मुंबई: महाविकास आघाडीने राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान भाजपच्या १२ आमदारांचे केलेले निलंबन आणि महाराष्ट्रात ओबीसींचे रद्द झालेले राजकीय आरक्षण हे दोन्ही मुद्दे संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडले जाणार आहेत.
लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात १२ आमदारांचे निलंबन आणि महाराष्ट्र सरकारने मनमानी वृत्ती अवलंबून ओबीसी आरक्षण रद्द करण्याचा मुद्दा उपस्थित केला जाईल, अशी माहिती खासदार संगम लाल गुप्ता यांनी दिली.मुंबईतील कुर्ला स्टेशन (पश्चिम) येथील सिद्धिविनायक मंदिराजवळ आयोजित मोर्चा आणि धरणे आंदोलनात खासदार संगम लाल गुप्ता बोलत होते. भारतीय जनता पार्टीच्या वतीने (उत्तर मध्य मुंबई जिल्हा) मोर्चा आणि धरणे आंदोलनाचे आयोजन केले होते.
यावेळी बोलताना पराग आळवणी म्हणाले,"ठाकरे सरकारच्या निष्क्रियतेमुळेच ओबीसी आरक्षण रद्द झाले आहे.आमचा हा लढा आरक्षण मिळेपर्यंत सुरूच राहणार आहे. या आंदोलनांच्या माध्यमांतून आम्ही ओबीसी समजला जागृत करण्याचे काम करत आहोत.", असेही ते म्हणाले. यावेळी ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नरेंद्र गावकर म्हणाले की, मुंबईच्या या आंदोलनाचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात ऐकू जाईल. आगामी काळात मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक गल्ली व परिसरात अशी अनेक आंदोलने करण्यात येणार आहे. यावेळी खासदार संगम लाल गुप्ता, आमदार पराग अळवणी, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नरेंद्र गावकर, जिल्हा अध्यक्ष सुषम सावंत यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.