‘वसुधैव कुटुम्बकम्’ असे म्हणताना वसुंधरेचे एक अविभाज्य अंग म्हणजे पर्यावरण! भारताबरोबर महाराष्ट्रदेखील अमृतकाळाकडे प्रवास करीत आहे आणि या प्रवासात पर्यावरणाच्या वाटेवर महाराष्ट्राने देदीप्यमान कामगिरीही बजावली आहे. पण, त्यासोबतच अनेक पर्यावरणीय आव्हानेदेखील राज्यासमोर आ वासून उभी आहेत. आज राज्यातील पर्यावरणाची चळवळ कितीही विरोधाभास निर्माण करणारी असली, तरी तळागाळात पर्यावरणासाठी काम करणारी खरी मंडळी मात्र कोणत्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता, वसुंधरेच्या रक्षणासाठी अहोरात्र झटत आहेत. पर्यावरणाचे प्रश्न हे शेती, अर्थकारण, रोजगार आणि उद्योग अशा सर्वांशी निगडित आहेतच. पण, राज्यातून नामशेष होण्याच्या मार्गावर असणार्या प्रजातींचा प्रश्न जितका गंभीर आहे, तितकाच गंभीर प्रश्न वन्यजीवांमुळे शेती सोडलेल्या शेतकर्यांचा सुद्धा आहे. वृक्षारोपणाच्या नावावर माळरानांवरदेखील झाडे लावत सुटणार्यांचा धोका जेवढा पर्यावरणाला आहे, तेवढाच फायदा शास्त्रोक्त पद्धतीने वनीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धती अमलात आणणार्यांना प्रोत्साहन देण्याचा आहे. कचरा आणि सांडपाण्याच्या नावावर केवळ ओरड करणार्यांपेक्षा, कचर्यावर आधारित वीजनिर्मिती किंवा सांडपाणी शुद्ध करून नद्यांमध्ये सोडणार्या कंपन्यांची साथ घेणेही तितकेच गरजेचे. पर्यावरणीय समस्येच्या नावावर विदेशी चळवळीप्रमाणे केवळ विरोधाला विरोध करणारे असंख्य आहेत. मात्र, त्या समस्यांवर उपाययोजनांची फुंकर घालून तो प्रश्न मार्गी लावणारे अल्पसंख्य आहेत. पर्यावरण क्षेत्रातील याच अल्पसंख्याकांना जगासमोर आणण्याची खरी गरज आहे. आजच्या ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या निमित्ताने पर्यावरणीय समस्यांना शाश्वत उपाययोजनांचे कोंदण देणार्या व्यक्ती आणि संस्थांचा कार्यपरिचय करुन देणारी ही विशेष पुरवणी!
-अक्षय मांडवकर
वरिष्ठ पर्यावरण प्रतिनिधी, दै. ‘मुंबई तरुण भारत’