‘सदा सर्वदा सन्नीध असणारा देव’ हे सारे पाहत असतो. संकटातून सुटण्यासाठी भक्ताने केलेला प्रयत्न हे एक प्रकारचे प्रशिक्षण असल्याने तसा सराव करुन घेणारे भगवंत कृपाळू, दयाळू नाही का? छोट्याशा संकटप्रसंगी माणूस कसा वागतो, यावरुन त्याचा भक्तिभाव समजतो. संकट ही एक शिकण्याची संधी मानून जो शांतचित्ताने पूर्ण श्रद्धेने विवेकपूर्ण विचाराने उपाययोजना करतो, त्याचे व्यक्तिमत्त्व उठून दिसते.
असे हो जया अंतरीं भाव जैसा।
वसे हो तया अंतरीं देव तैसा।
अनन्यास रक्षीतसे चापपाणी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३५॥
ज्याच्या अंत:करणात परमेश्वराविषयी जसा भाव असेल, तसे त्या देवाचे अस्तित्व त्याला जाणवते. परमेश्वराशी अनन्यभावाने राहणार्या भक्ताचे रक्षण धनुष्यधारी राम करतो. राम कधीही भक्तांची उपेक्षा करीत नाही. अनन्यभावाने दास झालेल्या भक्ताचा रामाला अभिमान असतो. असा सरळ अर्थ या श्लोकांचा घेता येतो. तथापि, समर्थांच्या रचनेत अनेक बारकावे दडलेले असतात. ‘भाव तसा देव’ असे म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे आणि ती योग्य आहे. यासाठी परमेश्वराची भक्ती करताना आपला भाव अतिशय महत्त्वाचा असतो. नुसत्या यंत्रवत पूजेला, भक्तीला काही अर्थ नसतो. देवाची भक्ती करताना आपला भाव नि:स्वार्थ, अहंकाररहित व शरणागताचा असावा, पूर्ण विश्वासाच्या संदेहरहित असावा. स्वामींच्या दासबोधातही या अर्थाच्या ओव्या आहेत.
जैसा भाव जयापासी।
तैसा देव तयासी।
जाणे भाव अंतरसाक्षी।
प्राणिमात्राचा॥ (दा. ३.१०.१३)
भक्ताच्या मनातील भाव कसा आहे, हे त्या भगवंताला बरोबर कळते. कारण, भगवंत माणसाच्या अंतरंगातील भाव जाणत असतो, भगवंत हा आंतरसाक्षी आहे. त्यामुळे बाह्यत: चेहर्यावरील हावभावाने, सोंगढोंग करून माणूस लोकांना फसवू शकतो, पण भगवंत अंतरसाक्षी असल्याने त्याला फसवता येत नाही. स्वामी पुढे सांगतात की, जर आपला भाव मायिक म्हणजे फसवणूक करणारा असेल तर तो देवाला कळतो. अशा बाबतीत देवसुद्धा मोठा वस्ताद आहे, तो जशास तसा वागतो. हे त्याचे कौतुक पाहण्यासारखे आहे. स्वामी म्हणतात,
जरी भाव असला माईक।
तरी देव होये माहा ठक।
नवल तयाचे कौतुक।
जैशास तैसा (दा.३.१०.१४)
जशास तसे वागणे ही भगवंताची अद्भुत लीला आहे. परमेश्वराविषयी आपल्या अंत:करणात जसा भाव असेल, तशी प्रचिती आपल्याला येते. यासाठी आपला भाव शुद्ध, अहंकाररहित, भक्तिप्रेमाने युक्त असेल, तर परमेश्वराकडून तशाच भावाची परतफेड केली जाईल, असे समजावे. भगवद्गीतेतही भगवंत असाच विचार मांडतात. ‘ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्।’ यासाठी देवापासून काहीही लपवून न ठेवता त्याची अनन्यभावे उपासना करावी. अनन्यभावे उपासना करणार्या भक्ताचे रक्षण हा कोदंडधारी राम करीत असतो. भक्तांवर संकटे आली तरी, त्यांचे तो निवारण करतो. पण, त्यासाठी अनन्यभावे भक्ती करता आली पाहिजे. एकंदरीने सर्वच संत-देवांची अनन्यभावे भक्ती करायला सांगतात. ते पाहून सामान्य माणसाला वाटते की, हा पारमार्थिक उपदेश आहे. आमच्या रोजच्या व्यावहारिक जीवनात ही अनन्य उपयोगाची आहे का? या शंकेचे उत्तर हो, त्याचा प्रपंचातही उपयोग आहे, असे आहे. परमेश्वरशक्तीशी अनन्यभाव साधण्यासाठी अभ्यास करीत असता आपले चंचल मन स्थिर होऊ लागते. मनाची एकाग्रता व ग्रहणशक्ती वाढू लागल्याचे दिसून येते. असे मन निर्भय स्थितीचा अनुभव होऊ शकते. त्यामुळे रोजच्या जीवनातील व्यावहारिक अडचणी त्याला सहजपणे सोडवता येतात. हा परमेश्वराशी अनन्यभाव साधल्याचा परिणाम आहे काय? अशा अनन्य भक्तांची राम कधी उपेक्षा करीत नाही. उलट अशा भक्तांचा देवाला अभिमान असतो. यासाठी देव सतत आपल्या जवळ आहे. आपण देवाच्या सहवासात आहोत, या वृत्तीचा अभ्यास करावा लागतो. अशा अभ्यासाने देवाच्या सान्निध्याची प्रचिती येऊ लागते. या पुढील श्लोकात स्वामींनी या विचारावर भर दिला आहे. तो श्लोक असा-
सदा सर्वदा देव सन्नीध आहे।
कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे।
सुखानंद आनंद कैवल्यदानी।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥३६॥
देव नेहमी सर्वकाळी आपल्याबरोबर आहे. देव आपल्या जवळच आहे, या कल्पनेचा अभ्यास करताना भक्तांना सर्वसाधारणपणे ज्या अडचणी येतात, त्यावर स्वामी या श्लोकात विचार करीत आहेत. देव सदैव आपल्याबरोबर आहे, अशी कल्पना केली की, मग आपल्याला कसलीही चिंता करण्याचे कारण उरत नाही, असे भक्ताला वाटू लागते. त्यामुळे प्रपंचात तो गाफील राहू लागतो. त्याच्या अंगी निष्काळजीपणा येऊ लागतो. आपल्यावर काही संकट आले, तर देव त्याचे परस्पर निवारण करील. मला त्यासाठी काही करण्याची आवश्यकता नाही. अशा कल्पनेत असणारा भक्त आळशी होतो. त्यामुळे आपली कर्तव्ये व जबाबदार्या याचा भक्ताला विसर पडू लागतो. तसे होऊ नये म्हणून भगवंत कधी-कधी छोट्या संकटांची योजना करून भक्तांच्या अंगी असलेले ‘अल्प धारिष्ट’ आजमावत असतो. अर्थात, ‘अल्प धारिष्टां’साठी समोर उभे ठाकलेले संकट आपल्या दृष्टीने मोठे असते. भक्ताचे धारिष्ट आजमावून पाहण्यासाठी संकटाची परीक्षा घेणारा भगवंत हे कृपाळूपणे करीत आहे, असे स्वामी म्हणतात, हे जरा विचित्र आहे, असे प्रथमदर्शनी वाटते. जरासे धैर्य पाहण्यासाठी कधी कधी लहानशा संकटांची योजना करणारा भगवंत हे दयाळूपणे करीत आहे, हे विधान विलक्षण आहे, असे वाटणे स्वाभाविक आहे. संकट येऊ देणे आणि कृपाळूपणे असणे हे दोन्ही भाव परस्परविरोधी आहेत. पण, तरीही स्वामी या श्लोकात सांगतात की, ‘कृपाळूपणे अल्प धारिष्ट आहे.’ हा वैचारिक गुंता विचारानेच सोडवता येतो. भक्तावर आलेले संकट, त्यातून उत्पन्न झालेल्या समस्या, भक्त विवेकाने वागून स्वप्रयत्नाने कशा प्रकारे सोडवतो, हे भगवंत पाहत असतो.
भगवंतावर श्रद्धा, विश्वास असला, तरी येणार्या संकटाला भक्तालाच सामोरे जावे लागते. अशाप्रसंगी भगवंत बुद्धी, शक्ती, युक्ती, विचार देतो. तथापि त्याचा वापरा कसा करायचा, हे भक्ताला ठरवावे लागते. छोट्याशा संकटाने नैराश्य येऊ न देता भक्त परमेश्वरावरील श्रद्धा कायम ठेवून त्यातून कसा बाहेर पडतो, हे भगवंत पाहत असतो. उथळ विचारांची माणसे संकटांना घाबरुन जाऊन परमेश्वरालाच दोष देऊ लागतात. त्यांना वाटत असते की, ‘मी इतकी वर्षे इमानइतबारे पूजाअर्चा करतो. दर गुरुवारी देवांच्या तसबिरांनी हार घालतो, पण देवाने मात्र मला या संकटातून वाचवले नाही. कधी वाटते की, या जगात देव नाही, असा हा माणसांचा उथळपणा देवाला कळत नाही, असे थोडेच आहे. ‘सदा सर्वदा सन्नीध असणारा देव’ हे सारे पाहत असतो. संकटातून सुटण्यासाठी भक्ताने केलेला प्रयत्न हे एक प्रकारचे प्रशिक्षण असल्याने तसा सराव करुन घेणारे भगवंत कृपाळू, दयाळू नाही का? छोट्याशा संकटप्रसंगी माणूस कसा वागतो, यावरुन त्याचा भक्तिभाव समजतो. संकट ही एक शिकण्याची संधी मानून जो शांतचित्ताने पूर्ण श्रद्धेने विवेकपूर्ण विचाराने उपाययोजना करतो, त्याचे व्यक्तिमत्त्व उठून दिसते. आपले व्यक्तिमत्त्व उंचावण्याची संधी भगवंत देतो, म्हणून तो कृपाळू आहे. जो राम सुख, आनंद, कैवल्य (मोक्ष) देणारा आहे, त्याने आपली छोटीशी परीक्षा घेतली तर बिघडले कुठे? राम भक्तीची कधीही उपेक्षा करीत नाही. सर्व संकटातून धैर्याने बाहेर पडणार्या श्रद्धावान दासांचा रामाला अभिमान असतो. भक्तावरील संकटाची मजा पाहत भगवंत उभा असतो, असे नसून भक्ताच्या संकटसमयी भगवंत धावून येतो, असे स्वामी पुढील श्लोकात चक्रवाक पक्षाचे उदाहरण देऊन स्वामी आहेत. तो भाग पुढील लेखात...
(क्रमश:)
- सुरेश जाखडी