ज्या संस्काराने संतती ही बलशाली, शक्तीयुक्त व आरोग्यसंपन्न बनते, तो संस्कार म्हणजे पुंसवन संस्कार! काहीजण पुंसवन संस्काराला पुत्राच्या म्हणजेच मुलाच्या निर्मितीचा संस्कार मानतात. पण, त्यांचा हा गैरसमज आहे. ‘पुंमान्’ म्हणजे पुत्र नसून पुरुषत्त्वाने, शरीराने बलशाली असा शिशु! गर्भस्थानी पुत्र असो वा कन्या, त्यांच्या पौरुषत्व वाढीसाठी व शरीरबळ विकासाकरिता व्रतस्थ होण्याचा संस्कार!
आ ते गर्भो योनिमेतु पुमान् बाण इवेषुधिम्। आ वीरो जायतां पुत्रस्ते दशमास्य: स्वाहा॥
अन्वयार्थ
हे सौभाग्यवती देवी! (बाण इव इषुधिम्) बाण हा ज्याप्रमाणे भात्यामध्ये सुरक्षितपणे राहतो, प्राप्त होतो, त्याचप्रमाणे (ते) तुझ्या (योनिम्) उत्पत्तिस्थानी, (पुमान् गर्भ:) पुरुषत्वाने, शरीरबळाने पूर्णपणे असा गर्भ (आ एतु) चांगल्या प्रकारे प्राप्त होवो. तसेच (दशमास्य:) दहा महिन्यांचा कालावधी पूर्ण करूनच (ते) तुला (वीर: पुत्र:) शूरवीर, बलशाली असा पुत्र-कन्या, संतती (आ जायताम्) उत्पन्न होवो.
विवेचन
गर्भ स्थिर होऊन पाहता-पाहता दोन-तीन महिने लोटले असता आता गर्भस्थ बाळाची वाढ होऊ लागतेय. तेव्हा आई-वडील (पती-पत्नी) व कुटुंबीयांचे कर्तव्य आहे की, त्यांनी ‘पुंसवन’ हा दुसरा संस्कार करण्यास प्रवृत्त व्हावे. आईच्या उदरात विद्यमान असलेल्या बाळाची शारीरिक वाढ दोन प्रकारे होते. एक शारीरिक तर दुसरी मानसिक! पुंसवन संस्काराचे उद्दिष्ट प्रामुख्याने उदरस्थ शिशुचा शारीरिक विकास साधणे हे होय. गर्भाधानानंतर गर्भ स्थिर झाल्याचे लक्षात आले की पुढे भीती असते, ती गर्भ न थांबण्याची! यासाठी बाळाच्या आई-वडिलांनी व कुटुंबीयांनी सावधानता बाळगण्याची फार गरज असते. विशेष करून गर्भिणी मातेस अधिक काळजी घ्यावयास हवी. कारण, प्रामुख्याने तिच्याच हाती बाळाची सुरक्षितता अवलंबून असते. याबाबत सुश्रुताचार्य म्हणतात-
दोषाभिघातै: गर्भिण्या,
यो यो भाग: प्रपीड्यते।
स स भाग: शिशुस्तस्य,
अर्थात, ज्या शारीरिक गैरहालचालीने, दोषांमुळे गर्भवती स्त्रीचे जे कोणते अवयव पीडित होऊ लागतात, त्याचप्रमाणे गर्भस्थित शिशुचेदेखील ते ते अवयव (अंग) पीडित होत असतात. त्यास इजा पोहोचू शकते. याकरिता मातेने शारीरिकदृष्ट्या नेहमी दक्ष राहावयास हवे. सोबतच पित्याचेदेखील कर्तव्य आहे की, या अवस्थेत पूर्ण संयमाने ब्रह्मचर्याचे पालन करीत पत्नीला कोणताही त्रास होणार नाही, याविषयी सतर्कता बाळगणे. यावरून हे लक्षात ठेवावे की, बाळाच्या रक्षणाची जबाबदारी ही केवळ मातेचीच नसून पित्याचीदेखील आहे.
पुंसवन संस्कार हा दुसर्या क्रमांकाचा संस्कार! या शब्दाची उत्पत्ती अशी होते-- पुमान् सूयते यस्मात इति पुंसवनम्!तात्पर्य असे की, ज्या संस्काराने संतती ही बलशाली, शक्तीयुक्त व आरोग्यसंपन्न बनते, तो संस्कार म्हणजे पुंसवन संस्कार!पुमान् म्हणजेच बलवान, शारीरिकदृष्ट्या मजबूत आणि अंग-प्रत्यंगांनी सुविकसित बाळ! काहीजण पुंसवन संस्काराला पुत्राच्या म्हणजेच मुलाच्या निर्मितीचा संस्कार मानतात. पण, त्यांचा हा गैरसमज आहे. ‘पुंमान्’ म्हणजे पुत्र नसून पुरुषत्त्वाने, शरीराने बलशाली असा शिशु! गर्भस्थानी पुत्र असो वा कन्या, त्यांच्या पौरुषत्व वाढीसाठी व शरीरबळ विकासाकरिता व्रतस्थ होण्याचा संस्कार!
वरील मंत्रात उपमा अलंकारातून अभिव्यक्त होणारा आशय दिव्यत्वाला स्पर्शून जातो. बाळाला बाणाची तर मातेच्या गर्भस्थानाला भात्याची उपमा देऊन वेदभगवंताने कमालच केली आहे. रणांगणात शत्रूसैन्यांशी लढणार्या वीर योद्ध्यांकरिता सर्वात मोठे साधन असते ते बाण याच बाणाच्या आधारे तो समोरच्या शत्रूंना परास्त करतो. त्याच्या विजयाचे सर्वस्व म्हणजे बाण. अशा बाणांना सुरक्षित ठेवण्याचे स्थान म्हणजे त्या वीरांच्या पाठीवरील भाता याला संस्कृतात ‘इषुधि:’ तर हिंदीमध्ये ‘तरकस’ असे म्हणतात. भाता मजबूत, दोषरहित व सुव्यवस्थित असेल, तर त्यामुळे बाणदेखील सुरक्षित राहू शकतो. त्याचप्रमाणे मातेचे गर्भस्थान म्हणजेच योनी ही देखील सर्व दृष्टीने निर्दोष, निरामय व सुरक्षित असेल, तर त्यात ‘पुंमान् गर्भ:’ म्हणजेच बलशाली पुरुषत्वाने परिपूर्ण असा गर्भ शिशु राहू शकतो. मग ऊर्जावान व बलसंपन्न असा गर्भ अवेळी कोसळणार नाही की तो बाहेर पडणार नाही.
तो अगदी दहा महिन्यापर्यंत म्हणजेच नऊ महिने नऊ दिवसांच्या कालावधीपर्यंत स्थिर राहणार, यात शंका नाही आणि नंतर तो शूरवीर संततीच्या रूपाने जन्मणार. या शिशुला कोणताही त्रास होणार नाही की कोणत्याही प्रकारचा शारीरिक रोग. याचे कारण म्हणजे, मातेने दहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत घेतलेली पूर्ण काळजी. तसेच, तिने ग्रहण केलेला सात्विक व शुद्ध असा उत्तम आहार, वेळोवेळी घेतलेले औषधोपचार आणि योग्य ती शारीरिक हालचाल!
गर्भिणी मातेस दोन किंवा तीन महिने लोटल्यानंतर आपल्या सुविधेनुसार, योग्य तो दिवस निवडून त्या दिवशी हा पुंसवन संस्कार आयोजित करावा. यात पहिल्यांदा अग्निहोत्र केले जाते. यजमान दाम्पत्यास पूर्वाभिमुख बसवून यज्ञ केला जातो. बृहद्यज्ञांच्या आहुत्या दिल्यानंतर स्विष्टकृत म्हणजेच घृतयुक्त भाताची किंवा गुळाची आहुती दिली जाते. त्यानंतर तुपानेनी वरील मंत्रानंतर ‘अग्निरैतु प्रथमै देवतानां सोऽस्यै....! (आश्वलायन गृहसूत्र-१/१३/६)‘ या मंत्राची आहुती प्रदान करावी. नंतर एकांतस्थानी जाऊन पत्नीच्या हृदयावर हात ठेवून पतीने खालील मंत्र म्हणावा-
यत्ते सुसीमे हृदये हितवन्त: प्रजापतौ।
मन्येऽहं मां तद्विद्वांसं माहं पौत्रमघं नियाम् ॥ आश्वलायन गृहसूत्र(१/१३/७)
इथे पती आपल्या पत्नीला आश्वासन देत आपली जबाबदारी स्वीकारत म्हणत आहे की हे देवी! तुझ्या अंत:करणाची जी पवित्र हितकारक भावना आहे, तिला मी स्वतःचीच मानतो. याची जाणीव करून घेतो की यापुढे मी असे कोणतेही कार्य करणार नाही, जेणेकरून त्या संततीला त्रास होईल.यज्ञ संपन्न झाल्यानंतर वटवृक्षाची कोवळी कळी, जटा किंवा पाने आणि गुळवेलाच्या लहान लहान तुकड्यांना एकत्र वाटून ते कपड्याने गाळून घ्यावे व गर्भिणी मातेच्या उजव्या नाकपुडीत तिचा सुवास द्यावा.
सुश्रुत संहितेत वड आणि गुळवेलाचे अधिक महत्त्व विशद केले आहे. विशेषकरून गर्भ स्थिर राहण्याकरिता हे फार मोठे मौलिक औषध आहे. पण, हे घेत असताना वैद्यांचा सल्ला मात्र अवश्य घ्यावा. त्याचबरोबर गर्भवती स्त्रियांनी भोजनात सात्विकता ठेवावी. दूध-तुपाचे पदार्थ, फलाहार व शक्तीवर्धक अन्नधान्यांचा आहारात समावेश करावा. मसालेदार, तेलकट, आंबट पदार्थ टाळावेत. मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करावा. संस्कारविधीनुसार किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार बाळाच्या शारीरिक विकासासाठी जो सात्विक व शुद्ध आहार घ्यावयाचा, त्यासंदर्भात त्यांच्या आदेशांचे पालन करावे.
थोडक्यात, हा संस्कार शिशुच्या शारीरिक वाढीसाठी कोणकोणत्या प्रकारची काळजी घ्यावी आणि कोणत्या नियमांचे पालन करावे? यासंदर्भात मार्गदर्शक स्वरूपाचा आहे. भावी सुसंतती हीच आपली अमूल्य धनसंपत्ती ती रोगी किंवा बलहीन जन्मता कामा नये. गर्भावस्थेत योग्य आहार न घेतल्यामुळे त्याचे दुष्परिणाम बाळाला भोगावे लागतात व नेहमीच दवाखान्यात ये-जा करावी लागते. तसेच, मोठ्या प्रमाणात पाण्यासारखा पैसाही खर्चावा लागतो. त्यापेक्षा जर काय बाळाच्या जन्मापूर्वीच मातेने योग्य तो सात्विक आहार घेतला व शारीरिकदृष्ट्या सुयोग्य काळजी घेतल्यास निश्चितच निरोगी व बलशाली असे तेजस्वी बाळ निपजते.
त्यामुळे आई-वडील आणि कुटुंबातील सदस्यांची कायमस्वरूपी चिंता मिटते. म्हणूनच जर काय शारीरिक-धनसंपत्तीने वैभवशाली संतती हवी असेल, तर पुंसवन संस्काराचे महत्त्व जाणावे व त्याचे श्रद्धेने आयोजन करून व्यक्ती, कुटुंब, समाज व राष्ट्राला शरीराने धष्टपुष्ट, बलशाली, निरोगी व शक्तीसंपन्न असे पुत्र व कन्यारत्ने प्रदान करावीत, जेणेकरून गृहस्थाश्रम हा यशस्वी ठरेल.
-प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य