विकासची उत्तुंग ‘झेप’

    18-May-2025
Total Views |
devlopemnt of rural schools

ग्रामीण भागातील शाळांचा कायापालट करत मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे भरीव सामाजिक योगदान देणार्‍या ‘झेप प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष विकास धनवडे यांच्याविषयी...


आपण वृत्तपत्रातून, दूरचित्रवाणीवरील बातम्यांमधून वनवासी भागातील सरकारी आणि खासगी शाळांची पटसंख्या घटत असल्याचे कायमच ऐकतो. मात्र, जेवढी ही आकडेवारी चिंता वाढवणारी आहे, तेवढीच मुलांची शाळा सोडण्याची करणेही. या मुलांनी शाळेत यावे, त्यांना चांगले आरोग्य लाभावे, शहरातील शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा या शाळांमध्ये असाव्या या हेतूने विकास धनवडे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील ‘झेप प्रतिष्ठान’ ही संस्था कार्यरत आहे.

विकास धनवडे यांनी 2011 साली ‘झेप प्रतिष्ठान’ची स्थापना केली. या संस्थेचे संस्थापक आणि अध्यक्ष असणार्‍या विकास धनवडे यांनी शिक्षणाद्वारे उत्क्रांती या ध्येयाने या संस्थेची सुरुवात केली. विकास यांनी मुंबई विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले असून, सध्या ते मूळच्या अमेरिकन कंपनीत उच्चपदस्थ आहेत.

विकास यांचे मूळ गाव सातारा. विकास यांचे वडील मुंबईत एका गिरणीत काम करत होते. मात्र, 1991 साली वडीलांची गिरणी बंद पडली. त्यावेळी रिक्षा चालवून, टेम्पो चालवून वडिलांनी संसाराचा भार वाहिला. दहावीत शिकत असताना विकास यांना मातृशोक झाला. यामुळे विकास यांचे संपूर्ण बालपण हलाखीतच गेले. विकास आणि त्यांच्या भावंडांनीदेखील पेपर टाकणे, घरोघरी दूध पोहोचवणे, भिंतीवर पोस्टर चिटकविणे, कम्पाऊंडर, लादी पुसणे अशी छोटीमोठी कामे करतच शिक्षण पूर्ण केले. विकास याचा असा विश्वास आहे की, शिक्षण हाच मानवी जीवनाचा पाया आहे. अत्यंत संघर्षमय वातावरणात जिथे नवी पुस्तके खरेदी करण्याचीही सोय नव्हती परंतु, जीवनात पुढे जाण्याची जिद्द आणि केवळ शिक्षण व अनुभवामुळेच जीवन बदलू शकले, असे मत विकास व्यक्त करतात.

विकास म्हणतात, “आज भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे मूलभूत शिक्षणाचा अभाव आहे किंवा आर्थिक समस्यांमुळे मुले शिक्षण पूर्ण करू शकत नाहीत. अशावेळी मुले परिस्थितीच्या फेर्‍यात अडकतात आणि असे पिढ्यान्पिढ्या सुरूच राहते. अशा बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करण्यार्‍या मुलांना मदतीचे हात देण्यासाठीच ‘झेप प्रतिष्ठान’ची स्थापन केल्याचेही विकास सांगतात.

हलाखीच्या परिस्थितीमध्ये असताना मुलांना येणार्‍या अडचणींचा पूर्ण अंदाज असल्याने, विकास यांनी सुरुवातीला अशा भागांचा शोध घेतला जिथे आरोग्य सुविधा, शाळेत पायाभूत सुविधा आणि इतर शैक्षणिक सुविधांची वानवा आहे. सुरुवातीला काही शाळांमध्ये पुस्तक वाटप, वही वाटप, आर्थिकद़ृष्ट्या मागास असलेल्या मुलांचे शुल्क भरणे, आरोग्य शिबिरांचे आयोजन अशा उपक्रमांना विकास यांनी सुरुवात केली. मात्र, कालांतराने ठाण्यापासून 150 किमी अंतरावरच्या जव्हार येथील एक शाळा, विकास यांच्या संस्थेने दत्तक घेतली. या शाळेतील संपूर्ण पायाभूत सुविधांची उभारणी विकास यांनी केली. या शाळेत सुसज्ज कम्प्युटर लॅब, मुला-मुलींसाठी स्वच्छ अत्याधुनिक स्वच्छतागृहे आली. या शाळेचा पूर्ण चेहरामोहराच विकास आणि त्यांच्या संस्थेने बदलून टाकला. यंदाच्या दहावीच्या निकालात ‘झेप’ संस्थेने दत्तक घेतलेल्या ‘भीमाद्री’ या शाळेचा निकाल 100 टक्के आला आहे. ही शाळा संपूर्ण सीसीटीव्हीखाली सुरक्षित आहे. या शाळेतील मुलांना सर्वकाही विकास यांची संस्थाच पुरवते. अत्यंत स्त्युत्य असा उपक्रम विकास यांच्या संकल्पनेतून शाळेत साकारला जातो आहे. आतापर्यंत विकास यांच्या संस्थेच्या माध्यमातून, दोन शाळांचा पूर्ण कायापालट झाला आहे.

हे सामाजिक कार्य विकास आपले काम आणि कुटुंब सांभाळत अत्यंत कुशलपणे करत आहेत. विकास यांना त्यांच्या कुटुंबीयांचेही या कार्यात मोलाचे सहकार्य लाभते. विकास म्हणतात की, “आम्ही अनेक भागांत भेट देतो. मुले गळकी छप्पर असणार्‍या शाळा, चिखलात, स्वछतागृहे नाहीत असा अत्यंत हलाखीत शिक्षण घेत असतात. सर्वप्रथम ग्रामीण भागातील शाळांत शिक्षण घेण्यायोग्य वातावरण, पायाभूत सुविधा उभारणे आवश्यक आहे. कारण, प्रत्येकाचीच खासगी शाळेत शिक्षण घेण्याची परिस्थिती नसते. म्हणूनच जिथे सरकार पोहोचत नाही, अशा ठिकाणच्या विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक वातावरण निर्माण करून देण्याचा आमचा भविष्यातही प्रयत्न असेल.”

शिक्षण क्षेत्रासोबतच कोरोना काळात विकास यांनी, राज्यातील पहिली ‘प्लाझ्मा दान’ मोहीम उभी केली. यासोबतच दोन हजार कुटुंबांना शिधा आणि दैनंदिन सामान पोहोचविले. विकास यांच्या कार्याला आजतागायत विविध स्तरांवरून गौरविण्यात आले आहे. सामाजिक कार्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडून देण्यात येणार्‍या ‘ठाणे गौरव’ पुरस्कारानेदेखील विकास यांना आणि संस्थेला गौरविण्यात आले. याचसोबत ‘सातारा रत्न’ या सन्मानानेही विकास यांचा गौरव करण्यात आला. याचसोबत अनेक राज्यस्तरीय पुरस्कारही विकास यांच्या संस्थेने मिळविले आहेत. “आम्ही कोणत्याही पुरस्कार किंवा निधीसाठी काम करत नसून, आमचे ध्येय केवळ प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळावे हेच आहे,” असे विकास आवर्जून सांगतात. विकास धनवडे यांना भविष्यात सामाजिक कार्यात उत्तुंग झेप घेण्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून अनेकानेक शुभेच्छा!

गायत्री श्रीगोंदेकर
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121