आज काही कवींच्या उपद्व्यापामुळे समाजातील विचारांचा उथळपणा वाढला आहे. कविता वाचनाच्या नावाखाली केले जाणार्या कार्यक्रमांतून आज जो धुमाकूळ व वात्रटपणा पाहायला मिळतो, तो याची साक्ष देतो. अशावेळी समर्थांच्या विचारांतून काव्याकडे बघितले पाहिजे.
सुमारे ३५०-४०० वर्षांपूर्वी समर्थांच्या काळात उत्तम काव्याचा विचार करताना ते काव्य परमार्थ विचारांशी कितपत जोडले गेले आहे, यावरून ठरवले जाई. त्या काळाची काव्यसमीक्षा ही परमार्थ विचार नीतिमत्ता, चारित्र्य, विवेक, वैराग्य, भक्ती, परोकार व लोकोद्धार या निकषांवर केली जाई. काव्याचा परमार्थाशी निकटचा संबंध असल्याने भक्तिप्रधान कवितेला मानाचे स्थान होते. ‘आत्मबोध’ आणि ‘रंजकता’ हे काव्याचे निकष महत्त्वपूर्ण समजले जात. संतकवी व इतर कवी दोघेही प्रतिभावान हे खरेच. परंतु, त्या दोहोतील फरक स्पष्ट करताना संतांची प्रतीक्षा कायम जागृत असते, तर इतर कवींची प्रतिभा मधून जागृत होते. इतरवेळी ती निद्रित असते, असे सांगितले जाते. आपण मागील लेखात पाहिले आहे. तसेच संतकवींची रचना भक्तिप्रधान असून इतर कवींची रचना रसप्रधान, शब्दचातुर्य दाखवणारी असते. त्यांच्या काव्यात भक्तिरसाला aप्रमुख स्थान नसते. पुढे कालमानाप्रमाणे कवितेकडे पाहण्याची दृष्टी बदलत गेली, असे असले तरी समर्थाचे काव्यविषयक विचार, कवित्वाचे प्रकार इत्यादी अभ्यासले गेले पाहिजे. कारण, प्रासादिक काव्याची लक्षणे त्यातून प्रगट होतात. समर्थांच्या मते काव्यवाचनाने माणसाची देहबुद्धी कमी होऊन आत्मबुद्धी वाढली पाहिजे. वाचकांच्या अंत:करणात विरक्ती व भक्ती प्रगट होऊन त्यांचे अंतरंग निर्मळ झाले पाहिजे. परोपकाराची भावना त्यांच्या ठिकाणी उत्पन्न झाली पाहिजे. या समर्थ विचारांची समाजाला व कवींना गरज आहे. आज काही कवींच्या उपद्व्यापामुळे समाजातील विचारांचा उथळपणा वाढला आहे. कविता वाचनाच्या नावाखाली केले जाणार्या कार्यक्रमांतून आज जो धुमाकूळ व वात्रटपणा पाहायला मिळतो, तो याची साक्ष देतो. अशावेळी समर्थांच्या विचारांतून काव्याकडे बघितले पाहिजे. काव्य कसे असावे आणि कसे नसावे, यावरही समर्थांनी चिंतन केले आहे. त्याची चर्चा दासबोधातील समास 14.3 मध्ये पाहायला मिळते. त्यावर विवेचन करण्यापूर्वी मराठी वाड्.मयातील काव्यसमीक्षाची दिशा, त्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण काव्यरचना समजून घेतल्या पाहिजे.
मराठी वाड्.मयाच्या इतिहासात कवितेला मानाचे स्थान आहे. प्राचीन मराठी वाड्.मयातील संतकवी आणि अर्वाचीन मराठी वाड्.मयातील कवींनी आपल्या प्रतिभेने मराठी कवितेला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. कवी आपल्या प्रतिभेच्या बळावर ‘उपमा’, ‘दृष्टान्त’ अलंकरांच्या साहाय्याने यथोचित शब्दप्रयोग करीत वाचकाला एका वेगळ्या प्रसन्न वातावरण घेऊन जातो. परमार्थ साधन करीत असताना साधकाला अनेक प्रसंगांतून जावे लागते. तेथील अनुभवांनी गुंतागुंतीच्या मानवी जीवनाचा अर्थ तो उलगडतो. हा गूढार्थ इतरांनाही सांगावा, अशी स्फूर्ती साधकाच्या अंतरंगात उत्पन्न होऊन त्याच्या मुखातून सहजगत्या ईश्वर भक्तिभावाची कविता बाहेर पडते. संतांची ती स्वाभाविक स्थिती असते. त्यामुळे बहुतेक संतांनी उत्तम काव्यरचना केलेल्या पाहायला मिळतात. भंडारा डोंगरावर निसर्ग सान्निध्यात ईश्वर चिंतन करणारे संत तुकाराम महाराज ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरें। पणीही सुखरे आळविती॥‘ हे किती सहजतेने लिहून जातात. संतांप्रमाणे कवींनाही आपल्या काव्यसाधनेत जीवनाचा गूढार्थ समजून त्यांची प्रतिभा जागृत होते. तो अर्थ ते कवितेतून मांडतात. सामान्य माणसाला सूक्ष्म विचार करण्याची, चिंतनाची सवय नसते. त्यामुळे मानवी जीवनातील रहस्ये त्याला उलगडता येत नाहीत. अशावेळी संतांनी व प्रतिभावान कवींनी केलेली जीवनभाष्ये माणसाला नवीन विचार देऊन जातात. कमीत कमी अर्थपूर्ण शब्दांत कवी ते मांडतात. संसारदु:खाने अस्त झालेल्या माणसाला या काव्यवाचनाने आपल्या दु:खांचा विसर पडतो. जगण्याची एक नवी उमेद त्याला मिळते. आपण ज्याचा कधी विचारही केला नव्हता, अशा कल्पना समजल्यावर माणसाला एक वेगळाच आनंद मिळतो. बर्याच वेळेला हे प्रतिभावान कवी जीवनोपयोगी तत्त्वज्ञान कवितेतून सांगून जातात. ती तत्त्वे गवसल्याने माणसाचे मन शांत होते. ते नीटपणे विचार करून परिस्थितीला सामोरे जाते. या संदर्भात कविवर्य भा. रा. तांबे यांची एक कविता मला आठवते.
जन पळभर म्हणतील हाय हाय।
मी जाता राहील कार्य काय।
माणसाचा अहंभाव इतका पराकोटीचा असतो की, त्याला वाटत असते, माझ्या सभोवतालची कृत्ये सर्व काही माझ्यामुळेच होत आहेत. माझ्यावाचून सर्वांचे अडेल, ही विलक्षण अहंकारी माणसे नोकरीतून निवृत्त होतात, तेव्हा त्यांना वाटत असते की, ‘आजवर माझ्यामुळे सर्व कार्यालय चालले होते. मी गेल्यावर यांचे कसे होणार?’ हीच भावना वृद्धापकाळी त्यांना सतावते की, ‘मी गेल्यावर माझ्या कुटुंबातील माणसांचे काय होणार?’ पण, अहंकारातून उत्पन्न झालेला हा विचार किती चुकीचा आहे, हे कवीला प्रतिभेतून समजते. त्यामुळे कवी सांगतो की, हे जग सोडून गेलेल्या माणसासाठी जग थांबून राहत नाही. जग अशा प्रसंगी ‘पळभर हाय हाय’ एवढीच प्रतिक्रिया व्यक्त करेल, पण कुणाचे काही अडणार नाही. सारे काही पूर्वी होते, तसेच चालू राहणार आहे. या कवितेत पुढे अनेक उदाहरणे देत कवीने हे स्पष्ट केले आहे की, एखाद्याच्या जाण्याने जगरहाटीत काही फरक पडणार नाही. कविवर्य भा. रा. तांबे यांची ही कविता मनाचा ठाव घेते. त्यातील विचाराने आपला अहंभाव, गर्व, ताठा कमी होण्यास मदत होते. हे जग सोडून माझ्या जाण्याने काही फरक पडणार नाही, याची जाणीव होते. काहीवेळ प्रतिभावान कवी मानवी जीवनातील कटू सत्य स्पष्ट शब्दांत सांगून जातात. अशा कवितांच्या वाचनातून जगरहाटी विषयीचा भ्रमनिरास होऊन त्यातील कटू सत्याचा आपण स्वीकार करतो. राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज हे असेच एक प्रतिभावान कवी. त्यांनी मानवाच्या वागण्यातील विरोधाभास उघड करून सांगितला आहे. माणूस जीवंत असताना त्याच्या आजुबाजूची मंडळी त्याला फारशी किंमत देत नाहीत. पण, तो मेल्यावर मृतदेहाचा सन्मान करतात. हा विरोधाभास कवी गडकरींनी अचूक शब्दात मांडून विदारक सत्य सांगितले आहे.
अन्नावाचून सपिंड मरती। मरता त्याते पिंड अर्पिती।
जीवंत असता लत्त देती। मरता घेती खांद्यावरती ।
दुसरे उदाहरण खानदेशातील बहिणाबाई चौधरी या कवयित्रीचे. त्यांच्या कवितेतून त्या जीवनविषयक तत्त्वे सहज सांगून जातात. रोजच्या व्यवहारातील दाखले दिल्याने त्यांचे काव्य मनाची पकड घेते. व्यवहारात आधी दुःख, कष्ट आणि नंतर त्याचे फळ हा अनुभव सर्वांचा असतो. कष्टाशिवाय फळ नाही, हे बहिणाबाई छान सांगतात.
अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर।
आधी होताला चटके तेव्हा मिळते भाकर॥
त्यांच्या कवितेतील आणखी एक मजेशीर अनुभव पाहा. माणसाच्या मनात अनेक विषारी विचार, विकार असतात, पण त्या विषयावर औषध नसते. बहिणाबाई म्हणतात-
मन जहरी जहरी, त्याचं न्यारं रे तंतर।
अरे इच्चू साप बरे, त्याले उतारे मंतर॥
प्रतिभावान कवींचे विचार तत्त्वशोधक संताप्रमाणे असतात ते जीवनातील गूढार्थ शोधतात. समर्थांनी जे प्रासादिक काव्य सांगितले आहे तसेच काव्याचे प्रकार आहेत. समर्थांचे काव्यविषयक विचार त्यांनी केलेले काव्याचे वर्गीकरण काव्य असे असावे व कसे नसावे, याबाबत समर्थांची मते हे पुढील लेखांतून पाहूू. (क्रमश:)
- सुरेश जाखडी