वैद्यकीय शाखेचे महत्त्व जसजसे ठळकपणे समाजात अधोरेखित होत गेले, तसतसे त्यावर अवलंबून असलेल्या शाखांचेही महत्त्व पर्यायाने वाढत गेले. ज्यामध्ये औषधनिर्मिती करणार्या कंपन्या, पॅथोलॉजिकल लॅबोरेटरी तसेच सिटीस्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी, एक्स-रे इत्यादीची ‘डायग्नॉस्टीक सेंटर्स’ सुरू झाली. या सर्वांची चलती व्हावी म्हणून मग या कंपन्या जे लोभी व धंदेवाईक डॉक्टर्स आहेत, अशांना विविध आमिषे दाखवू लागली व त्याचाच परिणाम म्हणून या सर्वांचा धंदा वाढला. उठसूठ रक्त तपासणी, मोठमोठ्या टेस्ट्स रुग्णांकडून करून घेतल्या जाऊ लागल्या.
साध्या तापासाठी जरी रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये भरती झाला, तर नुसत्या तपासण्यांचेच बिल २५ ते ३० हजारांच्या वर होते. मेडिकल कॉलेजमधील ‘क्लिनिकल निदान’ हा प्रकारच लोप पाावत चालला आहे. प्रत्येक रुग्णाला कॅलशियम, व्हिटामीनच्या गोळ्या घेण्यासाठी सवय लावली जात आहे. सकस आहारामधून सुद्धा या सर्व गोष्टी माणसाला मिळतात, याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते. रुग्णाचे शरीर हे पैसे कमावण्याची मशीन झाली आहे. या सर्वांमध्ये प्रामाणिक व सुज्ञ वैद्यकीय व्यवसायाला पवित्र मानणार्या डॉक्टरांना मात्र नाहक त्रास होतो. ज्यावेळी या संधीसाधू व्यावसायिकांना कळेल की, अति-भरपूर पैसा आहे, त्यावेळी अॅलोपॅथी या वैद्यकीय शाखेचे महत्त्व अपेक्षेपेक्षा जास्त वाढले.
अॅलोपॅथी, होमियोपॅथी, आयुर्वेद ही तीन मुख्य औषध प्रणाली जगभरात कार्यरत आहेत.परंतु, सर्वांत प्राचीन व प्रभावी असूनही आयुर्वेद का मागे पडला? ज्या भारतात आयुर्वेदाची सुरुवात झाली, तेथेच आयुर्वेदाची अशी परवड का झाली? हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, लोकांच्या मनावर पद्धतीशीरपणे असे बिंबवले जाते की, जगात फक्त एकच औषधशास्त्र आहे आणि होमियोपॅथी आणि आयुर्वेदाला महत्त्वच दिले जात नाही. मागे उदाहरण दिल्याप्रमाणे, आजही एखाद्या लहान मुलाला जर औषधाचे चित्र काढायला आपण सांगितले, तर तो इंजेक्शन, सिरपची बाटली व गोल गोळी याचेच चित्र काढतो. म्हणजेच काय तर आपल्या सर्वांच्या मनावर हेच बिंबवले जाते की, हेच औषध आहे आणि म्हणूनच मग इतर शाखांचे महत्त्व पद्धतशीरपणे कमी होत जाते.
अॅलोपॅथी, होमियोपॅथी, आयुर्वेद या तीनही शाखा आपापल्या ठिकाणी श्रेष्ठच आहेत. प्रत्येक पॅथीला व्याप्ती आणि मर्यादा आहेत. परंतु, केवळ व्यवसायचा धंदा करण्यासाठी बाकीच्या दोन शाखांना दाबण्यात येते. ‘नीट’च्या अभ्यासासाठी आता विविध ठिकाणी महाविद्यालये व क्लासेस चालू झाले आहेत. या क्लासेसमध्ये सुद्धा ‘नीट’च्या अभ्यासक्रमासाठी भरमसाठ शुल्क आकारण्यात येते आणि चुरशीच्या या परीक्षेसाठी पालक इतकी फी भरायला नाईलाजाने तयारही होताना दिसतात.
मुलांच्या खांद्यावर अभ्यासक्रमाचे प्रचंड ओझे तर हे क्लास टाकतातच. परंतु, वैद्यकीय शाखेतील धंद्याचा यांच्यावरही परिणाम झालेला दिसून येतो. जगात एकमेव औषध पद्धती आहे व ती म्हणजे अॅलोपॅथी, हे पटवून देण्यात हे क्लास कुठेही कमी पडत नाहीत, हेच आजचे वास्तव.
(क्रमश:)
डॉ. मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)
९८६९०६२२७६