मनोविकारांकडून मनोविकासाकडे नेणारे ‘मानस’!

    22-Jun-2022
Total Views | 112
 
 
lol
 
 
 
 
लोकांमध्ये मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हे ध्येय घेऊन ‘मानस सायकोलॉजिकल हेल्थ सेंटर’ व ‘मनोदय ट्रस्ट’ काम करीत आहे. मानसिक स्वास्थ्यासाठी अविरत कार्यरत असणारी आणि मनोविकारांकडून मनोविकासाकडे नेणार्‍या या संस्थेच्या कार्याचा आढावा घेत आहोत.
 
 
 
मानस सायकोलॉजिकल हेल्थ सेंटर’ची स्थापना मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अद्वैत पाध्ये यांनी २००१ मध्ये केली होती. डॉ. पाध्ये यांचे ‘ओपीडी’ स्वरूपात काम सुरू होते. ’स्किझोफ्रिनिया’ हा आजार किशोर वयात होतो. हा आजार बरीच वर्षे सुरू राहतो. या आजारामुळे शिक्षण अर्धवट राहते. नोकरी मिळत नाही. या प्रकारच्या रुग्णांच्या पालकांकडून डॉ. पाध्ये यांना नेहमीच तक्रार केली जात होती. ते डॉक्टरांना या मुलांना तुमच्याकडे बोलवून घेत जा, अशी विनंती करत होते. त्यानंतर रुग्णांना नुसतेच रुग्णालयात बोलावून ठेवून काय करणार, असा प्रश्न होता.
 
 
 
मग त्यांच्यासाठी काय करता येईल, या दृष्टीने विचार सुरू झाला. डॉक्टरांनी मुंबईत २००३ मध्ये ‘स्किझोफ्रिनिया’ची एक परिषद घेतली. त्या परिषदेला केवळ एक पालक उपस्थित होता. त्यानंतर पालकांची उपस्थिती वाढत गेली. काही पालकांकडून डॉक्टरांना नोकरी देऊ शकेल का, अशी विचारणा केली जात होती. त्यावर डॉक्टरांनी नातेवाईकांशी चर्चा करून त्या रुग्णांना नोकरी देऊ शकत नाही, पण ते नोकरी करतील, एवढे त्यांना सक्षम करू, असा शब्द दिला. त्यासाठी ‘अ‍ॅक्टिव्हिटी’ करण्याचे ठरविले. या ‘अ‍ॅक्टिव्हिटी’ करण्यासाठी त्याला काहीतरी नाव द्यायची गरज होती.
 
 
 
म्हणून २००८ मध्ये ‘मनोदय ट्रस्ट’ची स्थापना केली. ‘मनोदया’च्या अंतर्गत अनेक गट तयार करून ‘अ‍ॅक्टिव्हिटी’ करण्यास सुरुवात केली. रुग्णासाठी विविध ‘अ‍ॅक्टिव्हिटी’ करणारी महाराष्ट्रात तीनच ठिकाणी सुविधा उपलब्ध आहे. त्यामध्ये ठाणे, डोंबिवली आणि पुणे यांचा समावेश आहे, असेही डॉ. पाध्ये यांनी सांगितले. ‘मनोदय’च्या अंतर्गत ‘फिनिक्स’ हा शुभार्थींसाठीचा (रुग्णांसाठी) ‘स्वमदत गट’ स्थापन केला. या ‘स्वमदत गटा’मध्ये राबवत असलेल्या अनेक विविध उपाययोजना आणि कार्यशाळेमुळे रुग्णांना स्वत:बद्दलचा आत्मविश्वास वाढला आहे.
 
 
 
ज्या रुग्णांना समाजामध्ये जाण्याची भीती वाटत होती. तेच आता सर्वसामान्यांप्रमाणे सर्वांमध्ये मिसळत आहेत. सुरुवातीला शुभार्थींना इथे येण्यास फारशी रुची नव्हती. पण डॉक्टर्स, मानसोपचारतज्ज्ञ, रुग्णांचे नातेवाईक आणि स्वयंसेवकाच्या अथक प्रयत्नांमुळे शुभार्थींची संख्या वाढत आहे. अनुपस्थितीचे प्रमाणदेखील कमी होत आहे. योग आणि नृत्य यामुळे शुभार्थी बाहेरच्या जगात सर्व सामान्यांबरोबर कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहे. याशिवाय या गटात डान्स, योग, ‘आर्ट थेरपी’, चित्रकला अशा विविध ‘अ‍ॅक्टिव्हिटी’ घेतल्या जातात. शुभार्थींनी बनवलेल्या वस्तूंना दिवसेंदिवस मागणी वाढत आहे.
 
 
 
शुभार्थींच्या वाढत्या संख्येमुळे असलेली जागा कमी पडत आहे. यातूनच या ‘स्वमदत गटा’वर सगळ्यांचा किती विश्वास आहे, हे दिसून येत आहे. या शुभार्थींकडून मासिक छापले जाते. या मासिकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर लिहिण्याची संधी शुभार्थींना दिली जाते. तसेच शुभार्थींना संगणक प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांचे वाचन वाढवण्यासाठी ट्रस्टच्यावतीने एक ‘मिनी लायब्ररी’ चालू करण्यात आलेली आहे. घरघंटीवर पीठ दळून देणे, शिवणयंत्राद्वारे शिवणकाम करण्यात येते. त्यामध्ये कापडी पिशव्या, फ्रिज बॉक्स, पर्स तयार केल्या जातात. घरघंटीवर सर्व वयोगटासाठी पौष्टिक असलेली ‘पूर्णान्न’ आंबोळी पीठ, थालीपीठ भाजणी, कुळीथ पीठ बनविले जाते.
 
 
 
या पीठाला ही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. शुभार्थींची हजेरी पाहून त्यांना दर महिन्याला ‘स्टायपेंड’ दिला जातो. त्यामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. कोरोना काळात ऑनलाईन ‘अ‍ॅक्टिव्हिटी’ सुरू होती. तसेच त्यांच्यासाठी मोफत बससुविधाही उपलब्ध करून दिली आहे. तसेच ‘स्किझोफ्रेनिया’चे जे रुग्ण आता व्यवस्थित आहेत, नोकरी करत आहेत, त्यांच्यासाठी ‘उडान स्वमदत गट’ स्थापन करण्यात आला आहे. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवा. मनातील प्रश्नांना उत्तर मिळण्यासाठी हा ग्रुप आहे.
 
 
 
‘स्किझोफ्रिनिया’ रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ‘आधारवड’ हा एक मंच तयार करण्यात आला आहे. त्याठिकाणी ते आपल्या भावना, विचार, अनुभव यांची एकमेकांमध्ये देवाणघेवाण करू शकतात. त्यामुळे नवीन रुग्णांना त्यांचा आधार वाटतो. याअंतर्गत वेगवेगळे करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे शुभकरांना आनंद मिळतो. सकारात्मक शक्ती वाढून नवीन अडचणींना तोंड देण्याची उमेद मिळते. हा ‘स्वमदत गट’ प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या शनिवारी होतो.
 
 
 
‘प्रोत्साहन’ हा ‘स्वमदत गट’ अपस्मार म्हणजेच मिरगी किंवा ‘एपिलेप्सी’चा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी आहे. हा शारीरिक आजार असला, तरी त्याने अनेक मानसिक त्रासही संभवत असतात. हा ‘स्वमदत गट’ रुग्णांचा त्रास समजून घेऊन त्यांना मदत करतात. याशिवाय ‘ऑब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑर्डर’च्या रुग्णासाठी ‘चिंतन’ हा ‘स्वमदत गट’ आहे. या आजारामध्ये एकच विचार किंवा कृती वारंवार होत असते. उदाहरणार्थ- २० ते ३० वेळा हात तपासून पाहणे, सतत येणार्‍या विचारांमुळे कृती करायला भाग पाडणे. ‘उत्तररंग’ हा ‘स्वमदत गट’रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आहे. त्यात आजाराची माहिती देणे, आजारी माणसाला कसे जपले पाहिजे, त्याबरोबर स्वत:चे संतुलन कसे राखायचे, हे एकमेकांच्या अनुभवावरून ऐकायला मिळते. व्यसनांनी ग्रासलेल्या माणसांच्या कुटुंबासाठी ‘मधुशाला’ हा ‘स्वमदत गट’ आहे.
 
 
 
यामध्ये कुटुंब एकमेकांचे अनुभव सांगतात. व्यसनांची कारणे, व्यसनी माणसांशी कसं वागायचं, त्याचबरोबर आपलंही आयुष्य कणखरपणाने पुढे न्यायचे, हे गटामध्ये समजते. ‘जाणीव’ हा गट आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. या गटामार्फत अनेक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली जाते. सध्या ती काळाची गरजदेखील असल्याचे डॉ. पाध्ये सांगतात. संस्थेच्या माध्यमातून ‘मंत्र आनंदाचे’ ही कार्यशाळा घेतली जाते. या कार्यशाळेत १८ वर्षांवरील व्यक्तीसाठी असून त्यात भावनांची शक्ती ओळखली जाते. तुमच्या स्वत:च्या भावना व दुसर्‍यांच्या भावना ओळखून कसे वागायचे, हे शिकविले जाते. ‘मी अष्टपैलू’ ही स्पर्धा इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येते. त्यात विद्यार्थ्यांना स्वत:मध्ये अभ्यासाव्यतिरिक्त काय गुण आहेत, हे समजते.
 
 
 
ते विचार मांडता येतात. संस्थेच्या माध्यमातून बरेच उपक्रम, कार्यशाळा, कार्यक्रम होत असतात. त्यात कौटुंबिक, सामाजिक समस्या कशा हाताळायच्या, हे दाखविले जाते. सध्या घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. लग्न झालेल्यांसाठी व न झालेल्यांसाठी ‘लग्न समुपदेशन’ ही कार्यशाळा घेण्यात येते. नैराश्य, मोबाईल व इंटरनेट ‘अ‍ॅडिक्शन’ यावरसुद्धा समुपदेशन कार्यक्रम घेतले जातात. हे सर्व मदतगट मोफत चालविले जातात. दुसर्‍या कोणत्याही डॉक्टरांकडे उपचार घेत असलेले रुग्ण या मदतगटात येऊ शकतात. उपचार करण्यासाठी ते पुन्हा आपल्या डॉक्टरांकडे जाऊ शकतात. या रुग्णांना समुपदेशन करण्यासाठी आणि समुपदेशकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संवाद साधणे आणखी सोपे झाले आहे.
 
 
 
त्यामुळे कोणत्या विषयावर चर्चा करायची, हे विषय ठरविले जातात. मदतगटाच्या माध्यमातून दु:ख सांगितल्यामुळे दु:ख हलके होण्यास मदत होती. रुग्णांनी त्यावर कशा पद्धतीने मात केली, हेदेखील इतर रुग्णाला समजते. २०११ मनोरुग्णांना विमा संरक्षण मिळावे, यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांच्या साहाय्याचे निवेदन केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पाठविले होते. त्यानंतर सचिवांना पत्र आले होते. त्यासंदर्भात नवीन कायदा करताना त्यात विचार करू, असे त्यात म्हटले होते. आता २०१७ साली नवीन कायदा केला आहे. त्यात तशी सोय केली आहे. पण अजून ही सर्व विमा कंपनी देतात असे नाही. पण कायदा झाला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. अशाप्रकारे चळवळीचादेखील फायदा होत आहे, असेही डॉ. पाध्ये यांनी सांगितले.
 
 
 
 
लेखिका: जान्हवी मौर्ये
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121