नवी दिल्ली : (Dr.Tara Bhawalkar speech Delhi) " लोकसंस्कृतीची व्याख्या केवळ ग्रामीण आणि जुनी असा समाज आपल्याला बघायला मिळतो परंतु ते वास्तव नसून, आपली लोकसंस्कृती सर्वव्यापी आहे. माणसांच्या अस्तित्वाला व्यापनारी आहे असे प्रतिपादन ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा भवाळकर यांनी केले. नवी दिल्ली येथील, तालकटोरा स्टेडियम, छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी येथे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सूत्र हाती घेताना त्या बोलत होत्या. ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पाहिल्या दिवसातील दुसऱ्या उद्घाटन सत्रात अध्यक्षपदाचा हस्तांतरण सोहळा पार पडला.
९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे यांनी अध्यक्षपदाची सूत्र डॉ. ताराबाई भवाळकर यांच्याकडे सुपूर्द केली. आपल्या पूर्वाध्यक्ष भाषणात रवींद्र शोभणे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या पार्श्वभूमीवर साहित्य संमेलनाच्या कार्याची व्याप्ती लोकांसमोर मांडली, त्याच बरोबर साहित्य संमेलनाच्या इतिहासाचा परिचय श्रोत्रवृंदाला करून दिला. आपल्या अध्यक्षीय भाषणात लोकसाहित्य आणि लोक संस्कृतीची व्याप्ती सांगताना ताराबाई म्हणाल्या " भारतीय संदर्भा मध्ये लोक हा शब्द आदरवाचक म्हणून वापरला जातो. आपल्याकडे लोकसाहित्य म्हणजे केवळ लिखित स्वरूपातील साहित्य नाही तर यामध्ये निरनिराळ्या चालीरीती, रूढी परंपरा यांचा समावेश आहे. आपल्याकडे लोककथा आणि लोकगीत हे शब्द प्रथम इतिहासाचार्य राजवाडे यांनी वापरले, त्यांच्यानंतर लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती हे शब्द प्रचलित झाले." त्याचबरोबर ताराबाई भवाळकर यांनी साहित्य संमेलनाच्या बदलणाऱ्या प्रवाहावर भाष्य केले. भाषा हे संस्कृतीचे वाहक असून निरनिराळ्या पातळीवर असलेले भाषेचे महत्व त्यांनी सांगितले. मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात भाषेच्या दर्जावर भाष्य करताना त्या म्हणाल्या की " मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा मलाही आनंद झाला. शासकीय दर्जा मिळाल्याने महाराष्ट्रातील मराठी लेखकांना संशोधकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे."