भारताच्या ‘जीडीपी’ आणि रोजगाराचा महत्त्वपूर्ण भाग असलेले कृषी क्षेत्र उष्णतेच्या लाटेमुळे अत्यंत प्रभावित होते. अतिउष्णतेमुळे पिकांचे नुकसान घेऊन उत्पादनही कमी होते. शिवाय अन्नधान्याच्या किमतीही वधारतात. शेतकरी आणि ग्राहकांनाही या झळांची धग सहन करावी लागते. वाढत्या उष्णतेच्या लाटेचा पिकांवर होणार्या वाईट परिणांमाचा अभ्यास आणि उपाययोजना यासाठी केंद्र सरकारने तज्ज्ञांची समिती नेमून तिच्या अहवालावर जनतेसाठी कल्याणकारी योजना राबवण्याची गरज आहे. त्याविषयी...
तीन वर्षांच्या खंडानंतर यंदा मान्सूनचा हंगाम या ’अल निनो’च्या प्रभावामुळे विस्कळीत होण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला आहे. तसे झाल्यास यंदाच्या आर्थिक वर्षात खरीप पीक उत्पादनावर याचा फार मोठा वाईट परिणाम होऊ शकतो.उष्णतेच्या लाटांमुळे शेतीचे नुकसान झाल्यामुळे आपसुकच अन्नधान्यांच्या किमतीही वाढतात आणि परिणामी वाहतुकीसाठीचे इंधनही महाग होते. २०२१-२०२२ या वर्षात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही गेल्या वर्षी महागाईत वाढ झाली होतीच. उन्हाळ्यातील उष्ण दिवसांचा प्रदीर्घ कालावधी आणि अपेक्षेपेक्षा कमी पाऊस, यामुळे पीक उत्पादकतेवर यंदा मोठा परिणाम होणार असून त्यामुळे महागाई वाढण्याचा धोका अधिक आहे.
पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या प्रमुख गहू उत्पादक राज्यांत गेल्या वर्षी फेब्रुवारी अखेरपासून मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत उष्णतेची लाट होती. गहू पीक तयार होण्याच्या ऐन काळातच, उष्णतेमुळे गहू उत्पादनात सुमारे सहा टक्क्यांनी घट झाली. १०९.५९ दशलक्ष टन उत्पादन अपेक्षित असताना केवळ १०७.७४ दशलक्ष टन उत्पादन झाले. याही वर्षी परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये वाढलेल्या तापमानामुळे गव्हाचे उत्पादन ४० ते ५० दशलक्ष टनांनी कमी होण्याची शक्यता व्यापारी संघटनांनी वर्तवली आहे. यंदा गहू उत्पादन १०६ ते १०७ (केंद्राचा अंदाज ११२.२ दशलक्ष टन) दशलक्ष टन राहील, असे ‘रोलर फ्लोअर मिलर्स फेडरेशन ऑफ इंडिया’चे अध्यक्ष प्रमोद कुमार यांनी नुकतेच सांगितले. म्हणजे उष्णतेची लाट ही कृषी क्षेत्र आणि एकूणच अर्थव्यवस्थेला चटका लावणारी ठरु शकते.
‘इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन’च्या एका अहवालानुसार, केवळ भारतातच नाही, तर जगभरात २०३० पर्यंत दोन टक्के इतके एकूण कामकाजाच्या तासांचे नुकसान उष्णतेच्या लाटेमुळे होईल. कारण, या लाटेमुळे नोकरदारांना कामाच्या ठिकाणी पोहोचणेच शक्य होणार नाही किंवा ते कामावर हजर राहिले, तरी त्यांच्या कामाचा वेग हा मंदावलेला असेल. साधारणत: ३५ अंश सेल्सिअसच्या वरील तापमानाच्या नोंदीची ‘उष्णतेची लाट’ म्हणून संयुक्त राष्ट्राकडून गणना केली जाते. कार्यालयीन कर्मचार्यांपेक्षा याचा सर्वाधिक धोका शेतात राबणारे शेतकरी आणि बांधकाम क्षेत्रातील मजूर आदी थेट सूर्यप्रकाशात काम करणार्यांना अधिक जाणवतो. त्यातच भारतीय अर्थव्यवस्था ही कृषिप्रधान असल्यामुळे या क्षेत्रातील मानवी संसाधनाच्या उत्पादकतेची घट ही पर्यायाने इतर क्षेत्रांतील कामकाजाचे तास, उत्पादकता यांच्यावरही नकारात्मक परिणाम करू शकते.
उष्णतेच्या लाटांदरम्यान विजेची मागणी वाढल्याने, वीज खंडित होऊ शकते, ज्यामुळे आर्थिक क्रियाकलाप कमी होतात. विशेषत: उत्पादन आणि आरोग्य सेवा यांसारख्या उद्योगांमध्ये जे कार्यान्वयनासाठी विजेवर अवलंबून असतात. उन्हाळ्यात वाढत्या उष्णतेवर उपाय म्हणून महानगरात वातानुकूलित यंत्रणा, फ्रीझर, कूलिंग सिस्टीमचा वापर प्रचंड वाढतो. साहजिकच, अशा उपकरणांतून वातावरणात अधिक प्रमाणात ओझोनला छेद करणारे हरितगृह वायू उत्सर्जित केले जातात. म्हणजे उष्णता कमी करण्यासाठी वापरली जाणारी उपकरणेच पुन्हा तापमानवाढीस कारणीभूत होतात. हे दुष्टचक्र आहे.
अशा या उष्णतेच्या लाटेची तीव्रता कमी करता येत नसली, तरी त्याला प्रभावीपणे तोंड देण्याचे उपायही करता येणे शक्य आहे. पर्यावरण आणि हवामानबदलतज्ज्ञ अतुल देऊळगावकर सांगतात की, “निसर्गाचे चक्र बदलले आहे. पूर्वी पावसाळ्यात अनेक दिवस सरासरीइतका पाऊस पडत होता. आजही सरासरी इतका पाऊस देशात पडतो. मात्र, तो चार महिन्यांतील पावसाळ्यात न पडता फक्त काही दिवसच आणि त्यातही काही तास प्रचंड पडतोे.” निसर्गाचे हे बदलते चक्र समजून घेऊन ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ उपक्रम प्रभावीपणे राबवायला हवे. भूगर्भातील जलपातळी आज अतिवापरामुळे प्रचंड खोल गेली आहे. कूपनलिकेवाटे जे पाणी आज आपण काढतो, ते एखाद्या वर्षात साठवलेले नसून किमान २०० वर्षे अगोदर साठवले गेलेले असते. या वास्तवाला डोळ्यांसमोर ठेवून ’रेनवॉटर हार्वेस्टिंग’ किती गरजचे आहे, हे अधोरेखित होते.
उष्णतेच्या लाटेमुळे कृषी उत्पादनावर होणारे परिणाम कमी करण्यासाठी जलनियोजन अत्यंत गरजेचे आहे. वाढत्या उष्णतेचा शेतीपिकांवर होणार्या वाईट परिणांमाचा अभ्यास आणि उपाययोजना यासाठी केंद्र सरकारने तज्ज्ञांची समिती नेमून तिच्या अहवालावर जनतेसाठी कल्याणकारी योजना राबवण्याची गरज आहे. केंद्र सरकारतर्फे येऊ घातलेल्या उष्णतेच्या लाटेवर काम करण्यास प्रारंभही झाला आहे, हे आश्वासकच!
निल कुलकर्णी
९३२५१२०२८४