युद्ध‘विराम’ नव्हे ‘स्वल्पविराम!’

    22-Nov-2023
Total Views | 58
Israeli gov’t meets to vote on Gaza truce deal

आंतरराष्ट्रीय शक्तींच्या दबावामुळे अखेरीस ‘हमास’ आणि इस्रायलमध्ये चार दिवसांचा युद्धविराम झाला खरा. पण, या घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली आहे. ती म्हणजे ‘हमास’सारख्या संघटनांना मुळापासूनच उखडून टाकावे लागेल. त्यांच्याकडून पश्चात्तापाची अपेक्षा करणेच व्यर्थ!

गाझा पट्टीत निदान चार-पाच दिवस तरी युद्धाची धूमश्चक्री थांबण्याची चिन्हे आहेत. महिला आणि मुलांसह सुमारे ५० परदेशी ओलिसांची मुक्तता करण्याची तयारी ‘हमास’ने दाखविल्यामुळे इस्रायलने चार दिवस युद्धविराम घोषित केला आहे. इस्रायललाही सुमारे ५० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करावी लागेल, असे दिसते. हा अल्पविराम गाझातील नागरिकांना श्वास घेण्याची उसंत देईल, अशी अपेक्षा आहे. पण, चार दिवसांनंतर गाडी पुन्हा मूळपदावर येण्याचीच शक्यता अधिक. कारण, मूळ रोगावर इलाज झालेला नाही. केवळ मलमपट्टी करण्यात आली आहे. ही मलमपट्टी फार दिवस चिकटून राहणार नाही आणि जखम पुन्हा भळभळून वाहू लागेल.

रुग्णालये, शाळा, निर्वासितांचे कॅम्प्स, मशिदी यांसारख्या पूर्णपणे अराजकीय स्थळांचा वापर ‘हमास’कडून केवळ राजकीय उद्दिष्टांसाठी केला जातो असे नव्हे, तर या ठिकाणी इस्रायलविरोधात हिंसक कारवायांची केंद्रे तयार केली जातात. अल शिफा हे गाझातील एक मोठे रुग्णालय. त्या रुग्णालयाच्या तळघरात भुयारे खोदण्यात आली असून, त्यात घातक शस्त्रास्त्रे तर ठेवण्यात आली होतीच. पण, ‘हमास’ने पकडलेल्या ओलिसांनाही तेथे बंदिवान म्हणून ठेवण्यात आले होते. या रुग्णालयावर ताबा मिळविल्यावर लष्कराच्या प्रवक्त्याने तर अशा भुयारांचा व्हिडिओच जगापुढे सादर केला आहे. त्यात ‘हमास’ने कशा प्रकारे शस्त्रास्त्रे ठेवली होती, ओलिसांना कुठे बांधून ठेवले होते, वगैरे अनेक तपशील दाखविण्यात आले. मुळात या रुग्णालयात असे तळघर आणि भुयार सापडणे हाच ‘हमास’विरोधातील पुरावा आहे. इतकेच नव्हे, तर या रुग्णालयातून दोन परदेशी ओलिसांना कसे घाईघाईने, फरफटवत एका जागेवरून दुसरीकडे हलविण्यात आले, त्याची दृश्येही जगापुढे आली आहेत.

रुग्णालयात आपला जीव वाचविण्यासाठी लोक येतात. अशा ठिकाणाचा वापर ओलिसांना बंदिवासात ठेवण्यासाठी आणि इस्रायलवर हिंसक हल्ले करण्यासाठी करून ‘हमास’ने शाळा, रुग्णालये, मशिदी यांसारख्या स्थळांचे पावित्र्य भंग केले आहे. त्यामुळे इस्रायलकडून या ठिकाणांवर होत असलेल्या बॉम्बहल्ल्यांचे समर्थनच करावे लागते. रुग्णालये आणि शाळा व शरणार्थींचे कॅम्प येथे आपल्या दहशतवाद्यांना दडवून त्यांच्याकडून इस्रायलवर हल्ले करणे हे शिखंडीच्या आडून भीष्मांवर शरसंधान करण्यासारखे आहे. पण, ही तुलना इतक्यापुरतीच आहे. त्यातून अन्य राजनैतिक किंवा नैतिक अर्थ काढणे चुकीचे ठरेल. ‘इस्रायलचा रुग्णालयावर बॉम्बहल्ला, अनेक रुग्ण ठार’ असे मथळे हे फसवे आणि अर्धसत्य कथन करणारे आहेत. या रुग्णालयांमध्ये इस्रायलवर डागण्यात येणार्‍या रॉकेटची यंत्रणा बसविली होती, हा या मथळ्याचा उत्तरार्ध असतो. पण, कथित सेक्युलर आणि शांतिप्रिय इकोसिस्टिम हा भाग दडवून ठेवते. इस्रायलच्या खर्‍या-खोट्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या बातम्या ठळकपणे देणारी माध्यमे ‘हमास’च्या या अमानवी आणि अनैतिक कृत्यांबाबत मौन पाळून आहेत.

निरपराध लोकांच्या आडून सैन्यावर हल्ले करणे, ही इस्लामी दहशतवाद्यांची जुनीच खोड आहे. काश्मीरमध्येही पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी अनेक गावांतील घरांमध्ये दहशतीच्या जोरावर आश्रय घेत. त्यामुळे लष्कराला सार्‍या गावाला वेढा घालावा लागत असे. अनेक विद्यार्थ्यांना पैशाच्या मोबदल्यात भारतीय लष्करावर दगडफेक करण्यास उद्युक्त केले जाई. भारताच्या उदारतेच्या मूल्यांमध्ये अशा निरपराध विद्यार्थ्यांवर पाशवी बळाचा वापर करणे बसत नसल्याने अनेक जवानांना घायाळ व्हावे लागले, तरी त्याबदल्यात एकाही विद्यार्थ्याचा मृत्यू लष्कराच्या हातून झालेला नाही. भारतीय लष्कराने इस्रायलचे तत्त्व अंगीकारले नव्हते, तर भीष्मांप्रमाणे अर्जुनाच्या बाणांनी रक्तबंबाळ होणे स्वीकारले.

सध्याचा युद्धविराम हा तात्पुरता असून, आपल्या जीवावर उठलेल्या ‘हमास’ला कायमचे गाडण्याची आलेली ही सुवर्णसंधी इस्रायल सोडणार नाही. त्यामुळे सर्व ओलिसांची बिनशर्त मुक्तता करण्याबाबत इस्रायल आग्रही आहे. आताचा चार-पाच दिवसांचा युद्धविराम हा इस्रायलला मनापासून मान्य नसला, तरी जागतिक दबावापोटी तो स्वीकारून आपण तडजोडीला तयार आहोत, हे इस्रायल दाखवून देत आहे. या काळात इस्रायललाही आपल्या पुढील रणनीतीसाठी पूर्वतयारी करण्यास अवधी मिळेल. कारण, त्यानंतर इस्रायलकडून गाझावरील हल्ले पुन्हा सुरू होतील. ‘हमास’ला या पाच दिवसांनी तसा काही लाभ होणार नाही. गाझावर इस्रायलचे पूर्ण नियंत्रण बसले असून, यापुढील अनेक वर्षे ते तसेच राहील, हे ‘हमास’ने ओळखले आहे.

इस्रायलने आपला सुरा त्यांच्या गळ्याशीच टेकविल्यामुळे जीव वाचविण्यासाठी त्या संघटनेने एक पाऊल मागे घेतले आहे, इतकेच. या संघटनेने खरोखरच काही ओलिसांची मुक्तता केली, तर ते ओलिस ‘हमास’चे पितळ अधिकच लखलखीतपणे जगापुढे आणतील. त्यामुळे ‘हमास’ ओलिसांची मुक्तता करील की नाही, हेच आधी तपासून पाहावे लागेल. जरी सुटका केली, तरी त्यामुळे मूळ प्रश्न सुटणार नाही. कारण, इस्रायलला ‘हमास’चे आणि ‘हमास’ला इस्रायलचे अस्तित्त्वच नष्ट करायचे आहे. इस्रायलला आपल्या नागरिकांची, ज्यू धर्मीयांची मुक्तता हवी आहे आणि ‘हमास’ला ते करायचे नाही. त्यामुळे हा युद्धविराम नसून स्वल्पविराम आहे.

राहुल बोरगांवकर 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121