निसर्गातील पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी कागदी पिशव्या तयार करून त्या मोफत पुरवण्याचे कार्य करणार्या भारती पाटील यांच्याविषयी...
आजकाल अस्वच्छतेच्या चर्चा खूप होतात. मात्र, ती चर्चा का होत आहे? यावर कारणमीमांसा आणि उपाय शोधण्याऐवजी, एकमेकांची यावरून उणी-दुणी काढण्यातच धन्यता मानली जाते. केवळ महानगरातीलच नव्हे, तर अन्यत्रदेखील अस्वच्छता वाढीस लागली आहे. यामुळे पर्यावरणाचा र्हास, आरोग्याशी खेळ आणि माणसाने आपणहून ओढवून घेतलली संकटेदेखील दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. अशावेळी कुणी याबाबतीत सजग आणि निष्ठेने कार्य करीत असेल, तर त्याची दखल घेणे आवश्यक ठरते. जेणेकरून अशा चांगल्या कार्यातून इतरजणही ही संकटे दूर सारू शकतील, असा विश्वास वाटतो. भारती पाटील हे असेच प्रेरक व्यक्तिमत्त्व.
"रस्त्याच्या कडेला टाकलेले अन्नपदार्थ प्लास्टिकच्या पिशवीसह जनावरे खाताना पाहून, तर कधी मेलेल्या गाईच्या पोटात प्लास्टिकचा गोळा निघाल्याच्या बातम्या वाचून मी अस्वस्थ व्हायचे. प्लास्टिकच्या वापराने एकूणच मानवी जीवन आणि प्राण्यांच्या आरोग्यावर किती मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम होत आहेत, हे लक्षात आले. त्यामुळे याविरुद्ध काहीतरी करावे, या उद्देशाने मी कागदी पिशव्या तयार करून त्या मोफत वाटण्याचा संकल्प केला. आजच्या घडीला दर महिन्याला ५०० कागदी पिशव्या तयार करीत आहे,” अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या भारती पाटील यांनी दिली.
वर्तमान परिस्थितीत पृथ्वीतलावर पर्यावरणाचा जो प्रश्न जटील बनत चालला आहे, त्या अनुषंगाने निसर्गातील ही हानी कमी करण्यासाठी ज्या काही सामाजिक संस्था आणि व्यक्ती आपापल्यापरीने प्रयत्न करत आहेत, त्यांपैकी एक नाव म्हणजे भारती भीमराव पाटील! सामाजिक कार्याची आवड असलेल्या भारती या मूळच्या कोल्हापूरच्या. त्यांचा जन्म अंबरनाथ येथे झाला. पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर लग्न करून त्या तारापूर, बोईसर येथे वास्तव्यास आल्या. लग्नानंतर भारती यांनी स्वतःची ‘मॉन्टेसरी’ सुरू केली. या ‘मॉन्टेसरी’मध्ये त्यांनी अनेक गरीब मुलांना मोफत शिक्षण दिले. त्यातून त्यांची सामाजिक बांधिलकी वाढतच गेली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांना मोफत शिक्षण देण्यासोबतच, भारती यांनी आपल्या महिला सहकार्यांसह गावामध्ये ठिकठिकाणी स्वच्छता अभियानही राबवले.पती भीमराव यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्या, आपल्या कुटुंबासह पुणे येथील पिंपळे सौदागर इथे आठ वर्षांपूर्वी राहायला आल्या. बोईसरहून पुण्यात आल्यावर त्यांनी आपल्या सामाजिक कार्यात खंड पडू दिला नाही.
प्लास्टिकला पर्याय म्हणून काहीतरी काम करण्याचे त्यांचे जे स्वप्न होते, ते त्यांनी पुण्यात आल्यावर साकार करायचे ठरवले. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी, कागदी पिशव्या तयार करण्यास सुरुवात केली. पर्यावरणपूरक कामाचा एक भाग म्हणून प्लास्टिक पिशव्यांना पर्याय ठरलेल्या कागदी आणि तेही जुन्या वर्तमानपत्रांच्या पिशव्या मोफत वाटण्याचे त्या काम करीत आहेत. विशेष म्हणजे भारती स्वत: या कागदी पिशव्या तयार करतात. रस्त्याने जाताना कुठे प्लास्टिकच्या वस्तू, पिशव्या, खाद्य पदार्थांचे आवरण आढळून आल्यास, त्याची योग्य विल्हेवाट लावल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे त्या स्वतः प्लास्टिकविरोधी कार्याला हातभार तर लावतातच, त्याव्यतिरिक्त इतरांनाही त्याबाबत जागृत करण्याचे काम करतात. दरमहा साधारणपणे ५०० कागदी पिशव्या तयार करून परिसरातील विक्रेते, ग्राहक यांना मोफत पुरवण्याचे काम त्या नित्यनेमाने करीत आहेत. पर्यावरणाचा समतोल काही प्रमाणात का होईना राखता यावा, या उद्देशाने कार्यरत असलेल्या भारती यांच्या या सामाजिक कार्याचा प्रारंभ खर्या अर्थाने ‘कोविड’ काळात झाला. ज्या भागात त्या राहतात, तिथे आणि त्याच्या आसपास असलेल्या पिंपळे निलख, पिंपळे गुरव या भागांतील सोसायट्यांमध्ये, मोफत कागदी पिशव्या पुरवण्याचे काम त्यांनी सुरू केले. आजच्या घडीला जवळपास १५ हजार कागदी पिशव्यांचे वाटप त्यांनी केले आहे. आणखी एका गोष्टीचा याठिकाणी उल्लेख करावाच लागेल, तो म्हणजे या पिशव्या कशा करायच्या याचे वर्कशॉप अनेक सोसायट्या तसेच, शाळांमधून भारती घेत असतात. अतिशय सोप्या पद्धतीने पिशव्या तयार करण्याचे कसब त्या शाळकरी मुले आणि गृहिणींना देतात. एकूणच पर्यावरणाच्या दृष्टीने भारती यांचे हे कार्य निश्चितच दखलपात्र आहे. विशेष म्हणजे पिशव्या तयार करण्याकरिता, भारती यांना त्यांचा मुलगा ऋषिकेश पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. त्यालाही आपल्या आईप्रमाणे सामाजिक कार्याची आवड असून, कागदी पिशव्या तयार करण्याकरिता जी काही थोड्याफार प्रमाणात आर्थिक मदत लागते, त्यासाठी भारती यांना त्याचा नेहमीच हातभार लागतो. सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन भारती मोठ्या तळमळीने आणि निष्ठेने कागदी पिशव्या तयार करण्याचे काम करीत आहेत. आपल्या या कार्याच्या माध्यमातून पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी खारीचा वाटा समजून त्या जे काम करीत आहेत, त्यांच्या या कार्याची पावती म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने त्यांचा सत्कारही करण्यात आला. भारती यांच्या या कार्याला समाजानेही मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देऊन कागदी पिशव्यांचा वापर करावा हीच अपेक्षा. भारती पाटील यांच्या या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
अतुल तांदळीकर