मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाच्या उद्रेकामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, राज्य सरकार कठोर निर्णय घेऊ शकतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे व या बैठकीमध्ये महाराष्ट्रात ३ आठवड्यांचा लॉकडाऊनलावला जाऊ शकतो, असा अंदाज ब्याक्त होताना दिसत आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही तसेच संकेत दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, चंद्रकांत पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रण दिले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारला कडक लॉकडाऊनकरावा लागू शकतो. मात्र त्याबाबत आजच्या बैठकीदरम्यान विरोधी पक्षांची भूमिका काय हे जाणून घेऊन मुख्यमंत्री मोठा निर्णय घेऊ शकतात. यापूर्वीही मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जाणकार व तज्ञ मंडळींशी याबाबत चर्चा केली होती.
कोरोनावर मात करण्यासाठी राज्यात निर्बंध कडक करून ‘ब्रेक द चेन’ ही मोहीम हाती घेतली आहे. कारण संसर्ग रोखण्यासाठी साखळी तोडणे आवश्यक आहे. व त्यासाठी आता लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नसल्याचे भयाण चित्र आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन झाला तर त्यामध्ये कदाचित मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनला पुन्हा ब्रेकही लागू शकतो. सध्या वीकेंडला ज्याप्रमाणे सर्व बंद ठेवण्यात आलं आहे, तसंच आठवड्यातील सर्व दिवस हेच नियम लागू शकतात. जीवनावश्यक सुविधांची दुकानं वगळता सर्व दुकाने बंद ठेवली जाऊ शकतात. तर या लॉकडाऊनमध्ये भाजीपाल्याच्या बाजारपेठा आणि किराणा दुकानं एका विशिष्ट वेळेत उघडी ठेवण्याची मुभा असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.