
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Brigade 313 in Pakistan) पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या उपाध्यक्षा शेरी रहमान यांची एक मुलाखत नुकतीच प्रसारित झाली, जी स्काय न्यूज या वृत्तसंस्केने घेतली आहे. यामध्ये अल कायदाशी संलग्न ब्रिगेड ३१३ बद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आले असता शेरी रहमान यांची बोलती बंद झाल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानातून कार्यरत असलेली आणि काश्मीरमध्ये हल्ले समन्वयित करणारी अल-कायदाच्या नेतृत्वाखालील 'ब्रिगेड ३१३' संघटनेचा उल्लेख करताच प्रश्नाचे उत्तर देणे रहमान यांनी टाळल्याचे दिसून आले.
वास्तविक ब्रिगेड ३१३ हा एक अत्यंत धोकादायक आणि प्रभावी दहशतवादी गट आहे, जो पाकिस्तानातील विविध दहशतवादी गटांचे एकत्रित रूप आहे. या गटाचे अल-कायदाशी घनिष्ठ संबंध आहेत आणि तो पाकिस्तानमधील आणि भारताच्या सीमेजवळील दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय असल्याची माहिती आहे. या दहशतवादी गटाचे नाव बद्रची लढाई लढणाऱ्या पैगंबर मुहम्मद यांच्या ३१३ साथीदारांपासून प्रेरित आहे. या युतीचे नेतृत्व इलियास काश्मिरी करत होते, जो पाकिस्तानी लष्कराचा माजी कमांडो होता आणि नंतर २०११ च्या अमेरिकन ड्रोन हल्ल्यात मारला जाण्यापूर्वी अल-कायदाचा एक प्रमुख कमांडर बनला.
ब्रिगेड ३१३ ही एक संकरित संघटना म्हणून काम करते असे म्हटले जाते. ही स्वतंत्र संघटना नाही तर लष्कर-ए-तैयबा, लष्कर-ए-झांगवी, हरकत-उल-जिहाद अल-इस्लामी, जैश-ए-मोहम्मद आणि तालिबान गटातील दहशतवाद्यांची युती आहे. ती अल-कायदाच्या छत्राखाली काम करते आणि त्यांच्या लष्कर अल-झिल किंवा 'शॅडो आर्मी'चा भाग आहे. 'शॅडो आर्मी' ही अत्यंत अचूक आणि नियोजनबद्ध पद्धतीने हाय-प्रोफाइल दहशतवादी कारवाया करण्यासाठी ओळखली जाते. ही ब्रिगेड विशेषतः दक्षिण आशियात अल-कायदाच्या दहशतवादी कारवाया करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. अमेरिका आणि भारतासारख्या देशांविरुद्ध जिहादचे युद्ध लढणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.
पाकिस्तान हा दहशतवादाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो, कारण तिथे अनेक दहशतवादी गट उदयाला आले आहेत. त्यापैकी १९८७ साली उदयास आलेला लश्कर-ए-तैयबा, २००० मध्ये उदयास आलेला जैश-ए-मोहम्मद, २००७ मध्ये उदयास आलेला तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान, त्यानंतर उदयास आलेले हक्कानी नेटवर्क, अल-कायदा व ब्रिगेड ३१३ सारखे काही गट आजही सक्रिय आहेत.
पाकिस्तानमध्ये दहशतवादी गटांचे जाळे खोलवर रुतलेले आहे. भारतात झालेल्या अनेक हल्ल्यांचे सूत्रधार पाकिस्तानी गट होते. २००१ साली भारतीय लोकशाही प्रणालीची हत्या करण्याचा प्रयत्नात नवी दिल्लीतील भारतीय संसदेवर झालेला हल्ला, २००८ साली मुंबईतील २६/११ चा हल्ला, ज्यामध्ये मुंबईतील ताज हॉटेल, ओबेरॉय, छशिमट रेल्वे स्थानक, लिओपोल्ड कॅफे, इ. ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यानंतर २०१६ सालचा पठाणकोट वायुदल तळावरील हल्ला, २०१६ चा उरी हल्ला, २०१९ चा पुलवामा आत्मघाली हल्ला आणि नुकताच २०२५ दरम्यान झालेला पहलगाममधील दहशतवादी हल्ला ही काही प्रमुख उदाहरणे आहेत. ज्यातून पाकिस्तान दहशतवादाला पोसतो हे स्पष्ट होते. मात्र शेरी रहमान या मुलाखतीत.. आम्हाला ब्रिगेड ३१३ सारख्या दशतवादी संघटनांबद्दल माहिती नाही म्हणून सांगतायत आणि पाकिस्तान बदललाय असा खोटा दावा देखील करताना दिसतायत.
ऑपरेशन सिंदूर राबवत भारताने पाकिस्तानातील दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले आणि त्यानंतर भारतातून विविध देशांत गेलेल्या सर्वपक्षिय शिष्टमंडळांनी पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा देखील फाडला. आज हातावर मोजण्याइतकी काही राष्ट्रे सोडली तर उर्वरित सारे जग भारताच्या बाजून दहशतवादाविरोधात उभे आहे.