वैदिक विवाह संस्कारात सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा विधी जर कोणता असेल, तर तो म्हणजे सप्तपदी होय. या संदर्भात अशी मान्यता आहे की, हा विधी जर पार पडला नाही, तर तो विवाहच पूर्ण होत नाही. म्हणूनच वेगवेगळ्या पद्धतीने का असेना? पण हा विधी सर्वत्र संपन्न केला जातोच. सप्तपदीशिवाय विवाह नाही अन् विवाहाविना सप्तपदी नाही. यासाठी तर सप्तपदी का? कशासाठी? वगैरे गोष्टींचे विश्लेषण करणे अगत्याचे ठरते.
आजकालच्या धावपळीच्या व धकाधकीच्या युगात धार्मिक विधींकडे दुर्लक्ष होत असल्याने साहजिकच विवाहाअंतर्गत महत्त्वपूर्ण मानली जाणारी ही सप्तपदीदेखील दुर्लक्षिली जात आहे, ही खेदाची गोष्ट. त्यातच मग या विधीला जाणून घेण्यासाठी कोणालाही वेळ नाही. उगीच कशातरी पद्धतीने हा विधी उरकायचा? केवळ एका परंपरेचे निर्वहन करणे, हेच आता शिल्लक राहिले आहे. ‘सप्तपदी’ हा शब्द बराच अर्थ सांगून जातो. नव वर-वधूंनी सात पावले सोबत-सोबत चालणे म्हणजेच सप्तपदी होय. जगन्नियंता परमेश्वर, यज्ञीय अग्नी, पुरोहित, माता-पिता व आप्तजनांसह आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना साक्षी मानून सात पावले चालणे म्हणजे जीवनाची सुरुवात करणे होय.
ग्रंथीबंधन
सप्तपदीला प्रारंभ करण्याअगोदर वधू-वरांची हृदये एकरुप होणे आवश्यक असते. कारण, हृदय हे प्रेमभावनेचे प्रतीक. एकदा काय हे दोघेही एका हृदयाचे, एका मनाचे व एका विचारांचे झाले की, ते आपला वैवाहिक जीवनप्रवास सप्तपदीच्या माध्यमाने यशस्वीपणे प्रारंभ करू शकतात. यासाठीच ग्रंथीबंधनाचा प्रसंग. हृदयाच्या ग्रंथी तर आपण प्रत्यक्ष बांधू शकत नाहीत. म्हणून प्रतीकात्मक प्रसंग येतो, तो वस्त्रांच्या गाठी बांधण्याचा. विवाह मंडपात सर्वांच्या समोर बांधली जाणारी गाठ हेच सूचित करते की, आता ही गाठ केवळ ही वस्त्रांचीच नसून हृदयांची आहे. वराचे उपवस्त्र (टॉवेल किंवा शाल) तर वधूची उत्तरीय वस्त्रे (टॉवेल किंवा शाल) या दोन्हींची गाठ बांधणे यालाच मराठीत ‘गाठ बांधणी’ किंवा हिंदीत ‘गठजोडा’ असेदेखील म्हणतात. मंडपातील एखाद्या सौभाग्यवती महिलेने येऊन या दोन्ही वस्त्रांची गाठ बांधावी. या गाठीच्या मागे हृदयाच्या एकत्वाचे रहस्य दडले आहे. प्रेमभावना, विचार व कार्यपद्धतीची एकरूपता नसेल, तर माणूस कोणाच्याही सोबत चालू शकत नाही. आता वधू-वर हे तर संसाररुप भीषण नदीत स्थैर्याने उतरु इच्छितात किंवा खडतर मार्गाने आपल्या जीवनाचा प्रवास प्रारंभ करू इच्छितात. त्यासाठी त्यांच्यात नको का मग एकता? म्हणून दोघांच्याही वस्त्रांची कधीही न सुटणारी गाठ बांधून त्यांना सोबत सोबत चालण्यास प्रवृत्त केले जाते.
सातच पावले का?
सप्तपदी म्हणजेच सात पावलांचे चालणे. ’सप्तानां पदानां समाहार:!’ हा या शब्दाचा समासविग्रह. अनेकांना हा प्रश्न पडतो की, सातच पावले कशासाठी? सहा, आठ किंवा यापेक्षा कमी-अधिक का नकोत? तर यामागे उत्तर असे की, आपल्या भारतीय संस्कृतीत 7 या संख्येला फार महत्त्व आहे. वैदिक संध्येतील प्राणायाम मंत्रात परमेश्वराची भू:, भुव:, स्व:, मह:, जनः, तप: व सत्यम् अशी स्तुतिपर सात नावे किंवा विशेषणे आली आहेत. तसेच इंद्रधनुष्याचे सात रंग, सात समुद्र, सात द्वीप, सात धातू किंवा इतरही सात बाबींवरूनदेखील सात पावलांचे चालणे म्हणजेच सप्तपदी निश्चित केली असावी. त्याबरोबरच संगीत क्षेत्रातील सा, रे, ग, म, प, ध, नि हे सात स्वरदेखील मोलाचे आहेत. संगीताची परिपूर्ण माहिती असलेली एखादी व्यक्ती जोपर्यंत संवादिनी (हार्मोनियम) वरील सात स्वरांवर आपला अधिकार किंवा जम बसवत नाही, तोपर्यंत तो उत्कृष्ट संगीतशिक्षक होऊ शकत नाही, तद्वतच वर-वधू गृहस्थाश्रमरुप हार्मोनियमच्या या सप्तपद-स्वरांवर आपले साम्राज्य स्थापन करत नाही, तोपर्यंत ते आदर्श गृहस्थाश्रमी होऊ शकत नाहीत.
उजव्या पावलाने सुरुवात
वस्त्रबांधणी झाल्यानंतर वधू-वरांना ईशान्य दिशेकडे तोंड करून सप्तपदीसाठी सज्ज व्हावयाचे आहे. पूर्व आणि उत्तर या मुख्य दिशांच्या मध्यभागी ईशान्य दिशा येते. या दोन्ही दिशा प्रकाशाने परिपूर्ण आहेत. वधू-वरांच्या जीवनात सतत तेजोमय वातावरण राहावे. दोघांच्याही जीवनात सात्विकता वाढत राहावी, हाच या मागचा उद्देश. तसेच उत्तर दिशेत ध्रुवतारा आहे, जो की, दृढतेचं प्रतीक मानला जातो. हे दोघे वधू-वर आपल्या दाम्पत्य जीवनात नेहमी ज्ञानप्रकाशाने परिपूर्ण होत विचार व कृतीने दृढ राहोत, हाही भाव या मागचा आहे.
सप्तपदीला प्रारंभ करण्याअगोदर वर आपला उजवा हात वधूच्या खांद्यावर ठेवतो आणि याप्रसंगी मंत्राच्या माध्यमाने आदेश देतो- मा सव्येन दक्षिणम् अतिक्राम! म्हणजेच हे वधू, तू डाव्या पायाने उजव्या पायाचे उल्लंघन करू नकोस. गृहस्थाश्रमात पदार्पण करीत असताना नेहमी सरळ व सन्मार्गाने कामे व्हावीत. सव्य म्हणजे डावा, तर दक्षिण म्हणजे उजवा. डाव्याला कुटीलतेचा मार्ग, तर उजव्याला सरलतेचा मार्ग असे म्हटले जाते. यापुढे आपल्या गार्हस्थ्य जीवनात चांगल्याची जागा वाईटाने घेऊ नये. सरळ कार्यांच्या ऐवजी वाकडीतिकडी अनिष्ट कामे होता नयेत. म्हणूनच पुढे वाटचाल करीत असताना दक्षिण म्हणजेच उजवा पाय ठेवला जावा. कारण, उजव्या पायातच खर्या अर्थाने शक्ती किंवा बळ असते. उजवे पाऊल पडते, तेव्हा डावा पाय उचलला जातो. डाव्याचे सामर्थ्यदेखील उजव्यातच अंतर्भूत आहे. इतकेच काय, तर विवाह संस्काराच्या प्रत्येक विधीप्रसंगीसुद्धा वर किंवा वधू हे एक दुसर्यांचे उजवेच हात पकडतात. यावरून उजव्याचे महत्त्व आपणास लक्षात येते. यासाठीच तर वर वधूला म्हणतो -
‘मा सव्येन दक्षिणम् अतिक्राम!’
आता हे दोघेही एकाच गतीने, मतीने व कृतीने सप्तपदीच्या माध्यमाने जणू काही जीवनाची पदयात्राच प्रारंभ करीत आहेत. दोघांची पाऊले एकदाच उचलले जाणार. या प्रसंगी सातही पाऊल म्हणजे गृहस्थाश्रम रुपी विशाल भवनाच्या सात पायर्या आहेत. आश्रम म्हणजे मोठ्या प्रमाणात श्रम, परिश्रम, कष्ट, प्रयत्न व खडतर तपश्चर्या करण्याचा आश्रम. इथे केवळ ऐषाराम किंवा भोगविलास नव्हे, तर कर्तव्यांची जोपासना आहे. आता या नववधू-वरांना धर्मपती व धर्मपत्नी बनून प्रत्यक्षात धर्मकार्यासाठी तत्पर व्हावयाचे आहे. इथे नेहमी चालत राहावयाचे. थांबायचे तर अजिबात नाही. कुठे बसायचेही नाही. नेहमीच दक्ष व क्रियाशील राहायचे आहे. कारण, ’जो थांबला तो संपला.’ या सात पावलांनी चालत राहणे म्हणजे महानतम सात उद्दिष्टे गाठणे. ही उद्दिष्टे कोणती आहेत? ही सात पावले कोणती? यावरील विवेचन पुढील अंकात...
- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य