मानवता स्वतंत्र करणारा चवदार तळे सत्याग्रह

    19-Mar-2024
Total Views | 102
Chavdar Tale Satyagraha

डॉ. बाबासाहेबांनी दि. २० मार्च, १९२७ साली महाड येथे चवदार तळ्याच्या सत्याग्रह लढ्याचे नेतृत्व केले. आज हा दिवस ‘सामाजिक सबलीकरण दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने या सत्याग्रहाचे महत्त्व आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मौलिक विचार यांचा आढावा घेणारा हा लेख...

भारतीय लोकशाहीत आंदोलनांचे स्थान महत्त्वपूर्ण आणि अनन्यसाधारण आहे. व्यापक जनहितासाठी वापरले जाणारे ते एक प्रभावी साधन आहे. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान नेत्यांनी विचारांच्या, तत्वांच्या भक्कम बैठकीवर समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी केलेल्या यशस्वी आंदोलनांचा इतिहास सर्वज्ञात आहे. डॉ. बाबासाहेबांनी दि. २० मार्च, १९२७ साली महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रहाच्या लढ्याचे नेतृत्व केले. आज हा दिवस ‘सामाजिक सबलीकरण दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या त्या पहिल्या सामाजिक सत्याग्रहाच्या ९७ व्या क्रांतिदिनानिमित्त त्यांच्या आंदोलनांमधील विधायकता, सामाजिकता आणि देशशरण भूमिका आपल्याला आंदोलने कशी असावीत? कशी करावीत? कोणत्या गोष्टींचे भान ठेवावे? याचा वस्तूपाठ देते. त्यातील यशस्विता जपण्यासाठी त्यांनी जी जीवापाड मेहनत घेतली त्याला तोडच नाही. त्यातून त्यांचे विचार आणि कृतीतील निखालस द्रष्टेपण दिसून येते.
 
या सामाजिक सबलीकरण दिवसाचे निमित्त साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन आणि ‘विवेक विचार मंच’ यांच्या संयुक्त विद्यमाने एका व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २० मार्चला दुपारी ४ वाजता विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाच्या पी. सी. रे सभागृहात ’सामाजिक समतेचा लढा’ या विषयावर ‘दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीज’च्या महिला विभागाच्या मेंटॉर व महर्षी कर्वे संस्थेच्या संचालिका सीमा कांबळे यांचे व्याख्यान होणार आहे. कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या व्याख्यानास भारत इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष व माजी खासदार प्रदीपदादा रावत व विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान अमूल्य आहे. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक, परराष्ट्र व्यवहार, पर्यावरण अशा अनेक विषयांवर त्यांचे विचार आणि कार्य नेहमीच प्रेरणादायी ठरले, ते आपल्या असामान्य, अलौकिक आणि आदरणीय गुणांमुळे आणि कर्तृत्वामुळे.ते जगातील कुठल्याही आणि कोणत्याही सुज्ञ आणि जिज्ञासू व्यक्तीच्या चिंतनाचा, मननाचा, आदराचा, आनंदाचा, लेखनाचा आणि त्यांच्या कृतिशिलतेचा विषय होत आहे, ही आवर्जून समजून घ्यावी, अशी अत्यंत महत्त्वपूर्ण वास्तविकता आहे.

डॉ. बाबासाहेबांनी १९१६ सालापासून आपल्या निहित सामाजिक कार्याचा आरंभ केला. कृतिशूरपणा हा ऐतिहासिक महापुरुषांचा स्थायीभाव असतो. डॉ. बाबासाहेबांचे महनीय कार्य असे की, कोट्यावधी जनतेच्या मनात त्यांनी अन्यायाची चीड निर्माण केली, स्वाभिमानाची ठिणगी पेटवली.शतकानुशतकांचे वैचारिक साखळदंड तोडून टाकले. हे कार्य सहज घडण्यासारखे नव्हते. सर्वच दृष्टींनी नागवला गेलेला दलित समाज त्याच्या स्वतःच्यापायावर उभा करावयाचा असेल, तर त्याला आत्मस्थितीचे ज्ञान दिले पाहिजे. आपले जन्मसिद्ध अधिकार कोणते? याची जाणीव त्याच्या चित्तात उत्पन्न केली पाहिजे. आपण व आपल्या भोवतीच्या जगाचे यथार्थ भान आल्याशिवाय गुलामाला आपली गुलामगिरीही कळत नाही. गुलामगिरी कळूनही त्याच्यात त्याविरूद्ध जाणीव उत्पन्न केल्याशिवाय तो संघर्ष करू शकत नाही, असा संघर्ष करण्यासाठी अपार कष्ट केले. एक सशक्त, स्वाभिमानी आणि समतायुक्त समाजनिर्मितीसाठी डॉ. बाबासाहेबांनी आपल्या जीवनाचेअग्निकुंड केले.

डॉ. आंबेडकर आपले कृतिशील विचार वृत्तपत्रांच्या माध्यमातून, भाषणांतून आणि गावोगावी पसरलेल्या अस्पृश्य वस्तीतील दीनदलितांना पोटाशी धरून वर्षानुवर्षे सांगत राहिले. कोणताही नेता जनतेच्या सर्व स्तरात प्रेमाने, आपुलकीने वावरतो आणि सामान्यातील सामान्य होऊन त्यांच्यातील माणूसपणाला आत्मियतेने उदराशी धरतो, तेव्हा त्या जनसमूहाचे रुपांतर एकात्म समाजात होते. असा एकात्म समाज हा समता आणि बंधुतेच्या पायावरच उभा राहील, अशी त्यांची धारणा होती. डॉ. बाबासाहेबांनी आरंभलेल्या महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह, पुण्याच्या पर्वती मंदिर सत्याग्रह, अंबामाता मंदिर प्रवेश सत्याग्रह अशा विविध सामाजिक लढ्यांबरोबरच राजकीय लढ्याचा पुणे करार असेल, या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या नाशिकच्या दौर्‍यात दि. १३ ऑक्टोबर, १९३५ रोजी येवला येथे अस्पृश्यगटातील सर्वांची परिषद झाली. या परिषदेच्या निमित्ताने उपस्थित असलेली सुमारे दहा हजार श्रोत्यांसमोर ’आपला समाज स्वतंत्र करावा’ अशा आशयाचा लिखित अंतस्थ हेतू डॉ. बाबासाहेबांनी प्रकट केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सामाजिक न्यायाच्या संग्रामामधील ’महाडचा लढा’ हे एक सुवर्णपान आहे. जनतेची तहान भागविणारे असंख्य पाणवठे आपल्या देशात आहेत. परंतु, सामाजिक न्यायाची तहान भागविणारा पाणवठा महाडमध्ये आहे. त्याचे नाव आहे ’चवदार तळे’. आपल्या देशातीलअनेक तळी, तलाव उदा. मानसरोवर, पुष्कर तलाव तसेच गोदावरीच्या पात्रातील रामकुंड असे अनेक पाणवठे धार्मिक कारणांसाठी तीर्थक्षेत्रे झाली आहेत. महत्त्वाचे म्हणजे, चवदार तळे मात्र सामाजिक तीर्थक्षेत्र झालेले आहे. या तीर्थाची यात्रा दरवर्षी मार्च महिन्यात भरते. डॉ. बाबासाहेबांनी दि. २० मार्च, १९२७ साली महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह केला, त्यांच्या त्या पहिल्या सामाजिक सत्याग्रहाच्या ९४व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या आंदोलनांमधील विधायकता, सामाजिकता आणि देशशरण भूमिका आपल्याला आंदोलने कशी असावीत? कशी करावीत? कोणत्या गोष्टींचे भान ठेवावे? त्यातील यशस्विता जपण्यासाठी त्यांनी जी जीवापाड मेहनत घेतली, त्याला तोडच नाही. त्यातून त्यांचे विचार आणि कृतीतील निखालस द्रष्टेपण दिसून येते.

अलीकडच्या काळातील आंदोलने ही आंदोलनांमधील सामाजिकतेला आणि राष्ट्रीयत्वाला मूठमाती देतील की काय? असा प्रश्न मनात उभा राहतो. या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेबांनी सामाजिक न्यायाच्या संदर्भात केलेल्या आंदोलनांचे वैचारिक महत्त्व अधोरेखित होते. त्यांनी केलेली आंदोलने ही सामाजिक समता प्रस्थापनेसाठी, आपले जन्मसिद्ध अधिकार प्रस्थापनेसाठी, समाजातील हिनत्वाचे भाव काढून टाकण्यासाठी आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे समाजाची मानसिकता बदलण्यासाठी होती.चवदार तळ्याच्या काठी उभे असलेले मूर्तिमंत धैर्य आणि निष्ठा यांचे रूप असलेले डॉ. बाबासाहेब उगवत्या सूर्यासारखे भासले. मुक्तीच्या मार्गावरील जनसमूहांचे ते नेतृत्व करणारे होते. ‘स्वातंत्र्य मागून मिळत नसते, तर ते लढून मिळवावे लागते,’ असे संदेश त्यांनी याठिकाणी दिला. आपल्या हाताच्या ओंजळीत त्यांनी पाणी घेतले, त्यांचेच अनुकरण तेथे उपस्थित असलेल्या हजारो अनुयायांनी केले. सत्याग्रहाचे खरे उद्दिष्ट असे होते की, पाणी ही निसर्गाची देणगी आहे आणि ते सर्वांना मिळालेच पाहिजे. अशा प्रकारे त्यांची शिकवण आणि विचार प्रत्येकाने मूर्त स्वरुपात आणणे आवश्यक आहे. पाणी पिण्याच्या क्रियेतून त्यांना सर्वांना हे दाखवून द्यायचे होते की, अत्याचाराची परिसीमा होते, तेव्हा लहानातला लहान जीवही बंड करून उठतो आणि अत्याचाराच्या बेड्या तोडून टाकतो.
 
डॉ. बाबासाहेबांनी चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी दोन गोष्टी सांगितल्या होत्या. ते म्हणाले, “पहिली गोष्ट म्हणजे आंदोलन करताना जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा. दुसरी गोष्ट म्हणजे, विचारात परिवर्तन झाल्याशिवाय आचरणात परिवर्तन होऊ शकणार नाही. अस्पृश्यांना समतेच्या आणि माणुसकीच्या हक्काची वागणूक नाकारली जात होती. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली चवदार तळ्याचे पाणी सर्वांनी मिळून संघटितपणे पिण्याचे आंदोलन यशस्वी केले. त्याकरिता त्यांच्या विचार आणि कृतीत सूत्रबद्ध रचना आहे.”व्यवस्था परिवर्तनाचे जे आंदोलन आम्ही चालवित आहोत ते आंदोलन चालवणारे लोक, आंदोलनास साथ देणारे लोक तसेच आंदोलनाची विचारधारा आणि उद्देश सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणार्‍या लोकांसाठी विचार हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. विचार समाजाला गती देतो, गतिमान करतो. जनतेने हा विचार बनवला, तयार केला आणि जगाने मानला, तर तो अनेकांना प्रेरित करतो, प्रेरणा देतो. ’विचारात परिवर्तन झाल्याशिवाय आचरणात परिवर्तन होत नाही,’ ही गोष्ट बाबासाहेबांनी आंदोलनकर्त्यांना सांगण्याचे कारण म्हणजे त्यांच्यापुढे लक्ष्य असे होते की, आपल्या समाजाच्या आचरणात परिवर्तन करायचे आहे. तुम्ही नेता, कार्यकर्ता किंवा प्रचारक म्हणून लोकांमध्ये परिवर्तन करू शकता. कोणतीही व्यक्ती आचरण कसे करते, जसा त्या व्यक्तीचा विचार असतो किंवा व्यक्ती जो विचार करतो, त्याप्रमाणे त्याचे आचरणअसते.

एखादी व्यक्ती किंवा समाज चुकीच्या विचारांस चुकीचे न मानता, त्याचा स्वीकार करते आणि त्यामुळे चुकीचेच आचरण करत असेल, तर त्या चुकीच्या विचारांस चुकीचे ठरविण्याची जबाबदारी परिवर्तनाचे कार्य करणार्‍या समस्त लोकांचीच आहे. ज्यांनी चुकीचा विचार स्वीकारला आहे, त्यांना त्यांचा विचार कसा चुकीचा आहे, ते पटवून देत त्यांच्यासमोर दुसरा विचार ठेवला पाहिजे. अशा प्रकारे पर्यायाने दोन वेगळे विचार लोकांसमोर असायला हवेत. तुम्ही तो दुसरा विचार लोकांसमोर ठेवणार आहात, त्याच्यातून तुम्हाला हे सिद्ध करता आले पाहिजे की, त्यांनी स्वीकारलेला अगोदरचा विचार चुकीचा होता. जो विचार लोकांच्या आचरणामध्ये दिसून येतो तो त्यांच्या विचारात जर तुम्ही परिवर्तन केले, तर त्यावेळी त्यासंदर्भात तो विचार लोकांच्या आचरणामध्ये प्रतिबिंबित होईल. त्यामुळे डॉ. बाबासाहेबांना समाजात जे परिवर्तन घडवून आणायचे होते, त्यासाठी त्या समाजात प्रथम जागरूकता निर्माण करून त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल घडवून आणण्याचे महत्कार्य त्यांनी केले.डॉ. बाबासाहेबांनी केलेल्या विविध आंदोलनांचा मागोवा घ्यायचा झाला, तर त्यांनी केलेली सर्व आंदोलने-सत्याग्रह प्रतिशोधासाठी नव्हती, तर प्रतिसादासाठी होती. राष्ट्रीय मालमत्तेचे नुकसान नाही, तर त्याच्या संवर्धनासाठी होती. ती अराष्ट्रीय तर कधीच नव्हती, तर राष्ट्र मजबूत करण्यासाठीच होती. ती एका महान राष्ट्रपुरुषाने राष्ट्रोन्नतीसाठी केलेली आदर्श आंदोलने होती. त्याचा आज आम्हाला विसर पडत चालला आहे. चवदार तळे सत्याग्रहाच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांनी केलेल्या आंदोलनांच्या आदर्शाचा जागर करण्याची आज वेळ आलेली आहे.


डॉ. सुनील भंडगे

(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख आहेत.)


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121