प्रायमरी मार्केट मधील गुंतवणुकीचा वाढता ओघ आणि खबरदारी

    13-Jun-2025
Total Views | 10

investment inflows and caution in the primary market
 
‘आयपीओ’मध्ये केलेली गुंतवणूक म्हणजे ‘प्रायमरी मार्केट’मध्ये केलेली गुंतवणूक होय. यापूर्वीच्या लेखांत आपण ‘आयपीओ’विषयी माहिती जाणून घेतली. आजच्या लेखात ‘आयपीओ’साठी नेमका कसा अर्ज करावा आणि एकंदरीतच गुंतवणूक करताना कोणती खबरदारी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख...
 
कंपन्या जे भागभांडवल विक्रीस काढतात, त्याला ‘प्रायमरी मार्केट’ म्हटले जाते व भागभांडवल (शेअर) शेअर बाजारात ‘लिस्ट’ झाल्यानंतरच्या गुंतवणुकीला ‘सेकंडरी मार्केट’ म्हणतात. शेअर बाजारात ‘लिस्ट’ होण्यापूर्वीची गुंतवणूक म्हणजे ‘प्रायमरी मार्केट’मध्ये केलेली गुंतवणूक, शेअर बाजारात केलेले ट्रेडिंग हे ‘सेकंडरी मार्केट’मध्ये केलेले व्यवहार. सध्या भारतीय भांडवली बाजारपेठेत म्युच्युअल फंडांच्या योजना व ‘आयपीओ’ अग्रस्थानी आहेत. बँकांना ठेवी मिळविण्याकरिता फार संघर्ष करावा लागत आहे. ‘आयपीओ’मध्ये केलेली गुंतवणूक म्हणजे ‘प्रायमरी मार्केट’मध्ये केलेली गुंतवणूक. सध्या एकापाठोपाठ एक असा प्राथमिक समभाग विक्रीचा अर्थात ‘आयपीओ’चा सपाटा सुरू आहे आणि भविष्यातही तो सुरूच राहील, असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे.
 
यापूर्वी विक्रीस आलेल्या ‘आयपीओ’मध्ये कित्येक गुंतवणूकदारांना आठ ते दहा दिवसांत त्यांच्या गुंतवणुकीवर मुदतठेवींच्या तुलनेत कित्येक पट परतावा मिळाला आहे. साहजिकच त्यामुळे खूप नवे गुंतवणूकदार ‘आयपीओ’साठी अर्ज करीत आहेत.
‘आयपीओ’ला अर्ज करण्यासाठीचे पर्याय
 
1) अनेक बँकांना बचतखाते, ट्रेडिंग व डीमॅट खाते एकत्र काढण्याची सोय असते. या खात्यातून ऑनलाईन अर्ज करता येतो
2) ‘झिरोधा/अ‍ॅपस्टॉक’सारखे जे डिस्काऊंट ब्रोकर अथवा ‘शेअरखान’, ‘5 पैसा.कॉम’ असे ऑनलाईन ब्रोकर आपल्या पोर्टलवर अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून देतात. ते कसे करावे, याचीदेखील माहिती बहुतेक वेळा स्लाईड स्वरुपात दिलेली असते.
3) ‘एनएसई’/‘बीएसई’वर ‘आयपीओ’ अर्ज उपलब्ध असतात. त्यांची प्रिंट काढून आवश्यक माहिती भरून आपण आपल्या ‘एएसबीए’ (रीलर) सोय देणार्‍या बँकेत अर्ज भरू शकतो
4) जर गुंतवणूकदाराचा स्थानिक ब्रोकर असेल आणि त्याच्याकडे डीमॅट खाते असेल, तर त्याने केवळ आपला ‘युपीआय आयडी’ दिला, तर ब्रोकर परस्पर ऑनलाईन अर्ज भरू शकतो. फक्त ‘युपीआय’ लिंक बँक खाते व डीमॅट खाते यामधील पहिल्या खातेधारकाच्या नावे/मार्फतच व्यवहार होऊ शकतात.
5) जे गुंतवणूकदार इंटरनेट बँकिंगचा वापर करतात, ते तिथे लॉगिन करून ‘आयपीओ’साठी अर्ज करू शकतात. अ‍ॅक्सिस, आयसीआयसीआय, एचडीएफसी, कोटक, पीएनबी, एसबीआय अशा अनेक बँकांमध्ये ही सोय उपलब्ध आहे.
 
‘आयपीओ’साठी अर्ज करणे ही एक तांत्रिक बाब झाली. पण, जेव्हा ‘आयपीओ’ तेजीत असतात, तेव्हा बरेचदा त्यांची नोंदणी वरच्या भावाने होते. त्यामुळे गुंतवणूकदार अतिउत्साहात सर्व ‘आयपीओं’ना अर्ज करतात आणि बेसावधपणे जोखीम वाढवतात. आजचा उत्साह उद्या निराशेतसुद्धा बदलू शकतो. त्यामुळे शक्यतो फार मोठा अपेक्षाभंग होऊ द्यायचा नसेल, तर गुंतवणूकदारांनी कोणत्याही
 
‘आयपीओ’ला अर्ज करण्यासाठी काही प्राथमिक बाबी तपासून घेतल्या पाहिजेत, त्यापुढील प्रमाणे-
 
1) ‘आयपीओ’ आणत असलेल्या कंपनीचे आधीच बाजारात कार्यरत असणार्‍या कंपन्यांपेक्षा काही वेगळेपण आहे का?
2) बाहेरून पैसा गोळा करणार्‍या कंपनीचा अंतस्थ हेतू काय आहे? प्रवर्तकांची या भांडवलावर अधिक परतावा मिळवून देण्याची क्षमता आहे का?
3) मागील तीन ते पाच वर्षे कंपनीची आर्थिक स्थिती कशी आहे?
4) आपण शेअरला अर्ज केल्यापासून नोंदणीपर्यंत बाजार खूप पडला आणि शेअर खालच्या भावाला नोंदला गेला, तर पुढील काही वर्षे तो शेअर आपण ठेवावा, अशी त्याची परिस्थिती आहे का?
5) आपण ‘आयपीओ’ला अर्ज केला आणि त्याला कित्येक पट मागणी आली, तर नक्की आपल्याला किती शेअर मिळतील अथवा नाही आणि मिळाले, तर किती कमी मिळतील? या सगळ्याचा एकूण आपल्या पोर्टपोलिओच्या परताव्यावर असा किती परिणाम होईल? याचा विचार आधीच करून ठेवावा. या सर्व बाबींचा शांतपणे विचार केला, तर एकूण आपला निर्णय चुकण्याची शक्यता बरीच कमी होऊन आपल्याला फक्त प्राथमिक बाजावर अवलंबून न राहता, ‘सेकंडरी मार्केट’मध्ये मिळत असलेल्या संधीचा लाभदेखील घेता येऊ शकतो.
 
तेजी असताना बाजाराची मानसिकता खूप सकारात्मक असते, वातावरण आशादायी असते. एखादा ‘आयपीओ’ मंदीत जर ‘क्ष’ किमतीने आणला, तर तेजीत तो ‘2क्ष’ किंवा ‘3क्ष’ असाही होऊ शकतो. काही काही ‘आयपीओ’ विक्रीतून प्रवर्तक अब्जाधीश झाले आहेत. याचा परिणाम अन्य कंपन्यांच्या प्रवर्तकांवर होऊन नवनवीन ‘आयपीओ’ बाजारात येतात. मागील काही वर्षांत गुंतवणूकदार अनेक कंपन्यांच्या प्राथमिक समभाग विक्रीतून मालामाल झाले. कारण, आठ ते दहा दिवसांत त्यांच्या गुंतवणुकींवर 30-40 टक्के परतावा मिळत आहे. याचवेळी सर्वसामान्य गुंतवणूकदार भुलतो व सर्व ‘आयपीओ’ला अर्ज करतो. यात नंतर फसगतही होऊ शकते. सर्वसामान्यतः ज्या कंपनीचा ‘आयपीओ’ आहे, त्याची खूप चर्चा होते. त्यासाठी खूप मागणी आणि वर त्याचे वाटप (शेअरचे) गुंतवणूकदाराला होतेच, असे नाही. त्यामुळे तो निराश होतो. ‘आयपीओ’मध्ये शेअर वाटप प्रक्रिया कशा पद्धतीने असते, हे समजले की ‘आयपीओ’मध्ये शेअरसाठी अर्ज कसा करावा, हे समजणे सोपे जाते. कंपनीने ऑफर केलेल्या शेअरपेक्षा अधिक शेअरसाठी अर्ज आहे, तर आधी प्रत्येक गुंतवणूकदारांला शक्य असल्यास प्रत्येकी एक लॉट दिला जातो. पण, हे करणे जर शक्य नसेल, तर बहुदा लॉटरी पद्धतीने वाटप केले जाते. त्यामुळे नक्की कोणाला शेअर मिळतील, हे समजणे अवघड जाते. यासाठी छोट्या गुंतवणूकदारांनी फक्त एकाच्या नावावर अर्ज करण्यापेक्षा कुटुंबातील जास्तीत जास्त व्यक्तींच्या नावावर अर्ज केले, तर शेअर वाटप होण्याची शक्यता अधिक राहते.
 
बरेचदा एका व्यक्तीची अनेक डीमॅट खाती असतात. त्यामुळे ‘आयपीओ’ला अर्ज करताना सर्व खात्यांतून अर्ज केला जातो. परंतु, व्यक्तीचा पॅन एकच असल्यामुळे अर्ज आल्याआल्याच तो रजिस्ट्रारकडून नाकारला जातो. त्यामुळे एका गुंतवणूकदाराने एकच अर्ज करावा. हल्ली ‘आयपीओ बुक बिल्डिंग’ पद्धतीने येत असल्यामुळे किंमत पट्टा दिलेला असतो. एक निश्चित भाव नसतो. त्यामुळे अर्जदाराने ‘कट-ऑफ’ किमतीला निवडणे आवश्यक असते. जर एक ठराविक किंमत त्याने लिहिली आणि जर तिथे इश्यू किंमत निश्चित झाली नाही, तर त्याचा शेअर मिळू शकत नाही. एखाद्या कंपनीचा खूप खोलात जाऊन अभ्यास करायचा झाला, तर बराच वेळ आणि प्रावीण्य लागते. ‘आयपीओ’ बाजारात आणण्यापूर्वी कंपनीला ‘रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस्’ प्रकाशित करावे लागते. हे ‘एनएसई’, ‘बीएसई’च्या साईटवरून बघता येते. ते 300-400 पानांचे असल्यामुळे प्रत्येकाने वाचून अर्थ काढणे शक्य नसते. त्यामुळे गुंतवणूकदारांनी त्यांच्या आर्थिक सल्लगाराकडून ते समजून घेण्याचा प्रयत्न करावा.
 
जेव्हा ‘आयपीओ’ येतो, तेव्हाच विक्रीचा शेवटचा दिवस, वाटप कधी येणार या तारखा जाहीर केलेल्या असतात. त्यानुसार ‘आयपीओ’चा जो रजिस्ट्रार आहे, त्याच्या संकेतस्थळावर जाऊन ‘अ‍ॅलॉटमेंट स्टेटस’मध्ये आपला पॅन/डीमॅट क्रमांक/अर्ज क्रमांक घालून पाहिल्यास आपल्यास शेअर मिळाले अथवा नाही, हे पाहता येऊ शकते. कंपन्या जसे ‘आयपीओ’ आणून प्रत्यक्ष सर्वसाधारण गुंतवणूकदाराकडे पोहोचतात, तसेच नव्या गुंतवणूकदारांना अनेकदा ‘आयपीओ’ला प्रथम अर्ज करून मग हळूहळू शेअर बाजारची ओळख होते आणि त्यातूनच ‘सेकंडरी मार्केट’मध्ये ते ट्रेडिंग करावयास शिकतात. भांडवली बाजारात ‘आयपीओ’चा सतत सहभाग असणे, हे सर्वच घटकांच्या दृष्टीने आवश्यक ठरते. गुंतवणूकदारांच्या हे ध्यानी यायला पाहिजे की, शेअर बाजार हे दुधारी शस्त्र आहे. येणारा काळ भारताचा असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त डोळसपणे केलेल्या गुंतवणुका फार मोठा फायदा करून देऊ शकतात.
 
मागच्या दोन-तीन वर्षांत अनेक ‘आयपीओ’ आले आणि अनेकांनी ‘लिस्टिंग’च्या दिवशी 100 टक्क्यांहून अधिक परतावादेखील दिला. साहजिकच ज्यांना या शेअरचे वाटप झालेले नसते, ते नाराज होतात आणि बाहेरच्या किमतीला ‘लिस्टिंग’च्या दिवशी शेअर घेण्यास ते तयार होतात आणि अडकतात. हा एक सापळा असतो. ‘लिस्टिंग’च्या दिवशी जे चित्र बघावयास मिळते, ते खरोखरच कंपनीची सत्य परिस्थिती दाखवतेच, असे नसते. ‘व्हॅल्यू रिसर्च’ने एक अभ्यास केला. त्यानुसार, 2010 ते 2017 मध्ये 39 कंपन्यांनी ‘लिस्टिंग’च्या दिवशी 50 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला. पण, घाई न करता एक वर्षाने जर त्याच शेअरमध्ये गुंतवणूक केली असती, तर त्यांचा पुढील तीन वर्षांचा परतावा अधिक होता, असे आढळून आले. त्यामुळे भांडवली बाजारात कायम लक्षात ठेवण्याचा मंत्र हा, की एक संधी गेली म्हणजे सगळे संपले, असे नसून परत परत संधी येतात. त्या त्या वेळी थोडेसे डोळस राहिले, तर त्याचा नक्की फायदा घेता येतो.
 
 - शशांक गुळगुळे
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
पुढील १० वर्षात, भारतामध्ये ₹२.५ ते ₹३ लाख कोटी भुयारी मार्ग प्रकल्पांची उभारणी करण्याची योजना – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची एमआयटी-डब्ल्यूपीयू मध्ये घोषणा

पुढील १० वर्षात, भारतामध्ये ₹२.५ ते ₹३ लाख कोटी भुयारी मार्ग प्रकल्पांची उभारणी करण्याची योजना – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची एमआयटी-डब्ल्यूपीयू मध्ये घोषणा

भारतातील पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठी क्रांती घडवून आणण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. याचाच एक भाग म्हणून पुढील १० वर्षांत ₹२.५ ते ₹३ लाख कोटींच्या टनेल (भुयारी मार्ग) प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. नितीन गडकरी यांनी दिली. ते एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (MIT-WPU), पुणे येथे आयोजित ‘सस्टेनेबल टनेलिंग फॉर बेटर लाईफ’ या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते...

शिक्षकांच्या खांद्यावर पुन्हा निवडणुकीची जबाबदारी - मतदारयाद्या अद्ययावत करण्यासाठी मुंबई पालिकेतील शिक्षकांची नेमणूक

शिक्षकांच्या खांद्यावर पुन्हा निवडणुकीची जबाबदारी - मतदारयाद्या अद्ययावत करण्यासाठी मुंबई पालिकेतील शिक्षकांची नेमणूक

शिक्षकांच्या खांद्यावर पुन्हा एकदा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील शिक्षकांना मतदारयाद्या अद्ययावत करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मात्र, यासाठी त्यांना मूळ कार्यालयातून कार्यमुक्त केले जाणार नसून, पूर्णवेळ कार्यालयात उपस्थित राहूनच ही जबाबदारी ऑनलाइन पद्धतीने पार पाडावी लागणार आहे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121