"...तर कोऱ्या कागदावर सही करुन राजीनामा देतो"; मंत्री लोढांचं अंबादास दानवेंना चोख प्रत्युत्तर
20-Dec-2023
Total Views | 99
नागपूर : एकही बेकायदेशीर काम केलं असेल तर मी कोऱ्या कागदावर सही करून राजीनामा देतो, असे म्हणत कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानपरिषदेत संताप व्यक्त केला आहे. मंगळवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी सभागृहात लोढांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. यावर मंत्री लोढांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.
"मंगलप्रभात लोढांनी मुंबईत ठाणे, कल्याण, भिवंडीत जमिनी घेतल्या," असा आरोप अंबादास दानवेंनी केला. त्यानंतर लोढांचे नाव घेण्याबद्दल दानवेंवर आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी ते मागे घेत असल्याचे म्हटले. मात्र, भाजपचे एक नेते, मुंबईचे पालकमंत्री यांचे अनेक ठिकाणी अवैध बांधकाम आणि त्याची विक्री सुरु आहे. भाजप उघड्या डोळ्याने हे बघत आहे, असे म्हणत आरोप केलेत.
यावर मंगलप्रभात लोढांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, "अंबादास दानवेंनी माझं नाव घेतलं. ते काढून टाकण्याच्या आधीच युट्युबवर पसरलं आहे. त्यानंतरही दानवेंनी भाजप नेता आणि पालकमंत्री असा केलेला उल्लेख हा माझ्याबद्दलच होता हे स्पष्ट झाले आहे. मी दहा वर्षांपासून माझ्या परिवाराच्या व्यवसायात नाही. माझ्या मुलाचा व्यवसाय फक्त मुंबईत नसून जगभरात आहे. त्यामुळे कुणी कायदेशीर पद्धतीने व्यवसाय करत असेल तर ते चांगलं आहे की, काहीच काम न करता आरामात राहतात ते चांगले आहेत?" असा सवाल त्यांनी केला.
तसेच माझ्या परिवाराने एकही बेकायदेशीर काम केलं असेल तर मी माझा राजीनामा इथे जमा करतो," असेही ते म्हणाले. "३० वर्षांपासून मी विधानसभेचा सदस्य आहे पण कधीही माझ्या पदाचा दुरुपयोग केला नाही. माझ्या कुटुंबातील कोणीच व्यवसाय करु नये का? सर्वांनी घरी बसायचं का? ते त्यांच्या कामात यशस्वी झाले तर त्यांच्यावर आक्षेप घ्यायचा का?"
"अंबादास दानवेंनी केलेले आरोप जर खरे असतील तर ते त्यांनी पुराव्यासहित ते सिद्ध करावे. कोणत्याही पुराव्याशिवाय कुणावर अनावश्यक आरोप करु नये. त्यांचं कुटुंब व्यवसाय करतात ते रास्त आहे आणि माझं का नाही? मी अत्यंत पारदर्शी पद्धतीने काम करतो. माझ्यावर कुणी एक रुपयाचाही आक्षेप घेऊ शकत नाही," असे म्हणत त्यांनी दानवेंना प्रत्युत्तर दिलं आहे.