ज्योती मल्होत्राच्या देशविघातक कृत्यांमध्ये प्रमुख पात्र आहे एहसान-उर-रहीम उर्फ दानिश. ज्याला भारत सरकारने दि. 13 मे रोजी हेरगिरीसंदर्भात भारताबाहेर हकलवले होते. दिल्लीच्या पाकिस्तान उच्चायोगामध्ये त्याची भेट ज्योती मल्होत्राशी झाली. त्यानंतर ज्योती देशविदेशांत फिरू लागली. ज्योतीचे महागड्या गाड्या आणि उंची कपडे वापरणे, महागड्या हॉटेल्समध्ये राहणे सुरू झाले. तिचे एका पाकिस्तानी व्यक्तीशी संबंध असून ती त्याच्यासोबतच बालीमध्येही फिरायला गेली होती, असेही म्हटले जाते. यावरून देशविघातक कृत्य व्हाया ‘लव्हजिहाद’ असे म्हणायला वाव आहे. पाकिस्तान आणि चीनमध्ये भारतीय व्यक्तीला सहजासहजी प्रवेश आणि निवास शक्यच नाही. मात्र, सामान्य युट्यूबर ज्योतीला पाकिस्तान आणि चीनमध्ये राजेशाही वागणूक मिळाली, हे सगळे कसे शक्य होते? अर्थातच दानिश आणि पाकिस्तान ‘आयएसआय’चे वरिष्ठ तिच्यासोबत होतेच.
ज्योती पाकिस्तानी लोक, संस्कृती आणि देश किती चांगला आहे, यावर व्हिडिओ व्ह्लॉग तयार करायची. तिचे इन्स्टाग्रामवरही लाखो फॉलोअर होते. भारतीयांसमोर ती पाकिस्तानची छबी चांगली करण्याचा प्रयत्न करत होती. हे का? तर पाकिस्तानचे विघातक सत्य भारतीयांनी विसरावे म्हणून. तसेच, ज्योतीने भारतातील संवेदनशील परिसर, सैन्याची गतविधी याची माहिती पाकिस्तानला पुरवल्याचे असे आरोपही तिच्यावर आहेत. पहलगामध्ये धर्मांध दहशतवाद्यांनी 26 हिंदूंना मारले. त्यानंतर काही वेळातच एक व्यक्ती केक घेऊन दिल्लीमधल्या पाकिस्तान हायकमिशनमध्ये गेली. तेव्हा हायकमिशनच्या बाहेर उभ्या असलेल्या पत्रकारांनी त्याला हटकले की, हा केक कशासाठी? तेव्हा तो गप्प राहिला होता. पहलगामध्ये हिंदूंवर हल्ला झाल्याच्या आनंदासाठी पाकिस्तानी उच्चायुक्तामध्ये केक कापला गेला, असेही असू शकते. मात्र, हीच व्यक्ती ज्योतीला पाकिस्तानमध्ये भेटली होती, असेही आढळले आहे. तसेच, ज्योती जानेवारीमध्ये पहलगाममध्ये गेली होती आणि तिथून गुप्त मार्गाने पाकिस्तानला गेली होती, हेसुद्धा आता सिद्ध झाले. तिच्यासह पंजाब, उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथील 11 जणांना पाकिस्तानी हेरगिरीसंदर्भात अटक करण्यात आली आहे. ज्योती आणि इतर 11 जण हे त्यांच्या कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर समाज आणि देशासाठीही कलंक आहेत.
अनुराधा पासवान ही 23 वर्षांची युवती. तिला राजस्थान पोलिसांनी नुकतीच अटक केली. तिने सात महिन्यांत 25 पुरुषांशी लग्न केले. दोन-चार दिवस त्यांच्यासोबत काढले आणि संधी मिळताच ती त्या त्या वेळी वरांच्या घरातील रोकड, दागिने आणि किमती वस्तू घेऊन पळून गेली. सात महिन्यांत 25 पुरुषांशी विवाह आणि त्यांची फसवणूक? अनुराधाचा गुन्हा जितका गंभीर आहे, तितकेच समाजाचे वास्तवही गंभीर आहे. तिचे हे गुन्हे लोकांना कळलेही नसते मात्र, दि. 3 मे रोजी सवाई माधोपूरच्या विष्णु शर्मा नावाच्या युवकाने पोलिसांकडे तक्रार केली. त्याने सांगितले की, “विवाह जुळावा म्हणून त्याने सुनीता आणि पप्पू मीणा नावाच्या विवाह जुळवणार्या मध्यस्तांना, दोन लाख रुपये दिले होते.” लग्नासाठी चांगली मुलगी शोधून देण्याचे आश्वासन या दोघांनी विष्णुला दिले. त्यानंतर त्यांनी अनुराधाशी त्याची भेट घडवून आणली. त्याच्यासाठी अनुराधाच योग्य वधू असल्याचे त्यांनी सांगितले आणि त्याचा विवाह अनुराधाशी लाऊन दिला.
दि. 20 एप्रिल रोजी स्थानिक न्यायालयात विष्णु आणि अनुराधाचे लग्न झाले. परंतु, लग्नाच्या काही दिवसांनीच अनुराधा घरातले सामान घेऊन पळून गेली. पोलिसांनी चौकशीसत्र सुरू केल्यानंतर आढळले की, एक गुन्हेगार टोळी सक्रिय असून ती जिथे काही कारणास्तव पुरुषांचे विवाह होत नसतील, अशाच ठिकाणी कार्यरत होती. विवाह न जुळणार्या पुरुषांची माहिती घेऊन त्यांच्यापर्यंत या न त्या माध्यमातून ते पोहोचत होते. ते अनुराधाला नियोजित वधू म्हणून त्या पुरुषांना भेटवत असत. या टोळीने आधीच नियोजित वराची माहिती काढली असल्याने अनुराधा त्यांना कशी योग्य वधू आहे, हे ते पटवून देत असत. आपल्या विचारांशी आचारांशी अनुरूप असणारी वधू आहे म्हणून नियोजित वर तिच्याशी विवाह करीत असे. पण, ती काही दिवसांतच त्यांना लुटून पळून जात असे, त्यापैकीच एक विष्णु होता. या गुन्हेगारी घटनेचा विचार करताना जाणवते की, लाख लाख रुपये देऊन या 25 जणांनी अनुराधाशी विवाह केला होता. या पुरुषांचे विवाह का जुळत नसतील? की तिथे विवाहयोग्य वयाच्या मुलीच नसतील? किंवा त्यांचा विवाह जुळण्यामध्ये इतर काही अडचण येत असेल का? काहीही असो, अनुराधासारख्या व्यक्ती या समाजाला कंलक आहेत.