आक्रसणारा चीन आणि विस्तारणारा भारत, पण...?

    22-Apr-2023
Total Views | 114
Why India's population is increasing?

‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड’ने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनलाही मागे टाकले. भारताची लोकसंख्या १४२.८६ कोटी, तर चीनची त्याखालोखाल १४२.५७ कोटी. त्यामुळे एकीकडे आक्रसणारा चीन, तर दुसरीकडे विस्तारणारा भारत असे जागतिक पटलावर निर्माण झालेले चित्र. त्यानिमित्ताने लोकसंख्या वाढीची कारणे, आव्हाने आणि एकूणच या लोकसंख्यावाढीकडे बघण्याचा संख्यात्मक-गुणात्मक दृष्टिकोन यांचा उहापोह करणारा हा लेख...


भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला दोन शतकानंतर मागे टाकले आहे, असे ‘युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड’ (युएनएफपीए) च्या डेटावरून नुकतेच समोर आले आहे. यापुढे चीनची लोकसंख्या आक्रसत जाणार आहे, तर भारताची लोकसंख्या वाढत जाणार. भारताने लोकसंख्येच्या बाबतीत १४२.८६ कोटींचा आकडा पार केला, तर चीनची लोकसंख्या १४२.५७ कोटी आहे. आता जगातील दर पाच मनुष्यांत एक भारतातील असेल. चीनला मागे टाकून आता भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश ठरला आहे. चीनच्या लोकसंख्येने गेल्यावर्षी उच्चांक गाठला होता. पण, आता मात्र चीनची लोकसंख्या कमी होऊ लागली आहे, असे हा अहवाल स्पष्ट करतो, तर दुसरीकडे भारताची लोकसंख्या वाढतेच आहे, कमी होत नाही. पण, भारताच्या लोकसंख्येच्या वाढीचा दर १९८० पासून घसरत आहे. म्हणजेच भारताची लोकसंख्या जरी वाढत असली तरी लोकसंख्या वाढीचा दर पूर्वीच्या तुलनेत कमी झाला आहे.

‘युएनएफपीए’ची उद्दिष्टे

‘युएनएफपीए’ची उद्दिष्टे साररूपाने काहीशी अशी आहेत. स्त्रीला गर्भारपण हवेसे वाटले पाहिजे. प्रत्येक जन्म सर्वार्थाने सुरक्षित असावा, प्रजोत्पादन क्षमता असलेल्या प्रत्येक तरुण व्यक्तीला आपल्या या क्षमतेला वाव देता आला पाहिजे. लैंगिक आणि प्रजोत्पादक आरोग्याचा लाभ प्रत्येक व्यक्तीला मिळावा. यासाठी कुटुंब नियोजन महत्त्वाचे आहे. प्रसूती दरम्यानचे मृत्यू कमी झाले पाहिजेत. तरुण स्त्री-पुरुषांचे जीवन सुखासमाधानात जावे, लिंग समानतेचा पुरस्कार केला जावा. लोकसंख्या वाढीचा वेग, प्रजननक्षमता, मृत्यूदर आणि स्थलांतर याबाबत मानवीय, सामाजिक आणि आर्थिक प्रगती साधली जाईल, हा हेतू समोर ठेवून धोरणे आखली जावीत, यावर ‘युएनएफपीए’चा भर आहे. थोडक्यात असे की, लोकसंख्येचा विचार मानवीय भूमिकेतून व्हावा हे ‘युएनएफपीए’ला अभिप्रेत आहे.आपल्या देशाचा एक हजार लोकांमधला जन्मदर २७.५ आहे व मृत्यूदर ०.५ आहे. त्यामुळे लोकसंख्येत वाढ होताना दिसते. अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी-परंपरा यामुळे समाजाचा कल अधिक मुलांना जन्म देण्याकडे असतो. समाजामध्ये काही अंधश्रद्धा असतात. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मेल्यावर पाणी पाजण्यास व अग्नी देण्यास तसेच संपत्तीला वारस पाहिजे आणि तो मुलगाच पाहिजे, त्यामुळे मुलाची वाट पाहात कुटुंबात मुले जन्माला घातली जातात. परिणामी, लोकसंख्या वाढते.

असे होते चीनचे लोकसंख्याविषयक धोरण
 
लोकसंख्या नियंत्रणासाठी चीनने १९७९ साली ‘एक अपत्य धोरण’ स्वीकारले. प्रचंड लोकसंख्या हा विकासातला सर्वांत मोठा अडथळा मानला जातो. त्यामुळे लोकांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने हे केले गेले. ‘एक अपत्य धोरणा’मुळे चीनला सुमारे ४०० दशलक्ष जन्म रोखता आले. हे धोरण अतिशय कठोरपणे राबविण्यात आले. आर्थिक दंड आकारूनच अनेक श्रीमंत लोकांना अधिक अपत्यांना जन्म देण्याची अनुमती दिली गेली. पण, आज या ‘एक अपत्य धोरणा’चे चिनी समाजावर दीर्घकालीन परिणाम झाले आहेत. चिनी सरकारने जन्मदर नियंत्रणात आणला खरा ; परंतु त्यामुळे लिंग गुणोत्तर बिघडले. आणि आज तर चीन अशा टप्प्यावर आहे की, श्रीमंत होणे तर दूरच राहिले, पण चीनचा प्रवास मात्र वृद्धत्वाकडे सुरू झाला आहे.

चीनमध्ये काय घडले?

जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून चीनचा आजवर पहिला क्रमांक होता. चीनमध्ये स्वत:ला साम्यवादी म्हणवणारे सरकार आहे आणि त्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी काय केले, हे लक्षात घेतले पाहिजे.१९५०च्या दशकामध्ये चीनची लोकसंख्या ज्या दराने वाढत होती, त्या दराने धान्याचे उत्पादन होत नव्हते. म्हणून चिनी सरकारने लोकसंख्या नियंत्रणासाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करायला सुरुवात केली. तरीही लोकसंख्या वाढ नियंत्रित होत नव्हती. हे लक्षात आल्यावर चीनने १९७९ मध्ये ’एक मूल धोरण’ जाहीर केले. यानुसार चीनमधील कुटुंबाला फक्त एकाच मुलाला जन्म देण्याची परवानगी देण्यात आली. हे धोरण थोडीथोडकी नव्हे, तर जवळजवळ ३५ वर्षे राबविण्यात आले. अलीकडेच २०१५ मध्ये चीन खडबडून जागा झाला आणि हे धोरण बदलण्याचे सरकारने ठरविले. याचे कारण म्हणजे, हे धोरण लागू केल्यापासून, चीनमध्ये मोठ्या प्रमाणात लिंगगुणोत्तरात असमानता निर्माण झाली. मुली जन्माला येताच लोक तिला मारून टाकू लागले. उद्योगांना कामगार मिळेनासे झाले आणि वृद्धांची संख्या वाढत गेली. यामुळे चीन सरकारने २०१५ नंतर या धोरणामध्ये बदल केला आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा करणे हे धोरण सोडून देण्याचे ठरवले.
 
लोकसंख्येचे नियंत्रण करण्यासाठी कायदा करण्यापेक्षा जर आपण जनजागृती निर्माण केली, लोकांना चांगले आरोग्य व शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिल्या, लहान कुटुंबाचे महत्त्व समजावून सांगितले आणि स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या धोरणाचा वापर केला, तर लोकसंख्या नियंत्रण होऊ शकते, हे चीनला खूप उशिराने कळले.१९६०च्या दशकानंतर चीनमध्ये गेल्या वर्षी लोकसंख्येची वाढ सर्वांत कमी झाल्याचे दिसून येताच, चीन सरकारने केवळ दोन मुलं असण्याचा नियम हटवला. चीनमध्ये एका जोडप्याला आता दोनऐवजी तीन अपत्यांना जन्म देण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण, आता अनेकांना मूलच नको असे वाटू लागले आहे. ‘हम दो हमारे तीन’, ‘हम दो हमारे दो‘ किंवा ‘हम दो पर हमारा एकही’ आणि आता तर ‘हम दो पर हमारा न कोई’ हे धोरण चिनी जनतेने मोठ्या प्रमाणावर स्वीकारल्याचे दिसते.‘मूलच नको’ हा दृष्टिकोन तरुण मुलामुलींनी मोठ्या प्रमाणावर स्वीकारला आहे, हे कळताच चिनी धुरिणांचे धाबेच दणाणले. लग्नाला तीन वर्षे उलटली तरी बाळ जन्माला घालण्याचे जोडप्याच्या मनातही नसते. बाळाची जबाबदारी आणि चिंता यांचं ओझे न बाळगता त्यांना जीवन जगणं जर शक्य असेल, तर तो लाभ का घ्या, अशी जोडप्यांची भूमिका आहे. सुखोपभोग आणि अपत्यसंभव यांचा संबंधविच्छेद चिनी तरुणाईला चांगलाच भावला आहे. सध्या चीनमध्ये शहरी भागातच मूल जन्माला घालण्याबाबतचा हा नवीन दृष्टिकोन विशेष प्रमाणात आढळतो आहे. पण, हे लोण खेड्यात पोहोचण्यास वेळ लागणार नाही, हे चिनी सरकारला चांगलेच ठावूक आहे.

लोकसंख्या वाढीचा दर असाच कमी होत राहिला, तर चीनची लोकसंख्या नकारात्मक दृष्टीने घटत जाईल. म्हणजे देशातील तरुणांची लोकसंख्या कमी असेल आणि एक वेळ अशी येईल की, देशात वृद्धांची लोकसंख्या सर्वाधिक असेल. चीनमध्ये महागाईच्या काळामध्ये मुलांना वाढवणं आधीच अवघड होऊन बसलं आहे. कारण, चीनमध्ये गेल्या काही दशकांमध्ये उदरनिर्वाह भागवण्यासाठी लागणार्‍या खर्चामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामानाने चिनी नागरिकांचे उत्पन्न मात्र वाढलेले नाही.चीनमध्ये लोक एखाद्या सरकारी धोरणामुळे मुलं जन्माला घालायला घाबरत नसून, बाळाच्या जन्मानंतर त्याचे पालनपोषण महागल्याने ते यासाठी धजावत नाहीत. चीनमध्ये आणि विशेषतः शहरी नागरिकांमध्ये तर यशस्वी जीवनाची व्याख्याच बदलली आहे. आता विवाह करणे किंवा मुलं जन्माला घालणे या पारंपरिक गोष्टींचा यशस्वी जीवनाशी संबंध लावला जात नाही. लोक सध्या वैयक्तिक प्रगतीवर अधिक लक्ष केंद्रित करीत आहेत. बहुतेक मुलामुलींना विवाहबंधन नको आणि मुले तर अजिबात नकोच. त्यातही मुलांच्या संगोपनाची जबाबदारी ही प्रामुख्याने आईचीच आहे, असे चीन मानतो.

तिसर्‍यांदा अध्यक्षपदी विराजमान झालेले शी जिनपिंग हे लिंगसमानतेचे खंदे समर्थक मानले जातात. पण, सध्यातरी चीनमध्ये शासन आणि प्रशासनस्तरावर महिलांची भूमिका ‘चूल आणि मूल’ यापुरतीच सीमित असल्याचे दिसते. आज चीनमध्ये जन्मदर काळजी वाटावी इतका कमी झाला आहे. तसेच, विवाहितांच्या संख्येतही लक्षणीय घट होताना दिसते. तरुण-तरुणी लग्नाविना सोबत राहू इच्छितात, हे पाहून शी जिनपिंग यांनी तर महिलांना उपदेश केला आहे की, त्यांनी नोकरी करण्याऐवजी कुटुंबातील बाल आणि वृद्धांची काळजी घ्यावी. तसेच, लहान मुलांच्या शिक्षणावरही लक्ष केंद्रित करावे.चीनमध्ये नव्या पिढीतील तरुणी मूल जन्माला घालण्यासाठी घाबरतात, असेही समोर आले आहे. कारण, त्यामुळे त्यांच्या करिअरवर याचा वाईट परिणाम होईल, याची भीती त्यांना वाटत असते. अगोदरच महिलांसाठी रोजगाराच्या चांगल्या संधी चीनमध्ये कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यात ज्या महिला चांगली नोकरी करतात, त्यांना ती संधी गमावण्याची इच्छा नसते. अशा परिस्थितीत कोणतीही मुलगी बाळाचा विचार कसा बरे करेल? चीनमध्ये पुढील पाच-सहा वर्षांपर्यंत मुलं जन्माला घालण्याबाबत काहीही निर्बंध नसतील, असा धोरणात्मक बदल चीनने केला आहे. पण, त्याचा आता फारसा उपयोग शहरात होण्याची शक्यता दिसत नाही.

उलट या धोरणामुळे खेड्यात लोकसंख्येचा स्फोट होण्याची भीती नाकारता येत नाही. यातून बेरोजगारी आणि गरिबी यात वाढ होण्याची शक्यता आहे. मुलांचे शिक्षण आणि आरोग्य याबाबतची जबाबदारी देशाने स्वीकारावी. अशाप्रकारे कुटुंबांवरचं मानसिक ओझं कमी करावे. यालाही खूप उशीर झाल्यास हा उपायही परिणामकारक ठरणार नाही, असे या विषयाच्या अभ्यासकांचे मत आहे. यासाठी ते जपान आणि फ्रान्सचे उदाहरण देतात. या देशांची लोकसंख्या सतत कमी होत असून तो देशासमोरचा बिकट प्रश्न होऊन बसला आहे. मुले असलेल्या कुटुंबांवर फ्रान्स, सवलती आणि पारितोषकांचा वर्षाव करीत असतो. पण, वैयक्तिक स्वातंत्र्य आणि मोकळीक यांच्या जोडीला जबाबदारीशिवाय सुखोपभोग याचे आकर्षण एवढे जबरदस्त ठरले आहे की, या प्रलोभनांचा तेथील जनतेच्या मनावर परिणाम होताना दिसत नाही.

 
मग ही लोकसंख्या शाप की वरदान?

‘सर्व समस्यांचे मूळ लोकसंख्या वाढीत आहे!’ अशा स्वरूपाची शीर्षके असलेले लेख आपल्यापैकी अनेकांनी वाचले असतील. भारतात हे वाक्य तर आपण आजही अनेकदा ऐकतो. लोकसंख्या वाढ हेच सर्व समस्यांचे मूळ आहे, हा निष्कर्षही या लेखांमध्ये काढलेला आढळतो. पण, असा विचार करताना आपण हे मुळी लक्षातच घेत नाही की, कुशल मनुष्यबळ असेल तरच आर्थिक विकास साधता येईल आणि आर्थिक विकासातूनच सर्वंकष विकासाची गंगा या भूतलावर आणता येईल. आर्थिक विकासातून दोन महत्त्वाची साधने उपलब्ध होऊ शकतात. पहिले साधन आहे कुशल मनुष्यबळ आणि दुसरे साधन आहे उद्योजक! पण, यासाठीही जाणीवयुक्त दृष्टिकोन आणि नियोजन आवश्यक आहे. लोकसंख्या वाढ ही केवळ संख्यात्मक असेल, तर ती अनेक समस्यांना जन्म देईल. पण, लोकसंख्येसोबत गुणात्मकताही निर्माण होत असेल तर? अशी लोकसंख्या तर वरदान ठरू शकेल. बालक म्हणजे केवळ आ वासून उभे असलेले तोंड नाही. याचा अर्थ असा की, कौशल्य, ज्ञान, आरोग्ययुक्त व्यक्तिमत्त्व आणि सकारात्मक भूमिका असलेले नागरिक हे कोणत्याही देशासाठी वरदानच सिद्ध होतील. अशाची संख्या जेवढी जास्त तेवढे वरदानही मोठे असेल.

लोकसंख्या नियंत्रणाचा मानवीय मार्ग


लोकसंख्या नियंत्रणासाठीचे अतिरेकी उपाय अनेक उपप्रश्नांना जन्म देत असतात. त्यातून स्त्री-पुरुष समतोल बिघडतो, समाजातील वृद्धांची संख्या वाढते, विकासासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. हे प्रश्न आता चीनला भेडसावू लागतील. याउलट बालमृत्यूचे प्रमाण कमी होईल, अशा आरोग्यसुविधा निर्माण कराव्यात. नोकरी करणार्‍या महिलांच्या मुलांसाठी सार्वजनिक स्तरावर बालसंगोपन व्यवस्था उभ्या कराव्यात. लोकांचे आयुर्मान वाढावे यासाठी वृद्धांची काळजी घ्यावी, प्रजनन दर कमी करण्यासाठी स्त्री शिक्षणाला महत्त्व द्यावे, जोडीला करमणुकीची सकारात्मक साधने निर्माण करावीत. चांगले आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचतील, असे पाहावे. लोकसंख्या नियंत्रणाचा हा मानवीय मार्ग आहे. कारण, विकासातून लोकसंख्या नियंत्रण आपोआप घडत असते.भारताची लोकसंख्या आता सर्वाधिक झाली आहे, याची आम्ही दखल घेत नसल्याचे चीनने म्हटले आहे. संख्या नाही, तर दर्जा महत्त्वाचा अशी टिप्पणी चीनने केली. चीनजवळ ९० कोटींचे कुशल मनुष्यबळ आहे, अशी प्रौढी चीनने मिरविली. चीनची ही प्रतिक्रिया अपेक्षित अशीच आहे.

भारताचे लोकसंख्याविषयक धोरण


तसे पाहिले, तर भारत हा जगातला लोकसंख्याविषयक धोरण स्वीकारणारा पहिला देश. १९५२ साली भारताने हे धोरण स्वीकारले. पण, नीट अंमलबजावणी आणि जनतेचे १०० टक्के प्रबोधन होऊ न शकल्यामुळे संपूर्ण जनतेने हे धोरण मनापासून स्वीकारले नाही. ‘खाणारे तोंड एक असते, पण राबणारे हात दोन असतात’, हा विरोधकांचा मुद्दा शासनाला पुरतेपणी समजला आणि खोडता आला नाही. ‘खाणारे तोंड निरोगी असावे आणि राबणारे हात काटक्यांसारखे नसावेत, तर ते बलवान बाहू असावेत’ ही जोड आपण मुखाला आणि हातांना देऊ शकलो नाही. आणीबाणीत तर कुटुंब नियोजनाची बेछूट अंमलबजावणी झाली, त्यामुळे तर या योजनेचे ‘कुटुंब नियोजन’ हे शीर्षकच गाळण्यात आले आणि त्याऐवजी ‘कुटुंब कल्याण’ असा शब्दप्रयोग करावा लागला. अशाप्रकारे एका राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या प्रश्नाची दुर्दशा झाली.भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे, हे खरे. पण, या बाजारपेठेचे राहणीमान आणि जीवनमान समृद्ध असण्याची आवश्यकता आहे, हा प्राथमिक निकष आपण नजरेआड केला. भारतीय तरुण सुशिक्षित, सुसंस्कारित, सुपोषित, कुशल, निरोगी आणि बुद्धिचापल्ययुक्त असण्यावर आपला भर यापुढे असला पाहिजे, हे आपण वेळीच ओळखले हे बरे झाले.

मूल होणे किंवा न होणे हे ठरविण्याचा हक्क फक्त पुरुषांचा असून स्त्रीने तो हक्क पुरुषांना बजावू दिला पाहिजे, ही मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. कारण, लोकसंख्यावाढीचे हे एक प्रमुख कारण आहे. निम्म्या लोकसंख्येला म्हणजे महिलांनाही समान संधी, समान अधिकार आणि समान प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, हेही आपण ओळखले आहे. म्हणूनच तर ‘पंतप्रधान निवास योजने’तील घरे गृहिणींच्या नावे नोंदविली जात आहेत. जगाचा फक्त २.५ टक्के भूभाग पण १८ टक्के लोकसंख्या असे विषम परिमाण आपल्या वाट्याला आले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आपण कौशल्यविकासाचा भारतव्यापी कार्यक्रम हाती घेऊन विशाल कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दिशेने पाऊल टाकणे आहे. आरोग्य सुविधा सर्व गरजूंना उपलब्ध व्हावी, यासाठी आपण भारतव्यापी कार्यक्रम हाती घेतला आहे. अन्नधान्याच्या उत्पादनाचे बाबतीत भारताची स्थिती चांगली आहे. आता आपल्याला आवश्यक असलेले अन्नधान्याचे सर्व प्रकार देशातच निर्माण होतील, यावर आपला भर असला पाहिजे.

१५ ते २४ वयोगटातील २५ कोटींपेक्षाही जास्त तरुणाई जर सुशिक्षित, सुसंस्कृत, सुदृढ, बलवान, सुबुद्ध या गुणांची परिचायक सिद्ध झाली, तर शाश्वत कुशल मनुष्यबळाचा अक्षुण्ण सागर असे भारताचे स्थान जगात निर्माण होईल. भारताचे एकेकाळचे हे ‘पूर्वदिव्य’ होते. त्यामुळे यात अशक्य असे काहीही नाही. आज भारतात जसे पुरेसे रोजगार उपलब्ध नाहीत, तसेच अशा रोजगारांसाठी आवश्यक असलेले कौशल्यधारीही तयार व्हावयाचे आहेत. नोकर्‍यांची संख्या आणि रोजगारांचा दर्जा यातही समान वाढ झाली पाहिजे. भारताचे सेवाक्षेत्र जसे आज प्रगतिपथावर आहे, तशीच कारखानदारी आणि त्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचे प्रयत्न दुप्पट वेगाने करावे लागणार आहेत. यातूनच भारतात ‘रम्य भावीकाळ’ निर्माण होणार आहे.
 

भारत-चीन लोकसंख्येसंबंधीचे काही तुलनात्मक आकडे


अ) भारतातील २५ टक्के लोकसंख्या ० ते १४, तर चीनमध्ये १७ टक्के लोक ० ते १४ वर्षे या वयोगटातील आहेत.

ब) भारतातील १८ टक्के लोक हे १० ते १९ वयोगटातील आहेत, तर चीनमध्ये १२ टक्के १० ते १९ वयोगटातील आहेत.

क) भारतात २६ टक्के लोकसंख्या ही १० ते २४ वयोगटातील आहे, तर चीनमध्ये १८ टक्के लोक १० ते २४ वर्षे या वयोगटातील आहेत.

ड) भारतात ६८ टक्के लोक १५ ते ६४ वर्षे वयोगटातील आहेत, तर चीनमध्ये ६९ टक्के १५ ते ६४ वर्षे वयोगटातील आहेत.

ई) भारतात ६५ वर्षांवरील गटात सात टक्के लोक आहेत, तर चीनमध्ये १४ टक्के लोक ६५ वर्षांवरील गटात आहेत.

तसेच एका अहवालानुसार, अठराव्या शतकात भारताची लोकसंख्या सुमारे १२ कोटी असावी, असे गृहीत धरले आहे. १८२० मध्ये भारताची लोकसंख्या सुमारे १३.४० कोटी होती. सतराव्या शतकापर्यंत भारताची लोकसंख्या २३ कोटींच्या पुढे गेली. २००१ मध्ये भारताची लोकसंख्या १०० कोटींच्या पुढे गेली आणि सध्या भारताची लोकसंख्या १४० कोटींच्या आसपास आहे. भारताची लोकसंख्या याच गतीने वाढत राहिली, तर २०५० पर्यंत भारताची लोकसंख्या सुमारे १६६ कोटी असेल, अशी एक शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 
-वसंत गणेश काणे


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121