थोरला देव

    27-Feb-2025
Total Views | 62

manache shlok 179- 182
 
विश्वातील अगम्य घटनांच्या न समजणार्‍या कार्यकारणभावाच्या अथवा निमित्तकरणाच्या जिज्ञासेतून, ‘देव’ कल्पना उदय पावली. लोक आपण शोधलेल्या देवाला श्रेष्ठ मानून, त्याची पूजा, उपासना करू लागले. त्यात वेदात वर्णन केलेल्या, कुलपरंपरेनुसार अथवा भीतीपोटी आलेल्या, अनुकरण करण्यातून आलेल्या अनेक देवदेवतांना लोक भजू लागले. त्यामुळे ‘जगी पाहता देव कोट्यान्कोटी’ अशी स्थिती निर्माण झाली. प्रत्येकाला आपापल्या देवाचा, भक्तीचा वृथा अभिमान होऊन, गर्व निर्माण झाला. इतरांच्या देवकल्पनेला तो तुच्छ मानू लागला. पुढे क्षेत्रदेवाची कल्पना उदय पावल्याने, ’जितुके गाव तितुके देव जनांलागी’ अशी परिस्थिती झाल्याचे स्वामी सांगतात. आधुनिक काळात तर अनेक बाबा, साधू, मठाधिपती, स्वयंघोषित साक्षात्कारी तांत्रिक मांत्रिक यांची भर पडल्याने, एकंदरीत अनावस्था निर्माण असल्याचे, स्वामींनी यापूर्वीच्या श्लोकांतून सांगितले आहे. त्या ‘देवशोधन’ श्लोकांच्या गटातील हा शेवटचा श्लोक पुढीलप्रमाणे आहे -
 
तिन्हीं लोक जेथूनि निर्माण जाले।
तथा देवरायासि कोण्ही न बोले।
जगीं थोरला देव तो चोरलासे।
गुरुवीण तो सर्वथा ही न दीसे॥१७९॥
 
समर्थांनी दासबोधातील दशक ८, समास १० मध्ये, तत्कालीन जनमानसांत प्रचलित असलेल्या अनेक ग्रामीण क्षेत्रदेवदेवतांची नावे दिली आहेत. त्यात भैरव, झोटींग, काळीकंकाळी, भद्र, चांडाळी, मल्लारी इत्यादी अनेक देवदेवतांची नावे आली आहेत. याशिवाय, ’तेतीस कोटी सुरवर। अठ्यासि सहस्त्र ऋषेश्वर। नवकोटी कात्यायेणी’ असाही उल्लेख आढळतो (दा. ९.५.३१). या सर्व गोंधळात, खर्‍या अर्थी देव कोणाला म्हणावे असा प्रश्न उपस्थित होतो. त्याचे उत्तर स्वामींनी दिले आहे.
 
च्यारी खाणी च्यारी वाणी।
चौर्‍यांसि लक्ष जीवयोनी।
जेणे निर्मिले लोक तिनी।
तया नांव देव॥ (दा. ८.१.२०)
 
प्रस्तुत १७९व्या श्लोकाचा विषय हाच आहे. व्यवहारात आपण कोणत्याही घटनेचे, प्रसंगाचे निमित्तकारण अथवा त्यासंबंधीचा कार्यकारणभाव शोधत असतो. त्याला फारशी बुद्धी लागत नाही. थोडी कल्पकता असली तरी भागते. जो तो आपल्या कल्पना लढवून, कारण शोधण्याचा प्रयत्न करतो. तथापि, अपरंपार विश्वाच्या मुळाशी असलेली तत्त्वे शोधण्यासाठी व विश्वातील विविध स्वरूपात घडणार्‍या घटनांची संगती लावणारी असामान्य बुद्धिमत्ता, प्रतिभा क्वचितच पाहायला मिळते. त्यामुळे तिन्ही लोक ज्याच्यातून निर्माण झाले, त्या मूळ देवरायाबद्दल कोणीच काही बोलत नाही. त्या देवरायाला जाणून घेण्याची बौद्धिक क्षमता, अनुभूतीचा परीघ सामान्यजनांपाशी नसतो, हे उघड आहे. या सृष्टीनिर्मात्या देवाला स्वामी ‘थोरला देव’ म्हणून संबोधतात. या थोरल्या देवाच्या ठिकाणी विश्वाचे, त्यातील घडामोडींचे मूळ सापडते. परंतु, थोरला देव सूक्ष्मातिसूक्ष्म असल्याने, त्याला जाणणे हे आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या आवाक्यात येत नाही. त्यामुळे ‘थोरला देव’ आपल्या दृष्टीने अनाकलनीय आहे, तो चोरला गेला आहे, समजण्यापलीकडचा आहे. आपल्याला तो सापडू शकत नाही, असे वाटते. ज्या महात्म्यांनी बौद्धिक क्षमतेच्या जोरावर, देहबुद्धी अहंकार नष्ट करून, ध्यानावस्थेत चिंतनातून अतिसूक्ष्म अवस्थेच्या अनुभवात जाऊन ’थोरल्या देवा’चा साक्षात्कार करून घेतला, अशा सद्गुरूचे शिष्यत्व पत्करल्याशिवाय, खरे परमेश्वरतत्त्व समजणार नाही, असा अभिप्राय स्वामींनी या श्लोकाच्या शेवटी व्यक्त केला आहे. तथापि, सभोवतालच्या परिस्थितीचा विचार करता सद्गुरू कोणाला म्हणावे, यासाठी समर्थांनी यापुढे आणखी चार श्लोक लिहिले आहेत. त्यातील पहिल्या तीन श्लोकात, गुरूपदाला लायक नसलेल्या गुरूबाजीचे विवेचन केले आहे. “गुरूबाजी हा अध्यात्मजीवनाचा पुरातन रोग आहे. तो भारतीय अध्यात्माचा कॅन्सर आहे,” असे प्रा. के. वि. बेलसरे यांनी म्हटले आहे, ते खरे आहे. ती वस्तुस्थिती आहे. यासंबंधी मनाच्या श्लोकांतील पुढील श्लोक असा आहे.
 
गुरू पाहतां पाहतां लक्ष कोटी।
बहूसाल मंत्रावळी शक्ती मोठी।
मनीं कामना चेटकें धातमाता।
जनीं वेर्थ रे तो नव्हे मुक्तिदाता॥ १८०
 
अध्यात्मात गुरूशिवाय प्रगती संभवत नाही हे एकदा ठरल्यावर त्याचा गैरफायदा घेऊन, स्वतःला गुरू म्हणवून घेणारे स्वार्थी महाभाग गुरूपदाची झूल अंगावर चढवून भोळ्या भाविकाला फसवू लागले. या भोंदू गुरूंपासून समाजाने सावध राहावे, यासाठी स्वामींनी प्रथम गुरू कसा नसावा, हे सांगायला सुरुवात केली. नंतर त्यांच्यापासून सावध राहण्याचाही सल्ला दिला आहे. या गुरुबाजीचा विचार केला, तर अनेक प्रकारांनी लोकांना भूलवणारे, मंत्र-तंत्रांचा प्रयोग करणारे अशा गुरूंचा वावर समाजात मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. म्हणून स्वामी म्हणतात की, अशा प्रकारचे गुरू पाहता, ते लक्ष कोटी दिसतील. त्यांच्या ठिकाणी तंत्र-मंत्रांची शक्ती असल्याचेही दिसून येते. बाह्यदृष्ट्या हे मोठे शक्तिमान असल्याचे भासत असले, तरी त्यांच्या अंतरंगाचा विचार केला तर ते विविध वासनांनी बरबटलेले आहेत, असे दिसून येईल. पण, तसे कोणी उघडपणे बोलत नाही. कारण ते जादूटोणा करणारे आहेत, त्यांना तर्‍हेतर्‍हेचे मंत्र-तंत्र माहीत आहेत आणि ते अनेक खर्‍या-खोट्या कल्पित कथा (धातमाता) सांगत असतात, याचीच लोकांना भीती वाटते. असे दहशत पसरवणारे गुरू काय कामाचे? ते मुक्तिदाता होऊ शकत नाहीत. ते गुरूपदाला नालायक आहेत.
 
स्वामींनी यापुढे श्लोक क्र. १८१ व १८२ मध्ये या नालायक गुरूंचे अवगुण अधिक स्पष्ट केले आहेत, की ज्यामुळे समाजाने त्यांना ओळखावे व त्यांच्यांपासून सावध राहावे.
 
नव्हे चेटकी चाळकु द्रव्यभोंदू।
नव्हे निंदकु मत्सरू भक्तिमंदु।
नव्हे उन्मत्तु वेसनी संगबाधु।
जगीं ज्ञानिया तो चि साधु अगाधु॥१८१॥
 
नव्हे वारुगी चाहुरी काम पोटी।
क्रियेवीण वाचाळता ते चि मोठी।
मुखे बोलिल्यासारखे चालताहे।
मना सद्गुरू तो चि शोधूनि पाहे॥१८२॥
 
अगाध ज्ञानी, सज्जन, बोलल्याप्रमाणे प्रत्यक्ष आचरण करणारा सद्गुरू शोधला पाहिजे. तो कधीही चेटुक करणारा, फसवणूक करणारा, खोटे बोलणारा, निंदा व मत्सर करणारा, भक्तीचा लवलेश नसलेला, स्वतःच्याच धुंदीत असणारा, मग्रुर, तसेच आपण व्यसनाधीन असून, दुसर्‍यांना बिघडवणारा असा असूच शकत नाही. गुरू हा निष्कारण चावटपणे वायफळ बडबड करणारा नसावा. कारण अशा माणसाच्या अंतरंगात, वासना पुरेपूर भरलेली असते. त्याची कृती शून्य असते, पण बडबडणे, बडेजाव सांगणे हे मात्र तो मोठ्या प्रमाणावर करत असतो. त्याचप्रमाणे, बोलण्यासारखे त्याचे आचरण नसते. लोकांना तो उपदेशाचे डोस पाजतो, पण त्याच्या ठिकाणी त्या गुणांचा अभावच असतो. तेव्हा आत्मज्ञान आत्मसात केलेला, लोकांना ते समजावून सांगणारा आणि त्याप्रमाणे स्वतः वागणारा, आचारशील असा सद्गुरू शोधला पाहिजे. त्यातच खरे कल्याण आहे. असे महात्मे दुर्लभ असतात. माणसाने भोंदू गुरूंना ओळखून त्यांच्यापासून दूर राहावे, हे सांगण्यासाठी वरील तीन श्लोक स्वामींनी विस्ताराने लिहिले. गुरूपदाला लायक पुरुषाची लक्षणे, स्वामींनी यापुढील श्लोकात सांगितली आहेत. ती पुढील लेखात सविस्तर पाहू. (क्रमशः)
 
 
सुरेश जाखडी
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121