सलग आठ वर्षांपासून स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणादायी विचारांचा प्रचार व प्रसार करून जागतिक विक्रमाला गवसणी घालणार्या नाशिकच्या प्रा. अमोल अहिरे यांच्याविषयी...
प्रबंधभूमी म्हणून ओळखल्या जाणार्या दाभाडी या पुण्यभूमीत एका सुविद्य व सुसंस्कारी कुटुंबात अमोल अहिरे यांचा जन्म झाला. आजोबा कै. महिपतराव हैबतराव अहिरे कृषी अधिकारी होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वारसा पुढे चालविण्याची शिकवण व संस्कार अमोल यांच्यावर आईवडिलांकडून बालपणापासूनच झाले. परिवारात आईवडील, काका-काकू, तिन्ही आत्या सारेच उच्चशिक्षित होते. त्यामुळे कुटुंबात शिक्षणाबरोबर संस्कारांनाही महत्त्व होते. अमोल यांचे प्राथमिक शिक्षण कल्याण व गिसाका दाभाडीला काका-काकूंकडे झाले. काकूंच्या कडव्या शिस्तीमुळे पहाटे लवकर उठून व्यायाम व अभ्यासाची चांगली सवय लागली. माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण दाभाडी, मालेगाव तसेच, नाशिक येथे झाले. त्यांनी राज्यशास्त्र, इतिहास, मराठी या विषयात ‘एमए’ केले. तसेच, ‘बीएड’ व पत्रकारितेचीही पदवी घेतली.
वडील श्रीकृष्ण ऊर्फ बाळासाहेब अहिरे यांनी कल्याणसारख्या मोठ्या शहरातून 1968 मध्ये मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले. मात्र, नोकरी न करता वडिलांच्या आज्ञेनुसार वडिलोपार्जित शेती व्यवसाय संभाळला. हाच आदर्श ठेवून अमोल यांनीही नाशिक येथील नामांकित महाविद्यालयात नोकरीची संधी सोडत, वडिलांच्या इच्छेखातर ग्रामीण विद्यार्थ्यांच्या विकासासाठी जळगाव निंबायती येथील गो. य. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात नोकरी पत्करली. संस्थापक अध्यक्ष रोडूआण्णांच्या कृपाशीर्वादाने गेल्या 18 वर्षांपासून, ज्ञानदानाच्या कार्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते प्रयत्नरत आहेत. प्रा. अहिरे यांच्यावर विद्यार्थी दशेपासूनच विवेकानंदांचा प्रभाव होता. ते भारतीय संस्कृती परीक्षेच्या माध्यमातून विवेकानंद केंद्राच्या संपर्कात आले. मालेगावातील सुप्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. सुरेश शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली केंद्राच्या कार्यात सक्रिय झाले. त्यांनी 2017 साली विवेकानंद केंद्राच्या सात दिवसीय निवासी व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात सहभाग नोंदवला. विवेकानंदांच्या साहित्याचे वाचन करून ‘विवेक विचार’ नामक संदेशातून, त्यातील तत्त्वाचा प्रचार व प्रसार समाजमाध्यमातून करण्याचा संकल्प त्यांनी केला. वर्षभरानंतर नियमित वाचकांनी आग्रह धरल्याने सदर उपक्रम सलग व अखंडितपणे दोन हजार, 935 दिवसांपासून म्हणजे गेली आठ वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. सद्यस्थितीत त्यांनी विवेकानंदांच्या प्रेरणादायी विचारांचा प्रसार पाच वर्तमानपत्रे व दहा राज्यांत, विविध नऊ भाषेतून करत जागतिक विक्रम प्रस्थापित केले आहेत.
अमेरिका, ब्रिटन, मॉरिशिसमधील भारतीय, इंग्रजी भाषेतून सदर संदेशाचे समाजमाध्यमांतून प्रसारण करत आहे. देश-विदेशातून तब्बल पाच लाखांहून अधिक लोकांपर्यंत सदर संदेश दररोज पहाटेच्या वेळी प्रसारित केला जात आहे. प्रा. अहिरे यांना माजी सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते, मंत्रालयात ‘लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. मुनगंटीवार यांनी अहिरे यांच्या कार्याची प्रशंसाही केली. तसेच, तब्बल आठ जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आहेत. आगामी काळात लिखित विचारांबरोबर ‘विवेक वाणी’ या ध्वनीमुद्रित संदेशांचेही प्रसारण करण्याचा त्यांचा मनोदय आहे. हे वैचारिक अग्निहोत्र प्रत्येकाच्या हृदयात सतत तेवत राहावे व कृतीत यावे, याकरिता आगामी काळात या संदेशांचे संकलन करून, पुस्तक प्रकाशित करण्याची अहिरे यांची इच्छा आहे. त्यांना राष्ट्रीय, राज्य, विभाग व जिल्हास्तरीय 43 विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. सदर संदेशात प्रा. अहिरे स्वतःचा नामोल्लेख करत नाही, यामुळे वाचक सदर विचार सहजपणे पुढे पाठवतात. शिवाय यात विवेकानंदांच्या संदेशाबरोबर दिनविशेष, तिथी, वार, भारतीय सौर, युगाब्द आदी देत असल्याने, राज्यातील 200 हून अधिक शाळांच्या फलकावर शिक्षकांकडून या संदेशाचे दररोज लेखन केले जात आहे. त्यातील काही शाळांच्या विद्यार्थ्यांनी ‘विवेक विचार संदेश’ नामक नोंदवहीत हे विचार संकलित केले आहेत. एवढे यश संपादन करूनही प्रा. अहिरे यात आपली भूमिका विवेकानंद विचारदूत म्हणून केवळ पोस्टमनची असून, स्वामी विवेकानंदच ही कृती माझ्याकडून करवून घेत असल्याचे विनम्रपणे सांगतात.
प्रा. अहिरे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात रुची वाढावी, यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापनात नावीन्यपूर्ण प्रयोग केले आहेत. प्रा. अहिरे प्रतिवर्षी बारावी बोर्डाच्या परीक्षेत राज्यशास्त्र विषयात 90 पेक्षा अधिक गुण मिळविणार्या विद्यार्थ्यांचा प्रत्येकी 501 रुपये देऊन गौरव करतात. आतापर्यंत 34 विद्यार्थ्यांना त्यांनी सन्मानित केले आहे. त्यांनी विविध शालेय, सहशालेय, पर्यावरणीय उपक्रम राबविले आहेत. शाळा महाविद्यालयांमध्ये व्याख्याने दिली आहेत. प्रा. अहिरेंनी ‘एचएससी’ परीक्षेत परीक्षक, नियामक, मुख्य नियामक तसेच, विविध सेवांतर्गत प्रशिक्षणात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून भूमिकाही बजावली. राज्यशास्त्र परिषदेचे विभागीय महासचिव, नाशिक विवेकानंद केंद्राचे मा. नगरप्रमुख, ‘हिरवांकुर फाऊंडेशन’चे पदाधिकारी म्हणूनही ते कार्यरत आहेत. त्यांना आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!