ममदापूर संवर्धन राखीव क्षेत्रात काळविटांना केंद्रस्थानी ठेवून सुरू झालेल्या गवत कुरण विकास प्रकल्पाचे यश वाखाणण्याजोगे आहे. कुरण विकास प्रकल्पाचा हा प्रयोग राज्यातील इतर वनक्षेत्रांसाठी दिशादर्शक ठरला आहे. त्याविषयी ऊहापोह करणारा हा लेख...
नाशिक जिल्ह्यातील येवला व नांदगाव या दोन तालुक्याच्या सीमारेषेवर पसरलेला गवताळ उघड्या माळरानाचा ५,४४५.९५५ हेटर म्हणजेच ५४.४६ चौ.किमी हा वनप्रदेश काळविटांच्या नैसर्गिक अधिवासासाठी सुयोग ठरला आहे. या विस्तृत माळरान क्षेत्रावर स्थानिक स्थळवैशिष्ट्यांमुळे काळवीट, लांडगा, तरस, कोल्हा, खोकड, रानमांजर, उदमांजर, ससा, मुंगुस, सायाळ इ. वन्यप्राणी आणि विविध प्रजातींचे पक्षी, सरपटणारे प्राणी, कीटक व उभयचर आढळतात. या क्षेत्रातील काळवीट आणि जैवविविधतेच्या संवर्धनाकरिता ममदापूर संवर्धन राखीवची स्थापना २०१४ साली झाली.
ममदापूर संवर्धन राखीव ही गवताळ परिसंस्था आहे. या भागात चराईमुळे गवताच्या चांगल्या प्रजाती नष्ट होऊन कुसळीसारख्या प्रजातींची वाढ झाली. परिणामी, जंगलात चारा उपलब्ध न झाल्याने काळविटांनी आपला मोर्चा आजूबाजूचा परिसरातील शेतीकडे वळविला. त्यामुळे वाहनांना धडकणे, विहिरी-शेततळ्यांत पडणे, पिकांचे नुकसान होणे अशा गोष्टी घडू लागल्या. त्यामुळे संवर्धन राखीव क्षेत्रामध्येच गवताळ अधिवासाच्या पुनरुज्जीवनासाठी ‘कॅम्पा’ योजनेअंतर्गत गवती कुरण विकास प्रकल्प सुरू झाला.
गवती कुरण विकास प्रकल्प राबवण्याकरिता गवताची प्रजात, त्यांची ओळख आणि गवत लागवड यांविषयीचे ज्ञान वनकर्मचार्यांकडे नव्हते. त्यामुळे सुभाष बडवे यांनी ‘गवती कुरण विकास’ या विषयांवर कार्यशाळा घेतली. या कार्यशाळेत वेगवेगळ्या गवती प्रजातींची जसे डोंगरी, मारवेल, हेमाटा, अंजण, धामण, दशरथ यांची माहिती तसेच विविध गवती कुरण विकासकामांची माहिती देण्यात आली. कोणत्या गवताची निवड करावी, गवताची लागवड कशी करावी, याबाबतचे मार्गदर्शन वनकर्मचार्यांना मिळाले. काळविटांना सकस चारा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने २०२१ साली प्रथमच ममदापूर संवर्धन राखीवमध्ये गवती कुरण विकासकामे हाती घेण्यात आली.
राहुरी कृषी विद्यापीठ किंवा पिंपळगाव बसवंत अशा विविध ठिकाणांवरून गवती रोप, ठोंब आणि बिया गोळा करणात आल्या. इतर ठिकाणांवरुन माहिती घेऊन प्रायोगिक तत्त्वावर काही गवत प्रजातींचे बी हे राजस्थान, केरळ येथून मागविण्यात आले. विविध ठिकाणांवरून गवती प्रजातींचे बी व त्याचे ठोंब प्राप्त केल्यानंतर योग्यरित्या छेद करून बावीस्टीन, ह्युमीक आणि जिब्रालिक अॅसीडमध्ये बुडवून ते रोपवाटिकेमध्ये तयार करण्यात आलेल्या गादी वाफ्यावरती १५ बाय १५ मी अंतरावर लावण्यात आले. काही ठोंब पिशवीमध्ये लावले. त्यानंतर अंजन गवत ठोंब १५ ते २० दिवसानंतर फुटण्यास सुरुवात झाली. तीन ते चार महिन्यानंतर एका ठोंबापासून २५ ते ३० अंजन ठोंब तयार झाले. डोंगरी गवत बी आणि ठोंब गोळा केल्यानंतर बुरशीनाशक व जेब्रालिक अॅसीडमध्ये बुडविल्यानंतर त्यांची उगवन क्षमता ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत दिसून आली.
रोपवाटिका
चांगल्या जातीचे बियाणे आणि कंद प्राप्त करून बीजप्रक्रिया करून अजंण, धामण, हेमाटा, मारवेल, डोंगरी, दशरथ या प्रजाती पिशवीमध्ये लावण्यात आल्या. लावताना बुरशीनाशक बावीस्टीन आणि ह्युमिक अॅसीडमध्ये बुडवून लागवड करणात आली. रोपवाटिकेत पिशवीमध्ये लागवड केलेल्या रोपांना मार्च व एपिलमध्ये बी आले. हे बी पुन्हा गोळा करून पुन्हा गादी वाफावरती पेरणी केली. रोपवाटिकेमध्ये अंजण, धामण, मारवेल, डोंगरी, हेमाटा, दशरथ ही बहुवार्षिक गवताची रोपे तयार करण्यात आली.
ममदापूर संवर्धन राखीवमध्ये केलेल्या गवती कुरणांमध्ये रोपे कोवळे असतानाच काळवीट खात असल्याचे आढळून आले. त्याचा परिणाम गवताच्या वाढीवर होत असल्याचे दिसून आले. त्याकरिता प्रायोगिक तत्त्वावर दोन हेटर क्षेत्रावर चॅनलिंग फेन्सिंग करून त्यात गवती रोपांची लागवड करण्यात आली. गवतांची वाढ उत्कृष्ट झाल्याचे दिसले. बिया पडून त्यापासून नवीन रोपे तयार झाल्याने संवर्धन राखीव क्षेत्रात गवती कुरणाच्या लागवडीला यश मिळाले आहे.
१) डोंगरी (Chrysopogonfulvu) - डोंगरी गवत हे कोरडवाहू क्षेत्रात येणारे आहे. उथळ खडकाळ भागात हे गवत आढळते. हे गवत वर्षानुवर्षे फुटत असते. ठोंबापासून फुटलेल्या गवताची एक मीटरची व्याप्ती असते. कमी पावसाच्या क्षेत्रातपण टिकून राहते. या गवताला सप्टेंबर ते ऑटोबर या महिन्यात फुलोरा येतो. नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये बी परिपक्व होते आणि बी व ठोंबापासून गवत लागवड करता येते. जल व मृदसंधारणामधे एक गवत पाच ते दहा किलो माती धरून ठेवते. या गवताची वाढ वार ते पाच फूट होत असते. या गवताचा पौष्टिक चारा म्हणून उपाोग केला जातो.
२) मद्रास अंजन (Cenchrusciliaris Linn) - अंजन गवत हे कोरडवाहू क्षेत्रात येणारे आहे. उष्ण व कोरड्या वातावरणात हे गवत चांगल्या प्रकारे येते. अंजन गवताची निर्मिती ठोंब व बियांपासून करता येते. ठोंबापासून २५ ते ३० फुटवे फुटता. हे गवत कमी पावसाच्या क्षेत्रातपण टिकून राहते. या गवताचा फुलोरा सप्टेंबर ते ऑटोंबर या महिन्यात येतो. जल व मृदसंधारणामधे एक गवत दहा ते १५ किलो माती धरून ठेवते. या गवताची वाढ पाच ते सहा फूट होते. या गवताची लागवड करताना पुंजका पद्धतीने बी लागवड केली पाहिजे.
३) हेमाटा (StyloHamat) - हेमाटा हे गवत हे कोरडवाहू व मुरमाड क्षेत्रात येणारे आहे. उष्ण व कोरड्या वातावरणात हे गवत चांगला प्रकारे येते. हेमाटा गवताची लागवड बियांपासून करता येते. या गवताची वाढ दोन ते तीन फूट होते.
४) धामण (Cenchurussetigeru) - धामण हे गवत हे कोरडवाहू व मुरमाडक्षेत्रात येते. धामण गवताची निर्मिती बियांपासून करता येते. हे गवत कमी पावसाच्या क्षेत्रातपण टिकून राहते. जल व मृदसंधारणामधे एक गवत आठ ते दहा किलो माती धरून ठेवते. या गवताची वाढ अडीच ते तीन फूट होत असते. एक गवत लागवड केलानंतर एक मीटरचा व्यास व्यापतो.
५) दशरथ (Cenchurussetigeru) - दशरथ घास या चारा पिकाच्या लागवडीसाठी हलया ते मध्यम प्रकारची जमीन निवडावी. क्षारयुक्त जमिनीमध्येदेखील हे गवत उत्तम येते. हे चारा पीक बहुवार्षिक असल्यामुळे जनावरांना कमीत कमी पाच वर्षे वर्षभर हिरवा चारा मिळतो. दशरथ घास हे दिद्वल वर्गातील चारा पीक आहे. हा चारा हिरवागार, कोवळा, लुसलुशीत असतो. या पिकाच्या मुळावर रायझोबियम या जिवाणूच्या गाठी असल्यामुळे जमिनीचे आरोग्यदेखील चांगले राहते. हे पीक दोन ते तीन मीटर सरळ उंच वाढते.
गोपाळ हरगावकर
(लेखक ममदापूर संवर्धन राखीव क्षेत्रात वनरक्षक म्हणून काम करतात.)