हठयोग

युञ्जते इति योग: भाग-२

    16-Jun-2022
Total Views | 185

yoga 2
 
 
 
 
 
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २१ जून हा ‘आंतराष्ट्रीय योग दिवस’ धूमधडाक्यात साजरा होणार यात शंका नाही. धूमधडाक्यात म्हणण्याचे कारण, या दिवशी अनेक उपक्रम (एक दिवसासाठी) राबविले जातात. प्रत्येक संस्थेला हा दिवस साजरा केला, हे दाखवायचे असते. वास्तविक, हा दिवस आपला संकल्प दिवस असायला हवा. या दिवशी घेतलेला संकल्प पुढील वर्षीपर्यंत निरंतर, सातत्याने कृतीत आणावयाचा, असे दरवर्षी करायचे म्हणजे आपण खर्‍या अर्थाने योगसाधक होऊ शकतो.
 
 
 
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २१ जून हा ‘आंतराष्ट्रीय योग दिवस’ धूमधडाक्यात साजरा होणार यात शंका नाही. धूमधडाक्यात म्हणण्याचे कारण, या दिवशी अनेक उपक्रम (एक दिवसासाठी) राबविले जातात. प्रत्येक संस्थेला हा दिवस साजरा केला, हे दाखवायचे असते. वास्तविक, हा दिवस आपला संकल्प दिवस असायला हवा. या दिवशी घेतलेला संकल्प पुढील वर्षीपर्यंत निरंतर, सातत्याने कृतीत आणावयाचा, असे दरवर्षी करायचे म्हणजे आपण खर्‍या अर्थाने योगसाधक होऊ शकतो. साधना करण्यास सुरुवात केली की, लगेच अडचणी येऊ लागतात. या अडचणींवर मात करायची असेल, तर ’एकतत्त्वाभ्यास’ करावा लागतो, हे ’एकतत्त्व’ म्हणजेच ’योग’ होय. ’युञ्जते इति योग:’ या लेखमालेच्या कालच्या भागात आपण पाहिले की, ’समाधी’ हा अष्टांग योगाचा अंतिम टप्पा आहे. ते आपले अंतिम लक्ष्य आहे. ही वाटचाल आपल्याला हळूहळू क्रमाक्रमाने करावी लागते, म्हणजेच स्थूलाकडून सूक्ष्मत्वाकडे प्रवास करावा लागतो. स्थूल म्हणजे ‘ग्रॉस लेव्हल’वर, काय आहे? तर आपले शरीर. या शरीराकडून म्हणजेच अन्नमय कोषापासून सुरुवात करत आपल्याला आनंदमय कोषापर्यंत पोहोचायचे आहे. हठयोग हा असा मार्ग आहे, जो आपल्याला शरीराकडून मनाकडे,मनाकडून आत्मतत्त्वाकडे नेतो. ‘हठप्रदीपिका’, ’घेरंड संहिता’, ‘गोरक्षशतक’, ’हठरत्नावली’ इ. हठयोगाचे मार्गदर्शन करणारे ग्रंथ आहेत. ‘हठप्रदीपिके’त स्वात्माराम म्हणतात, ‘राजयोग’-’हठयोग’ हे वेगळे करता येत नाहीत. ते एकमेकांवर अवलंबून आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार, मनाच्या वृत्तीनुसार ज्याला-त्याला रुचेल, जमेल अशा योगमार्गाचे वर्णन आपल्या योगग्रंथांमधून केले गेले आहे. शरीर हा केंद्रबिंदू आहे. कारण, शरीर असेल तरच साधना होऊ शकते. शरीर स्वस्थ असेल, तरच तप साध्य होऊ शकते. म्हणून हठयोगात योगसाधनेस साधक-बाधक अशा तत्त्वांचे वर्णन केले आहे. उत्साह, साहस, धैर्य, तत्त्वज्ञान, निश्चय आणि जनसंग परित्याग ही योगास पूरक अशी तत्त्वे आहेत. अत्याहार, प्रयास, प्रजल्प, नियमाग्रह, जनसड्.ग आणि लौल्य ही योगास बाधक तत्त्वे आहेत. साधकतत्त्वांचा अवलंब करीत साधना सुरू ठेवली की, ’शुद्धिक्रिया’, ‘आसन’, ’प्राणायाम’, ‘मद्राबंध’, ‘नादानुसंधान’ असा एक एक अंगाचा अभ्यास सहज साध्य होऊ शकतो.
 
 
 
शरीराची हालचाल केली की, त्याचा परिणाम आपल्याला लगेच जाणवतो, म्हणून हठाच्या साधनेने आसनांना अग्रक्रम दिला आहे. आसनांचा अभ्यास केल्याने स्थैर्य (स्थिरता) प्राप्त होते. आरोग्याचा लाभ होतो आणि शरीरात हलकेपणा जाणवतो. आसनस्थैर्य प्राप्त होणे म्हणजे, एका आसनस्थितीमध्ये किमान तीन तास बसता येणे किंवा एकच आसनस्थिती तीन तास धारण करून ठेवता येणे. हे स्थैर्य प्राप्त झाले की, प्राणायामाचा अभ्यास करावा. प्राणायाम करण्यापूर्वी नाड्यांची शुद्धी होणे, म्हणजेच सगळे ‘चॅनेल्स’/स्रोत मोकळे असणे गरजेचे आहे. तसे नसेल तर प्राणाच्या वहनात अडथळे निर्माण होऊन रोगोत्पत्ती होऊ शकते. म्हणूनच प्राणायामास ‘दुधारी शस्त्र’ म्हटले आहे. प्राणायाम योग्य पद्धतीने केल्यास सर्व रोगांचा नाश होतो, पण अयोग्यरितीने केल्यास रोगांचा प्रादुर्भाव किंवा रोगोत्पत्ती होते. म्हणूनच नाडीशुद्धीसाठी षट्कर्मांचेवर्णन केले आहे. ‘धौतिबस्ति’, ‘नेति’, ‘नौलि’, ‘त्राटक’, ‘कपालभाति’ यांना ‘षट्कर्म’ म्हणतात. त्याव्यतिरिक्त ‘नाडीशोधन’ प्राणायामाचेही वर्णन केले आहे. प्राणायामाचा अभ्यास हा शनै:शनैः वाढवत न्यावा. जसे हिंस्र प्राण्यांना हळूहळू काबू केले जाते, तसेच हळूहळू प्राणायाम साध्य करावा. प्राणायामाच्या अभ्यासाने निर्माण झालेली ऊर्जा सहन करता यावी, म्हणूनच आधी आसनाने शरीरात स्थिरता आणावी. मग ती ऊर्जा योग्य दिशेने वळविण्यासाठी ‘मद्राबंधां’चा अभ्यास करावा. उर्जेचा प्रवाह योग्य दिशेने सुरू झाला की, आपोआप आपण पुढील साधनेस पात्र होतो. ती साधना आहे ’नादानुसंधान.’ महर्षी पतंजलींनी ‘समाधी’ म्हणून ज्याचे वर्णन केले आहे, तेच ‘नादानुसंधान’ म्हणून हठात वर्णित आहे. प्राण आणि मन यांचा एकमेकांशी खूप जवळचा संबंध आहे. आपण एरवीही पाहतो. मनातल्या भावभावनांचा परिणाम आपल्या श्वासावर होतो. श्वासावर लक्ष केंद्रित करून, श्वासाची गती नियमित केली की, उत्तेजित झालेले मन शांत होते. एकदा आठवण करूनदेखील की, श्वास हा ‘ग्रॉस लेव्हल’वर(स्थूलस्तरावर) आहे, तर त्याचा परिणाम सूक्ष्मस्तरावर, मनावर होताना दिसतो. हेच तत्त्व ‘नादानुसंधाना’साठी वापरले आहे. हठात वर्णन आहे की, इंद्रियांचा स्वामी मन आहे, मनाचा स्वामी मरुत् (म्हणजे प्राण)आहे, प्राणाचे स्वामित्व लयीकडे आहे आणि लय ही नादाच्या आश्रयाने राहते /असते. म्हणजेच नादाच्या अभ्यासाने क्रमाने आपण प्राणावर नियंत्रण आणू शकतो, ज्याच्यामुळे मनावर नियंत्रण मिळवता येते आणि मन ताब्यात आले की, इंद्रिये आपल्या ताब्यात येतात. इंद्रियांचे व्यवहार योग्यमार्गाने आणि सुरळीत झाले की, त्यांची बाह्य विषयांकडे असणारी ओढ आपोआप कमी होते व इंद्रिये आत्मतत्त्वास जाणण्यासाठी/समजण्यासाठी अंतर्मुख होतात. हिच तर ‘समाधी’अवस्था आहे. ज्याप्रमाणे सैंधव आणि पाणी एकत्र केले, तर सैंधव पाण्यात विरघळून जाते, त्याचप्रमाणे मन आत्मतत्त्वात विलीन होते, आत्मतत्त्वाशी एकरूप होते. या एकरुपतेमुळे सर्व संकल्पांचा, म्हणजेच चित्तवृत्तींचा लय होतो. हिच चित्तवृत्ती निरोधाची अवस्था म्हणजेच समाधीस्थिती. म्हणूनच स्वात्माराम म्हणतात...
 
 
 
सर्व हठलयोपाया राजयोगस्य सिद्धये।
राजयोगसमारूढः पुरुषः कालवञ्चकः॥
हठ. प्र. ४/१०३.
॥हरी ॐ॥
 
९८६७९६७२२५  namratagoray@gmail.com

(लेखिका एमडी (आयुर्वेद), एमए (योगशास्त्र) आयुर्वेदिक पंचकर्म - योगोपचारतज्ज्ञ आहेत.)

- वैद्य. नम्रता गोरे
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121