एके काळचे सूर्यमंदिर : मुधाई देवी मंदिर

    01-Jun-2025
Total Views | 48
Sun Temple : Mudhai Devi Temple

खानदेशालाही प्राचीन मंदिरांची परंपरा लाभलेली. असेच एकेकाळचे सूर्यमंदिर असलेले मंदिर म्हणजे चाळीसगाव जवळचे मुधाई देवी मंदिर. हे मंदिर 24 खांबांवर उभे असून सध्या पुरातत्व खात्याने या मंदिराचे संवर्धन केले आहे. तेव्हा, अशा या कत्तूर नदीच्या काठावरील एका टेकडीवर वसलेल्या मुधाई देवी मंदिराविषयी...


रामायणाच्या किष्किंधा कांडामध्ये उल्लेख आलेला रसिक प्रांत, त्यानंतर इसवी सनाच्या दहाव्या-बाराव्या शतकामध्ये ओळखला जाणारा ‘सेवन देश’ आणि आज याच प्रांताला आपण ‘खानदेश’ या नावाने ओळखतो. एवढा प्राचीन इतिहास या खानदेशचा आहे. साधारण 1906 मध्ये ब्रिटिशांनी पूर्व आणि पश्चिम खानदेश असे दोन विभाग या संपूर्ण भागाचे केले आणि मग त्यानंतर 1960 मध्ये जळगाव आणि धुळे असे दोन वेगळे जिल्हे या महाराष्ट्राला मिळाले. पितळखोरे आणि बहाल या गावांमध्ये झालेल्या उत्खननात अगदी अडीच तीन हजार वर्षे जुन्या अनेक गोष्टी सापडलेल्या आहेत. या सापडलेल्या गोष्टी जळगावच्या प्राचीनत्वाची साक्ष देतात. सातवाहन राजा सातकर्णी पहिला, त्यानंतर अभिर राजे, वाकाटक राजे, सेंद्रक, राष्ट्रकूट, यादव अशा अनेक महत्त्वाच्या राजसत्तांनी या संपूर्ण भागावर राज्य केले. या सत्तांनी त्या जागेच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्येदेखील खूप मोठे योगदान दिलेले आपल्याला दिसून येते. आज आपण याच जळगाव जिल्ह्यातल्या एका अतिशय महत्त्वाच्या मुधाई देवी मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत.

चाळीसगाव गावापासून जवळच वाघळी नावाचे एक छोटे गाव आहे. या वाघळी गावात कित्तूर नदीच्या काठावरती एका टेकडीवरती हे मुधाई देवीचे मंदिर आपल्याला बघायला मिळते. हे मंदिर पूर्वाभिमुख असून दाराच्या आकाराची याची रचना आहे. या मंदिरामध्ये आज गर्भगृह, अर्धमंडप आणि मंडप असे दिसतात. हे मंदिर 24 खांबांवरती असून मंदिराच्या मंडपाचा भाग हा बर्‍यापैकी पडलेला आहे. पण, पुरातत्व खात्याने त्याचे संवर्धन केले आहे. मंदिराच्या गर्भगृहाची जी बाह्य भिंत आहे, त्यावरून आपल्याला या मंदिराच्या मूळ स्वरुपाचा अंदाज येतो आणि नक्की मंदिर कसे असेल, याची कल्पना येते. दुर्दैवाने या मंदिराचे छत आज नष्ट झालेले आहे. आता मुधाई देवी म्हणून ओळखले जाणारे मंदिर हे कधीकाळी एका वेगळ्या देवतेला अर्पण केलेले मंदिर होते. ती नक्की कुठली देवता, याची ओळख आपण पुढे करून घेऊया.

महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीमध्ये असलेले कानाकादित्याचे सूर्यमंदिर आपल्याला माहिती आहे. तसेच गुजरातमध्ये मोढेराचे सूर्यमंदिरदेखील आपण जाणतो. पण, आज आपण जे वाचत आहोत, ते मुधाई देवी मंदिर हेदेखील कधी काळी एवढेच महत्त्वाचे सूर्यमंदिर होते, याचे पुरावे आपल्याला वेगवेगळ्या शिलालेखांमध्ये मिळतात. हेहय राजघराण्याचा राजा शुभकांत याला या सूर्यमंदिरासाठी चालुक्य राज्यांकडून खूप मोठ्या प्रमाणामध्ये दान मिळालेले होते. हा काळ साधारण सातवे-आठवे शतक असा येतो. त्यानंतर राजा नरसिंहदेव यानेदेखील या मंदिराची परिस्थिती बघून ती परत बांधण्यासाठी आणि तिथल्या गुरुजींना त्यांची काळजी घेता यावी, त्यांचा उदरनिर्वाह व्हावा, यासाठीदेखील मोठ्या प्रमाणामध्ये दान या ठिकाणी केलेले आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर राष्ट्रकुटांचा राजा गोविंद याने लिहिलेल्या शिलालेखामध्ये या मंदिराचे स्थपती म्हणजेच आर्किटेक्ट नरुख याचादेखील उल्लेख आलेला आपल्याला बघायला मिळतो. या उल्लेखामुळे हा शिलालेख अभ्यासकांसाठी आणि मंदिरांबाबतीत कुतूहल बाळगणार्‍या सर्वांसाठी एक अतिशय महत्त्वाचा पुरावा म्हणून आपल्यासमोर येतो. या मुधाई देवी मंदिराला बाहेरून फेरी मारताना आपल्या लक्षात येतं की, मंदिराची डावीकडची बाजू, मागची बाजू आणि उजवीकडची बाजू या ठिकाणी मुख्य देवकोष्ठांमध्ये अनुक्रमे गणपती, सूर्य आणि देवी यांच्या मूर्ती दिसतात. मंदिराच्या पाठीमागच्या देवकोष्ठामध्ये असलेला सूर्य हा अतिशय सुंदर कोरलेला आहे. दोन्ही हातांमध्ये कमळ, शेजारी उषा आणि प्रत्युषा आणि खाली सात घोड्यांचा रथ अशा पद्धतीने आपल्याला या शिल्पाची रचना केलेली दिसते. त्याचबरोबर मंदिराच्या उजवीकडच्या बाजूला असणारे शिल्पदेखील अतिशय बोलके आहे. हे शिल्प देवीचे असून तिच्या एका हातामध्ये खटवांग आणि वरच्या हातामध्ये नाग पकडलेला दिसतो. कदाचित ही चामुंडेची मूर्ती असावी, असा अंदाज या निरीक्षणातून आपल्याला बांधता येऊ शकतो.

मंदिर कोणाचे आहे, हे ओळखण्यासाठी वेगवेगळी प्रमाणे आपल्याला वापरावी लागतात. मंदिराच्या गर्भगृहामध्ये जाताना जी द्वारशाखा लागते, त्या द्वारशाखेच्या ललाटावरती म्हणजेच वरच्या पट्टीवरती जे शिल्प आहे, तेसुद्धा सूर्याचे भग्न शिल्प आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर या पट्टीच्या वरच्या बाजूला अजून एक मोठी पट्टी आपल्याला दिसते. यामध्ये नऊ वेगवेगळ्या आकृतींची रचना त्यांनी केलेली आहे. शेवटच्या दोन आकृतींचे चेहरे हे थोडेसे वेगळे आणि मोठे आहेत. त्याच्यावरून कदाचित ते राहू आणि केतू असावेत, असा अंदाज आपल्याला बांधता येतो. म्हणजे ही संपूर्ण पट्टी नवग्रहांची पट्टी तिथे आहे, हे आपल्याला त्या मंदिरात आत गेल्यावरती कळते. हे मंदिर सूर्याचेच होते, अशा सांगणार्‍या अनेक गोष्टी तिथे आपल्याला दिसतात. मंदिरात प्रवेश करतानाच उजवीकडच्या बाजूला आपल्याला जुन्या द्वारशाखेच्या काही पट्ट्या दिसतात. त्यामध्ये वेगवेगळ्या सूर्यप्रतिमा कोरलेल्या आहेत. या मंदिरामध्ये अशा पद्धतीने कोरलेल्या वेगवेगळ्या 12-13 सूर्यप्रतिमा आपल्याला दिसतात. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सूर्यप्रतिमा महाराष्ट्रात क्वचितच इतर कुठल्या मंदिरामध्ये आपल्याला बघायला मिळतील. त्याचबरोबर दारात शेंदूर लावलेला गणपती दिसतो. तसेच एक भग्न झालेली, ओळख न पटणारी मूर्तीदेखील आपल्याला इथे बघायला मिळते. डॉ. कुमुद कानेटकर यांनी ‘टेम्पल्स ऑफ नॉर्थ महाराष्ट्र’ या त्यांच्या दिलेल्या संशोधनपत्रात कदाचित हे मंदिर मार्तंड भैरवाचे असावे का, अशा पद्धतीचा प्रश्नदेखील उपस्थित केलेला आपल्याला बघायला मिळतो.

सहसा कुणी फिरायला जात नसलेल्या या खानदेशातील हे प्राचीन ऐतिहासिक वैभव बघायला जास्तीत जास्त मंडळींनी बाहेर पडायला हवं. त्याशिवाय, या जागा प्रकाशात यायला आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत याची माहिती पोहोचायला मदत होणार नाही. हे वैभव बघणं, जपणं आणि त्याच्याबद्दल इतरांना सांगणं, हे महत्त्वाचं आहे. ती या वैभवशाली परंपरेचे नागरिक म्हणून आपली नैतिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जबाबदारीदेखील आहे, याची जाणीव आपल्याला असायलाच हवी!

इंद्रनील बंकापुरे
7841934774
www.virastindia.in
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121