आपल्या शेजारचे राष्ट्र आपला किती द्वेष करते, हे युद्धविराम झाल्यानंतरदेखील दिसून येते. त्यामुळे येऊन-जाऊन पाकिस्तान्यांची तळी उचलणार्यांनी ‘उचलली जीभ’ असे प्रकार जे समाजमाध्यमांतून सुरू केले आहेत, त्याला जरा आवर घालावा. आपल्या शूर सैनिकांनी अतिशय अचूक मारा केला, म्हणूनच तुर्कीने पाकिस्तानला दिलेले ड्रोन नष्ट करण्यात यश आले, हे जरा ध्यानी ठेवावे. ते जर का भारतात पडले असते, तर पहलगामपेक्षा आणि काँग्रेस-डावे आणि पुरोगाम्यांच्या सरकारच्या काळात जेवढे दहशतवादी बळी गेले, त्यांपेक्षा कितीतरी बळी आपल्या देशात गेले असते. उगाच मोदींना विरोध करायचा म्हणून काहीबाही बरळणे बंद केले, तर आपल्याच देशाची शान आपण अधिक राखू, किमान हे भान तरी ठेवायला हवे.
हे एवढे पाल्हाळ लावण्याचे कारण म्हणजे, युद्धकाळातदेखील पुण्यात नागरिकांनी देशभक्तीचे ओतप्रोत उदाहरण आदर्श म्हणून सर्वांसमोर ठेवताना येथील व्यापार्यांनी चक्क तुर्कीच्या पुण्यात येणार्या मालावर बहिष्कार टाकला आणि आता तुर्कीचा माल ते आयात करणार नाहीत. कालच पुण्याचे खासदार आणि केंद्रीय विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीदेखील तुर्कीच्या कंपन्यांचे परवाने रद्द करण्याचे जाहीर करून ‘देशाच्या रक्षणासाठी कायपण’चा धडा अधोरेखित केला. असे राष्ट्रप्रेम बहरत असताना, आता पाकमधून चक्क येथील व्यापार्यांना धमक्यांचे कॉल येणे सुरू झाले आहे. येथील सफरचंद व्यापार्यांस त्याने तुर्कीच्या मालावर बहिष्कार घातला म्हणून मोबाईलवर पाकिस्तानातून धमकी प्राप्त झाली आहे. याचाच अर्थ, पाकिस्तान नागरिकांची अजून जिरली नाही. त्यांची वरात काढावीच लागणार आहे.
उगा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी किंवा उबाठाचे संजय राऊत सरकारविरोधात बरळत सुटले, म्हणून त्यांची री ओढण्याचा प्रयत्न करणार्यांनी आणि रिकामटेकडेपणा म्हणून समाजमाध्यमांवर बरळणार्यांनी या वरातीचा अर्थ समजून घ्यावा. त्यात सहभागी होऊन शोभा करून घेऊ नका. पुणेकरांनी घालून दिलेला आदर्श माना आणि आपल्या सैनिकांचा सन्मान करायला शिका!
पालखी
आपल्या शेजारच्या कट्टर शत्रूची आपल्या सैनिकांनी जिरविल्यावर देशातील नागरिक निश्चिंत असला, तरी सावधदेखील आहे. पुणे महानगर हे आता आगामी काळात सण-उत्सवांच्या तयारीस लागेल. येथील नागरिक किती दक्ष आणि राष्ट्रभक्त आहेत, हे तुर्कीवरील बहिष्काराच्या निमित्ताने सिद्ध झाले. आता जून महिन्यात होणार्या संत तुकोबाराया आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी पूर्वतयारी सुरू झाली आहे. जगात ख्याती पावलेला हा सोहळा भव्य आणि दिव्य असतो, आता तर सरकारकडून सुविधांची उपलब्धता केली जात असल्याने यात सहभागी होणार्या वारकरी संप्रदायांची संख्यादेखील वाढत चालली आहे. यासंदर्भात महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाने आढावा बैठका घेणे सुरू केले आहे. सोमवारी आयुक्त महानगरातील पालखी मार्गांची पाहणी करणार आहेत. यंदा मान्सूनचा अंदाज लवकर येण्याचा असल्याने वारकर्यांच्या सोयीसाठी बरीच कसरत प्रशासनाला करावी लागणार आहे. त्यात आता विविध सामाजिक संघटनादेखील वारकर्यांच्या सेवेसाठी तत्पर असतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यापासून ते भोजन आणि मुक्कामाच्या सोयीची खबरदारी सर्व स्तरांवर अगदी चोख घेतली जाते. आता युद्धाचे सावट निवळले आहे. त्यामुळे आगामी वारकरी संप्रदायांचा हा पालखी सोहळा असो की गौरी-गणपतीच्या काळातील नागरिकांचा उत्साह असो, पुणेकर यात उत्साहाने सहभागी होत असतात. यावेळी समाजातील एकजुटीचे दर्शन घडते आणि त्याची ख्याती सर्वदूर पोहोचते. आजकाल प्रदूषणाबाबत सामान्य नागरिकदेखील अतिशय सजग आहेत. त्यामुळे या गर्दीच्या काळात सर्वच प्रकारच्या प्रदूषणापासून मुक्ततेसाठी उपाययोजना आणि नियोजन केले जात आहे. स्वच्छ, हरित आणि सुरक्षित वारीसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. खड्डेमुक्त पालखी मार्ग आणि दरड कोसळण्याच्या दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. पालखी सोहळ्याची ख्याती मोठी आहे. अशा गर्दीच्या समयी कोणतेही गालबोट लागू नये, म्हणून अचूक नियोजन आवश्यक असते. त्यादृष्टीने आता तयारीला वेग आला आहे. दरवर्षी पुणे जिल्हा प्रशासन आणि येथील सर्व सामाजिक संघटनांच्या सहयोगाने हा सोहळा यशस्वी होत असतो. यंदादेखील तो अधिक उत्साहात निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी तयारी केली जात आहे.