‘नाचणे’करी घडवी कांदळवन सफारी

    05-Jun-2025
Total Views | 34
Mangrove Safari

कांदळवन निसर्गपर्यटन हे स्थानिक लोकांसाठी उपजीविकेचे साधन आहेच. सोबतच कांदळवन अधिवासाबद्दल जनजागृती निर्माण करण्यास मदत करते. रत्नागिरीतील नाचणे गावाला कांदळवनामुळे मिळालेल्या रोजगाराची माहिती देणारा हा लेख...


रत्नागिरीसारख्या गजबजलेल्या शहराला लागून असलेल्या निसर्गसंपन्न अशा नाचणे गावाला समृद्ध जैवविविधता लाभली आहे. या जैवविविधतेमध्ये आपले वेगळे असे स्वतःचे अस्तित्व सांगणारी परिसंस्था म्हणजे कांदळवन. समुद्र किनार्‍यापासून नाचणे गाव जवळच असल्याने काजळी नदी भाट्ये खाडीला मिळून पुढे अरबी समुद्राला जाऊन मिळते. या भाट्ये खाडीच्या दुतर्फा सुंदर, स्वच्छ आणि मन प्रसन्न करणारी कांदळवन परिसंस्था आढळून येते. भरतीच्या वेळी समुद्र जवळ असल्यामुळे या नदीपात्रामध्ये खाडीचे पाणी आत येते. या खाडीपात्रतात वैशिष्ट्यपूर्ण रचना असलेल्या कांदळवनाच्या प्रजाती दिसून येतात.

महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाअंतर्गत 2012 साली ‘कांदळवन कक्षा’ची स्थापना झाली. या कक्षाअंतर्गत ‘महाराष्ट्र कांदळवन आणि सागरी जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान’ (कांदळवन प्रतिष्ठान) ही वन विभागाअंतर्गत संस्था स्थापन करण्यात आली आहे. ‘कांदळवन प्रतिष्ठान’ व ‘कांदळवन कक्ष’ मागील काही वर्षे मोठ्या प्रमाणात किनारी परिसंस्थेचे संवर्धन आणि संरक्षणावर काम करत आहे. महाराष्ट्र शासनाने 2017 सालापासून महाराष्ट्रातील किनारी जिल्ह्यांमध्ये ‘कांदळवन संवर्धन व उपजीविका निर्माण’ ही योजना सुरू केली. ‘कांदळवन कक्ष’ व ‘कांदळवन प्रतिष्ठान’मार्फत किनारी गावांमध्ये ‘कांदळवन सहव्यवस्थापन समिती’ स्थापन करण्यात येतात आणि समितीमार्फत गावामध्ये गट स्थापन करून योजना राबवण्यात येत आहेत.

‘कांदळवन कक्ष आणि प्रतिष्ठान’मार्फत रत्नागिरी तालुक्यातील शहराला लागून असलेल्या नाचणे गावची निसर्गपर्यटन प्रकल्पासाठी निवड करण्यात आली. नाचणे या गावात ‘कांदळवन सहव्यवस्थापन समिती’ स्थापन करून नारायणमळी येथे महिला आणि पुरुष यांचा समूह तयार करण्यात आला. त्याद्वारे ‘नवलाई कांदळवन’ निसर्गपर्यटन गटाची स्थापना करण्यात आली. सुरुवातीच्या काळात पर्यटनस्थळी कोणत्या प्रकारचे पर्यटन करू शकतो, याबाबतचा सखोल अभ्यास करण्यात आला. त्यानंतर सात प्रवासी क्षमता असणारी विना इंजिन नौका सफर, कयाकिंग, पक्षीनिरीक्षण, कांदळवन सफारी, निसर्ग भ्रमंती यांसारखे उपक्रम करण्याचे नियोजित करण्यात आले. प्रकल्प सुरू करण्याकरिता लागणारा निधी, कागदपत्रांची पूर्तता याबाबतची प्राथमिक कामे पूर्ण करण्यात आली. प्रकल्प सुरू करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यापूर्वी कांदळवन ओळख, पक्षीओळख याच्या सखोल अभ्यासाच्या कार्यशाळा गटातील सदस्यांसाठी घेण्यात आल्या. प्रत्यक्ष जागेवर जाऊन प्रत्येक झाडाची वेगळी ओळख पटवून देण्याकरिता खाडी परिसरात अनेक अभ्यास फेर्‍या घेण्यात आल्या. पक्षी-प्राणी निरीक्षण अधिकरित्या सोपे करण्यासाठी निरनिराळे प्राणी-पक्षी माहिती पुस्तकांचा आधार घेण्यात आला. येणार्‍या पर्यटकांसमोर माहिती सांगताना अडचण येऊ नये म्हणून विविध शाळा, महाविद्यालय यांची अभ्यास फेरी आयोजित करून त्यांना गटातील लोकांद्वारे कांदळवन जैवविविधता याबाबत माहिती देण्यात आली. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गटातील सदस्यांचा जीवरक्षक प्रशिक्षणात सहभाग घेण्यात आला. या सगळ्या गोष्टी साध्य होण्यासाठी थोडा कालावधी गेला आणि मार्च 2024 साली सगळ्या नियम व अटींची पूर्तता करून पर्यटन प्रकल्प सुरू करण्यात आला.

सुरुवातीला लोकांपर्यंत पर्यटन प्रकल्पाची माहिती नसल्यामुळे पर्यटक ओढ खूप कमी होती. परंतु, वृत्तपत्र, इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप यांसारख्या प्रसारमाध्यमांचा उपयोग रत्नागिरीत येणार्‍या पर्यटकांपर्यंत पोहोण्यासाठी झाला. हळूहळू पर्यटन प्रकल्पाची प्रसिद्धी सगळीकडे सुरू झाली आणि पर्यटनाला चालना मिळाली.

नाचणे गावात एकूण कांदळवनाच्या 11 प्रजाती पाहायला मिळतात. तसेच, संलग्न कांदळवन प्रजातींचा पण आढळ आहे. येणार्‍या पर्यटकांना मोठ मोठे उंच नारळाच्या झाडांप्रमाणे सरळ पांढर्‍या चिपी तर भला मोठा गुंता असलेली कांदळ प्रजातीची मूळं आकर्षित करतात. तसेच, निरनिराळे पक्षीनिरीक्षक आपल्या अनुभवांचा खजिना घेऊन या परिसंस्थेचा अभ्यास करण्यासाठी कांदळवन सफारीमध्ये सहभागी होत असतात. या वर्षभरात साधारण 3 हजार, 500 पेक्षा पर्यटक भेट देऊन गेले असून, नऊ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न ‘नवलाई’ गटाला झाले आहे. या कांदळवन निसर्गपर्यटनामुळे स्थानिक लोक तसेच येणार्‍या पर्यटकांना कांदळवनाचे महत्त्व आणि त्याचे संवर्धन का केले पाहिजे, याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. तसेच, पर्यटन प्रकल्प आणि निसर्ग यांचा ताळमेळ घालून आपण येणार्‍या पर्यटकांना कशा प्रकारे अजून पर्यावरणाचे महत्त्व पटवून देऊ शकतो, याची जाण गटातील लोकांना झाली आहे. निसर्गपर्यटन हे पर्यावरणाचे संरक्षण, नैसर्गिक साधनसंपत्तीचा सुज्ञ वापर आणि स्थानिक लोकांचा आर्थिक विकास यावर लक्ष केंद्रित करते हे समजले आहे. पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. पर्यटकांच्या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार मिळत आहे आणि उत्पन्नात वाढ होत आहे. हॉटेल, रेस्टोरंट आणि इतर पर्यटन व्यवसाय यांना फायदा होत आहे. अशा या काजळी कांदळवन निसर्गपर्यटन प्रकल्पाला तुम्ही नक्की भेट द्या आणि अनोख्या ‘बॅक वॉटर’ पर्यटनाचा आस्वाद घ्या.

नाचणेतील जैवविविधता


नाचणे गावातील काजळी नदीचे पात्र हे कांदळवनाच्या जैवविविधतेसाठी अगदी साजेसे ठिकाण आहे. गावाला लागून शहर जरी असले, तरी स्वच्छता आणि नैसर्गिक सौंदर्य बघण्यासारखे आहे. या कांदळवन परिसंस्थेत अनेक प्रकारच्या जलीय प्राण्यांचा अधिवास आहे. खूप सार्‍या पक्ष्यांसाठी निवासाचे ठिकाण आहे. निरनिराळे स्थलांतरित पक्षी या कांदळवनामध्ये आश्रय घेण्यासाठी निरनिराळ्या हंगामात येत असतात. पावसाळ्यामध्ये येणारा ‘जऊघऋ ’ हा किंगफिशर खूप सार्‍या छायाचित्रकारांना फोटो काढण्यासाठी पर्वणी असते. त्याचबरोबर निरनिराळे प्राणीही इथे पाहायला मिळतात. यामध्ये मुख्यतः घोरपड, डुक्कर कोल्हे दिसून येतात. कधी कधी तर उंदीर, मांजरसुद्धा या परिसंस्थेमध्ये दिसून येतात. या काजळी नदीमध्ये कांदळवनांचे बेट आहे. या बेटावर कोल्हे आणि डुक्कर यांचे अस्तित्व आहे.

स्वस्तिक गावडे
(लेखक ‘कांदळवन प्रतिष्ठान’मध्ये रत्नागिरी येथे प्रकल्प साहाय्यक म्हणून कार्यरत आहेत.)
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

२५ जून : आणीबाणीच्या काळ्या आठवणी जागविण्याचा दिवस

आज आपण सर्वजण स्वातंत्र्याचा अनुभव घेतोय. कोणीही, कधीही, कुठेही जाऊ शकतो, मनासारखे (झेपेल त्याप्रमाणे) काहीही करू शकतो. मग विषय कोणताही असो. ‘कोरोना’चा असो किंवा चिनी घुसखोरीचा, शेतकर्‍यांच्या प्रश्नांचा विपर्यास करण्याचा, दि. २६ जानेवारी रोजीच्या राजधानीत घातलेल्या धुडगुसाचे निर्लज्ज समर्थन करण्याचा, खलिस्तानचे समर्थन करण्याचा, ‘वॅसिन’च्या प्रश्नावर दिशाभूल करण्याचा, स्वतःच्या अकार्यक्षमतेचे खापर निर्लज्जपणे केंद्र सरकारवर फोडण्याचा, केतकीच्या कवितेवरून तिला चार महिने तुरुंगवारी घडविण्याचा आणि मोदींना ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121