पुण्यश्लोक अहिल्यादेवी : मुत्सद्देगिरी आणि युद्धनीती

    30-May-2024
Total Views | 278
article on Punyashlok Ahilya Devi



अहिल्याबाई होळकर यांची केवळ उत्तम प्रशासक म्हणूनच नव्हे, तर एक मुरब्बी मुत्सद्दी आणि कुशल युद्धनीतीतज्ज्ञ म्हणूनही इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये नोंद आढळते. मल्हाररावांनी वेळोवेळी केलेले दिगादिग्दर्शन, युद्धाचे डावपेच, युद्धभूमीवरील कामगिरी, दारुगोळा आणि युद्धसाम्रगीचे व्यवस्थापन यांसारख्या बाबींतही अहिल्याबाई तरबेज होत्या. त्यांच्या याच मुत्सद्देगिरी आणि युद्धनीतीमुळे होळकरशाहीची विजयी घोडदौड झाली. त्याविषयी सविस्तर...


भारतामध्ये राजनीतीशास्त्रात अनेक खंदे विचारक होऊन गेले. बृहस्पती, शुक, नारद, विशालाक्ष, प्राचेतस, भरद्वाज, गौरशिरस, कामंदक, विदुर ही त्यापैकी काही नावे. या सगळ्यांच्या राजनीतीशास्त्र विषयक चिंतनाचे मूळ ग्रंथ आज उपलब्ध आहेतच, असे नाही. अन्य ग्रंथांमधून यांचे संदर्भ दिलेले आढळतात. ज्याचा समग्र ग्रंथ आज आपल्याला उपलब्ध आहे, असा विचारक म्हणजे चाणक्य किंवा कौटिल्य. याचा ’कौटिलीय अर्थशास्त्र’ हा ग्रंथ प्रख्यात आहे. युद्ध आणि मुत्सद्देगिरी यांच्या संदर्भात या सगळ्या विद्वानांच्या म्हणण्याचा आशय असा की, राजाने चतुरंग दल सज्ज केले पाहिजे. गुप्तचर खातेही अतिशय सक्षम ठेवले पाहिजे. युद्धे करून दिग्विजय केले पाहिजेत, पण होता होईतो युद्ध करणे टाळून मुत्सद्देेेगिरीने कार्यभाग साध्य केला पाहिजे. म्हणजे काय? एकीकडे तुम्ही सांगता युद्धे करावीत आणि दुसरीकडे सांगता युद्धे टाकून मुत्सद्देगिरीनेच कामे पटवावीत. असे कसे होऊ शकेल?

असे कसे होऊ शकते, हे समजून घेण्यासाठी पुण्यश्लोक मातोश्री अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनातला एक प्रसंगच पाहणे आवश्यक आहे. दौलतीचा धनी जो माधवराव पेशवा, त्याचा खुद्द काका राघोबादादा हा 50 हजार फौजेनिशी इंदोर राजधानीवर चाल करून आला. याच्या मनात होळकरांची जहागीर जप्त करण्याचा डाव होता. त्याला अहिल्याबाईंचा कारभारी गंगोबातात्या चंद्रचूड याचीच फूस होती. अहिल्याबाईंनी आपला सेनापती तुकोजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली सैन्याची जय्यत तयारी केली. निवडक 500 महिलांना सैनिकी प्रशिक्षण देऊन त्यांचे एक पथक तयार केले. महादजी शिंदे, बडोदेकर गायकवाड आणि नागपूरकर भोसले यांना तातडीने फौजा घेऊन मदतीला बोलावले. पुण्याहून खुद्द पेशवा माधवरावाकडून ‘बेलाशक पारिपत्य करा,’ अशा शब्दांमधून परवानगी घेतली आणि मग क्षिप्रा नदीच्या पैलतटावर इंदूर शहरावर मोहरा धरून बसलेल्या राघोबादादाला निरोप पाठवला. ’क्षिप्रा उतरून अलीकडे याल, तर तलवारीला तलवार भिडेल.’ या पत्रातली जरब अशी होती की, राघोबा वरमला, खजील झाला. नरमाईने बोलू लागला. शेवटी त्याने फौजेच्या खर्चाकरिता तरी काही रक्कम द्या, इतकी शेपूट घातली. अहिल्याबाईंनी त्याला फक्त एक तोफ दिली. तलवार म्यानातून बाहेरही न काढता, बंदुकीची एक गोळीही न झाडता, रक्ताचा एक थेंबही न सांडता अहिल्याबाईंनी युद्ध जिंकले. म्हणजे, युद्धाची कडेकोट सज्जता करून माणूसबळ नि शस्त्रबळ यांच्या नुसत्या दबावानेच मुत्सद्देगिरी केली. शत्रूला रिकाम्या हाती परत पाठवले.


हा सगळा घटनाक्रम कसाकसा घडत गेला? मराठेशाहीतली राज्य व्यवस्था आणि सैनिकी व्यवस्था कशी होती? हे सगळे समजून घेण्यासाठी आपल्याला अपरिहार्यपणे शिवछत्रपतींच्या काळाकडे वळावे लागते. शिवपूर्व सुलतानी काळात राज्य कारभाराचा सर्वात छोटा घटक गाव हा होता. गावाचे मुख्य उत्पन्न शेती आणि बागायतीचे. प्रत्येक गावाच्या जमिनीची पाहणी करून, प्रतवारी गावाचे सरासरी वार्षिक उत्पन्न नक्की करणे आणि यानुसार ठरवून, या गावाने सरकारला किती सारा भरायचा हे ठरवणे, ही कामे कुलकर्णी, पाटील, पटवारी आणि चौगुले या गावकामगारांची होती. अशा काही गावांचा मिळून एक महाल आणि अशा काही महालांचा मिळून एक प्रांत बनत असे. हा सगळा मुलकी म्हणजे, नागरी कारभार नीट चालण्यात जर कुणी अडथळा आणू पाहील, तर त्याचे पारिपत्य करण्यासाठी फौजदार आणि यांच्या हाताखाली सैन्य असे. जो कुणी सरकारप्रमुख म्हणजे राजा असेल, तो आपल्या विविध सरदारांना असे प्रांत, महाल, गावे जहागिरी म्हणून देत असे. म्हणजे समजा, एखादा सरदार हा पंचहजारी मनसबदार आहे, तर त्याने पाच हजारांचे सैन्य बाळगायचे असते. या सैन्याला पगार, घोडे वगैरे वाहने आणि तलवार, याला इत्यादी शस्त्रे देण्यासाठी या सरदाराला काही गावे जहागीर म्हणून देण्यात येत असत. या सरदाराने पाच हजार सैन्य बाळगावे. त्या जहागीर गावांच्या उत्पन्नातून स्वतःचा खर्च चालवावा, सैन्याचा खर्च चालवावा आणि या गावांमधील रयतेचेही नीट प्रतिपालन करावे, असे अपेक्षित असे. यालाच ‘वतनदारी पद्धत’ असेही म्हणत असत. सुलतानशाहीच्या काळात ही पद्धत विकृत, बनत गेली. वतनदार लोक अधिक गावे मिळावीत म्हणून एकमेकांचे खून पाडू लागले. तसेच आपल्या जहागिरीत मोठे बळ एकत्रित करून राजाला म्हणजेच केंद्र सत्तेला डोईजड बनू लागले.


म्हणून शिवछत्रपतींनी आपल्या हिंदवी स्वराज्यात वतनदारी पद्धत साफ रद्दच करून टाकली. गाव, महाल आणि प्रांत याद्वारे किंवा महसूल गोळा करणारे कमाविसदार म्हणजेच ‘रेव्हेन्यू कलेक्टर्स’ हे मधल्या कुणाही मोठ्या सरदाराला किंवा मंत्र्याला जबाबदार नसून भेट छत्रपतींनाच जबाबदार असत. शिवरायांच्या सैन्याचे पायदळ आणि घोडदळ असे दोन भाग होते. दहा पायदळ सैनिकांवर एक नाईक, पाच नाईकांवर एक हवालदार, तीन हवालदारांवर एक जुमलेदार आणि दहा जुमलेदारांवर एक, एक हजारी सरदार असे. पाच हजारी सरदारांचा प्रमुख हा सरनौबत असे. शिवरायांच्या पायदळाचा सरनौबत त्यांचा बालमित्र येसाजी कंक हा होता.


घोडदलात बारगीर म्हणजे सरकारची घोडी वापरणारे नि शिलेदार स्वतःच्या मालकीचे घोडे वापरणारे असा एक फरक होता. पण, अशा 25 स्वारांवर एक हवालदार, पाच हवालदारांवर एक जुमलेदार, दहा जुमलेदारांवर एक सुभेदार आणि दहा सुभेदारांवर एक पंचहजारी असे. हा पंचहजारी म्हणजे घोडदळाचा सरनौबत प्रथम नेताजी पालकर, मग प्रतापराव गुजर, मग हंबीरराव मोहिते असे होते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सैन्य उभारणी करणे आणि त्याची सदैव सुसज्जता राखणे, यासाठी यापैकी कुणालाही गावे, जहागीर, वतन दिलेले नसून सगळ्यांना रोख पगार दिला जात असे. तो चोख वेळेवर दिला जाईल, या बाबतीत शिवराय अत्यंत दक्ष असत.


होळकरशाहीमात्र, नंतरच्या औरंगजेबाच्या प्रचंड आक्रमणामुळे राजाराम महाराज, महाराणी ताराबाई आणि रामचंद्रपंत अमात्य यांना वतनदारी पद्धत पुन्हा सुरु करणे भाग पडले. पुढे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातही ही पद्धत चालू राहिली. औरंगजेबाविरुद्ध पराक्रम गाजवलेल्या आपल्या अनेक सरदारांना शाहू महाराजांनी वेगवेगळी वतने बहाल केली. कान्होजी आंग्रे यांना कोकणचा भाग दिला. पिलाजी गायकवाडांना गुजरात दिला, तर रघुजी भोसल्यांना पूर्व भारत दिला.


सन 1720 साली शाहू महाराजांचे कर्तबगार पेशवे बाळाजी विश्वनाथ मरण पावले आणि यांचे चिरंजीव बाजीराव हे पेशवे झाले. अवघा 20 वर्षांचा हा तरणाबांड पेशवा अतिशय धडाडीचा सेनापती होता आणि यामुळेच सर्व मराठी सैनिकांचा अतिशय आवडता नेता होता. प्रारंभीची काही वर्षे दक्षिणेत निजाम, फिरंगी, सिद्दी वगैरेंचा बंदोबस्त करण्यात गेल्यावर बाजीरावाने नवे राजकीय धोरण आखले. फांद्या न छाटता मुळावर घाव घातला. सगळ्या संकटांचे मूळ म्हणजे दिल्लीची मुघल पातशाही. तिच्यावरच घाव घालून, बाकी फांद्या आपोआपच निर्जीव होतील. या धोरणाला शाहू महाराजांनी मान्यता दिली. आता हे धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी बाजीरावाने अतिशय चलाख, चपळ आणि गतिमान असे घोडदळ उभारले. या घोडदळातले जीवाभावाचे साथीदार म्हणजे मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे.

महाराष्ट्रातून उत्तरेकडे जाताना नर्मदा नदी ओलांडली की माळव किंवा माळवा हा अतिशय सुपीक असा प्रांत लागतो. बाजीरावाने माळवा प्रांत जिंकला आणि त्याच्या बंदोबस्तासाठी आपले जहागीरदार म्हणून होळकरांना इंदोर आणि शिंद्यांना उज्जैनची जहागिरी दिली. अशा प्रकारे मध्य भारतात दोन मराठी राज्ये निर्माण झाली. मल्हारराव होळकर हे मुळात सरदार कंठाजीराव कदमबांडे यांच्या घोडदळात शिलेदार होते. बाजीरावाच्या नेतृत्वावर खूश होऊन त्यांनी स्वतःच बाजीरावाला विनंतीपत्र लिहून कदमबांड्यांच्या पथकातून आपली बदली बाजीरावाच्या पथकात करून घेतली. मात्र, कृतज्ञता म्हणून त्यांनी पुढे आपल्या स्वतंत्र पथकाच्या ध्वजाचा रंग कदमबांड्यांच्या ध्वजासारखाच ठेवला. बाजीराव आणि त्याचा लक्ष्मणासारखा धाकटा भाऊ चिमाजी अप्पा यांच्याबरोबर मल्हारराव होळकरांनी उत्तर हिंदुस्थान आणि दख्खन सर्वत्र प्रचंड पराक्रम गाजवला. चिमाजी अप्पांसोबत ते वसईच्या भीषण संग्रामातही होतेच. पुढे सन 1740 साली बाजीराव मरण पावला. वर्षभरातच चिमाजी अप्पादेखील मरण पावला.

आता बाजीरावाचे मुलगे नानासाहेब आणि राघोबा व चिमाजी अप्पाचा मुलगा सदाशिवरावभाऊ ही नवी पिढी रिंगणात आली. मल्हारराव राघोबा सोबत दिल्ली-लाहोर-अटक-पेशावरपर्यंत पोहोचले, याच काळात कुंभेरीच्या लढाईत त्यांचा एकुलता एक मुलगा खंडेराव तोफेचा गोळा लागून ठार झाला. त्याची बायको अहिल्याबाई ही फार हुशार आहे, हे पारखून मल्हाररावांनी तिला राजकारण आणि रणांगण दोन्ही क्षेत्रांमध्ये तयार केले होते. ‘अहिल्या ही माझी सून नसून मुलगीच आहे,’ असे ते म्हणायचेच मुळी.
सन 1761 मध्ये मराठेशाही हादरली. पानिपतावर पाऊण लाख ते सव्वा लाख मराठे ठार झाले. सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव ठार झाले. त्या धक्क्याने जवळपास वेड लागून सहाच महिन्यांत पेशवे नानासाहेब मरण पावले. त्यांचा फक्त 16 वर्षांचा मुलगा माधवराव पेशवा झाला. हे पसंत न पडून नानासाहेबांचा धाकटा भाऊ राघोबादादा हा राज्यात बेदिली आणि फंदफितुरी माजवू लागला, पण, वर्षभरातच माधवरावाने आपले अस्सल पाणी दाखवले. घरभेद्या काकासह बाहेरच्या सगळ्या शत्रूंवरदेखील त्याने वचक बसवला. मराठेशाहीचेेे राजकारण आणि रणांगणे पुन्हा नव्या दमाने उभी राहू लागली.

आणि तेवढ्यात सन 1766 मध्येे सुभेदार मल्हारराव होळकर मरण पावले. आता अहिल्याबाईंचा मुलगा मालेराव नवा सुभेदार बनला. पण, वर्षभरातच म्हणजे सन 1767 साली मालेरावही मरण पावला. आता होळकरांच्या जहागिरीला वारस कोण? जहागिरी बाजीराव पेशव्यांनी दिलेली होती. म्हणजे, आता नवा वारस कोण, हे माधवराव पेशव्याने ठरवायला हवे. पण, इथेच खुद्द होळकरांचा दिवाण गंगोबातात्या चंद्रचूड याच्या मनात पाप आले. माधवराव आणि राघोबा यांच्या भांडणात गंगोबा हा राघोबाच्या पक्षाचा होता. त्यातच राघोबा हा 50 हजार फौज घेऊन माळवा भागातच आलेला होता. गंगोबाने राघोबाला प्रस्ताव दिला की, ‘अहिल्याबाईंच्या मांडीवर तुमच्या मध्यस्थीने एखादा दत्तक द्यावा. त्या दत्तकाचा मुख्य कारभारी मला करा आणि बाईला वर्षाला ठराविक रक्कम देऊन धार्मिक गोष्टींमध्ये गुंतवा. म्हणजे होळकर दरबार तुमच्या पक्षात आलाच.’


अहिल्याबाईंना हे समजलेच. आपण एक अश्राप विधवा स्त्री आहोत, आपण यांचे काय वाकडे करणार, असे समजून हे गंगोबा आणि राघोबा आपली दौलत हडप करू पाहत आहेत. पण, मी सुभेदार मल्हारराव होळकरांच्या तालमीत तयार झालेली आहे. ते मला सून नव्हे, मुलगीच मानायचे, ते शब्द सार्थ करून दाखवायची वेळ आलेली आहे. अहिल्याबाईंना आपले सेनापती तुकोजीराव होळकर यांना सर्व सैन्यानिशी सज्ज केले. शिंदे, गायकवाड, भोसले या सरदारांना मदतीची हाक दिली. पुण्याला माधवरावांना पत्र लिहिले. माधवरावांनी उत्तर पाठवले, ‘तुमचे दौलतीविषयी पायबुद्धी ठेवील त्याचे पारिपत्य बेलाशक करावे.’ राघोबांची फें फें अशी जय्यत सैनिकी तयारी करून अहिल्याबाईंनी राघोबांना निरोप पाठवला, ‘क्षिप्रा उतरून अलीकडे याल तर तुमची-आमची तलवार चालेल. मी तर बोलूनचालून बाई माणूस. माझा पराभव झाला, तर कुणी मला नावे ठेवणार नाही. पण, तुमचा पराभव झाला तर जग हसेल. म्हणून या लढाईच्या भरीस न पडाल तर बरे.’

या निरोपातील जरबेने राघोबा खजील झाले. मग, तोंड चुकवण्यासाठी त्यांनी उत्तर पाठवले, ‘आमचा लढाईचा मानस नाही. मालेराव मृत्यू पावले. त्यांच्या सांत्वनाकरिता मातोश्रींची भेट घेण्यास येत होतो.’ पण अहिल्याबाईंनी साफ धुडकावून लावत उत्तर लिहिले, ‘मातमपूर्तीकरिता (सांत्वनासाठी) एकट्यानेच येत असतात. फौजबंद होऊन नव्हे.’ मग, शरमिंदे झालेले राघोबा सांत्वनाकरिता भेटले. पण, तिथेही त्यांनी फौजेच्या खर्चाकरिता थोडे तरी द्रव्य द्यावे म्हणून मागणी केली. अहिल्याबाईंनी त्यांना एक तोफ दिली आणि बोेळवण केली.


सक्षम हिंदू स्त्री

इंग्रजी राजवट येऊन इंग्रजी शिक्षण सुरू होण्यापूर्वीची हिंदू स्त्री ही अबला, वंचित, पददलिताहूनही पददलित, पुरुष जातीची गुलाम, अशिक्षित, रांधा-वाढा-उष्टी काढा आणि मुले काढा एवढ्याच कामापुरती होती. अशी एक प्रतिमा मेकॉलेपुत्र, मार्क्सपुत्र आणि साने गुरुजींची धडपडणारी मुले या मंडळींनी आपल्यासमोर उभी करून, ठाकूनठोकून पक्की बसवलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाईंची राजनीती निपुणता नि रणनीती निपुणता पाहिल्यावर तो प्रचार किती एकांगी आणि खोटा आहे, हे ध्यानात येते.

मल्हार कृष्ण गोखले


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121