मानसिक आजारांचा होमियोपॅथीच्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण अभ्यास करत असतो. त्यावेळी सर्व प्रथम माणूस कशाने बनलेला असतो, ते जाणून घेणे महत्त्वाचे असते.
माणूस भावना, बुद्धिमत्ता, इच्छाशक्ती व सदसद्विवेकबुद्धी (Emotions, Intellect, Will Understand) व याबरोबरच बाह्यशरीर, शरीराची जडणघडण (Physical Constitution) आणि अंतर्गत अवयव व पेशी यांनी बनलेला असतो.
यामधील भावना, बुद्धिमत्ता, इच्छाशक्ती या सर्वांनी मिळून ‘मन’ बनते. मन नावाचा कुठलाही अवयव शरीरात नसतो. मनाचे जड अस्तित्व पूर्ण शरीराला ताब्यात ठेवत असते.
जेव्हा एखादा माणूस निरोगी असतो. त्यावेळी त्याचे शरीराचे कार्य व संवेदना व भावना यात कुठल्याही प्रकारची अशुद्धता नसते. निरोगी अवस्थेत माणूस कधीही आपला वेळ वायफळ खर्च करत नाही, तसेच स्वत:च्या आरोग्याविषयी उगाचच चिंताग्रस्त होत नाही, निरोगी अवस्थेत तो सतत सक्रिय असतो व आपले जीवन यशस्वी व सार्थकी लावण्यासाठी आपली सर्जनशीलता वापरत असतो. निरोगी माणूस नेहमी स्वत:बरोबरच इतरांचाही विचार करून इतरांना मदत करायला तयार असते. आता मनाची निरोगी अवस्था म्हणजे काय?
ज्यावेळी बुद्धिमत्ता व सदसद्विवेकबुद्धी जी माणसाची आत्मिक सहजता असते (स्पिरिच्युअल), या दोन्ही गोष्टी एकत्रित सहज कार्य करतात. त्यावेळी माणसाची इच्छाशक्ती व भावना जी मनाची अभिव्यक्ती असते, हे सर्व समतोल पातळीवर असतात आणि त्यामुळे मन हे संतुलित राहून निरोगी पातळीवर असते (Harmony Of Mind).
माणसाचे मन निरोगी आहे की नाही, हे माणसाच्या विचार करण्याच्या पद्धतीवरच ठरते. त्याचप्रमाणे अजूनही काही गोष्टी असतात, त्यावरून ठरते. जसे
विचारांची स्पष्टता (Clarity Of Mind)
जर माणूस निरोगी असेल, तर त्याचे मन खूप चांगल्या प्रकारे निरीक्षणशक्तीचा उपयोग करत असते व या निरीक्षणशक्तीचा वापर करून आणि कल्पनाशक्ती व कार्यशक्तीचा वापर करून त्याच्या विचारामध्ये अतिशय स्पष्टता आलेली असते, ही स्पष्टता तो माणूस ‘लॉजिक’चा विचार अनुसरून आलेली असते. ‘इन्डक्टिव्ह लॉजिक’ (Inductive Logic) आणि ‘डिडक्टिव्ह लॉजिक’ यांचा सारासार विचार करून मगच विचारांमध्ये एक प्रकारची स्पष्टता यायला लागते. माणसाचे विचार स्पष्ट व पारदर्शक असले की, माणसाच्या निरोगी मनाची खूण समजली जाते. स्पष्ट विचार असल्यावर कुठलीही साशंकता, ‘कन्फ्युजन’ राहत नाही. निर्णयक्षमता व कार्यतत्परता आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य पूर्णपणे कार्यरत होते. निरोगी मनाचे उदाहरणच द्यायचे झाले, तर छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, पु. ल. देशपांडे, स्वामी विवेकानंद अशी अनेक उदाहरणे आपल्याला पाहता येतील. या व्यक्तिमत्त्वांचा जर आपण अभ्यास केला, तर निरोगी मनाची अवस्था कशी असते, हे आपल्याला शिकायला मिळते. पुढील लेखात आपण निरोगी मनाचे अजून काही कंगोरे पाहू.
- डॉ. मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)
९८६९०६२२७६