काश्मिरी दहशतवाद आणि ‘जेकेएलएफ’चा फुटीरतावाद

    19-Mar-2022
Total Views | 480

JKLF
 
 
 
सध्या गाजत असणार्‍या ‘काश्मीर फाईल्स’ या चित्रपटामुळे काश्मिरी हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना आणि त्यातील दहशतवाद्यांचे क्रौर्य पुन्हा एकदा समाजात थरकाप उडवत आहे. त्यातील अनेक पात्र वास्तविक असणार्‍या व्यक्तींशी साध्यर्म्य साधत असल्यामुळे समाजात काश्मीरविषयी पुन्हा एकदा संवेदनशीलता वाढली आहे. चित्रपटात शारदा पंडित या हिंदू स्त्रीवर अमानुष अत्याचार करून तिला दोन तुकड्यात कापून टाकणे हे भयंकर कृत्य सुन्न करून टाकते. हे पात्र बांदीपूरच्या बारामुल्ला गिरीजा टिकू या स्त्रीवर आधारित आल्याचा दावा केला जातो आहे. या काश्मिरी स्त्रीला असेच सामूहिक बलात्कार करून सुतारकामात वापरण्यात येणार्‍या धारदार करवतीने दोन तुकड्यात कापले होते, असा आशय तिच्या छायाचित्रासह सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाला आहे. शिवाय, ज्यूंचे आणि काश्मिरी हिंदूंचे हत्याकांड यांची तुलना केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीर लिबरेशन फ्रंट या दहशतवादी संघटनेवर प्रकाश टाकणे महत्त्वाचे ठरते. कारण, देशातील फुटीरतावादांचे मूळ यात आहे.
 
 
 
भारतातील दहशतवादाचे मूळ
भारतातील दहशतवादाचे मूळ प्रामुख्याने काश्मीरमध्ये असल्याचे दिसून येते. जम्मू आणि काश्मीर यांचे भारतात झालेले विलिनीकरण हे पूर्णपणे कायदेशीर आणि न्याय्य होते. तरीही काश्मीरला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काही संघटना निर्माण झाल्या. त्यापैकी एक म्हणजे ‘जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट’ अर्थात ‘जेकेएलएफ’. या संघटनेची स्थापना अमानुल्लह खान आणि मकबूल भट यांनी १९७७ साली बर्मिंगहॅममध्ये केली. मुळच्या ‘आझाद काश्मीर प्लेबिसाईट फ्रंट’ या संघटनेचीच ही एक शाखा होती. शिवाय ‘नॅशनल लिबरेशन फ्रंट’ ही त्यांची लष्करीशाखा होती. ‘नॅशनल लिबरेशन फ्रंट’साठी दोन गट दि. १० जून, १९६६ ला काश्मीरमध्ये घुसले होते. एक गट मकबूल भट आणि त्यांचे सहकारी यांचा होता. काश्मीरमधून तरुणांना भरती करणे आणि आपले बस्तान बसवणे हा त्यांचा उद्देश होता. त्यांनी सप्टेंबर १९६६ मध्ये श्रीनगरला ‘सीआयडी’चे पोलीस इन्स्पेक्टर अमरचंद यांना ओलिस धरले आणि ठार केले. मग मकबूल भटला पकडण्यात आले. श्रीनगर न्यायालयाने त्याला सप्टेंबर १९६८ ला फाशी सुनावली. पण, डिसेंबरमध्ये तो तुरुंगातून पळून गेला. पुढे मग एका बँकेवर दरोडा आणि एकाला ठार केल्यामुळे त्याला पुन्हा मे १९७६ मध्ये पकडले आणि पुन्हा फाशी सुनावली गेली. न्यायमूर्ती नीलकंठ गंजू यांनी फाशीची शिक्षा सुनावली होती.
 
 
 
मग बर्मिंगहॅममध्ये ‘नॅशनल लिबरेशन आर्मी’ने भारतीय दुतावासातील रवींद्र म्हात्रे यांचे १९८४ साली अपहरण केले. त्या मोबदल्यात ‘जेकेएलएफ’चे संस्थापक मकबूल भटची तिहार जेलमधून सुटका व्हावी, ही मागणी केली. हे अपहरण फसले आणि दि. ६ फेब्रुवारी, १९८४ ला रवींद्र म्हात्रे यांना ठार केले गेले. मकबूल भटला लगेच दि. ११ फेब्रुवारी, १९८४ ला फाशी देण्यात आली. मग अमानुल्लाह खान यांंनी मुजफ्फराबाद येथे जाऊन ‘जेकेएलएफ’चे मुख्यालय सुरू केले. त्यावेळी पाकिस्तानमध्ये झिया-उल- हक सरकारने पंजाबमधील खलिस्तानी दहशतवाद्यांना पाठिंबा दिलेला होता. (संदर्भ- प्रवीण स्वामी, इंडिया, पाकिस्तान अ‍ॅण्ड दि सिक्रेट जिहाद, २००७, पृष्ठ -१६३-१६४)
 
 

JKLF1 
 
 
 
स्वतंत्र काश्मीर या राजकीय हेतूला सफल करण्यासाठी दहशतवादी सक्रिय झाले होते. त्यासाठी भारत सरकारवर दबाव आणणे आणि सामान्य जनतेला वेठीस धरणे हे सुरू झालेले होते. ‘जेकेएलएफ’ने दि. १४ सप्टेंबर, १९८९ ला काश्मिरी पंडितांचा आवाज असणारे पंडित टिकालाल तापलू यांची भरदिवसा हत्या करण्यात आली. (संदर्भ- कर्नल तेज के.टिकू -२०१२ -काश्मीर - इटस अ‍ॅब ओरीजीन्स अ‍ॅण्ड देयर एक्सोडोस,लांसर पब्लिशर,-पृष्ठ -४१४) लगेच दि. ४ नोव्हेंबर, १९८९ ला न्यायमूर्ती नीलकंठ गंजू यांंची हत्या केली गेली. कारण, त्यांनी मकबूल भटला फाशीची शिक्षा सुनावली होती. पुढे डिसेंबर १९८९ मध्ये त्यावेळचे भारताचे तत्कालीन गृहमंत्री मुफ्ती महंमद सईद यांची मुलगी रुबिया सईद हिचे अपहरण ‘जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट’च्या अतिरेक्यांनी केले होते. तिच्या सुटकेच्या मोबदल्यात त्यांच्या साथीदारांना सरकारने तुरुंगातून सोडावे ही मागणी त्यांची होती, अशा कारवाया चालूच होत्या.
 
 
 
कट्टरतावाद्यांचे पुढचे पाऊल
‘जेकेएलएफ’ प्रमाणेच मुजफ्फराबाद येथे मुख्यालय असणारी ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ची स्थापना १९८८ मध्ये मुहमद एहसान दर याने केली. ‘हिजबुल’ या अरेबिक शब्दाचा अर्थ आहे ‘अल्लाचे नाव’ आणि ‘मुजाहिद्दीन’चा अर्थ आहे ‘गैर-इस्लामी लोकांच्या विरोधात लढणारे सैनिक.’ यांना काश्मीर हे पाकिस्तानात हवे आहे. ‘हिजबुल मुजाहिद्दीन’ची धमकी दि. ४ जानेवारी, १९९० ला स्थानिक उर्दू वर्तमानपत्र ‘आफताब’ने छापली. सर्व हिंदूंना ‘काफिर’ घोषित काश्मिरी पंडितांना काश्मीर खोरे सोडून जायला सांगितले होते. ‘मुस्लीम धर्म स्वीकारा, नाही तर काश्मीर सोडून जा’ हे तर मशिदीमधून सांगण्यात आले. लाखो काश्मिरी पंडित विस्थापित झाले. हा सगळा इतिहास असला तरी तो देशाच्या सद्यपरिस्थितीतील दहशतवादाला थेट जोडला गेलेला आहे. ‘हिजबुल मुजाहिद्दिन’चा नेता बुरहान वानी याला दि. ८ जुलै, २०१६ ला सुरक्षा रक्षकांनी ठार मारले. बुरहान वानी सोशल मीडियावर लोकप्रिय होता. त्याने आधी आपल्या सहा मिनिटाच्या व्हिडिओमधून काश्मिरी पंडितांचे स्वागत केले. पण, त्यांच्या नव्या वसाहती निर्माण करण्याच्या विरोधात धमकी दिली होती. विशेष म्हणजे, वानीच्या मृत्यूला विरोध करण्यासाठी काश्मीरच्या जनतेने जो मोर्चा काढला होता, त्यात आदिल अहमद दर सक्रियपणे सहभागी झालेला होता. याने पुलवामा तेथे दि. १४ फेब्रुवारी, २०१९ लाजम्मू- श्रीनगरच्या राष्ट्रीय महामार्गावर ‘सीआरपीएफ’च्या वाहनावर आत्मघातकी दहशतवादी हल्ला केला. ज्यात ४० जवान हुतात्मा झाले. तो ‘जैश-ए-महंमद’चा सदस्य होता. नंतर त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला. त्यात त्याने म्हटले आहे की, हा व्हिडिओ मिळेल तेव्हा तो स्वर्गात असेल. म्हणजेच आपल्या कृत्याचे समर्थन त्याने धार्मिक आधारावर केलेले आहे.
 

JKLF2 
 
 
 
‘जैश-ए-महंमद’ हा पाकिस्तानातील जिहादी गट असून, काश्मीरमध्ये आणि नंतर भारतात अन्य ठिकाणी त्यांना ‘जिहाद’ घडवायचा आहे. या गटाचा तालिबान आणि ‘अल कायदा’ या संघटनांशी जवळचा संबंध आहे. या सगळ्याचा आढावा घेताना लक्षात येते की, ‘जेकेएलएफ’ हे काश्मिरी फुटीरतावादी दहशतवाद्यांचे मूळ आहे. सध्या यासिन मलिक हा ‘जेकेएलएफ’चा प्रमुख असून, त्याने काश्मिरी पंडितांनी काश्मीरमध्ये पुन्हा परत यावे, असे आवाहन २००४ साली केले होते. अर्थात, यावर कितपत विश्वास ठेवायचा हा प्रश्न होताच. कारण, त्याची भूमिका सतत बदलत असल्याचे दिसते. त्याची आणि भारताच्या माजी पंतप्रधानांची गोपनीय भेट झाली होती. यासिन मलिकच्या धोरणापासून वेगळे होत फारूख सिद्दिकीने २००५ मध्ये नव्याने ‘जेकेएलएफ’ची स्थापना केली. फारूखने तर हा प्रश्न सोडवण्यासाठी युरोपियन युनियनचा हस्तक्षेप स्वागतार्ह ठरवला. म्हणजेच काश्मीर प्रश्नाला कायम पेटत ठेवण्याचा त्यांचा डाव होता. शेवटी, पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यानंतर साधारण मार्च २०१९ पासून ‘जेकेएलएफ’वर भारत सरकारने बंदी घातलेली आहे.
 
 
 
दहशतवाद्यांचे नवे आव्हान
आता ‘कलम ३७०’ रद्द केल्यामुळे जम्मू आणि काश्मीरला असणारा स्वतंत्र दर्जा नष्ट झालेला आहे. हा निर्णय देशाच्या अखंडतेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. या कलमाला रद्द करण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आयुष्यभर संघर्ष केला. ‘एक देश मे दो विधान, दो प्रधान और दो निशान नही चलेंगे’ या त्यांच्या भूमिकेची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. आता केरळची चाललेली वाटचाल आणि तेथील वाढता इस्लामिक मूलततत्ववाद यावर वेळीच सावध होणे गरजेचे आहे. बर्‍याचदा दहशतवादी संघटना केवळ आपली नावे बदलतात, पण त्यांची कट्टर विचारधारा मात्र अधिकच तीव्र होत जाते. जसे केरळमध्ये सक्रिय असणारी ‘पीएफआय’ अर्थात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ ही ‘सिमी’ म्हणजेच ‘स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’असल्याचे केरळ सरकारने उच्च न्यायालयाला सांगितले होते. दि. २६ जुलै, २०१२ ‘सिमी’ला संपूर्ण भारताला ‘इस्लामिक खलिफत’मध्ये धर्मांतरीत करून ‘मुक्त’ करायचे होते. त्यासाठी ‘जिहाद’ करून ‘दार-उल-इस्लाम’ म्हणजेच इस्लामची भूमी/राज्य निर्माण करायचे होते. या ‘सिमी’वर आता बंदी आहे. एकूणच दहशतवादी विचारधारासुद्धा वेगवेगळ्या रुपात पसरत जातात. त्यांचे सुद्धा पिढ्यान्पिढ्या हस्तांतरण होत जाते. याची जाणीव ठेवली पाहिजे. सध्या ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाच्या निमित्ताने हिंदूंची तुलना ज्यूंशी देखील केली जात आहे. हे करताना त्यांच्या तीव्र राजकीय जाणिवेचासुद्धा आवर्जून विचार केला जावा. ज्यूंची राजकीय जागरुकता आणि ऐक्य प्रबळ असल्यामुळे इस्रायलचे अस्तित्त्व आहे. त्यांच्या निष्ठा त्यांच्या धर्माशी आणि राष्ट्राशी आहेत. त्याचे खंबीरपणे हस्तांतरणसुद्धा पिढ्यान्पिढ्या होत आहे. आपल्याकडे स्वत:च्याच धर्माची लाज बाळगणार्‍या तथाकथित लिबरल, डाव्या, तथाकथित बुद्धिवादी पिढीला हे कसे आणि केव्हा कळणार?
 
 
- रुपाली कुळकर्णी-भुसारी
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121