'त्या' प्रकरणातून मंत्री नितेश राणेंची निर्दोष मुक्तता!
02-Jun-2025
Total Views | 13
मुंबई : २०१७ च्या एका प्रकरणात मंत्री नितेश राणे आणि इतर ३० जणांची सिंधुदुर्ग न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सरकारी अधिकाऱ्यावर मासे फेकल्याचा तसेच शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा त्यांच्यावर आरोप होता.
न्यायालयाने २१ मे रोजी याबाबतचा निकाल दिला असून रविवारी त्याची माहिती उपलब्ध झाली. नितेश राणे यांनी आपल्यावर मासे फेकल्याचा आरोप संबंधित अधिकाऱ्याने केला होता. परंतू, पुराव्यांनुसार, त्यावेळी राणेंसोबत असलेल्या लोकांनी त्या अधिकाऱ्यावर मासे फेकले असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणी नितेश राणे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
याबद्दल बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, "न्यायालयाने आम्हाला न्याय दिला त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो. पारंपारिक मच्छिमारांच्या हितासाठी आम्ही ते आंदोलन केले होते. माझ्या घरात कुणी मच्छी देत नाही म्हणून मी ते आंदोलन केले नव्हते. पारंपारिक मच्छिमारांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात आम्ही आवाज उचलला होता. न्यायालयाने आमच्या सगळ्या बाजू ऐकून घेत आम्हाला न्याय दिला," असे ते म्हणाले.