तीळगूळ घ्या, गोड गोड बोला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jan-2020
Total Views |
Til gul _1  H x



थंडी ऐन बहरात येऊन गुलाबी होते. धुक्यांच्या लाटा सकाळ कुशीतून उमलायला लागतात. सांज अधिक गहिरी कातर होऊ लागते. पानगळीचे गालिचे रस्त्यांवर पहुडूलागतात अन् हिवाळा भरात येतो. शेकोटी, हुरडा, वांग्याचा लुसलुशीत कोवळेपणा, माघाची थंडी आणि जोडीला संक्रांतीचे तीळवण. एका सृजनोत्सवाची पेशकारी. तीळगूळ घ्या, गोड गोड बोला...

भारतीय उपखंडातील अनेक भागांत तेथील पर्यावरणाला अनुसरून त्या त्या भागात विशिष्ट सण साजरे केले जातात. ‘मकरसंक्रांत’ हा सण पर्यावरणावर अवलंबून नाही, तर पर्यावरण ज्याच्यावर अवलंबून आहे, अशा सूर्याशी जोडलेला आहे. सूर्य मकर वृत्तावर दिसू लागला की येणारा पहिला सण म्हणजे संक्रांत. सूर्य उत्तरेकडे सरकणार म्हणजे ऊन वाढणार, ऊर्जा वाढणार, वनस्पतींना अन्न तयार करायला अधिक वाव मिळणार, प्राण्यांना ते खायला मिळणार. जीवाला बरे वाटणार...

 

आनंदाचे दिवस असले की, उत्साह वाढतो, उत्सव, सण करावासा वाटतो. पूर्वी कदाचित हाच दिवस ‘मकरसंक्रांत’ म्हणून मानत असावेत. कालांतराने पृथ्वीच्या परांचन गतीमुळे दक्षिणायनाचा दिवस आणि सूर्याचा मकर राशीत प्रवेश करण्याचा दिवस यात अंतर पडले. भारतात खरेतर भारतीय उपखंडातच मकरसंक्रांत हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. एकाच दिवशी साजरा होत असूनही त्या सणाची नावे मात्र खूपच वेगळी आहेत. महाराष्ट्रात ‘मकरसंक्रांत’ किंवा ‘संक्रांत’ म्हणतात. ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणत तीळ आणि गूळ यांच्यापासून बनवलेल्या वड्या किंवा लाडू यांची देवाणघेवाण करतातमहाराष्ट्राच्या शेजारच्या कर्नाटकमध्येसुद्धा जवळजवळ महाराष्ट्रासारखाच हा सण साजरा होतो. उसाची सुगी झालेली असते.

 

‘एल्लु’ म्हणजे सफेद तीळ, भाजलेले शेंगदाणे, खोबर्‍याचे काप आणि बेळ म्हणजे गुळाचे खडे यांचे वाण सुपातून नेतात. त्यात कधी ‘सक्कर अच्चू’ म्हणजे बत्तासे, उसाचे करवे असेही पदार्थ ठेवतात. ते एकमेकांना देता-घेताना ‘एल्लू बेळ तिंडु झोल्ले मातंडी‘ म्हणजे ‘तीळगूळ खा चांगलेच बोला’ असं म्हणतात. महाराष्ट्राच्या वायव्येला असलेल्या गुजरात आणि राजस्थानमध्ये हाच सण ‘उतराण’ किंवा ‘उत्तरायण’ म्हणून साजरा होतो. तीळगुळाची चिक्की करतात. या मोसमात आलेल्या जवळजवळ सर्व प्रकारच्या फळभाज्या, शेंगभाज्या, कंदमुळे घालून मिश्रभाजी किंवा ‘उंधीयू’ करतात. पतंग उडविण्याचा मोठा जल्लोष असतो. जणू काही पतंगाच्या मार्गाने शर्यतच लागलेली असते सूर्यापर्यंत पोहोचायची...

 

गोवा, आंध्रप्रदेश, झारखंड, मध्यप्रदेश, ओडिशा, प. बंगाल, बिहार, उत्तरांचल, उत्तरप्रदेश, मणिपूर सगळ्या प्रांतांमध्ये ‘मकरसंक्रांत’ साजरी केली जाते. आंध्रप्रदेशात हा सण चार दिवस असतो - १. भोगी, २. पेट्टा पांडुगा ३. कणुमा आणि ४. मुक्कनुमा हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाबमध्ये तिला ‘माघी’ म्हणतात. काश्मीरमध्ये ‘शिशुर सैंक्रांत’ म्हणतात. आसाममध्ये ‘माघी बिहु’ किंवा ‘भोगाली बिहु’ असे म्हणतात.

 

उत्तर प्रदेशमध्ये ‘खिचडी’ म्हणतात. दक्षिणेकडील प्रांतांमधूनही हा सण साजरा होतो. तामिळनाडूत त्याला ‘पोंगल’ म्हणतात. केरळ प्रांतात ‘मकर विलु’ म्हणतात. भारताबाहेर भारताजवळच्या देशांमध्येही हा सण साजरा होतो. नेपाळमध्ये ‘तरुलोक - माघी’, थायलंडमध्ये ‘सोंगक्रान’, लाओसमध्ये ‘पि-मा-लाओ’, म्यानमारमध्ये ‘थिंग्यान’ तर कंबोडियामध्ये ‘मोहा संक्रांत’ म्हणून हा सण साजरा होतो.

 

या सणाशी अनेक पौराणिक कथाही जोडलेल्या आहेत. मकर राशीचा स्वामी ‘शनी’ म्हटला जातो. (‘शनी’ या शब्दाचा अर्थ हळूहळू सरकणारा) तो सूर्यापासून निर्माण झाला आणि खूप लांब गेला. वर्षातून एकदा एक महिनाभर सूर्य शनीला भेटतो, तो हा सण. दुसर्‍या एका कथेत असे सांगितले आहे की, संक्रांतीपासून देवतांचा दिवस सुरू होतो. (देव लोक वर - उत्तरेकडे राहतात असे मानतात. उत्तरीय ध्रुव प्रदेशात या क्षणानंतर सूर्य दिसायला सुरुवात होते) आणखी मजेदार दंतकथा अशीही आहे की, याच दिवशी भगीरथाने गंगा स्वर्गातून खाली आणली. काहीही असले तरी संक्रांत हा गोडव्याचा उत्सव आहे हेही तितकेच खरे.

 

मला अजूनही आठवतेय, भोगीपासून संक्रांतीला सुरुवात व्हायची. पारोशानेच सवाष्णिला तीळ, वांगी, शिकेकाई, गूळ, कापूस, ओंब्या, लोणी-साखर इ. वाण दिल्यानंतरच घरातल्या इतर गोष्टींना सुरुवात व्हायची. सगळ्या भाज्या ( गाजर, बोरं, शेंगदाणे, वांगी ) एकत्र करून त्याची खास भोगीची भाजी बनवली जायची. सोबत तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि खिचडी असायची. अंघोळीच्या पाण्यातही तीळ घातलेले असायचे. दुसरा मुख्य दिवस संक्रांतीचा. या दिवशी आई, काकू सुगडांची पुजा करायच्या. घरात तिळाची वडी, लाडू, शेंगपोळी आणि गुळाची पोळी बनवली जायची. काळ्या रंगाचे कपडे घातले की, हमखास रागवणारी आजी मुद्दाम नवा काळा फ्रॉक घालायला सांगायची.

 

नवीन लग्न झालेल्या कुणा ताईचा हलव्याच्या दागिन्यांनी सजवून फोटो काढला जायचा. संक्रांत सण साजरा व्हायचा. आम्हा मुलींची तर खूप धमाल चालायची. मैत्रिणींना भेट देण्यासाठी कानातले, रुमाल, पिना अशा भेटवस्तू खरेदी करून त्या भेट दिल्या जायच्या. दादा लोक मात्र पतंग उडवण्यात मग्न असायचे. संध्याकाळी आईसोबत अनेक ठिकाणी हळदी-कुंकूसाठी जावं लागायचे. तिथेही अनेक वस्तू वाण म्हणून मिळायच्या. तिसरा दिवस मात्र ‘शिळी संक्रांत’ किंवा ‘किंक्रांत’ म्हणून साजरा व्हायचा. अनेकांकडे त्या दिवशी आवर्जून ‘सामिष’ बनवलं जायचं. आजही संक्रांतीच्या या सार्‍या आठवणी ऊब देऊन जातात. सृजनानंतर पानगळ आणि पानगळीनंतर, सृष्टीच्या विलयातून पुन्हा सृजन हा निसर्गाचा नियमच आहे. दुःखाच्या कडू घोटानंतर सुखाचा गोडवा काही वेगळाच असतो ना...! संक्रांत हीच शिकवण देत वारंवार गोडवा देत राहते. तीळगूळ घ्या आणि गोड चांगले बोला. चांगला विचार आणि चांगली कृती करा हे सांगत राहते. तुम्हा सर्वांना हा तिळाचा तैलभाव आणि गुळाचा गोडवा आयुष्यभर मिळो, हेच संक्रांत सांगते. तीळगूळ घ्या गोड गोड बोला!

- मानसी चिटणीस

९८८११३२४०७



@@AUTHORINFO_V1@@