मुसाफिर ‘जितू’

    03-Jun-2025   
Total Views | 8
Passionate writer Jeetu

वेगवेगळ्या समाजमाध्यमांमध्ये काम करताना स्वतःची वेगळी ओळख जपत, सातत्याने नवनिर्मिती करणार्‍या जितू म्हात्रे यांच्याविषयी...


आपल्या मातृभाषेतून जर आपले शिक्षण झाले असेल, तर आपण आज या स्पर्धेच्या युगात टिकू शकतो का? शाळेत असताना जर आपण शेवटच्या बाकावरचे विद्यार्थी असू, तर पुढे करिअरमध्ये आपण यशस्वी होऊ का? असा सवाल ज्या विद्यार्थ्यांना किंवा ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांना पडला असेल, त्यांच्यासाठी एकच नाव पुरेसे आहे ते म्हणजे जितू म्हात्रे. सर्वसाधारणपणे रेडिओ ऐकणे, टीव्ही बघणे, वेब सिरिज बिंज वॉच करणे हे नित्याचे आहे. परंतु, या सगळ्या माध्यमांच्या मागे काम करणारे असंख्य हात असतात. आपल्यासमोर कार्यक्रमाच्या पंचपक्वानांचे ताट वाढले जाते. परंतु, त्यातील मजकुराच्या निर्मितीसाठी असंख्य आचारी कार्यरत असतात. त्यांचे कल्पनाविश्व ज्या वेळेस कागदावर उमटते, तेव्हाच आपल्याला कार्यक्रमांची, मालिकांची मेजवानी चाखायला मिळते. जितू म्हात्रे यांनी गेल्या १५ वर्षांत अशाच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुशाफिरी करत,कामाच्या माध्यमातून स्वतःची वेगळीच छाप सोडली आहे.

सांताक्रुझच्या एका लहान चाळीत जितू यांचे बालपण गेले. दहावीपर्यंत शिक्षण घेता घेता, मनामध्ये सर्जनाचे बीज नकळत रोवले गेले होते. भाषेवर प्रेम करणारा जितू, भाषा आत्मसात केल्यानंतर कवितेच्या प्रांताकडे वळला नसता, तरच नवल. अधून मधून मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर यांच्या रचना नजरेखालून जायच्या आणि कानांवरसुद्धा पडायच्या. शाळा सुटल्यानंतर वाणिज्य शाखेत प्रवेश तर मिळवला परंतु, आकड्यांची गोळाबेरीज करणे हे जमणार नाही, याची प्रचिती त्यांना लवकरच आली. त्यामुळे त्यांनी लेखणी हातात धरली. वयाच्या एका टप्प्यावर प्रत्येक कलाकाराला त्याच्यातील सुप्त सर्जनशक्ती साद घालत असते. जितू यांनीसुद्धा आपला आतला आवाज ओळखला आणि शब्दांसोबतचा त्यांचा संसार सुरू झाला. यामध्येसुद्धा आपल्याला गीतकार व्हायचे आहे हे हळूहळू कळत गेले आणि शब्दसंगीताचे नाद जीवनात फुलू लागले.

अशातच त्यांच्या कामाची सुरुवात झाली ती जाहिरात कंपनीच्या माध्यमातून. हिंदी कॉपीराईटर म्हणून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. या काळात गीतकार स्वानंद किरकिरे, प्रसून जोशी यांसारख्या मोठ्या माणसांकडून जितू मार्गदर्शन घेत होते. संगीत, शब्द, चाल या सगळ्यामध्ये असलेली ताकद ओळखण्याचा आणि त्या अनुषंगाने नव्या कामाची निर्मिती करण्याचा हा काळ होता. हे शिकता शिकताच, रेडिओ बिग एफएममध्ये काम करण्याची संधीही त्यांना मिळाली. ‘सुनो सुनाओ, लाईफ बनाओ’ ही जिंगल एके काळी गाजली होती, त्याचे लेखन जितू म्हात्रे यांनीच केले होते. यानंतर राजू श्रीवास्तव, शेखर सुमन अशा दिग्गज लोकांसाठी जितू यांनी अनेक कार्यक्रमांचे लेखन केले. रेडिओच्या कामात जितू यांनी प्रगतीची नवीन शिखरे गाठली. क्रिएटिव्ह हेड, दिग्दर्शक अशी वेगवेगळी पदे भूषवताना, रेडिओ आणि त्यासाठी लागणारा आवाज या दोन्हीवर त्यांनी हुकुमत निर्माण केली. दरम्यानच्या काळात पटकथा लेखन, लघुपटाचे लेखन, माहितीपटाची निर्मिती या सगळ्यामध्ये जितू नाव कमवत होते. ९दच् या गाण्यांच्या चॅनलवर प्रसिद्ध होणार्‍या ‘बकवास बंद कर!’ या कार्यक्रमाचे दिग्दर्शनसुद्धा त्यांनीच केले. सुप्रसिद्ध अशा स्टार वाहिनीसाठीही कार्यकारी निर्माता म्हणून जितू यांनी काम केले आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांची निर्मिती करताना, सोनाली कुलकर्णी यांच्यापासून ते थेट अमिताभ बच्चन यांच्यासाठी काम करण्याची संधी जितू यांना मिळाली.

प्रचलित आणि प्रवाही अशा माध्यमांमध्ये काम करत असताना, आपण कुठल्याही साच्यामध्ये बंदिस्त होत नाही ना, याची काळजी जितू यांनी नेहमी घेतली. वेगवेगळ्या संस्थांबरोबर काम करत असताना, २०२१ सालापासून ‘पॉकेट एफएम’ या ऑडिओ सिरिज प्लॅटफॉमसाठी त्यांनी काम केले. हे करता करता, कॅमेराच्या तंत्राविषयी त्यांच्या मनात ओढ निर्माण झाली आणि इथेसुद्धा आपल्या कामाची मोहार त्यांनी उमटवली. ‘भानगडवाडी’, ‘काल गुब्बारा’, ‘द रेड रॉक’ या लघुपटांची निर्मिती त्यांनी केली आहे. समाजमाध्यमांवर इतया वेगवेगळ्या प्रांतांमध्ये काम करणारे जितू आपले शब्दस्वर विसरले नाहीत. येत्या काळात त्यांचा एक मराठी कवितासंग्रहसुद्धा प्रकाशित होत आहे.

आपल्या जीवनप्रवासाबद्दल सांगताना जितू म्हणतात की, "या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून मी स्वतःचाच शोध घेत गेलो. एकाच वेळेला स्वतःला शोधण्याची आणि घडवण्याची परंपरा ही निरंतर सुरू होती. जितू यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे माणसांच्या अवतीभोवती फिरताना, त्यांना माणसांना ऐकायला आवडते. खर्‍या अर्थाने ते माणसांच्या कथा ऐकतात आणि कळत नकळत याच माणसांच्या अनुभूतीचा स्पर्श त्यांच्या कलेला होतो आणि त्यांची कला बहरते.” समाजमाध्यमांची व्याप्ती आज वाढली आहे. युवा पिढीला या माध्यमांच्या जगात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करायचे आहे. अशांसाठी जितू हेच सांगतात की, "कुठल्याही क्षेत्रात काम करताना, त्या त्या कामाला एक विशिष्ट वेळ द्यावा लागतो. तो वेळ देऊन काम समजून घेणे आणि त्या कामातून आपल्याकडच्या कलागुणांचा विकास आपण केला पाहिजे,” असा संदेश ते तरुणांना देतात. उपजत कलागुण आणि मेहनत करण्याची वृत्ती अंगी असेल, तर काय किमया घडू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे जितू म्हात्रे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा!


९९६७८२६९८३

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121