५० थर होते की खोके? आदित्य ठाकरेंचा शिंदेंना सवाल!
20-Aug-2022
Total Views | 90
175
पाचोरा : आम्ही पन्नास थरांची दहीहंडी फोडली, असा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आता शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पाचोरा शिवसंवाद यात्रेत प्रत्युत्तर दिले आहे. ५० थर होते की आणखी काही, असा उपरोधिक सवाल त्यांनी आपल्या भाषणात विचारला आहे. दहीहंडी कालच होऊन गेली आहे. कालच महाराष्ट्राच्या तात्पुरत्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की, त्यांनी पण पन्नास थर लावले होते.
"पन्नास थर होते की वेगळं काही होतं. त्यांनी सांगितलं त्यांनीही हंडी फोडली. मी आज सांगू इच्छीतो की त्यांच्या सोबत जे जे गद्दार गेलेले आहेत. त्यांना मला विचारायचे आहे, तुम्हाला काय मिळालं? जे गद्दार तिकडे गेले त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला मंत्री करू, त्यांनाही वाटलं चांगली खाती मिळतील. त्यांना मिळालं काय? कपील शर्माच्या शोमधली बाबाजी का ठुल्लू?", असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला आहे. उपस्थितांनी दिलेलं प्रेम हे माझ्यासाठी नव्हे तर शिवसेनेसाठी आहे, असेही ते म्हणाले.
"इथला जनसागर, माणसांचं प्रेम ज्यांनी गद्दारी केलीयं, त्यांनी इथे यावं आणि पहावी," असेही ते म्हणाले. "गेल्या दोन महिन्यांमध्ये जे काही घाणेरडं राजकारण झालं ते तुम्हाला पटणारं आहे का?, असा सवालही त्यांनी विचारला आहे. उद्याचा काळ येणारं भविष्य हे शिवसेनेचेच असेल, ही मला खात्री आहे. आज आमचं स्वागत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही केलं आहे. गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्रात आपण एवढी चांगली कामे केलेली आहेत. ज्यांना आपण प्रेम दिलं, आशीवार्द दिलं. त्यांना निवडून आणण्यासाठी दिवसरात्र एक केली. एवढं सगळं करून त्यांनीच आपल्या पाठीत खंजीर खुपसला, असेही ठाकरे म्हणाले.
"शिंदे गट महाराष्ट्राचे तुकडे पाडेल!"
यांच्या हातात महाराष्ट्र दिला तर महाराष्ट्राचे पाच तुकडे पाडतील, असा आरोपही त्यांनी केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण विकासाचे राजकारण केले, शिक्षण पद्धत बदलण्याचा प्रयत्न केला. कोविड काळात महाराष्ट्राच्या जनतेचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला. उद्धव आणि आदित्य ठाकरे साहेब हे महाराष्ट्राला पुढे घेऊन जात आहेत, हे त्यांना पहावलं नाही. आपल्या सरकारनं रायगडाला निधी दिला हा पहिला निर्णय होता. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जमुक्ती केली., असाही टोला त्यांनी लगावला.
आमचं हिंदुत्व हे वेगळं हिंदुत्व!
महाराष्ट्रात तीन पक्षांचे सरकार होतं. आमचं हिंदुत्व हे दोन धर्मांमध्ये भांडणं लावणारं हिंदुत्व नाही. सरकार चांगलं काम करत होतं. त्यामुळेच त्यांच्या पोटात दुखलं, त्यांना वाटलं की हे जर असेच काम करू लागले तर देशात बदल घडेल, या भितीने आमचं सरकार पाडण्यात आलं, असेही ते म्हणाले.
काय झाडी काय डोंगर काय हाटील!
पहिले गद्दार सुरतेला पळाले. त्यानंतर गुवाहाटीला गेले. तिथे त्यांनी झाडी बघितली, डोंगर बघितले. हाटीलं बघितली. गुवाहाटीला गेल्यानंतर ४० गद्दार स्वतःला शिवसैनिक म्हणवत होते याची मला लाज वाटत होती. तिकडे धांगडधिंगा घालत होते. त्याच आसाममध्ये महापूर आला. लाखो लोक विस्थापित झाले होते. जर त्यांच्या रक्तात खरी शिवसेना असती तर हे लोकं हॉटेलमध्ये न थांबता मदतीसाठी उतरले असते.
हे तात्पूरते मुख्यमंत्री!
हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणार लिहून घ्या, असे सांगत आदित्य ठाकरेंनी शिंदेंवर घणाघात केला. मुख्यमंत्री हे तात्पूरते आहेत. एक दोन लोकांच्या राक्षसी महत्वकांशेमुळे हे तिकडे गेले होते. मला मुख्यमंत्रीपद गेल्याचं दुःख नाही, मंत्रीपद गेल्याचं सत्ता गेल्याचं दुःख नाही. पण ज्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यावर हे गद्दार टेबलावर नाचत होते, अशी खरपूस टीकाही त्यांनी केली.