माझी गुरूमाऊली...

    11-Jun-2023
Total Views | 77
rss-leader-jayant-sahasrabuddhe


जयंतराव आज गेले, आपल्यातून गेले... हे वाक्यच इतक्या वेदना देणारं आहे. पण, त्यांनी सुमारे दहा महिने जी झुंज दिली, तीही तितकीच क्लेशकारक होती. केवळ त्याला आशेची सावली होती इतकच! अनेक कार्यकर्ते, डॉक्टर्स आणि संघ व्यवस्थापन यांनी शर्थीचे प्रयत्न केले. खरं तर ज्यांना इतका मोठा काळ ’जयंतराव बरे होण्यासाठी प्रयत्न करणे’ हे एकच ध्येय समोर होते. त्यांना आज ही पोकळी खूपच जाणवत असेल. आता केवळ एकमेकांचं सांत्वन करणं इतकच आपल्या हातात...

जयंतराव हे व्यक्तिमत्त्वच वेगळं होतं... आज हजारो लोकांना आपल्याच घरातील कुणी गेल्यावर येते तशी अस्वस्थता आली आहे. एक हव हवसं वाटणारं जवळचं माणूस न भेटता खूप दूर निघून गेल्याची हुरहुर हजारो मनांत आहे...कुशाग्र बुद्धी, अनेक विषयांचे सखोल ज्ञान, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांवर असलेलं प्रभुत्व, शांत चर्‍या, तितकाच मृदु आवाज, त्यांच्या डोळ्यातलं तेज, कमालीचा साधेपणा आणि सर्वांना आपुलकीने जोडण्याची अद्भुत संघटन कुशलता... तरीही अजून खूप काही होते जयंतराव...ते प्रत्येकाच्या घरातली एक जवळची व्यक्ती होऊन जायचे...अंतर्बाह्य निर्मल...माझी गुरूमाऊली... आज त्यांच्यासमोर नतमस्तक होताना खूप काही आठवतय आणि कंठ दाटून येतो...
 
मी पूर्वांचलला जायला इच्छुक आहे, हे समजल्यावर ते माझ्या घरी आले. आमच्याकडे संघ माहीत नव्हता आणि माझ्या पूर्वांचलला जाण्याच्या हट्टाला फारशी अनुकूलता नव्हती. पण, प्रांत-प्रचारक घरी आले आणि माझ्या घरी जणू संघ पोहोचला. इतकं छान संभाषण झालं. आपल्या लाघवी वाणीने आपलंस करून जयंतराव माझ्या कामाची मूकसमंती मला मिळवून देऊन गेले...२००५ ला मार्चमध्ये फोन आला, ”सुचिता, तुला नागालॅण्डला जायचं होतं. पण, नागालॅण्डच तुझ्याकडे येतोय. चिपळूणला वसतिगृह सुरू होतय. १३ मुली येताहेत. तू तिथेच राहून व्यवस्थापन बघ आणि त्यांची भाषा शिक. म्हणजे तिकडे जाताना तयारीने जाता येईल.”
त्यांचा शब्द म्हणजे शिरसावंद्य... मी घरी सांगून लगेच जूनमध्ये वसतिगृहात पोहोचले. कामाचा अनुभव नाही आणि पाच वर्षांच्या चीचीपासून १३ वर्षार्ंच्या हिरासमला पाहून प्रश्न पडला. मी नक्की काय करायचं. माझं काम काय? मी घरी सर्वांत लहान. वय केवळ २२ वर्षे आणि अपरिचित, अनाकलनीय भाषा बोलणार्‍या त्या मुली... मी थोडं निराश होऊन जयंतरावांना फोन केला. ”मी नक्की इथे काय काम करायचंय?” शांतपणे समोरून एका वाक्यात आलेले उत्तर आजही माझ्या मनात कोरलेलं आहे. ”तुला त्या १३ जणांची आई होऊन राहायचं आहे, बाकी काही नाही...”
 
माझ्यातली मातृत्वाची भावना त्या तीन वर्षांनी मला थोडं मोठं करून गेली. एकदा मी जयंतरावांना म्हटलं की, ”माझ्या वैयक्तिक खर्चासाठी मला थोडं मानधन मिळावं.” त्यांनी मला प्रश्न विचारून माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाले, ”हे काम तू भारतमातेची सेवा म्हणून करतेस ना, मग आपल्या आईच्या कामाचे आपण पैसे घेतो का? तुला जे आवश्यक खर्च असतील, ते सगळे आपण करू” आणि खरोखरच माझा द्वितीय आणि तृतीय वर्षांचा खर्च व्यवस्थेतून झाला.सहज एखादं वाक्य पण ते जेव्हा जयंतरावांच्या मुखाने यायचं तेव्हा त्याला त्यांच्या हृदयाच्या शुद्धतेचा, साधनेचा आणि कुशाग्र बुद्धीचा एक अनोखा सुगंध असायचा. पहिलंच काम, अनेक अडचणी यायच्या, पूर्वांचलची पुरेशी कल्पना नव्हती. मग हक्काने जयंतरावांना फोन करायचे. त्यांची काही वाक्य ही प्रकाशवाटेसारखी आहेत.

ते म्हणायचे, “सामाजिक काम हे एकतर्फी प्रेमासारखे असतं. समोरचा कसाही वागू दे, आपण चांगलं करत राहायचं.”मला नागालॅण्डशी जोडणारे जयंतराव. कधी काहीच काम होत नाही, मनासारखे निकाल येत नाहीत म्हणून निराशेने त्यांच्याशी बोलायचे. पण, ते आमच्या लहानसहान गोष्टींनी कधीही वैतागायचे नाहीत. एकदा त्यांनी मला समजावलं होतं, ”आपण पाणी १०० डिग्रीला उकळलं असं म्हणतो. पण, खरं असतं का ते? अगं ते पहिल्या डिग्रीलाच उकळायला सुरुवात होते. तसं हे काम... याचे दृष्परिणाम दिसायला आपल्याला वाट पाहावी लागेल. आपण काम करत राहायचं.. शांतपणे...””तू एकदा चार दिवस घरी जाऊन ये, म्हणजे शांतपणे विचार करशील आणि पुन्हा नव्याने कामाला लागशील.”
 
मग ते आवर्जून फोन करायचे. माझी, पुष्पाच्या घरच्यांची चौकशी करायचे. जणू आपल्या कुटुंबातली मोठी पण जवळची व्यक्ती वाटायचे. तेव्हा, वसतिगृह माधवबाग-संघ कार्यालयात होतं. आले की मुलींची भेट घ्यायचे. व्यक्तिगत प्रत्येकीची विचारपूस करायचे. ते आले की, मुली पण आमच्यासारख्याच खूश असायच्या. तिकडच्या प्रवासाचा वृत्तांत सांगायचे... त्यांची भेट नवीन उमेद देऊन जायची.मी नागालॅण्डला जाण्याचा तगादा लावला. तेव्हा ”तू आधी शिक्षण पूर्ण कर मग आपण तूला पूर्वांचलला पाठवू,” अशी माझी समजूत काढून मला मार्गदर्शन घेण्यासाठी मृदुलाताई देवस्थळी यांचं नाव त्यांनी सुचवलं आणि तिथूनच मी मानसशास्त्राकडे वळले. ’शिक्षण पूर्ण कर’ हा जयंतरावांचा आदेश होता. म्हणून घरी आल्यावर ‘एमएसडब्ल्यू’ केलं आणि मगच २०१४ ला एक वर्षांसाठी पूर्णवेळ गेला. ”आधी तिकडे जा. सगळे प्रकल्प बघ आणि तूच सांग कुठे जायचं...’ इतका मोकळा विचार आणि तितकाच विश्वास माझ्यासारख्या इवल्याशा कार्यकर्ता होऊ पाहणार्‍या वर दाखवणारे जयंतराव...
 
या सार्‍यात माझ्या ’गुरू माऊली’चा खूप मोठा वाटा होता. त्यांनी मला पूर्वांचल कसा बघायचा, ते नकळत शिकवलं. पूर्वांचलवर प्रेम करायला शिकवलं आणि संघांची ओळखसुद्धा त्यांच्या वागण्या-बोलण्यातून प्रथम झाली.त्यानंतर मी प्रत्येक गुरूपौर्णिमेला त्यांना फोन करायची.. मध्ये त्यांच्या व्यस्ततेमुळे संपर्क झाला नाही. पण, काही माणसं ही केवळ माणसं नसतात; ती तत्व होऊन आपल्या आयुष्यात भरून राहतात. जयंतरावही तसेच...मन शेवटचा नमस्कार करायला तयार होत नाही...पार्थिव गेले तरी ते माझ्यासारख्या त्यांच्याशी अगदी अल्प संपर्क आलेल्या हजारो लोकांच्या मनात नेहमीच राहतील...



-सुचिता भागवत
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121