कोकणातील सड्यांवर ऑगस्ट-सप्टेंबरपासून गवताचे प्राबल्य वाढत जाते. ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून हे गवत सुकण्यास सुरुवात होते. सड्यांवर गवताच्या कोणत्या प्रजाती आढळतात, त्यांचे पारंपरिक उपयोग, त्यांच्या वापरात झालेले बदल अशा बाबींचा अभ्यास संशोधकांनी केला असून त्याविषयी माहिती देणारा हा लेख.
आपल्या अगदी जवळ, हाकेच्या अंतरावर निसर्गातल्या अतिशय जिवंत आणि क्रियाशील जागा सापडतात. यांपैकी काही जागा वर्षातील बहुतांश काळ निद्रिस्त, सुप्तावस्थेत असतात. ऋतुमान बदलू लागल्यावर त्यांचेही रूप बदलत जाते. राखाडी, दगडी स्वरुपात दिसणारे सुके, कोरडेठाक पडलेले कोकणातील सडे असेच रूप पालटत हिरवेगार होताना आपण सध्या अनुभवत आहोत. ज्येष्ठ महिन्यापासून ते भाद्रपदापर्यंत दीपकाडी, हबेअमरी, तेरडा, सोनतळ, कावळी यांसारखी नाना रानफुले आणि बेडूक, देवगांडूळ इत्यादी प्राणी आपापली जीवनचक्रे पूर्ण करतात. दर 15 दिवसांनी सड्याचे रूप बदलत जाते आणि भाद्रपदाअखेर ते गवताने व्यापून जाते.
वर्षाच्या या हंगामात सड्यावरून झिरपलेले पाणी आणि मुबलक गवत हे स्थानिक लोकांसाठी मोठे वरदान ठरते. आश्विन महिन्यापर्यंत हे गवत विविध जातींनुसार वितभर ते अगदी पुरुषभर उंचीपर्यंत वाढलेले असते. भातपिके तयार होईपर्यंत गायीगुरे सड्यांवर चरण्यासाठी दररोज येऊन जातात. पौष-माघ महिन्यांनंतर हे सुके गवत कापून रचून जमा करण्याची लगबग सुरू होते. ज्यातून पुढच्या पावसापर्यंत जनावरांची सोय होते. हातभर गवताची पेंडी, त्यापेक्षा थोडे जास्त गवताचा पेंडा, तर त्याहीपेक्षा मोठी पेंडी म्हणजे वरंड आपल्याला गावागावांत दिसू लागतात. सड्यांवरच्या खोलगट भागांत भात, नाचणीची शेती होते. झोडणी झाल्यावर उरलेला गवतसदृश भाग चार्यासाठी वापरला जातो. त्याची विक्रीही होते. भाताचा उरलेला भाग बांधतात त्याला ‘भाताचा लाटा’ म्हणतात. शेतीच्या बांधावर किंवा घराजवळ मजबूत शेवर किंवा बांबूची काठी रोवली जाते आणि तिच्याभोवती भाताचा चारा गोलाकार रचला जातो. याला ‘उटी’, ‘तणस’ किंवा ‘उडवी’ म्हणतात. या चार्यावर झोडलेला भाताचे गवत हे आच्छादन म्हणून टाकले जाते. यामुळे पावसाचे पाणी थेट आत झिरपत नाही आणि आतले गवत कोरडे राहते. सड्यावरच्या गवताची विक्रीही काही प्रमाणात होते. एका 30 ते 40 किलोच्या वरंडीची किंमत साधारण 20 ते 60 रुपयांपर्यंत असते. याच्या जोडीला याचा वापर घर शाकारणी, राबशेती यांसाठी होतो. करडी व भाताचे गवत आंब्याच्या पेट्यांमध्ये वापरले जाते. करपील , गवतील , तांबिल काटवळ/बोंगराट , डोंगयाळ , कुडशी , गोंदियाळ या गवताच्या जाती जनावरांच्या विशेष आवडीच्या तसेच अतिशय पौष्टिक मानल्या जातात. गवताला फुले आल्यावर मात्र ते गुरांना फारसे रुचत नाहीत. फुले येण्याआधीचा कोवळा लुसलुशीत पालाच त्यांना आवडतो. जानेवारीत करडी गवत दवामुळे काळसर व मऊसर झाल्यावर ते जनावरे खातात. समुद्राला लागून असलेल्या सड्यावरील गवत थोडे खारट असते. त्यामुळे जनावर ते फार आवडीने खातात. भाताचे गवत उष्ण असल्यामुळे पावसाळी व थंडीच्या काळात उपयुक्त ठरते. हे दुधवाढीसाठीही फायदेशीर आहे. उन्हाळ्यात नाचणीसारखे थंड गवत चार्यासाठी वापरले जाते. चांभारीण , झेंडू , बोर यांसारख्या जाती जनावरांना आवडत नाहीत.
गवत ओळखताना स्थानिक लोक त्याच्या फुलांची रचना, पानांचा आकार, रंगछटा, उंची आणि पोषक माती लक्षात घेतात. काटवळ, डोंगयाळ, कुडशी, गोंदियाळ या प्रजाती गोंडेदार फुलांमुळे ओळखता येतात. करडीचा पांढरट, बारिक देठ उठून दिसते. गवतील हे लांबट, कोवळं व केसाळ, तर तांबिल हे जाडसर, रुंद असून त्याच्या पानांच्या लालसर कडांमुळे वेगळे दिसते. 2019च्या पशुगणनेनुसार महाराष्ट्रात गुरांची संख्या घटल्याने गवताचा वापर कमी झाला आहे. आज गवत कापणार्या मजुरांच्या रोजंदामुळे गवतविक्रीत फारसा नफा राहात नाही. परिणामी, सड्यांवर उगवलेले गवत तसंच साठून राहते. पावसाळ्यात ते इतर वनस्पतींच्या वाढीस अडथळा ठरते आणि त्यामुळे जैवविविधतेतही घट होते. याशिवाय, उन्हाळ्यात हे सुकलेले गवत वणव्याचे कारण ठरू शकते, ज्याचा फटका आजूबाजूच्या बागायती क्षेत्राला बसतो.
घटती मागणी आणि नियोजनाच्या अभावामुळे हा मौल्यवान नैसर्गिक स्रोत सध्या वाया जात आहे. मात्र, सुयोग्य व्यवस्थापन करून त्यातून नव्या संधी निर्माण करता येऊ शकतात. कंपोस्टिंग, जैवइंधन निर्मितीची चाचणी, तसेच दुष्काळग्रस्त भाग व पश्चिम महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायासाठी या गवताचा पुरवठा केल्यास उत्पन्नाचे पर्यायी स्रोत उपलब्ध होऊ शकते आणि सड्यांचे शाश्वत व्यवस्थापनही शक्य होऊ शकते.
पूजा घाटे
(लेखिका वनस्पती अभ्यासक आहेत.)