मुंबई - मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील वॉर्ड क्रमांक २५ येथील शौचालयाचे आणि ओम गगनगिरी सोसायटीच्या सभामंडपाचे उदघाटन भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या शुभहस्ते आणि भाजपा सहसंयोजिका निशा परुळेकर यांच्या पुढाकाराने नुकतेच पार पडले.
याप्रसंगी वॉर्ड अध्यक्ष पवन तिवारी, महिला वॉर्ड अध्यक्षा सुनयना कदम, संजना शिंदे, विजय खरात, मनोज तिवारी, दिलीप सावंत, मंगेश धावडे, कोंडीबा कदम, महेश दाभोळकर, गौतम पावर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. दरेकर म्हणाले की, मागाठाणे विधानसभा क्षेत्रात सर्वोत्कृष्ट शौचालय गगनगिरीचे झालेले पाहायला मिळतेय. फलकबाजी करून आपल्याला मोठे होता येत नाही. लोकांची जी गरज आहे त्या गरजेची पूर्तता होणे माझ्यासाठी महत्वाचे आहे. पाटी लागते, पाटी निघते परंतु प्रामाणिकपणे काम केले तर ते लोकांच्या हृदयात राहते. ते कुणालाही काढता येत नाही. यासाठीच माझा भर कामांवर असतो असेही त्यांनी अधोरेखित केले.
तसेच ते पुढे म्हणाले की, मागाठाणे विधानसभेत चांगल्या प्रकारे विकासकामे होताहेत. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी देश पुढे नेताहेत. त्यांच्या नेतृत्वावर जनतेचा प्रचंड विश्वास आहे. विकासकामे होताहेत परंतु माझ्या देशाकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिले, माझ्या आया-बहिणींचे कुंकू कोण पुसत असेल तर मी त्याला सोडणार नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून पाकिस्तानला जशास तसे उत्तर देऊन महिला भगिनींच्या कुंकूवाचा सन्मान करणारे पंतप्रधान आपल्याकडे आहेत. त्या पक्षाचे आपण कार्यकर्ते आहोत याचा अभिमान आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत जे खासगी वाढीव वने आहेत ते वनविभागातून वगळा असा शासनाने ठराव केला आहे. यावर राज्याचे मुख्यमंत्री शिक्कामोर्तब करणार आहेत. हा ठराव झाल्यावर मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन या खासगी वनेच्या जागेवर तुमच्या विकासाचा मार्ग मोकळा झालेला असेल, असा शब्दही दरेकर यांनी यावेळी उपस्थितांना दिला.
तसेच निशा परुळेकर यांनी गेल्या महापालिका निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही नगरसेवकाला लाजवेल असे काम केले आहे. त्या प्रामाणिकपणे येथील जनतेसाठी काम करत असतात असे गौरवोदगारही दरेकरांनी काढले.
गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना सहकार्य करणार
दरेकर म्हणाले की, झोपडपट्टीत राहून धावडे नावाची लेक दहाव्या इयत्तेत ९७ टक्के गुण मिळवू शकते हाच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा विजय आहे. बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा म्हटलेय. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते प्यायल्याशिवाय तुम्ही गुरगुरणार नाही. या धावडे मुलीने ९७ टक्के गुण मिळवून जानूपाड्याचे नाव उज्वल केलेय. शिक्षणात पालकांचे मोठे योगदान असते. धावडे कन्येसारख्या आणखी मुली तयार झाल्या पाहिजेत. गरीब कुटुंबातील मुलांना जिथे जिथे सहकार्य लागेल तिथे निश्चित करणार असल्याचे आश्वासनही दरेकरांनी यावेळी दिले.