‘ताली’ हिंदीतच का?
सद्यःस्थितीला ‘ओटीटी’ वाहिन्यांमुळे जगाच्या कानाकोपर्यात आणि कोणत्याही भाषेतील आशय पोहोचण्यास मदत होते. तृतीयपंथी गौरी सावंतची गोष्ट ही आधी मराठीत करावी, असे क्षितीज पटवर्धन यांना सूचले होते. मात्र, गौरी सावंतची गोष्ट ही केवळ एका राज्यापुरती मर्यादित न राहता जगभरात ती पोहोचायला हवी म्हणून ही वेब सीरिज हिंदीत करण्याचे निश्चित करण्यात आले. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गौरी सावंतची भूमिका हिंदीतील मोठ्या कलाकाराने करावी, अशी इच्छा असल्यामुळे ज्यावेळी ही लिहिलेली कथा माझ्याकडे आली, त्यावेळी अभिनेत्री सुष्मिता सेन हिची गौऱीच्या भूमिकेसाठी निवड झाली होती, असे रवी जाधव यांनी सांगितले. त्यानंतर सुष्मिता सेनला भेटायला गेल्याचा किस्सा सांगताना रवी जाधव म्हणाले की, ’गौरी जेव्हा गणेश होता त्यावेळी त्याचं चालणं, बोलणं, वेगळा आवाज या सर्व गोष्टींवर बारकाईने सुष्मिताने काम केले आणि जेव्हा गणेश गौरी झाली, त्यावेळी तिची शरीरयष्ठी कशी होती, बोलणं-चालणं कसं होतं, हेदेखील सुष्मिताने उत्तमरित्या साकारले, असे रवी जाधव म्हणाले. तसेच, ज्यावेळी पहिल्यांदा गौरी सावंत सुष्मिताला भेटायला गेल्या होत्या तेव्हा गौरी यांनी सुष्मिताला बिस्किटचा पुडा दिला आणि सांगतिलं की, माझ्याकडे हा पुडा लहान मुलांसाठी कायम असतो, आणि तुला पहिल्यांदा भेटत असताना माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नसल्याने तुला ही भेट मी देत आहे. आणि माझ्या गळ्यातली ही रुद्राक्षाची माळ तुला देत आहे. त्यामुळे ज्यावेळी सुष्मिता गणेश नंतर गौरी होते, त्यावेळी तिच्या गळ्यात जी रुद्राक्षाची माळ आहे, ती गौरी सावंतची आहे, असेही रवी जाधव यांनी सांगितले.
‘ताली’ हे नाव कसं आलं?
‘ताली’ या वेब सीरिजचे आधीचे नाव ‘अम्मा’ ठेवण्याचा विचार केला होता. त्याव्यतिरिक्त माझ्या मनात ‘गौराई’ असे नाव आले होते. कारण, गौरीला कायम आई व्हायचे होते. त्यामुळे गौरी आणि आई हे दोन्ही शब्द एकत्र करून ‘गौराई’ हे नाव. पण, त्यानंतर सुष्मिता म्हणाली की, ’ही संपूर्ण वेब सीरिज ही टाळीवर म्हणजेच तालीवर आधारित आहे. कारण, चित्रपटात एक संवाददेखील आहे की, ‘मै ताली बजाऊंगी नहीं, बजवाऊंगी’. मग सुष्मिता म्हणाली की, ‘आपण या वेब सीरिजचं नाव ‘ताली’ ठेवूयात का? आणि मग कोणतंही दुमत त्यावर झालं नाही आणि वेब सीरिजचं नाव ‘ताली’ निश्चित करण्यात आले, असा वेब सीरिजच्या नावाचा किस्सा रवी जाधव यांनी सांगितला.
प्रेक्षकांचा चित्रपटाच्या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येकवेळी वेगळा असतो...
दिग्दर्शकाने कोणत्याही विषयावरील चित्रपट तयार केला, तरी त्याच्यासाठी त्या विषयाचे असणारे महत्त्व आणि दृष्टिकोन हा प्रेक्षकांच्या दृष्टिकोनापेक्षा वेगळा असतो. ‘नटरंग’ चित्रपटात ज्यावेळी पुरुष स्त्रीचे कपडे परिधान करतो, स्त्रियांसारखे हावभाव करतो किंवा नृत्य करतो, त्यावेळी समाज वेगळ्या नजरेने त्यांच्याकडे पाहतो. पण, तेच ज्यावेळी ‘बालगंधर्व’ सारखा चित्रपट येतो आणि त्यात पुरूष स्त्रीवेशात उत्तम गाणे गातो, त्यावेळी ते प्रेक्षकांना आवडते. या दोन विभिन्न गोष्टी असून, प्रेक्षकांचा विषयांकडे बघण्याचा दृष्टिकोन फार निराळा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काहीतरी वेगळी कलाकृती साकारण्याचे मनात आले होते आणि ‘बालगंधर्व’ चित्रपटानंतर ‘ताली’ ही वेब सीरिज थेट एका तृतीयपंथीची ‘बायोग्राफी’ करत असल्यामुळे आनंद असल्याचेही रवी जाधव यांनी म्हटले. यानंतर या चित्रपटासाठी संशोधन करण्यास सुरुवात झाली. विविध तृतीयपंथींच्या समूहाला मी भेटलो. त्यावेळी एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली, ती म्हणजे या सर्व तृतीयपंथींना आपण आपली तक्रार किंवा अडचण घेऊन कुणाकडे जायचे, याचाच त्यांना थांगपत्ता नाही. व्यक्त कुणासमोर व्हायचे, याचा मार्ग त्यांना ठाऊक नसल्यामुळे त्यांच्यासमोर अनेक अडचणी उभ्या आहेत, हे या संशोधनातून समजले. ‘नटरंग’, ‘बालगंधर्व’ यांसारखे चित्रपट आव्हान म्हणून केल्याची कबुलीदेखील जाधव यांनी दिली. पुढे ते म्हणाले, ”मी जाहिरातीच्या क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे अनेक तृतीयपंथी तिथे काम करत होते. परंतु, कधीच त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट किंवा एखादी कलाकृती साकारायची संधी मिळेल, असे वाटले नव्हते. पण, ‘ताली’मुळे ते शक्य झाले,” असेही जाधव म्हणाले. ‘ताली’ या वेब सीरिजतून तृतीयपंथींच्या वेदना, आक्रोश, अडचणी या सत्य परिस्थितीची मांडणी अतिशय खर्या पद्धतीने करावी, असा अट्टहासदेखील होता,’ असेही ते म्हणाले. गौरी सावंत यांना ज्यावेळी पहिल्यांदा समजले की, त्यांच्या जीवनावर आधारित वेब सीरिज मी करत आहे, त्यावेळी त्यांना फार आनंद झाला होता आणि त्यांची अशी इच्छा होती की, ज्यावेळी गणेश गौरी होईल, त्यावेळी ती अतिशय सुंदर स्त्री असेल, आणि ज्यावेळी गौरी यांनी स्वतःला अर्थात सुष्मिताला गौरीच्या रुपात पाहिलं, त्या भारावून गेल्या आणि ‘मी किती सुंदर दिसते’, असे उद्गारही त्यांनी काढले, अशी आठवण रवी जाधव यांनी यावेळी सांगितली.
आव्हान घेऊन प्रत्येक चित्रपट साकारले
रवी जाधव यांनी विविध विषय फार कल्पकतेने प्रत्येक चित्रपटात हाताळलेले आपण पाहिले आहे. चित्रपटाचा विषय हा आव्हान म्हणून स्वीकारत तो पूर्णत्वास घेऊन जायचा, ही माझी काम करण्याची पद्धत असल्याचे रवी म्हणाले. ”ज्या व्यक्तीने कधी तमाशा पाहिला नाही, नाट्य संगीत पाहिले नाही, तो व्यक्ती जेव्हा ‘नटरंग’ किंवा ‘बालगंधर्व’ सारखे चित्रपट करतो, तर ‘ताली’ या प्रत्येकाच्या मनाला भिडणार्या विषयाचे सादरीकरण, हे उत्तमच हवे, हे आव्हान मी स्वतःला दिले होते आणि तिथूनच या वेब सीरिजचा दिग्दर्शक म्हणून माझा प्रवास सुरू झाला,” असे रवी जाधव म्हणाले.
तृतीयपंथीदेखील मनुष्यच आहेत
‘ताली’ या वेब सीरिजमध्ये अनेक तृतीयपंथींनी भूमिका साकारली आहे. आणि या वेब सीरिजसाठी आम्हाला उत्तम कलाकार हवे होते. गौरी सावंत यांचे चेले किंवा गौरीच्या आजूबाजूला वावरणारे जे तृतीयपंथी होते, त्यांचे या मालिकेसाठी ऑडिशन घेण्यात आले आणि त्यांच्याकडून त्या पात्रांसाठी सराव करून घेतल्याचे रवी जाधव यांनी सांगितले. त्यामुळे पहिल्यांदाच तृतीयपंथीचा बायोपिक ‘ताली’ या वेब सीरिजच्या निमित्ताने येत असून, यात तृतीयपंथी कलाकारांना प्राधान्य देण्यात आले आहे. अनेक तृतीयपंथी आज समाजमाध्यमावर मला मेसेज करतात आणि त्यांच्याबद्दल माहिती सांगतात. या वेब सीरिजमुळे अनेक तृतीयपंथीयांसोबत नाते जोडल्याचे सांगत रवी जाधव यांनी गौरी सावंत यांचे एक वाक्य सांगितले, तृतीयपंथी पुरुष, स्त्री आणि तृतीयपंथी अशा तिन्ही भूमिका साकारू शकतात. याचाच अर्थ तृतीयपंथी हेदेखील मनुष्य आहेत आणि त्याच प्रकारे वागवायला हवे.