सामन्यापर्यंतच असेल. त्या विचाराने तो आपल्या नोकरीत फक्त दि. 15 जूनपर्यंतच्या रजेचा अर्ज मंजूर करून घेतो. मात्र, अमेरिकेचा संघ साखळी सामन्यात द्वितीय स्थानावर जातो आणि त्यामुळे अमेरिकेला ‘सुपर आठ’मध्ये प्रवेश मिळतो. त्यामुळे त्याला आपली रजा वाढवून घेणे भाग पडते, म्हणून तो कंपनीत तसा रजेचा अर्ज टाकतो. अमेरिकेतील न्यूयॉर्कसारखी शहरे ही स्थलांतरितांची शहरे मानली जातात.
जगभरातून अनेक लोक नोकरी, व्यापारासाठी ये-जा करतच असतात. तसेच ते क्रिकेटमध्येही घडते. अनुभवले हाय व्होल्टेज : हे जसे विदेशातील भारतीय अमेरिकेत आहेत, तसेच काही पाकिस्तान वगैरे देशांतून आलेले खेळाडू देखील या संघात आहेत. या अमेरिकी संघाने पाकिस्तानला दि. 7 जून रोजीच्या ’जुम्मा’वारीच पराभूत केले. तोच पाकचा संघ दि. 9 जून रोजीच्या रविवारी भारताकडून पराभूत होत, शेवटी स्पर्धेतून बाहेर गेला. असे ते उत्कंठावर्धक ‘हाय व्होल्टेज’ टी-ट्वेंटी सामने आपणही अनुभवता आहोते.या ‘हाय व्होल्टेज’ सामन्यादरम्यान सट्टेबाज मंडळीदेखील आपल्या व्होल्टचे धक्के देत, आपले अर्थकारण उरकून घेताना आढळतात. आजकाल अमेरिकेत क्रिकेटचे वेड इतके वाढले आहे की, क्रिकेटच्याही सामन्यांची तिकिटे तेथील बास्केटबॉल, बेसबॉल, अमेरिकन फुटबॉल या त्यांच्या लोकप्रिय क्रीडा प्रकारांच्या तुलनेत ज्यादा दराने विकली जात आहेत. टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेआधी संपलेल्या आयपीएल सामन्यात खेळपट्या, हवामान, पाऊस असे मुद्दे संयोजकांना त्रासदायक ठरले नव्हते. आयपीएलमध्ये इंद्रदेवाच्या टीमचा सहभाग जवळजवळ नव्हताच, पण अमेरिकेत टी-20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान मात्र चित्र उलट दिसून आले. तेथील पाऊस, त्या अनोख्या खेळपट्ट्या यांमुळे सामनेदेखील कमी धावसंख्येचे निघाले. अमेरिकेत काही ठिकाणी पाऊस पडत होता. भारत-कॅनडासारखा सामना पावसामुळे रद्दच करावा लागला. सामना जर झालाच नाही, तर आमचे पैसे आम्हाला परत करा, अन्यथा आम्ही न्यायालयात जाऊ असे म्हणत तेथील स्थानिक वकील महाशयांनी न्यायालयात धाव घेण्याची धमकी दिली होती. असे सामने रद्द होत असल्याबद्दल सुनील गावसकरसारख्या अन्य वरिष्ठांनीदेखील आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांचा मतितार्थ असा होता की, आयसीसीने (आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिल) जेथे संपूर्ण मैदान पावसापासून सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी सामने आयोजित करूच नये. या स्पर्धेसाठी एवढा पैसा गुंतवला आहे, आणि तरीही ओल्या आऊटफिल्डमुळे सामने रद्द करण्यात येत आहेत. हे फक्त अमेरिकेतच नव्हे, तर वेस्ट इंडीजमध्येही होत असेल, तर ते कोणालाच योग्य वाटणार नाही.
सट्टेबाज आणि फिक्सर्स ठरत आहेत सुपर : भारतात पैसा, प्रतिष्ठा व पॉवरला पर्याय असणारे क्रिकेट, पहिल्यांदाच अमेरिकेत टी-20 विश्वचषकाच्या रुपात खेळले जात आहे. ‘टी-20’ विश्वकरंडक स्पर्धेने न्यूयॉर्क शहरात प्रचंड मोठ्या प्रमाणात क्रिकेटप्रेमी पर्यटक सामने बघायला आले होते. परिणामी भरमसाठ डॉलर मोजून हॉटेल पासून ते साध्या लॉजपर्यंत सगळे हाऊसफूल झाले आहे. उपहारगृहांमध्ये प्रतीक्षा करायला लागत आहे. टॅक्सीचालकांना भरपूर व्यवसाय मिळाला आहे. तेथे ये-जा करणार्या ट्रेनची तिकिटे हजारांनी विकली जात होती. या सगळ्या बरोबरीने तेथे सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती सट्टाबाजाराची. भारतात सट्टा अवैध असला, तरी अमेरिकेत सट्टा वैध मानतात. भरपूर पैसा असल्यामुळे, अनेक स्थानिक क्रिकेट संघांच्या भारतीय मालकांवरही या पैशांचा वर्षाव होत असतो. भारतात बेरोजगारांमध्ये आणि महाविद्यालयीन तरुणांमध्ये आयपीएल व टी-20 सारख्या विविध क्रिकेट सामन्यांत सट्टा हा जणू एक धंदाच झाला आहे. मग अधूनमधून भारतीय पोलीस सट्टा चालणार्या ठिकाणांवर कारवाई करत अनेकांना अटकही करतात. टी-ट्वेंटीचे पहिल्या फेरीचे सामने संपल्यावर पुढील फेरीचे सामने, वेस्टइंडीजमध्ये होत आहेत. त्याकडे जसे सगळ्या देशातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून राहीले आहे, तसेच लक्ष आता या सट्टेबाजांचेही लागलेले असेल.
सट्टेबाज आणि फिक्सर्स : हे अर्थकारण जसे मैदानाबाहेर चालू असते, तसे ते दोन संघांतील खेळाडू, पदाधिकारी, संघाबरोबरची वैद्यकीय मंडळी अशा कित्येकांमध्येही ’मॅच फिक्सिंग’च्या स्वरुपातही चालताना आढळते. प्राचीन ऑलिम्पिक काळापासून ते आजच्या टी-ट्वेंटी विश्वचषकाच्या सामन्यापर्यंत ते चालू आहे. त्याचे ताजे उदाहरण एका वृत्तसंस्थेच्या माहितीवरून आपल्याला कळेल. टी-ट्वेंटी विश्वचषक 2024 सालच्या गट साखळीतील सामन्यांदरम्यान युगांडाच्या एका खेळाडूशी मॅच फिक्सिंगसाठी संपर्क साधण्यात आला होता. केनियाच्या एका खेळाडूने त्याला मॅच फिक्सिंगसाठी वेगवेगळ्या दूरध्वनी क्रमांकांवरून संपर्क साधला होता. परंतु, अशात आपण पकडले गेलो, तर आपले नाव बदनाम होण्याबरोबर दंडात्मक कारवाई होऊन आपले करिअरही धोक्यात येईल, हा विचार करून त्याने त्याला प्रतिसाद दिला नाही, आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेकडे त्याची तक्रार केली. यामध्ये पूर्वनिश्चित निकाल मिळविण्याच्या उद्देशाने पैसे चारले जातात आणि आपला संघ जिंकावा किंवा हारावा म्हणून खलबते केली जातात. मुख्य खेळाडूला बाहेर बसवणे, अनेकदा निमित्त म्हणून कमीतकमी किंवा काल्पनिक दुखापतींचा वापर करणे अशा विविध प्रकारे हे फिक्सिंग केले जाते. सट्टेबाजांकरवी लाच देणे लाच घेणे, ब्लॅकमेल करणे यांसह मॅच फिक्सिंग होण्याची अनेक कारणे आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगची काही अत्यंत कुप्रसिद्ध उदाहरणे आपण यापूर्वी बघितली आहेतच, की ज्यात विदेशातील संघांच्या जोडीने, भारतीय क्रिकेट संघातील नामांकित खेळाडूंवर कारवाई झाली होती. यात एक गोष्ट मात्र अशी असते की, याचे पुरावे दाखवणे महाकर्म कठीण असते.
प्रतीक्षा संपायलाच हवी : या सट्टाबाजारातल्या त्या सट्टेबाज आणि फिक्सर्ससारख्या ‘बॅड बॉईज’चे काय करायचे ते त्यांना करू दे, पोलीस त्याची दखल घेतीलच. आपण आपल्या या अनिश्चिततेचा खेळ समजल्या जाणार्या क्रिकेटचा विचार करू. गुरुवारी, दि. 20 जूनला ’मिस्टर 360 डिग्री’ हा सामनावीर ज्या सामन्यात झाला होता, त्या अफगाणिस्तान संघाला भारताने पराभूत केले आहे. त्यानंतर दुसरा विजय शनिवारच्या रात्री बांगलादेशला भारताने नामोहराम केले, त्यात हार्दिक पंड्या सामनावीर ठरला होता. असे लागोपाठ दोन विजय मिळवून भारत आता उपांत्य स्पर्धेत जणू पोहोचला आहेच. आता फक्त सोमवारच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्याचा प्रश्न शिल्लक आहे. हा चषक 2007 सालानंतर इतक्या दिवसांनंतर आता भारताकडे आणायचा आहे. कठिण भासणारा संघ म्हणजे ऑस्ट्रेलिया, भारताच्या तिसर्या सामन्यात तो आता सामोरा येत आहे. आज सोमवारच्या रात्री त्याचा निकाल आपल्याला कळणार आहेच. या आधी भारताने दोन सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश सोपा केला आहे. चार गुणांसह सध्या भारत गटात अग्रस्थानी आहे. आता फक्त ऑस्ट्रेलिया विरुद्धचा सामना आणि नंतरच्या उपांत्य फेरीचे निकाल आता भारताच्या बाजूने लागोत, आणि दि. 29 तारखेला बार्बाडोसच्या मैदानावर अंतिम सामन्यात विजय मिळवून हा चषक भारतात परत आणण्यासाठी आपण समस्त क्रीडाप्रेमी रोहित शर्माच्या भारतीय चमूला मनःपूर्वक शुभेच्छा देऊ.
इति!
श्रीपाद पेंडसे
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत)
9422031704