नुकताच मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावरील मुंब्रा स्थानकात दोन लोकलमधील गर्दीमुळे लोंबकळून प्रवास करणार्या प्रवाशांच्या बॅगा एकमेकांवर घासल्या गेल्या आणि रुळावर पडून चार प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. मुंबई लोकलमधून गर्दीमुळे पडून मृत्युमुखी पडणार्यांचे प्रमाण दर आठवड्याला सरासरी सात ते नऊ इतके आहे. त्यामुळे आता देशाचे अर्थचक्र गतिमान ठेवणार्या या महानगरातील लोकलचे अपघाती मृत्यू रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना आवश्यक आहेत. त्याचाच आढावा घेणारा हा लेख.
सोमवार, दि. 9 जून हा आठवड्याचा पहिलाच दिवस मुंबईकरांसाठी काळा दिवस ठरला. याच दिवशी सकाळच्या सुमारास कळवा-मुंब्रा दरम्यान एका घातक वळणावर दोन लोकलमधील गर्दीमुळे दारामुळे लोंबकळणारे प्रवासी एकमेकांना अक्षरश: घासले गेल्याने तोल जाऊन रुळावर पडले. या दुर्घटनेत चार प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेने लोकल रेल्वेवरील प्रवाशांचा वाढता ताण, अपुर्या सुविधा आणि रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांच्या तक्रारींकडे होणारे दुर्लक्ष, अशा सगळ्याच बाबींकडे गांभीर्याने पाहण्याची तातडीची आवश्यकता निर्माण झाली आहे. या दुर्घटनेनंतर सरकारने, रेल्वे प्रशासनाने अनेक उपाययोजना राबविण्यासंबंधी घोषणाही केल्या आहेत. मात्र, या घोषणा प्रत्यक्षात येतील, तेव्हाच त्यावर विश्वास ठेवता येईल, असा एकंदरच सूर रेल्वे प्रवासी आणि संघटनांनी आळवलेला दिसतो.
रोज ‘म.रे’ त्याला कोण रडे?
दि. 9 जून रोजीही कसारा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही लोकल नेहमीप्रमाणेच गर्दीने अगदी खचाखच भरली होती, तर शेजारच्या रुळावरून कल्याणच्या दिशेने जाणार्या लोकलमध्येही गर्दीमुळे प्रवासी दाराशी लोंबकळत होते. मुंब्रा स्थानकातील वळणावर लोकल एका बाजूला झुकल्यामुळे दारात लटकलेले प्रवासी आपला हात सुटू नये, यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत होते. मात्र, त्याचवेळी दोन्ही लोकलमधील प्रवासी आणि त्यांच्या बॅगा एकमेकांवर घासल्या गेल्यामुळे, दोन्ही धावत्या लोकलमधून एकूण 13 प्रवासी रुळावर पडले आणि यामध्ये चार प्रवाशांचा मृत्यू झाला. मुंब्रा येथे जी दुर्घटना घडली, ती वेळ सकाळी कार्यालयात जाणार्या प्रवाशांच्या गर्दीची होती. मात्र, ही घडलेली पहिलीच घटना नाही. यापूर्वीही तीन ते चार प्रवासी रुळावर पडून मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक माहिती स्थानिक प्रवाशांनी दिली. मात्र, विविध उपाययोजना करूनही हे अपघात थांबलेले दिसत नाहीत.
अपघातांची आकडेवारी
नेमके काय सांगते?
मुंबई महानगरातील पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे या रेल्वेच्या दोन्ही विभागांकडून दररोज एकूण 3 हजार, 204 लोकलच्या फेर्या होतात. लोकलमधून दररोज 75 लाख प्रवासी प्रवास करतात. रेल्वे पोलिसांच्या अहवालानुसार, 2005 ते जुलै 2024 या काळात पश्चिम रेल्वेवर 22 हजार, 481 नागरिकांचा अपघाती मृत्यू झाला आणि 26 हजार, 572 जण जखमी झाले. गेल्या वर्षी लोकल अपघातात 2 हजार, 468 जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर 2023 मध्ये 2 हजार, 590 जणांचा मृत्यू झाला होता. यांपैकी एकूण 1 हजार, 151 जणांचा रेल्वे रुळ ओलांडताना मृत्यू झाला. रेल्वे रुळ ओलांडताना झालेले अपघात हे उपनगरील रेल्वेमार्गावरील प्रवाशाच्या मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे, तर मध्य रेल्वेवर 2009 ते जून 2024 दरम्यान 29 हजार, 321 जणांना आपला जीव गमावावा लागला. गेल्या दोन वर्षांत सर्वाधिक मृत्यूची नोंद असणार्या स्थानकांमध्ये कल्याण, ठाणे यांचा समावेश आहे. 2024 मध्ये कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सर्वाधिक म्हणजे 116 जणांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला. ठाणे रेल्वे पोलीस ठाण्याचा हद्दीत 2024 मध्ये रेल्वे रुळ ओलांडल्यामुळे 151 जणांचा मृत्यू झाला. मध्य रेल्वेवर दररोज 1 हजार, 810 उपनगरीय लोकल फेर्या होतात, ज्यामधून 40 लाख प्रवाशांची वाहतूक होते. या आकडेवारीनुसार गर्दी, अपघात आणि अन्य कारणांमुळे मुंबई लोकलध्ये दररोज सरासरी सहा ते सात मृत्यू होतात.
रेल्वे प्रशासनाकडून गांभीर्याने दखल
अशा दुर्घटना घडल्या की, विरोधकांकडून सातत्याने रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. मात्र, वाढती गर्दी, कार्यालयीन कामकाजाच्या वेळा, वाढती स्पर्धा, मुंबई महानगरातील वाढती लोकसंख्या, यानुसार लोकल रेल्वे सेवेचे नियोजन करणे सर्वाधिक आव्हानात्मक आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे सेवांमध्ये आगामी काळात असे अपघात होऊ नयेत, म्हणून या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाकडून विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. यानुसार, लोकल नॉन एसी गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे बंद करण्याबाबत चर्चा झाली. नॉन एसी गाड्यांमध्ये स्वयंचलित बंद दरवाजांमुळे प्रमुख समस्या म्हणजे कमी व्हेंटिलेशनमुळे प्रवाशांमध्ये चेंगराचेंगरी किंवा गुदमरण्यासारख्या घटना घडू शकतात. मात्र, सविस्तर चर्चेनंतर असे ठरविण्यात आले की, नवीन नॉन एसी गाड्या अशा पद्धतीने डिझाईन आणि उत्पादित केल्या जातील, जिथे तीन डिझाईन वापरून व्हेंटिलेशनची प्रमुख समस्या सोडवली जाईल. यामध्ये प्रथम दरवाज्यांना हवेचे झोत असतील. दुसरे, कोचमध्ये ताजी हवा पंप करण्यासाठी छतावरील व्हेंटिलेशन युनिट कार्यान्वित असतील आणि तिसरे, कोचमध्ये ‘वेस्टिब्यूल’ म्हणजेच प्रवासी एका कोचमधून दुसर्या कोचमध्ये जाऊ शकतील, अशा जागा असतील. यामुळे नैसर्गिक पद्धतीने गर्दी संतुलित करता येईल. या नवीन डिझाईनची पहिली ट्रेन नोव्हेंबर 2025 पर्यंत तयार होईल. आवश्यक चाचण्या आणि प्रमाणपत्र मिळाल्यानंतर, ती जानेवारी 2026 पर्यंत सेवेत दाखल केली जाईल. मुंबई उपनगरीय सेवांसाठी तयार केल्या जाणार्या 238 एसी गाड्यांव्यतिरिक्त या लोकल उपलब्ध होतील.
मुंबई उपनगरीय रेल्वे सेवांसाठी सर्वाधिक बजेट
केंद्रीय अर्थसंकल्पात 16 हजार, 400 रुपये कोटी खर्चून मुंबईत 301 किमी लांबीच्या रेल्वे प्रकल्पांची कामे सुरू आहेत. बोरिवली-विरार पाचवी-सहावी मार्गिका, कुर्ला-छशिमट पाचवी-सहावी मार्गिका, तसेच पनवेल-कर्जत उपनगरीय कॉरिडोर यांसारख्या 301 किमी नवीन रेल्वे मार्गिका प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. या प्रकल्पांमुळे मुंबई उपनगरीय रेल्वे अधिक वेगवान आणि प्रवासीसंख्या हाताळण्यासाठी सक्षम होईल. त्याशिवाय गर्दी कमी करण्यासाठी लोकलची संख्यादेखील वाढविण्यात येणार आहे. लोकलच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी तिन्ही मार्गांवर लोकलला ‘कवच’ प्रणालीबरोबरच ‘कम्बाईन कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल’ (सीबीटीसी) यंत्रणा जोडली जाणार आहे. यामुळे लोकल रेल्वे सेवांचा ‘लेट मार्क’ नियंत्रणात येण्यास मदत होईल.
मुंबई रेल्वे प्रवासी संघटनांची मागणी काय?
जगातील सर्वांत व्यस्त उपनगरी रेल्वे प्रणालीपैकी एक असलेल्या मुंबई रेल्वेमध्ये दररोज 80 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांची अडचण, असुविधा आणि सुरक्षा यांचे प्रश्न गेल्या अनेक दशकांपासून मार्गी लावण्यासाठी ‘मुंबई रेल प्रवासी संघा’चे कार्यकर्ते गेली अनेक वर्षे रेल्वे प्रवाशांच्या हितासाठी सातत्याने आवाज उठवत आहेत. प्रवासी संघाच्या प्रयत्नांमुळे मुंबई उपनगरी रेल्वेमध्ये काही महत्त्वाचे बदल घडूनदेखील आले. फूटओव्हर ब्रीज, नवीन उड्डाणपूल, रेल्वे स्थानकांवरील सुविधांचे अद्ययावतीकरण आणि गाड्यांची संख्या वाढ यांसारख्या सुधारणा या आंदोलनांचा परिणाम होत्या. मात्र, ‘उेवश ठशव’ अलर्ट सिस्टीम, गाड्यांमध्ये दरवाजे स्वयंचलित करणे, गोंधळ नियंत्रित करणे, मेल-एक्सप्रेस आणि लोकल सेवा वेगळ्या मार्गांवर वळवणे यांसारख्या सूचवलेल्या उपाययोजनांची आवश्यकता आज प्रकर्षाने जाणवत आहे. कसारा, कल्याण, ठाणे या मध्य रेल्वे मार्गावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी कळवा-ऐरोली एलिव्हेटेड कॉरिडोर, अपघात रोखण्यासाठी लोकल आणि मेल-एक्सप्रेस ट्रेनसाठी वेगळे ट्रॅक, प्रवाशांच्या संख्येच्या आधारावर सेवा नियोजन, प्रवाशांच्या सुविधेसाठी स्वयंचलित दरवाजे आणि निरीक्षण प्रणाली, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्मार्ट उपाय यांसारख्या उपाययोजना मध्य रेल्वेने गांभीर्याने ओळखून तत्काळ राबविण्याची आवश्यकता आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या समस्या फक्त घोषणांनी सुटणार नाहीत, तर ठोस कृती, नियोजन आणि प्रवाशांच्या सक्रिय सहभागातूनच बदल शक्य होतात, असे ‘मुंबई रेल्वे प्रवासी संघटने’चे अध्यक्ष मधु कोटियन सांगतात.