‘सित्वे’ बंदरामुळे सिक्कीम-पश्चिम बंगालमधील सिलिगुडी कॉरिडॉरवरील निर्भरता कमी झाली आहे. सिलिगुडी कॉरिडॉर ईशान्य भारताला उर्वरित भारताशी जोडणारा चिंचोळा पट्टा असून चीनबरोबर संघर्षात हा मार्ग बंद झाल्यास भारताला ईशान्येकडील राज्यांमध्ये पोहोचण्यासाठी ‘सित्वे’च्या माध्यमातून पर्यायी मार्ग मिळेल. ईशान्य भारतातून सिलिगुडी कॉरिडॉरचा वापर न करता कोलकात्यापर्यंत पोहोचता येईल.
म्यानमार हा भारताचा शेजारी असणारा देश. महत्त्वाचे सामरिक स्थान असणार्या या देशामध्ये सध्या ‘जुंटा’ या तेथील लष्कर प्रमुखांची राजवट आहे. म्यानमारची भारतामधील जुनी ओळख म्हणजे पूर्वी त्याला ब्रह्मदेश/बर्मा म्हणून ओळखले जायचे आणि तेथील रंगून (सध्याचे यांगून) हे भारतात अनेकांना माहिती असलेले आणि तेथील जुनी राजधानी असणारे शहर. म्यानमार या देशाच्या सीमा पश्चिमेकडे बांग्लादेशला भिडलेल्या आहेत, तर पूर्वेकडे चीन, थायलंड आणि लाओसला भिडलेल्या आहेत. म्यानमारच्या पूर्वेकडे असणारे ‘क्युकफ्यू‘ बंदर चीनकडून करण्यात आलेल्या गुंतवणुकीतून उभारण्यात आले आहे. खोल समुद्रातील हे बंदर चीनतर्फे विकसित करण्यात आले असून त्या बंदराशेजारी (म्यानमारच्या पश्चिमेकडील ‘राखीन’ भागातून) विशेष आर्थिक क्षेत्रही बनविण्यात आलेले आहे.
चीनकडून विकसित करण्यात आलेले पूर्वेकडील‘क्युकफ्यू‘ बंदर आणि भारताकडून विकसित करण्यात आलेले ‘सित्वे’ बंदर या दोघांमधील भौगोलिक अंतर आहे, फक्त १०५ किलोमीटर. नकाशा समोर ठेवला तर या दोन बंदरांचे महत्त्व स्पष्ट होते.चीनच्या ‘बेल्ट’ आणि ‘रोड अभियाना’अंतर्गत ही रस्ते बांधणीचे काम म्यानमारमध्ये चालू आहे. भारताच्या गुंतवणुकीतून उभारण्यात आलेल्या ‘सित्वे’ बंदराला पूर्वेकडील ‘चाबहार’ बंदर म्हणून ओळखले जाते. कलादान नदीच्या मुखाजवळ ‘सित्वे’ बंदर आहे. हे बंदर काही महिन्यांपूर्वी कार्यरत झालेले आहे. या बंदराचे संचालनही भारत करणार आहे. भारताने म्यानमारच्या ‘सित्वे’ बंदराचा केलेला विकास हा ‘कलादान मल्टिमॉडेल प्रोजेक्ट’चा भाग असून यामुळे भारताला ईशान्येकडील राज्यांमध्ये पोहोचण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. तसेच ‘सिलिगुडी कॉरिडॉर’ची निर्भरता कमी होईल.
भारताकडून वेळेआधी कार्यान्वित करण्यात येणार्या या ‘सित्वे’ बंदराचे महत्त्व भारतासाठी खूपच आहे. ‘नेबर फर्स्ट’ आणि ‘अॅक्ट ईस्ट’ धोरणाअंतर्गत हे बंदर भारतातर्फे विकसित करण्यात आले आहे. या बंदराचे संचालन भारताकडे देण्यात आलेले आहे. मुंबईस्थित ‘भारत फ्रेट ग्रुप’ (ए टू झेड एक्झिम लिमिटेड या कंपनीची उपकंपनी) या कंपनीला या बंदराचे कामकाज चालविण्याचे कंत्राट मिळालेले आहे. यापूर्वी कोलकाता ते मिझोरामकडे रस्ते मार्गाने जाणार्या वाहनांना अरुंद रस्त्यांवरील ठप्प वाहतुकीमुळे पोहोचण्यास प्रचंड वेळ लागत होता. त्याबरोबरच अनेकवेळा पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडाही मिझोराममध्ये जाणवत असे.
भारताने मॉरिशसजवळ असणार्या ‘अगलेगा’ बंदराच्या विकासात आघाडी घेतली आहे. त्याबरोबरच बांगलादेशातील ‘चितगाव’ बंदरातून वाहतूक करण्यासाठी परवानगी मिळाल्यामुळे अतिपूर्वेकडील भारताच्या राज्यांमध्ये वस्तूंची जलवाहतूक सुलभ आणि खूपच वेळ वाचवणारी ठरत आहे. त्यामध्येच ‘सित्वे’ बंदराचाही उपयोग लक्षणीय आहे.म्यानमारवर चीनच्या असलेल्या प्रभावानंतरही भारत म्यानमारबरोबर धोरणात्मक संबंध मजबूत करण्यात यशस्वी ठरल्याचे भारत म्यानमारमध्ये उभारत असलेल्या प्रकल्पांवरून स्पष्ट होते. भारत- म्यानमार-थायलंडला जोडणार्या त्रिपक्षीय महामार्गावरील अनेक पुलांचे कामही वेगाने पूर्ण करण्यात येत आहे.
‘सित्वे’ बंदर विकसित करण्यासाठी भारताने म्यानमारला १.४ अब्ज डॉलर्सचे आर्थिक साहाय्य दिले होते. ‘सित्वे’ बंदरामुळे सिक्कीम-पश्चिम बंगालमधील सिलिगुडी कॉरिडॉरवरील निर्भरता कमी झाली आहे. सिलिगुडी कॉरिडॉर ईशान्य भारताला उर्वरित भारताशी जोडणारा चिंचोळा पट्टा असून चीनबरोबर संघर्षात हा मार्ग बंद झाल्यास भारताला ईशान्येकडील राज्यांमध्ये पोहोचण्यासाठी ‘सित्वे’च्या माध्यमातून पर्यायी मार्ग मिळेल. ईशान्य भारतातून सिलिगुडी कॉरिडॉरचा वापर न करता कोलकात्यापर्यंत पोहोचता येईल. सध्या मिझोरामहून कोलकात्याला पोहोचण्यासाठी १ हजार ८८० किलोमीटरचे अंतर कापावे लागते. मात्र ‘सित्वे’ बंदर आणि मिझोरामच्या ‘एनएच-५४’ राष्ट्रीय महामार्गामधील अंतर केवळ १४० किलोमीटर आहे. (पालेटवा ते मिझोराममधील झोरींपुई) त्यामुळे कोलकात्याहून समुद्रीमार्गाने ‘सित्वे’ बंदर आणि तेथून मिझोरामपर्यंत पोहोचण्यासाठीचे अंतर अर्ध्याहून कमी होणार आहे. यावरून भारताने विकसित केलेल्या म्यानमारमधील बंदराचे व्यूहरचनात्मक महत्त्व अधोरेखित होते.
- सनत्कुमार कोल्हटकर