महाराष्ट्रातील केवळ एकाच तालुयात आढळणारा बेडूक म्हणजे ‘मलबार ट्री टोड’. राज्यात केवळ दोडामार्ग तालुयापुरताच सीमित असणार्या या बेडकाच्या अधिवासाची माहिती देणारा हा लेख...
भारताच्या पश्चिम किनार्यालगत पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये निसर्गाची न जाणो किती गुपिते दडली आहेत. साधारण १५ कोटी वर्षांपूर्वी आपल्या सह्याद्रीची निर्मिती झाली. तेव्हापासून आजपर्यंत अनेक लहानमोठ्या भौगोलिक घडामोडी सह्याद्रीमध्ये घडल्या. ऊन, वारा, पाऊस यांच्या बदलांमुळे जंगलाचे स्वरूप कित्येकदा बदलले. या भौगालिक आणि नैसर्गिक बदलांमुळे चमत्कारिक गुणधर्म असणारे आणि फक्त सह्याद्रीमध्येच राहू शकणारे जीव उत्क्रांत झाले. यापैकीच एक ‘मलबार ट्री टोड’. बेडूक आणि टोड यांच्यातील महत्त्वाचा फरक म्हणजे बेडकांची त्वचा ओलसर व गुळगुळीत असते, तर टोडची त्वचा कोरडी आणि लहान ग्रंथींमुळे खरखरीत असते. बेडकांचे मागचे पाय जाड व मांसल असतात, तर टोडचे पाय बारीक हाडकुळे असतात.
सह्याद्रीच्या सदाहरित आणि निम सदाहरित जंगलांमध्ये सापडणारा ‘मलबार ट्री टोड’ महाराष्ट्राच्या तिलारी जंगलात आढळतो. १८७६ साली पहिल्यांदा याचा शोध गंथर या जीवशास्त्रज्ञाने घेतला. त्यानंतर १०० वर्षांनी केरळ मधील सायलेंट व्हॅली नॅशनल पार्क येथे ही प्रजाती पुन्हा एकदा दिसून आली. भारतात सापडणार्या इतर टोड प्रजाती जमिनीवरती, गवतामध्ये राहतात, तर ‘मलबार ट्री टोड’ नावाप्रमाणे झुडपांच्या फांद्यांवर किंवा वृक्षांच्या खोडावर अगदी जमिनीपासून दहा मिटर उंचीवर आढळतो. सह्याद्रीच्या काही मोजयाच भागांमध्ये समुद्रसपाटीपासून २५० ते १००० मीटरपर्यंत यांचा अधिवास आहे. महाराष्ट्रातील तिलारीच्या संरक्षित आणि दोडामार्ग तालुयातील काही खासगी मालमत्तेतील जंगलामध्ये ‘मलबार ट्री टोड’ आढळतो. आकाराने लहान (३.६ ते ३.८५ सेमी) असणार्या या टोडच्या संपूर्ण अंगावर लहान लहान ग्रंथी असतात. त्यामुळे बेडकांपासून याला वेगळे ओळखता येते. लहानसे शरीर गडद मातकट रंगाचे आणि डोळ्याखालून खांद्यापर्यंत आणि मागे पायापर्यंत पांढरा पट्टा असतो. झाडांवरती चढता यावे यासाठी पुढच्या आणि मागच्या पायाच्या बोटांची टोके गोलाकार चकतीसारखी असतात. काचेवर सशन प्रेशरच्या साहाय्याने आपण एखादे स्टॅन्ड लावतो तशीच काहीशी यांची रचना असते. ‘मलबार ट्री टोड’ची प्रजनन करण्याची पद्धत आणि अंडी घालण्यासाठी लागणारा नेमका अधिवास यामुळे सह्याद्रीच्या काही भागातच हे दिसून येतात.
मे महिन्यानंतर मान्सून दाखल होण्याआधी दोन चार पाऊस झाले की यांचा विणीचा हंगाम सुरू होतो. पावसामुळे जंगलातले झरे वाहायला लागतात आणि छोटे खड्डे पाण्याने भरून जातात. सूर्यास्तानंतर अशा छोट्या पाणथळ जागी ‘मलबार ट्री टोड’चे नर एकत्र गोळा झालेले बघायला मिळतात. छोट्या पाणवठ्यावर पसरलेल्या झुडपांच्या फांद्यांवरती किंवा झर्याच्या शेजारी असणार्या वृक्षांच्या खोडावरती नर बसतात. प्रत्येक नराची जागा वेगवेगळी असते. बोटाला असणार्या चकत्यांच्या साहाय्याने हे नर फांद्यांवर चढून आपली जागा निश्चित करतात. इतर बेडकांप्रमाणेच मादीला आकर्षित करण्यासाठी आवाज देतात. आवाज देताना इतर नारांशी स्पर्धा करतात, काही वेळेला एखादा नर दुसर्या नराच्या अंगावर जाऊन बसतो अथवा त्याला त्याच्या जागेवरून हाकलून देतो.
मादीचा आकार नरापेक्षा थोडा मोठा असतो. प्रजननाच्या वेळी मादीच्या शरीरावर नर बसतो आणि ही जोडी झुडपांखाली साचलेल्या पाण्यामध्ये अंडी देण्यासाठी जाते. अंडी देण्याआधी नर व मादी पृष्ठभागाची थरथरल्याप्रमाणे हालचाल करतात. या हालचालीमुळे मादीच्या शरीरातून अंडी तर नराच्या शरीरातून शुक्राणू बाहेर पडतात. अंड्याचे गर्भधान हे शरीराबाहेर, पाण्यामध्ये होते. दोन ते तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी अंडी दिली जातात. प्रत्येक संचामध्ये २० ते ६० अंडी असतात. वेगवेगळ्या ठिकाणी अंडी घातल्यामुळे ती जीवित राहण्याची शयता वाढते. शिवाय एका संचावर शिकार्याने हल्ला केला तर उरलेले संच शाबूत राहतात. संचामधली अंडी एखाद्या साखळीसारखी असतात. अंड्यांमधून लहान टॅडपोल्स बाहेर येतात, महिन्याभरात या टॅडपोल्सचे रूपांतर छोट्या ‘ट्री टोड’मध्ये होते. सह्याद्रीच्या भौगोलिक इतिहासात घडलेल्या बदलांसोबतच ‘मलबार ट्री टोड’ची प्रजननक्रिया उत्क्रांत झाली आहे. पावसाचे बदलते प्रमाण आणि पाऊस पडण्याचा कालावधी यांचा मोठा परिणाम यांच्या प्रजनन क्रियेवरती होतो.IUCN रेड लिस्टमध्ये मलबार ट्री टोडला Endangered (EN) शेरा दिला गेला आहे. हे टोड ज्या ठिकाणी राहतात, आवाज देतात, अंडी देतात अशा अधिवासामध्ये झालेले छोट्यातले छोटे बदलसुद्धा यांची संख्या कमी होण्यासाठी कारणीभूत आहेत. नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनात असे समोर आले आहे की, वैश्विक तापमानवाढ आणि बदलत्या पर्जन्यवृष्टीमुळे ‘मलबार ट्री टोड’चा अधिवास ६८.७ टक्क्यांनी कमी होणार आहे. जीवशास्त्रज्ञ असेही सूचित करतात की, पूर्वी सह्याद्रीमध्ये बर्याच ठिकाणी ‘मलबार ट्री टोड’ आढळून यायचे. परंतु, बदलत्या वातावरणामुळे यांचे अधिवास संकुचित झाले आहेत. जगाच्या पाठीवर फक्त सह्याद्रीमध्येच सापडणार्या ‘मलबार ट्री टोड’चे सर्वच अधिवास काही संरक्षित वनांच्या सूचित नाहीत. त्यामुळे जंगलांचे संवर्धन होणे का महत्त्वाचे आहे, हे दिसून येते.
बदलत्या वातावरणाशी अतिसंवेदनशील असणार्या ‘मलबार ट्री टोड’च्या प्रजनन क्रियेचे तसेच नरांचे आवाज, सूक्ष्म अधिवास यांचे आणखी संशोधन होणे गरजेचे आहे. निसर्गचक्रामध्ये यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
निनाद गोसवी
(लेखक बेडकांवर संशोधनाचे काम करतात.)