ओ३म् भूर्भुवः स्वः ।
तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि ।
धियो यो नः प्रचोदयात् ॥
(ऋ. ३.६२.१०), यजु. ३.३५, २२.९, ३०.२, ३६.३ साम. ६.३.१०)
(ओ३म्) हे विश्वव्यापक, सकलसंरक्षका, परमेश्वरा! तू (भूः) सत् स्वरुपी, प्राणांचाही प्राण, (भुवः) चित चैतन्यशक्तीयुक्त सर्व त्रिविध दुःखांना हरणारा (स्वः) आनंदमय, सकल सुखांना वितरीत करणारा आहेस. (तत्) अशा उपरोक्त सच्चिदानंद प्राणदाता- दुःखहर्ता- सुखकर्ता असलेल्या (सवितुः) समग्र विश्वाला निर्माण (उत्पन्न) करणार्या, स्वयंप्रकाशित (देवस्य) दिव्यगुणांनी, दातृत्वशक्तीने व तेजाने परिपूर्ण अशा देवाच्या (वरेण्यम्) स्वीकरणीय, ग्रहण करण्यायोग्य (भर्गः) शुद्ध व मंगलमय स्वरुपाचे (वयम्) आम्ही उपासक भक्तगण, (धीमहि) एकाग्रतेने ध्यान, चिंतन, मनन व धारण करतो. (यः) असा जो महान परमेश्वर (नः) आम्हा सर्व आराधनांच्या (धियः) बुद्धी व कर्मांना (प्रचोदयात्) नेहमी सन्मार्गावर नेवो, उत्तम गती प्रदान करो, सत्प्रेरणा देवोः)
विवेचन :
चार वेदातील सर्व मंत्रांमध्ये ज्याचा सर्वोच्च असा महान दिव्य अर्थ आहे, अशा गायत्री महामंत्रांतर्गत स्तुती, उपासना व प्रार्थना या तीन भागांपैकी ‘उपासना’ या विषयावरचे आपण निरूपण जाणून घेत आहोत. दुसर्या चरणातील ‘सविता’ या शब्दावर मागील भागात प्रकाश टाकण्यात आला आहे. आता ‘देवस्य, वरेण्यं, भर्गः धीमहि ।’ आणि या दुसर्या प्रार्थना अंतर्गत ‘धियो यो नः प्रचोदयात् ।’ या तिसर्या व अंतिम चरणावर चिंतन करू या!
उपासना करीत असताना ‘उपास्य’ व ‘उपासक’ हे दोन घटक महत्त्वाचे असतात. यांनाच ‘साध्य’ व ‘साधक’ असेही म्हटले जाते. साध्य म्हणजेच वांच्छित किंवा प्राप्तव्य लक्ष्य! हे विशुद्ध, पवित्र व तितकेच श्रेष्ठ हवे, अन्यथा साधकाचे प्रयत्न वाया जातात. उपासक किंवा साधकांसमोर ध्येय आहे. ‘त्या सविता देवाच्या वरणीय व शुद्ध स्वरुपाला प्राप्त करणे, म्हणजेच त्याच्यासमान आपले जीवन घडविणे व त्या त्या श्रेष्ठ गुणांशी एकरूप होणे.’ ‘सवितुः’ व ‘देवस्य’ हे दोन्ही शब्द अनुक्रमे ‘सवितृ’ व ‘देव’ या मूळ शब्दाच्या षष्ठी एकवचनातील आहेत.
सविताच्या व देवाच्या (चा, ची, चे, च्या - षष्ठी सम्बन्धे) या अर्थानुसार या दोन्हींचा सम्बन्ध ‘वरेण्यम्’ व ‘भर्गः’ या कर्मांशी असून तो पुढे ‘धीमहि=धरेमहि।’ या क्रियेशी जोडला गेला आहे. सवितानंतर ‘देवस्य’ हे पद महत्त्वाचे आहे. ‘देव’ हा शब्द दिव् या धातूपासून तयार होतो, जो की अनुक्रमे क्रीडा, विजिगीषा (जिंकण्याची इच्छा), व्यवहार, धृती (प्रकाश), स्तुती, मोह, मद, स्वप्न, कांती, गती या विविध अर्थांनी वापरला जातो. निरुक्त शास्त्रात ‘देव’ शब्दाचा अर्थ विशद करताना आचार्य यास्क म्हणतात-
‘देवो दानाद्वा, दीपनाद्वा, द्योतनाद्वा, द्युस्थानो भवतीनि वा!’ म्हणजेच दान करण्याच्या, प्रकाशित होण्याच्या, चमकण्याच्या किंवा द्युस्थानी राहण्याच्या अर्थाने ‘देव’ म्हटले जाते! थोडक्यात ज्यामध्ये हे वरील गुण आढळतात, अशांना आपण ‘देव’ किंवा ‘देवता’ म्हणतो. या सर्वांमध्ये परमेश्वर हा देव आद्य! कारण तो समग्र विश्वाला आपल्या सद्गुणांचे दान देतो... अशा देवाचे स्वरूप फारच विशाल आहे. तो सर्वत्र व्यापक आहे. अणुरेणूंमध्ये आणि समग्र आसमंतामध्ये त्याचा दरवळ अनुभवता येतो. तो अनादी, अनंत आहे. त्या देवाच्या ‘वरेण्यम् व भर्ग’ या दोन गुणांचे भक्तांनी ध्यान, स्मरण, चिंतन व धारण करावयास हवे. काय आहेत हे दोन गुण?
वरेण्यम्
जगात सर्वाधिक वरणीय गोष्ट कोणती? जिथे संकटसमयी सर्व नातेवाईक, मित्र, सोबती, नागरिक काहीच मदत करू शकत नाहीत किंवा धनवैभवादी भौतिक संपदा किंवा जगातील कोणतीच शक्ती कामास येऊ शकत नाही. अशा वेळी आम्हास एकमेव अद्वितीय अशा देवाच्या वरणीय (वरेण्यम्) गुणांस आठवतो... त्यालाच हाक मारतो... त्या एकालाच स्वीकारतो. जगातील सर्व बाकी मागे राहतात. केवळ वरण केली जाणारी दिव्य शक्तीच कामास येते. म्हणून परमेश्वरालाच आम्ही वरतो. विवाहमंडपात वधूसमोर केवळ ‘वर’ हाच जसा एकमेव वरणीय असतो, तद्वतच या संसारचक्रात पदोपदी ईश्वर हेच एकमात्र वरणीय (स्वीकरणीय) तत्त्व समोर उभे राहते.
भर्गः
तो परमेश्वर ‘वरेण्यम’ का आहे? तर त्याच्यात विशुद्धता व पावित्र्य आहे. सर्व प्रकारच्या पापांचे नायनाट करण्याचे सामर्थ्य ईश्वरात आहे. भगवंताच्या सान्निध्यात राहणारा उपासक हा आपल्या दोघांना नष्ट करण्यास समर्थ होतो. त्याचे कर्मदोष लुप्त होतात. याकरिता एकमेव स्थान आहे, ते म्हणजे परमेश्वराचे शुद्धस्वरूप! इतरांमध्ये हा गुण कुठेच सापडणार नाही. परमशांतता, आनंद, समाधान, पावित्र्य हे सर्व ईश्वरातच विद्यमान आहेत. म्हणून जगातील प्रत्येक जीव हा त्या पवित्र व शुद्ध ठिकाणीच आश्रयाला जातो. कारण ‘यस्यच्छायाऽमृतम् ।’ त्या ईश्वराच्या सावलीत अमृतासमान आनंद दडला आहे.
अशा वरेण्यम् व भर्गः ‘स्वरुपाचे धीमहि।’ म्हणजेच आपण सर्व ध्यान करतो. इथे ‘धीमहि’ हे क्रियापद बहुवचनी आखले आहे. कारण, सामूहिक उपासना केल्याने कार्यशक्तीचा विस्तार होतो. विशेष म्हणजे ध्यान करणे, याचाच अर्थ केवळ स्मरण करणे असा न घेता आम्ही पूर्णांशाने त्या दिव्य भगवंताच्या सद्गुणांना अंगिकारतो किंवा त्यांना आमच्या जीवनांचा एक अविभाज्य असा भाग बनवितो. आमचे सर्वस्व केवळ त्या अभीष्ट ईश्वरीय तत्त्वाला समर्पित करतो, असा घ्यावयास हवा! धनुर्धारी अर्जुनाचे लक्ष्य ज्याप्रमाणे फक्त त्या निर्दिष्ट पक्ष्याचा डोळाच असतो, त्याचप्रमाणे उपासकाने आपले ध्येय ईश्वराचे शुद्ध व वरणीय स्वरूप हेच ठेवावयास हवे!
सद्बुद्धीची प्रार्थना
गायत्री मंत्राचा, अंतिम भाग म्हणजे ‘प्रार्थना’ होय. यालाच ‘याचना’ किंवा ‘कामना’ असेही म्हणतात. या मंत्रातील स्तुती, उपासना व प्रार्थना हा क्रमदेखील किती सुसंगत व संयुक्तिक आहे पाहा! यावरून प्राचीन ऋषींची दिव्यदृष्टी व कल्पकता दृष्टीस पडते. याचकाने एखाद्या धनाढ्य व्यक्तीकडे जाऊन आपणास इच्छीत वस्तूंची किंवा पैशाची लागलीच मागणी करावी, हा त्या याचकाच्या मूर्खपणाचा कळस नव्हे काय? यामुळे त्याची मागणी काय मान्य होईल? कदापि नव्हे! याउलट तो अपमानितच होईल. म्हणून त्याने पहिल्यांदा त्यांच्या गुणांचा गौरव किंवा प्रशंसा केली पाहिजे. नंतर नेहमी त्यांच्या जवळ राहत त्याच्या विचार, गुण व कार्याप्रमाणे आपण जीवन बदलावयास हवे. मग नंतरच त्याने प्रार्थना करावयास हवी! जेणेकरून ती मान्यही होऊ शकेल!
अगदी असेच आहे परमेश्वराविषयीदेखील! गायत्री मंत्रात पहिल्यांदा ‘ओ३म् व भूर्भुवः।’ याद्वारे स्तुती केली. नंतर ‘तत्सवितुः... धीमहि ।’ या चरणाने उपासना केली गेली आणि आता ‘धियो..... प्रचोदयात्।’ या अंतिम चरणात प्रार्थना करण्यात आली. त्या महान भगवंताकडे काय बरे मागावे? कारण दाता हा तर महानच आहे... त्या विधात्याने मानवाच्या कल्याणाकरिता सर्व काही अगोदरच देऊन ठेवले आहे. ही समग्र निसर्गशक्ती आणि त्यातील सर्व वैभव हे मानवाच्या ऐहिक सुखाकरिता पूर्वीच प्रदान केले आहे. एवढे असूनही माणूस कपाळकरंटा, दुःखी तो दुःखीच! सर्वकाही देऊनही त्याचे तेच ते रडगाणे! म्हणून नाही? त्याच्याजवळ असे काय, ज्याच्या अभावी मानवाला या इहपरलोकाला उपभोगता येत नाही. होय. ते तत्त्व म्हणजे सद्बुद्धी! बुद्धी तर सर्वांनाच मिळाली आहे. पण, सुबुद्धी किंवा सद्बुद्धी मात्र नाही किंवा ती मिळविण्याकरिता तो प्रयत्नही करीत नाही. म्हणूनच उपासक ईश्वराकडे आर्त विनवणी करतो-
‘धियो यो नः प्रचोदयात् ।’
हे सविता देवा! तू आम्हां सर्वांच्या बुद्धींना व कर्मांना पवित्र कर... सन्मार्गावर ने! प्र उपसर्गपूर्वक ‘चुद्’ धातूपासून ‘प्रचोदयात्’ ही विध्यर्थक क्रिया बनते. प्रकर्षाने म्हणजेच तीव्र गतीने आमच्या बुद्धींना चांगली प्रेरणा दे! अशी याचना इथे करण्यात आली आहे. बुद्धी तर चोर, धूर्त, लबाड, स्वार्थी व वाईट वृत्तीच्या मानव समूहांकडेही आहे. म्हणूनच आज कुटुंब, समाज, राष्ट्र व एकूणच सर्व जगात मोठ्या प्रमाणात अनिष्ट व समाजविघातक अशी पापकृत्ये मोठ्या प्रमाणात होत आहेत. बुद्धीच्या बळावर मानवाने निसर्गाला कवेत घेतले. पण, त्याचा योग्य तो विनियोग करण्याची सद्बुद्धी नसल्याने आज विनाशकाळ ओढवला आहे. ज्या सवितृदेवाने मानवाच्या उपभोगाकरिता सारे ऐश्वर्यसुख बहाल केले... पण त्याच्या दुर्बुद्धीचा हाच दुष्परिणाम की, त्याकरिता हे सर्व जग विषारी बनत चाललेय. बुद्धी बिघडली की माणसाने जे काही परिश्रमाने मिळविले, ते सर्व नष्ट व्हायला वेळ लागत नाही... जगाचा आजपर्यंतचा प्रदूषित इतिहास दुर्बुद्धीने ग्रासलेल्या राजे-महाराजांमुळेच कलंकित झाला आहे आणि त्याचे परिणाम अद्यापही सार्या जगाला भोगावे लागत आहेत. म्हणूनच सुबुद्धी, सद्बुद्धी, दिव्यबुद्धी आणि सात्त्विक बुद्धीची याचना व प्रार्थना करण्याच्या भावनेपोटी गायत्री मंत्र म्हणतो-
‘धियो यो नः प्रचोदयात् ।’
हे भगवंता! आम्हां सर्वांना बुद्धीवैभवास सत्प्रेरणा दे, चांगली दिशा दे, सन्मार्गगामी बनव! जेणेकरून आम्ही आमचे व्यक्तिगत, सामाजिक, राष्ट्रीय व वैश्विक पातळीवरील जीवन यशस्वी, कल्याणकारी, मंगलदायी आणि सर्व प्राणिमात्रांचे सर्वांगीण प्रगती साधण्यास उपयुक्त ठरेल...!
(समाप्त)
- नयनकुमार आचार्य