रे मानवा, नको तू बनू साप अन् विंचू!

    22-Sep-2021
Total Views |

sanke_1  H x W:
विंचू हा सापाइतका भयंकर विषारी नसला, तरी तो त्रासदायक आहे, हे मात्र निश्चित! सापात मोठ्या प्रमाणात विष आहे, पण त्याला त्याचा अभिमान नाही. पण विंचू हा मात्र अतिशय गर्विष्ठ! त्याच्या नांगीत अगदी थेंबभरच विष आहे. पण, तो नेहमी आपली शेपटी उंच करून चालतो. विष हेच ते त्याचे ऐश्वर्य. आपल्यातील थोड्याशा विषाचा त्याला फार मोठा गर्व! यापासून मानवाने हाच बोध घ्यावा की आपल्यातील थोड्याशा चांगल्या अथवा वाईट गोष्टींचा कधीही अभिमान धरू नये की गर्व करू नये.
माहिर्भूर्मा पृदाकुर्नमस्त आतानानर्वा प्रेहि।
घृतस्य कुल्या उप ऋतस्य पथ्या अनु॥
(यजुर्वेद ६,१२)
अन्वयार्थ
(आतान) हे विद्या, ज्ञान, यश व सद्गुण इत्यादी बाबींचा विस्तार करणार्‍या ज्ञानी माणसा, तू (अहि:) साप (मा भू:) बनू नकोस. तसेच तू (प्रदाकु:) विंचू किंवा अजगरदेखील (मा भू:) होऊ नकोस. (अनर्वा) अहिंसक आणि परावलंबी किंवा पराश्रित न होता (प्रेहि) पुढे जात राहा! (घृतस्य) तुपाच्या आणि तेजाच्या (कुल्या:) नदी-नाल्यांच्या (उप) जवळ जा. (ऋतस्य) सत्याच्या (पथ्या:) मार्गांचे (अनु) अनुसरण कर. (ते) अशा तुझ्या या आदर्श जगण्याला (नमः) आम्हा सर्वांचा नमस्कार असो!
विवेचन
‘माणसाचे जगणे कसे असावे?’ या संदर्भात वेदांनी मोठ्या प्रमाणावर विधेयात्मक तत्त्वे सांगितली आहेत. पण, जीवात्मा हा अल्पज्ञ असल्याकारणाने त्याला समजण्यासाठी म्हणून कधी कधी निषेधात्मक बाबींचा उपदेशदेखील केला आहे. चारही वेदांचा उद्देशच मानवी जीवनाला सन्मार्गावर आणण्यासाठीचा आहे. यासाठी सर्वच मंत्र हे अतिशय उदार शब्दांत आम्हा सर्वांचे उत्तमरित्या पथप्रदर्शन करतात, जे की नेहमीकरिता प्रासंगिक ठरणारे आहे. कारण, काळ बदलला तरी माणसाची प्रवृत्ती मात्र तशीच असते. म्हणूनच तर ही प्रवृत्ती बदलणे गरजेचे ठरते. वेदांनी माणसांच्या दुष्प्रवृत्तींना सत्प्रवृत्तीत रूपांतरित करण्याकरिता अगदी साधी-साधी उदाहरणे देऊन बोधामृत पाजला आहे. पशु-पक्षी व इतर जीवजंतूंचे आणि व्यवहारातील वस्तूंचे दाखले देत मानवाला सन्मार्गावर आणण्याकरिता प्रबोधन केले आहे.

प्रस्तुत मंत्रात ज्या वाईट सवयींमुळे माणसांची प्रवृत्ती बिघडते व प्रगती खुंटते, त्यांना आळा घालण्यासाठी व अनिष्ट बाबींना रोखण्याकरिता निषेधात्मक विचार मांडून सदुपदेश करण्यात आला आहे. ऋग्वेदात ‘मनुर्भव’ म्हणजेच श्रेष्ठ मानव होण्यासाठीचा जो सर्वोच्च विचार प्रतिपादिला आहे, त्याला साध्य करण्याकरिता मानवाने कोणत्या दुर्गुणांपासून दूर राहावे, हे सदरील मंत्रात साप आणि विंचू यांची उदाहरणे देऊन पटवून दिले आहे. जन्म-जन्मांतरीच्या पुण्याईने लाभलेला हा सर्वश्रेष्ठ देह! याच दिव्य साधनाने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थांना प्राप्त करावे. पशू हे भोगयोनीतले मानले जातात. कारण, त्यांना फक्त
दुःखेच भोगावयाची आहेत. पण, माणूस मात्र उभययोनी आहे. त्याला कर्म आणि भोग या दोन्ही बाबी साधत इहलोक व परलोक प्राप्त करावयाचा आहे.

खरेतर आम्ही सर्व जण प्रवासी आहोत. अनादी काळापासून सुरू झालेली ही आत्म्याची जीवन यात्रा सफल होण्याकरिता आपणांजवळ ज्ञानसाधने असावीत. आपला जीवनमार्ग प्रशस्त व्हावा, याकरिता वैचारिक सामर्थ्य नको का? कारण, या प्रवासात अंतर्बाह्य विघ्ने येऊ शकतात. छोट्या छोट्या दुर्गुणांमुळे माणसाचे जगणे अवघड होते. आपलेच दोष आपणांकरिता संकटे बनून उभे राहतात. अशावेळी माणसाने स्वतःला कधीही कमी लेखू नये, तर आपले अस्तित्व सर्वोच्च स्थानी मानावे. म्हणूनच मंत्रात जीवात्म्यासाठी आतान हे संबोधन आले आहे. ‘आतान’ म्हणजे आपल्यातील ज्ञान, सद्गुण, सदाचार, बुद्धी, धनैश्वर्य आदी तत्त्वांचा विस्तार करणारा! माणसाने आपल्यात असलेल्या सर्व दिव्य तत्त्वांचा विस्तार करावा, त्यांना कधीही संकुचित करू नये. अशी बुद्धी नेहमीच विस्तारलेली असावी. ‘तनु विस्तारे’ या धातूपासून बनलेल्या ‘आतान’ शब्दाचे ‘निर्वचन य: आतनोति विस्तारयति यश: सद्गुणादीन् वा स आतान।’असे होते. माणसाचे जीवन केवळ स्वतःपुरते मर्यादित नसावे, ते तर नेहमीच इतरांसाठीदेखील विस्तारलेले असावे. पण, हा विस्तार धर्ममार्गाने असावा. असत्य किंवा अधर्ममार्गाने कदापि नको. जे सुजन सन्मार्गाने आपल्या आयुष्याचा विस्तार करतात, ते धन्य होत. पण, अधार्मिक किंवा अनीतीच्या मार्गाने धन, ऐश्वर्य अथवा सत्ता हस्तगत करतात किंवा मान-प्रतिष्ठा मिळवून मोठे होतात आणि स्वतःसोबतच आपल्या कुटुंबाचा विस्तार करतात, त्यांचे सर्व काही व्यर्थ ठरते. त्यांची ही प्रगती अधिक काळ टिकणारी नसते. म्हणूनच मंत्रात ‘ऋतस्य पथ्या अनु...।’ म्हणजेच आम्ही सत्य, पवित्र व नीतीच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करावा, संतांच्या पंथांचे अनुसरण करावे, अशी लक्ष्मणरेषा ओढली आहे.

सत्याने व धर्ममार्गाने चालत आपल्या समग्र जीवनाचा विस्तार करण्याकरिता मंत्रांच्या प्रारंभीच दोन निषेधात्मक उपदेश मिळतात. यातून अगदी सामान्यातल्या सामान्य माणसालाही ज्ञानबोध होतो. आपल्या वर्तमान व्यवहारातदेखील आम्ही यांचा प्रयोग करू शकतो. एखाद्याला वाईटापासून रोखण्याकरिता ‘अरे, तू असा वागू नकोस,’ ‘राक्षस होऊ नकोस’ असे आपण सहजच बोलून जातो, तोच भाव व्यक्त करीत ऋषी म्हणतात-

मा अहि: भू:। मा पृदाकु: भू:॥
हे माणसा, तू साप होऊ नकोस, तसेच तू विंचूदेखील बनू नकोस! अहि म्हणजेच साप व प्रदाकु म्हणजे विंचू. ही दोन उदाहरणे माणसाला सन्मार्गावर आणण्याकरिता फार मोलाची ठरतात. सापाला आणि विंचवाला सर्वजण घाबरतात. कारण, यांचे विष भयंकर असते. सर्पदंशामुळे अनेक जण प्राणाला मुकतात, तर विंचवाच्या दंशामुळे माणसांस असह्य वेदना होतात. साप हा विषारी तर असतोच असतो, पण त्यासोबत तो वेड्या-वाकड्या वळणाने चालतो. माणसाने व्यवहारात कदापि विषारी बनवू नये. आपले चालणेसुद्धा वेडेवाकडे नको, ते तर सरळ असावे. जीवनाची वाटचाल सरळ दिशेने असली पाहिजे. ती विपरित दिशेने असता नये. माणुसकीला शोभेल असेच वागावे. आपले चालणे, बोलणे, ऐकणे, पाहणे आणि विचार करणे हे सर्व अगदी सुयोग्य पद्धतीने व उत्तम दिशेने असावे. आज बर्‍याच अंशी बाह्य भौतिक सुधारणा झालेल्या आहेत. रस्ते किंवा चौरस्ते हे सर्व अगदी सुविकसित स्वरूपाचे बनले आहेत. पूर्वीप्रमाणे काटेकुट्यांनी भरलेले, माती-धुळीने माखलेले, चिखलयुक्त किंवा दगड-धोंडे व खडकांनी परिपूर्ण असे रस्ते आज कुठे दिसत नाहीत. आजतर पूर्वीच्या पाऊलवाटासुद्धा दिसत नाहीत. अपवाद वगळता सर्व मार्ग व रस्ते हे अतिशय चांगल्या पद्धतीचे आहेत, पण दुर्दैवाने अशा या सुंदर रस्त्यांवरून चालणारे लोक मात्र बिघडले आहेत. आपली वाहने चालविताना नियमांचा भंग होतो. परिणामी, अपघातांचे प्रमाणदेखील वाढत चालले आहे. अशा या अव्यवस्थेला सुमार्गगामी बनविण्याकरिता वेदांचा ‘मा अहि: भू:।’ म्हणजेच सापासारखी वाकडी चाल चालू नकोस, सरळमार्गी हो, हा उपदेश खूपच मोलाचा ठरतो.

विंचू हा सापाइतका भयंकर विषारी नसला, तरी तो त्रासदायक आहे, हे मात्र निश्चित! सापात मोठ्या प्रमाणात विष आहे, पण त्याला त्याचा अभिमान नाही. पण विंचू हा मात्र अतिशय गर्विष्ठ! त्याच्या नांगीत अगदी थेंबभरच विष आहे. पण, तो नेहमी आपली शेपटी उंच करून चालतो. विष हेच ते त्याचे ऐश्वर्य. आपल्यातील थोड्याशा विषाचा त्याला फार मोठा गर्व! यापासून मानवाने हाच बोध घ्यावा की आपल्यातील थोड्याशा चांगल्या अथवा वाईट गोष्टींचा कधीही अभिमान धरू नये की गर्व करू नये.पुढे उपदेश देताना वेदवाणी म्हणते- अनर्वा प्रेहि। ‘अर्व’ म्हणजे हिंसा किंवा परावलंबित्व आणि ‘अनर्व’ म्हणजे अहिंसक वृत्ती अथवा अपरावलंबित्व! माणसाने नेहमी हिंसक कृत्यांपासून दूर राहावे व दुसर्‍यावर अवलंबून राहता कामा नये. हिंस्र वृत्ती ही पशूंमध्ये आढळते. किंबहुना तो त्यांचा स्वभावच असतो. माणूस हा तर बुद्धिमान व सहिष्णू प्राणी! हा सर्वांशी प्रेमाने वागणारा एक समाजशील जीव! आपल्या व्यवहारातून सतत प्रेम, स्नेह आणि मैत्रीपूर्ण संबंध दृष्टीस पडावयास हवेत.


दुसरी गोष्ट म्हणजे माणसाने स्वावलंबी होऊन जगावे. ‘आत्मनिर्भरता’ हा सुखाचा मूलमंत्र आहे. सद्य:परिस्थितीत व स्वल्प साधनांमध्ये माणसाने समाधान बाळगावे. प्रत्येक गोष्टीत दुसर्‍यांवर अवलंबून राहता नये. लोकव्यवहारात प्रचलित असलेली ‘जो दुसर्‍यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला!’ ही म्हण आपणांस बरेच कांही सांगून जाते.वेदोक्त या उपदेशांना जो ग्रहण करतो, त्याच्यासमोर निश्चितच सारे जग नतमस्तक होते. अशा आदर्श व्यक्तिमत्त्वांचा सर्वत्र जयजयकार होतो. मोठ्या प्रमाणांत त्याला ऐश्वर्यसुख लाभते. ‘घृतस्य कुल्या उप...।’ म्हणजेच असा हा सत्पुरुष तूप किंवा तेजाच्या वाहणार्‍या नद्यांच्या जवळ पोहोचतो. इथे ‘घृत’ या शब्दाचा मूलभूत व्यावहारिक अर्थ ’तूप’ असा न घेता तुपासारखे तेज, ओज, शक्ती, ऐश्वर्य असा घ्यावा. तूप म्हणजेच भौतिक आणि आध्यात्मिक ऐश्वर्य! वेदमंत्रांत प्रतिपादित उपदेश अंगिकारणारा जीवात्मा खर्‍या अर्थाने या दोन्ही प्रकारच्या वाहणार्‍या नद्यांच्या जवळ जातो व त्यात तो सुखाने स्नान करू लागतो.

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य









अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121