माजी सरपंचाच्या हत्येने बीड हादरलं! मस्साजोग सलग दुसऱ्या दिवशीही बंद
11-Dec-2024
Total Views | 134
बीड : (Beed) माजी सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी सलग दुसऱ्या दिवशीही मस्साजोगमध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. मस्साजोग मध्ये सर्वत्र तणावपूर्ण शांतता पसरली आहे. ४८ तासामध्ये सर्व आरोपींना जेरबंद करण्याचे पोलीसांनी आश्वासन दिले आहे. १० डिसेंबरच्या मध्यरात्री संतोष देशमुखांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध म्हणून सलग दुसऱ्या दिवशीही मस्साजोगमधील ग्रामस्थांसोबत व्यापाऱ्यांनीही बंद पुकारला आहे.
संतोष देशमुखांसोबत नेमकं काय घडलं?
सोमवार ९ डिसेंबर रोजीा संतोष देशमुख त्यांचा भाऊ शिवराज देशमुख व इतर सहकाऱ्यांसोबत चार चाकी वाहनातून मस्साजोगच्या दिशेने जात होते. त्यावेळी डोणगावाजवळ एका वाहनातून आलेल्या ६ अज्ञातांनी देशमुखांची गाडी अडवली. त्यांनी आधी देशमुखांना जबरदस्तीने बाहेर काढून काठीने त्यांना बेदम मारहाण केली. नंतर हल्लेखोरांनी देशमुखांना ओढत नेत स्वतःच्या गाडीत बसवले आणि निघून गेले. त्यानंतर देशमुखांच्या अपहरणाची बातमी केज तालुक्यात सर्वत्र पसरली. पोलीसांत तक्रार नोंदवल्यानंतर तपास सुरु झाल्यानंतर काही तासांतच बोरगांव दहिटणा रोडवर संतोष देशमुखांचा मृतदेह सापडला. संतोष देशमुख यांचा भाऊ शिवराज देशमुख यांनी पोलीसांत केलेल्या तक्रारीमध्ये जुन्या भांडणाचा राग डोक्यात ठेवून संतोष देशमुखांची हत्या करण्यात आल्याचे सांगितले. शिवराज देशमुख हे घटनेचे प्रत्यक्षदर्शी असल्याने सुदर्शन घुलेसह त्यांच्या ५ सहकाऱ्यांनी मिळून अपहरण केल्याचे त्यांनी म्हटले.
संतोष देशमुख यांच्या मस्साजोग गावामध्ये अवादा पवनचक्कीचा प्रकल्प आहे. ६ तारखेला या प्रकल्पासंदर्भात एका अधिकाऱ्यासोबत मस्साजोग गावच्या शेजारच्या काही लोकांचा वाद झाला. वादानंतर जमावाकडून अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली. त्यावेळी घटनास्थळी मस्साजोग गावचा एक तरुण सुरक्षा रक्षक म्हणून कामावर होता. अधिकाऱ्याला मारहाण होत असल्याचे कळताच सुरक्षा रक्षक मध्यस्थीसाठी गेला. पण जमावाने सुरक्षा रक्षकालाही मारहाण केली. या प्रकरणात अधिकाऱ्याच्या तक्रारीनुसार सुदर्शन घुले, प्रतिक घुलेसह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले. दुसरीकडे गावात सुरक्षा रक्षकाला मारहाण झाल्याने मस्साजोगच्या संतोष देशमुख यांनी घुलेंना जाब विचारण्यासाठी तसेच मध्यस्थीसाठी गेले होते. त्याच गोष्टीचा राग मनात ठेवून ही हत्या झाल्याचा संशय वर्तवला जात आहे.