‘ऑपरेशन सिंदूर’ने भारत हा लष्करीदृष्ट्या किती मजबूत देश आहे, तेच सिद्ध केले आहे. भारताचे सामर्थ्य पाहून जगाची छातीच दडपली. यामुळेच भारतातील देशविरोधी नेत्यांच्या अंगाची लाही लाही झाली आहे. नरेंद्र मोदी नामक राष्ट्रनायकाच्या पासंगालाही आपण पुरत नाही, हे लक्षात आल्यामुळे भारतविरोधी मजबूर नेत्यांनी थयथयाट सुरू केला आहे.
भारतात घडविलेल्या असंख्य लहानमोठ्या दहशतवादी हल्ल्यांनंतरही पाकिस्तानविरोधात बोटही उचलण्याची हिंमत न दाखविलेला काँग्रेस पक्षच पहलगाम हत्याकांडानंतर पाकिस्तानवर हल्ला करण्यास उतावळा होत होता, ही गोष्ट अनेक राजकीय निरीक्षकांना चकित करणारी वाटली. पण, त्यामागे असलेली कुटिल आणि देशद्रोही विचारसरणी लक्षात आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चिथावण्यांकडे साफ दुर्लक्ष केले आणि आपली पूर्ण तयारी झाल्यावरच ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानवर चढविलेल्या हल्ल्याने, सारे जग स्तिमित झाले. देशातील या देशद्रोही विरोधी पक्षांचीही काही दिवस वाचाच बसली होती. पाकिस्तानने नेहमीप्रमाणेच या कारवाईतून कसलाही बोध न घेता भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी उलट हल्ला चढविल्यावर मात्र, भारताने आपल्यातील सुप्त शक्ती जागृत केली. भारताच्या या विराटरूप दर्शनाने सारे जगच एक प्रकारे भयभीत झाले.
काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. मात्र, काही दिवसांनंतर त्यांनी या संघर्षात भारताची किती लढाऊ विमाने पडली, भारताचे किती सामरिक नुकसान झाले, यासारखे प्रश्न उपस्थित मात्र केले. इतकेच नव्हे, तर भारताने पाकिस्तानच्या याचनेनंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ तात्पुरते स्थगित केल्यावरही त्यांनी आणि त्यांच्या ‘इंडी’ आघाडीतील काही नेत्यांनी, पाकिस्तानवर आणखी हल्ले करण्याची मागणी केली.
यापूर्वी बालाकोट आणि उरी हल्ल्यांनंतर राहुल गांधी आणि या नेत्यांनी या कारवाईवर समाधान व्यक्त करणे दूरच, त्याचे पुरावे मागितले होते. त्यामुळे यावेळी त्यांच्या या प्रश्नांमुळे कोणाला आश्चर्य वाटले नव्हते पण, त्यामागील हेतू आता हळूहळू उघड होत आहे. नरेंद्र मोदी यांनी 2047 सालापर्यंत भारताला एक ‘विकसित राष्ट्र’ बनविण्याचे ध्येय जनतेपुढे ठेवले आहे. ते त्यांच्या परीने हे ध्येय साध्य करण्यासाठी जिवापाड मेहनत करताना दिसत आहेत. या ध्येयाचे विविध पैलू असून, त्यात संरक्षण सामग्रीच्या क्षेत्रात भारताला स्वयंपूर्ण करण्याचेही लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. भारताच्या संरक्षण क्षेत्राची वाटचाल त्या दिशेने किती वेगात आणि दमदारपणे सुरू आहे, याची छोटी झलक या ‘ऑपरेशन सिंदूर’ने भारतीयांना घडविली. देशप्रेमी जनतेने या रूपाचे स्वागत केले असले, तरी भारतातच राहणार्या देशविरोधी शक्तींच्या मनात मात्र त्यामुळे प्रचंड धडकी भरली आहे. कारण, भारत मजबूत नव्हे, तर मजबूर राहावा, यातच या शक्तींचे हितसंबंध गुंतले आहेत.
भारताने ताज्या संघर्षात ‘ब्रह्मोस’पासून ‘आकाश’पर्यंत विविध अस्त्रांचा वापर करून, पाकिस्तानच्या हवाईदलाच्या चिंध्या केल्या. ‘राफेल’सारख्या जबरदस्त शक्तिशाली लढाऊ विमानांचा वापर न करताही, केवळ ‘सुखोई’ आणि ‘मिराज-मिग’ यांसारख्या तुलनेने जुन्या पिढीतील विमानांद्वारेच पाकिस्तानची हवाई लढाऊ शक्ती नष्ट केली. हे सर्व करताना, भारतीय हवाईदलाने आणि सेनेने सरहद्द किंवा नियंत्रण रेषा ओलांडण्याचीही तसदी घेतली नाही. भारताच्या या प्रचंड लष्करी ताकदीने आणि तिचा वापर करण्याच्या राजकीय इच्छाशक्तीच विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या मनातील धडकीचे खरी कारण आहे. म्हणूनच ‘ऑपरेशन सिंदूर’ ही लुटूपुटूची लढाई होती, यासारखे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केले. तर ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे काहीच घडले नाही, हा निव्वळ देखावा होता; अशी टीका कर्नाटकातील काँग्रेस नेत्याने केली. समाजवादी पक्षाच्या एका नेत्याने सेनादलाच्या महिला प्रवक्त्यांची जात काढून आपली जातकुळी किती क्षुद्र आहे, तेच दाखवून दिले. एकंदरीतच दिवाळीच्या दिवशी घरात सुतकी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न, विरोधी नेत्यांकडून केला जात होता. ज्या काँग्रेसने मुंबईवर 26/11 सारखा भीषण हल्ला होऊनही पाकिस्तानला कागदी समज देण्याचा शेळपटपणा दाखविला, त्या काँग्रेसच्या दृष्टीने ‘ऑपरेशन सिंदूर’ हे विश्वरूप दर्शनच होते. पाकिस्तानकडे अण्वस्त्रे नाहीत हे गुपित उघड झाल्याच्या दुःखाने, काँग्रेसमध्ये सुतक पाळले गेले.
आपल्याच देशाची ही प्रगती विरोधी नेत्यांना का पाहावत नाही? असा प्रश्न कोणालाही पडेल. पण, त्याचे उत्तर सोपे आहे. गेल्या केवळ 11 वर्षांत मोदी यांनी भारताचे स्थान जगात ज्या प्रमाणात उंचावले आहे, ती गोष्ट विरोधकांना म्हणजे काँग्रेसला सहन होत नाही. कारण देशावर सर्वाधिक काळ राज्य करूनही काँग्रेसला मोदी यांच्या निम्म्यानेही भारताचा सन्मान वाढवता आला नाही. कथित आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ असलेल्या मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीतच भारताची अर्थव्यवस्था ‘फ्रजाईल 5’ या गटात गेली. उलट ‘चायवाल्या’ मोदी यांनी, भारताच्या अर्थव्यवस्थेला जगात चौथ्या क्रमांकावर नेण्याचा विक्रम केला आहे. काँग्रेसच्या कारकिर्दीत देशाचा फार मोठा भूभाग माओवादी-नक्षलवादी दहशतवाद्यांच्या कब्जात गेला होता. अमित शाह यांनी हा संपूर्ण भूभाग पुन्हा मुक्त करून, तेथे विकासाची गंगा वाहती केली. यासारख्या अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे काँग्रेसचे खरे स्वरूप उघड होत आहे. यात सांस्कृतिक व धार्मिक दमनशाहीचा उल्लेखही केलेला नाही.
‘ऑपरेशन सिंदूर’ हे ‘विकसित भारत’ या अधिक व्यापक आणि सर्वोच्च ध्येयाचा एक भाग झाले आहे. ‘विकसित भारत’ हा अन्य क्षेत्रांप्रमाणे संरक्षण सामग्रीच्या क्षेत्रात अन्य देशांवर अवलंबून राहणार तर नाहीच पण, दुसर्या देशांना भारतीय बनावटीची शस्त्रे-अस्त्रे निर्यात करणारा बलवान देश असेल, हे मोदी यांचे स्वप्न आहे. आज अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाने बनविलेली अत्याधुनिक लढाऊ विमानेही, भारताच्या ‘मिग’सारख्या तुलनेने जुनाट लढाऊ विमानांनी पाडली आहेत. यामागे लढाऊ वैमानिकाचे कौशल्य तर आहेच; पण त्याहीपेक्षा त्याच्या मनातील जाज्वल्य देशप्रेम आहे. तालिबानसारख्या मागास आणि रानटी विचारसरणी असलेल्या संघटनेनेही, अमेरिका नावाच्या महासत्तेला दमवून अफगाणिस्तानातून अक्षरशः पळून जाण्यास भाग पाडले होते. त्यांच्या तुलनेत भारत हा तर ‘विकसित देश’च म्हणावा लागेल. नरेंद्र मोदी यांनी प्रथम पंतप्रधानपदाची शपथ घेतली त्या दिवसाच्या 11व्या वर्धापनदिनापूर्वी या नेत्याने, भारतीयांची निवड चुकलेली नसल्याचा संदेश ‘मन की बात’ या भाषणातून दिला आहे.
-राहुल बोरगावकर